गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

डिजीटल युग अन् प्रसारमाध्यमांचे भवितव्य

(संपादक मित्रवर्य श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या 'अक्षरभेट' या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख 'अक्षरभेट'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी सप्रेम पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


जगभरातील प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात खळबळ माजवणारी एक घटना सन २०१३मध्ये घडली. म्हटली तर अपेक्षित, म्हटली तर अत्यंत अनपेक्षित आणि त्याहूनही धक्कादायक अशी ती घटना होती. ॲमेझॉन डॉट कॉमया ई-कॉमर्सच्या क्षेत्रातल्या दादा कंपनीकडून वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतल्या सुमारे १४० वर्षांच्या आजोबा दैनिकाची झालेली खरेदी. १९९४मध्ये जन्माला आलेल्या ॲमेझॉन कंपनीनं १८७७पासून अमेरिकेसह जगभरात पत्रकारितेच्या क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट सुमारे २५० मिलीयन डॉलर्सला खरेदी केलं. तसंही पोस्ट नुकसानीच्या गर्तेत गोते खात होतंच. त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज होतीच. ती गरज ॲमेझॉननं पुढं होत पूर्ण केली, इतकंच. हिमनगानं हिमालयाला आधार दिला, असं या घटनेचं तेव्हा वर्णन केलं गेलं. या घटनेनं जगाला एक नवं पर्व सुरू होत असल्याचे संकेत दिले. विशेषतः प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात तर नजीकच्या काळात अनेक बदल होऊ घातल्याचे हे संकेत होते. हे बदलही सर्वांगीण स्वरुपाचे आहेत. ते केवळ माहिती तंत्रज्ञानात्मक नाहीत, तर मनुष्यबळ व्यवस्थापनापासून ते अनेक मूलभूत संरचनात्मक बदलही घडवून आणणारे आहेत.
ॲमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बिझॉज यांनी त्या बदलांची चुणूक गेल्या दोन—तीन वर्षांत दाखवून दिली आहे. वॉशिंग्टन पोस्ट ताब्यात घेतल्यानंतर या व्यवहाराबद्दल एका मुलाखतीत बिझॉज सांगतात की, मला वृत्तपत्र व्यवसायाबद्दल काडीमात्र माहिती नव्हती. मात्र, मला इंटरनेट म्हणजे काय, हे उत्तम प्रकारे माहीत होतं आणि या आत्मविश्वासाच्या बळावरच हा व्यवहार केला.साहजिकच दरम्यानच्या कालावधीत बिझॉज यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचं एका माध्यम व तंत्रज्ञान कंपनीत यशस्वी रुपांतर केल्याचं दिसून येतं. वृत्तपत्राच्या संपादकीय ध्येयधोरणांशी बिझॉजला काहीही देणंघेणं नाहीय. मात्र, व्यवसाय आणि तंत्रज्ञानात्मक वृद्धीकडं त्याचा कटाक्ष आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पोस्टच्या वेबसाईटचं रुप पूर्णतः पालटण्यात आलं. कंपनीनं विविध ॲप्लीकेशन्स (ॲप्स) तयार केले. त्याचबरोबर आर्क हे मार्केटिंगसाठी उत्तम विश्लेषण पुरविणारं एक उत्तम सॉफ्टवेअरही तयार केलं. यामुळं डाटावर आधारित दृष्टीकोन विकसित झाला, ज्याच्या आधारे कोणत्या न्यूजस्टोरीला कशा प्रकारे प्रेझेंट केल्यानंतर वाचक त्याकडे आकर्षित होतो, याचं विश्लेषण करणं सोपं झालं. आता पोस्टमध्ये सातशेहून अधिक कर्मचारी काम करताहेत. इथल्या अभियंत्यांची टीम तर गेल्या दोन वर्षांतच तिप्पट झाली आहे. सिलीकॉन व्हॅलीतल्या कुठल्याही अभियंत्याला अंगावर घेण्याची या टीममध्ये क्षमता आहे, असा अभिमान बिझॉज यांना त्यांच्याबद्दल आहे. या सगळ्या गोष्टींवर काम केल्यानंतर त्यांनी आता संपादक व वार्ताहरांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळं आता पोस्ट दिवसाला सरासरी बाराशे विविध प्रकारचे लेख प्रसिद्ध करते. फोटोफीचर्सची संख्याही लक्षणीय आहे. मीडिया डिस्ट्रीब्युशनसाठीही त्यांनी जोमदार प्रयत्न केले. फेसबुक, ट्विटरसह समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्याबरोबरच ॲमेझॉनच्या फायर टॅबलेट्समध्येही वॉशिंग्टन पोस्टचं प्रि-इन्स्टॉल्ड ॲप त्यांनी उपलब्ध केलं आहे. परिणामी, सन २०१५मध्येच वॉशिंग्टन पोस्टनं वितरण व वाचकसंख्येच्या बाबतीत न्यूयॉर्क टाइम्सला पुन्हा एकदा मागं टाकून वरचं स्थान पटकावलं.
वॉशिंग्टन पोस्टचं उदाहरण सुरवातीलाच इतक्या सविस्तरपणानं देण्याचं कारण म्हणजे प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रावर आता तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण होणारं अर्थकारण या दोहोंचं एकत्रित अथवा स्वतंत्रपणानं वर्चस्व निर्माण होतं आहे. त्याचप्रमाणं माहिती तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारे तंत्रज्ञान यामुळं सर्वसामान्य वाचकाचा, वापरकर्त्याचाही या कन्टेन्टच्या निर्मितीमध्ये आता महत्त्वाचा सहभाग असणार आहे. आता केवळ एकतर्फी माहितीचे वहन होणार नाही. तिच्या दुतर्फा वहनास सुरवात झालेली आहेच, तिला नजीकच्या काळात अधिक गतिमानता येणार आहे.
डिजीटल तंत्रज्ञानानं गेल्या तीनेक दशकांत मानवी जीवनात घडवून आणलेल्या क्रांतीचं हे उदाहरण आहे. संवाद ही मानवाची मूलभूत गरज आहे. त्या गरजेपोटीच आदिम काळातील चित्रलिपीपासून ते आजपर्यंतच्या अनेक भाषा, लिप्यांची निर्मिती झाली. छपाईच्या शोधानं मानवाच्या या संवाद प्रक्रियेला खरी गती आली. जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावलेल्या छपाई तंत्राच्या शोधामुळं जगाच्या संवाद प्रक्रियेला गतिमानता प्रदान केली. औद्योगिक क्रांतीनंतर नवतंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या चालनेतून पुढे माध्यमांचं क्षेत्र अधिकच व्यापक होत राहिलं, विस्तारत गेलं. दूरध्वनीपासून ते दूरचित्रवाणी अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत हे क्षेत्र विस्तारलं. मानवाची माहितीची भूक भागविण्यासाठी अखंडितपणे ही माध्यमं सेवारत झालीआजही आहेत.
संगणक आणि त्यानंतर इंटरनेटच्या शोधानं या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला एक नवा आयाम मिळवून दिला. किंबहुनाया दोन गोष्टींच्या आस्तित्वाखेरीज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रच अस्तित्वात येऊ शकलं नसतं. डिजीटल हा शब्दच मुळी संगणकाशी संबंधित आहे. संगणकाला भाषा कळते तीच मुळात शून्य (०) आणि एक (१) यांच्या दोन डिजीट्सच्या स्वरुपातील. या भाषेला बायनरी भाषा म्हणतात. या दोन डिजीट्सच्या वापरातून ज्या ज्या बाबी निर्माण होतात, त्या डिजीटल होत. पूर्वी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक स्वरुपातील ॲनालॉग फॉर्मेट ध्वनी, दृश्ये यांच्या अंकनासाठी वापरले जात. त्यामध्येही वेगवेगळे प्रकार होते. त्या एका फॉर्मेटचे अन्य फॉर्मेटमध्ये रुपांतरण ही खूपच जिकीरीची बाब असे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे मात्र हे रुपांतरण अत्यंत सोयीचे बनले. हाच आपल्या डिजीटायझेशनचा कालखंड होय. अशा प्रकारे काळानुरुप होत गेलेलं माध्यमांतर हा मानवजातीच्या प्रगतीमधीलविकासामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहेअसं म्हटल्यास अतिशयोक्तीचं ठरणार नाही. परंतु, गुटेनबर्गनंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमं आस्तित्वात येण्याच्या दरम्यान सुमारे साडेतीनशे वर्षांचा काळ लोटलापण त्यानंतर अवघ्या साडेतीन दशकांमध्ये माध्यमांनी ज्या गतीनं आपलं रुप पालटलं आहेती गती अचंबित करणारी आहे. आणि हे गतिमानतेचं चक्र केवळ इंटरनेट, डिजिटलायझेशन आणि त्यांच्याशी संबंधित अनेकविध शोधांमुळंच तसं राहू शकलेलं आहे.
नाविन्याच्या स्वीकारात अग्रेसर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रावर उपरोक्त बाबींचा प्रभाव व परिणाम होणे ही स्वाभाविक बाब होती. मुद्रित माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर अर्थात रेडिओ आणि दूरचित्रवाणीमध्ये डिजीटायझेशनमुळे अनेक गुणात्मक बदल घडून आले. या नवतंत्रज्ञानाने प्रदान केलेल्या गतिमानतेमुळे या क्षेत्रांमध्ये लवचिकता आली. इंटरनेटमुळे ग्लोबल खेडे बनलेल्या या जगाला स्मार्ट टेलिफोनीच्या तंत्रज्ञानाने अधिकच जवळ आणले. समाजमाध्यमांच्या विकासाने तर संवादक्रांतीला अनेक नवे आयाम प्राप्त करून दिले.
इंटरनेट आणि समाजमाध्यमे यांच्या संयोगातून विकसित झालेल्या नवमाध्यमांना माध्यम क्षेत्रात आता नेक्स्ट मीडिया म्हणूनही संबोधले जाऊ लागले आहे. याचं कारण असं की, डिजीटलायझेशनमुळं पारंपरिक माध्यमे आणि नवमाध्यमे ही आता एकाच प्लॅटफॉर्मवर, हातातल्या मोबाईलच्या किंवा पी.सी.च्या एकाच स्क्रीनवर आपल्याला उपलब्ध होऊ लागली आहेत. हे माध्यमांतर क्रांतीकारक आहे. एखाद्या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर आपल्याला जसे फोटो पाहता येतात, तसेच एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे व्हिडिओ सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध होतात. एखाद्या वाहिनीच्या साइटवर त्यांच्या व्हिडिओ क्लिप्सबरोबरच संबंधित घटनेची लिखित माहिती छायाचित्रांसह पाहायला मिळू शकते. म्हणजे प्रत्येक माध्यमाने आपल्या मूळ माध्यमाच्या मर्यादा ओलांडून अन्य माध्यमांचा आधार घ्यायला सुरवात केली आहे. किंबहुना, नवमाध्यमांनी त्यांना या बदलाची संधी उपलब्ध केली आहे. तथापि, आता बदल एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. पारंपरिक माध्यमांनी समाजमाध्यमांमधूनही वाचकांशी जोडले जाण्यास सुरवात केली आहे. फेसबुक, ट्विटर यांच्यासह विविध प्लॅटफॉर्मवर ही माध्यमे सातत्याने वाचकांना ताजी, लेटेस्ट माहिती देत आहेत. ट्विटरवर सेकंदाला सहा हजार ट्विट्स, फेसबुकवर मिनिटाला चाळीस लाख लाइक्स, तर वॉट्सअपवरून दिवसाला ६० अब्ज संदेशांची देवाणघेवाण होत आहे. ही आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. ट्विटरवर प्रसारमाध्यमे आणि या क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक जण सातत्याने आपल्या अधिकृत हँडलवरुन ताजी माहिती अपडेट करतात. त्यामुळे वापरकर्त्यांना तत्काळ ती माहिती उपलब्ध होते आहे. ब्लॉगच्या माध्यमातूनही अनेक पत्रकारांबरोबरच सामान्य वापरकर्तेही वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतात. माध्यमांच्या साईट्सवरही आता त्यांच्याशी संबंधित संपादक, प्रतिनिधी यांचे विश्लेषणात्मक ब्लॉग लिहीले जाताना दिसताहेत.
याचा पुढचा टप्पाही आता स्मार्टफोन ॲपच्या द्वारे वापरकर्त्यांना उपलब्ध झालेला आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या पोर्टलवरुन लेटेस्ट न्यूज अपडेट्स संकलित करून एकाच ठिकाणी उपलब्ध करणारी अनेक ॲप्स आहेत. त्याचप्रमाणे आता हॉटस्टार, जीओ टीव्ही यांसारखी अनेक ॲप्स अशी आहेत की, जिथे आता कोणत्याही वाहिनीवरील कोणताही कार्यक्रम वापरकर्ता आपल्या सोयीने कोणत्याही वेळी पाहू शकतो. इतके स्वातंत्र्य या नवमाध्यमांमुळे वापरकर्त्यांना मिळालेले आहे.
तिसरा ट्रेंड आहे तो केवळ ऑनलाइन पोर्टल किंवा ॲप तयार करून केवळ त्याद्वारे बातमी, लेख, फीचर, ऑडिओ, व्हिडिओ तयार करून ते शेअर करण्याचा. व्यक्तीगत पातळीवर सुद्धा असा प्लॅटफॉर्म निर्माण करणे आता फारसे अवघड राहिलेले नाही. विशेषतः स्थानिक पातळीवरील माहितीच्या आदान-प्रदानासाठी अशा प्रकारचे अनेक प्लॅटफॉर्म ऑनलाइन स्वरुपात उदयास येत असलेले दिसतात.
पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत या नवमाध्यमांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे यांमध्ये आता प्रत्येक वापरकर्ता (युझर) हा माध्यमकर्ता (कॉन्ट्रीब्युटर) बनला आहे. हातातल्या स्मार्टफोनमुळे तो त्याला उपलब्ध असलेल्या अनेकविध समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरुन जशी त्याला हवी ती माहिती घेऊ शकतो, त्याचप्रमाणे विविध प्रकारची माहिती त्याद्वारे शेअरही करू शकतो. जे रोसेन म्हणतात त्याप्रमाणे लोकांना पूर्वी ऑडियन्स म्हटले जायचे. याचा अर्थच असा की, आता लोक केवळ प्रेक्षक, श्रोते किंवा वाचक राहिलेले नाहीत. ते स्वतः आता या नवमाध्यमांच्या द्वारे जगाला माहिती देण्यास सक्षम बनले आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की, माध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक माध्यमकर्मीची जबाबदारी आता दुपटीने वाढलेली आहे. वापरकर्त्यांचा वेग वाढल्यामुळे माध्यमांनाही त्यांची गती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. तथापि, केवळ गती वाढविली म्हणजे झाले, असे मात्र नाही. माहिती कितीही गतीने दिली जात असली, प्राप्त होत असली तरी, तिच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्याची जबाबदारी माध्यमांवरच येते.
नवमाध्यमांमुळे पारंपरिक माध्यमांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे, असे मात्र नाही. गेल्या शतकात रेडिओचे आगमन झाले, तेव्हा मुद्रित माध्यमांचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तविली गेली. दूरचित्रवाणीचे आगमन झाले, तेव्हा, रेडिओ आणि मुद्रित माध्यमांचे अस्तित्व संपेल, अशीही शक्यता वर्तविली गेली. मात्र, दोन्ही वेळेला तसे झाले नाही. उलट, या सर्वच माध्यमांचे क्षेत्र, व्याप्ती आणि अवकाश हा परस्परपूरक ठरत गेला आणि त्यातून त्यांची वृद्धीच झाल्याचे दिसून आले. आताही तसेच होईल, अशी चिन्हे आहेत. आजचे युग हे वर म्हटल्याप्रमाणे माध्यमांतराचे आहे. प्रत्येक माध्यम हे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या कक्षा विस्तारण्याबरोबरच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, हे निश्चितच आहे. नवमाध्यमांच्या द्वारे होणारे बदल स्वीकारत जे पुढे जात राहतील, त्यांची प्रगती होतच राहणार आहे. जे बदलणार नाहीत, होणारे बदल स्वीकारणार नाहीत, ते लयाला जाणारच आहेत. मोठ्या झपाट्याने जगभर विस्तारलेली मात्र न बदलणारी, लवचिक नसणारी  समाजमाध्यमे (उदा. ऑर्कुट) नष्ट झाल्याचे गेल्या दशकभरात आपण पाहिलेच आहे. बदल न स्वीकारणाऱ्या प्रसमारमाध्यमांनाही हेच लागू आहे.
नवमाध्यमांच्या या युगात प्रसारमाध्यमांना आणखी एका गोष्टीचा स्वीकार करावा लागणार आहे, ती म्हणजे सिटीझन जर्नालिझम. वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या माहितीचाच आधार घेऊन पत्रकारिता करण्याचे युग येऊ घातले आहे. किंबहुना, दक्षिण कोरियाच्या ओह-माय-न्यूज या वृत्तपत्राने त्याची पायाभरणी आधीच करून ठेवली आहे. या वृत्तपत्रात एकही पत्रकार नियुक्त करण्यात आलेला नाही. या वृत्तपत्रातील तथा त्याच्या पोर्टलवरील शंभर टक्के माहिती त्यांचे सिटीझन जर्नालिस्टच कॉन्ट्रीब्युट करतात. केवळ ५५ लोकांच्या स्टाफच्या बळावर त्यांनी सांभाळलेल्या या व्यापाकडे जगातील सिटीझन जर्नालिझमचे एक यशस्वी मॉडेल म्हणून पाहिले जाते. सीएनएनचे आय-रिपोर्ट, मी-पोर्टर, ग्लोबल व्हॉईस अशी सिटीझन जर्नालिझमला प्रोत्साहन देणाऱ्या पोर्टलची काही अन्य उदाहरणेही जगाच्या पाठीवर आहेत.
भारतात मोठी संधी असूनही सिटीझन जर्नालिझम म्हणावे तितके गतीने विकसित झालेले नाही. मात्र, सध्या माध्यम क्षेत्रात व्यावसायिक अंगानं होत असलेले बदल पाहता हळू हळू आपल्या देशातील प्रसारमाध्यम क्षेत्राची वाटचाल न्यूक्लिअर मालकी असणाऱ्या साखळी वृत्तपत्रसमूहाच्या दिशेने होताना दिसते आहे. अशा वेळी मल्टीमीडिया ॲप्रोच ठेवून काम करीत असताना केवळ मल्टीटास्किंग कुशल आणि कार्यक्षम लोकांनाच यापुढे माध्यम क्षेत्रात संधी राहणार आहे. कमीत कमी मनुष्यबळाच्या आधारावर जास्तीतजास्त आऊटकम बेस्ड काम करवून घेण्याकडे सर्वच क्षेत्रांचा कल वाढत असल्याने त्याला माध्यम क्षेत्र अपवाद असेल, अशी भाबडी आशा बाळगणे चुकीचे आहे. त्यामुळे कमी केलेल्या मनुष्यबळाची पोकळी भरून काढण्यासाठी सिटीझन जर्नालिझमकडे या क्षेत्राला निश्चितपणे वळावे लागणार आहे. प्रत्येक सर्वसामान्य वापरकर्त्याला सिटीझन जर्नालिस्ट म्हणून काम करण्याची मोठी संधी पुढील काळात उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. प्रसारमाध्यमांना मात्र त्या दृष्टीने युझर जनरेटेड कन्टेन्टच्या एडिटिंगवर अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. सिटीझन जर्नालिस्टकडून आलेल्या रॉ-फीडची शहानिशा करण्याबरोबरच त्या संदर्भातील अधिक पूरक माहिती घेऊन ती आकर्षक पद्धतीने बहुमाध्यमी वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना पेश करण्यासाठी अधिक काम करावे लागणार आहे.
सिटीझन जर्नालिझमचा हा पाचवा स्तंभ आकाराला येत असला तरी मुख्य प्रवाहातील पत्रकारितेला संपूर्णतया तो बाजूला करील, असे मात्र होणार नाही. त्याचे स्वरुप पूरकच राहील. याचे कारण असे की, नवमाध्यमांच्या आधारे देण्यात येणाऱ्या माहितीचे, घटना-घडामोडींचे स्वरुप हे फार मोठे, व्यापक असण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे सिटीझन जर्नालिस्ट हे कॉन्ट्रीब्युटर असले तरी, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला मर्यादा आहेतच. या मर्यादांच्या पलिकडचे अधिक मोठ्या, व्यापक स्टोरी करण्याचे अवकाश हे पत्रकारांसाठी खुले आहेच. सिटीझन जर्नालिझम, नवमाध्यमे यांवरील संतुलन सांभाळत या उपलब्ध खुल्या अवकाशात भरारी मारण्यास सज्ज असणाऱ्या पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांचे भवितव्य कालही उज्ज्वल होते, आजही आहे आणि उद्याही उज्ज्वलच असणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा