मैत्री दिनाच्या
पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी
माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर करावीशी वाटते... यातला एक जण शिक्षण क्षेत्रातल्या उच्चतम कुलगुरू पदावर... तर
दुसरा अल्पसंख्याक समाजातला अल्पशिक्षित... चहाचा गाडा चालवून कुटुंबाचा
उदरनिर्वाह करणारा... दोघांच्या सामाजिक-आर्थिक स्तरामध्ये, स्टेटसमध्ये
जमीन-अस्मानाचा फरक... तरीही दोघांतले मैत्रीचे बंध मात्र अतूट आणि सर्व तथाकथित
स्तरांच्या, मान्यतांच्या पलिकडले!
ही गोष्ट आहे, शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि औरंगाबादमध्ये चहाचा स्टॉल चालविणारे त्यांचे
मित्र जाफरभाई शेख यांच्या मैत्रीची! मला ती समजली, कुलगुरू
महोदयांचे ड्रायव्हर श्री. प्रल्हाद गंगाधरे यांच्याकडून! काही
दिवसांपूर्वी प्रल्हाद हे कुलगुरू डॉ. शिंदे यांना घेऊन औरंगाबादला गेले होते.
त्यावेळी सरांना कॉफी घ्यावयाची असल्याने त्यांच्या पदाला साजेसे असे हॉटेल प्रल्हाद
शोधत होते. अहिल्याबाई होळकर चौकात गाडी आल्यानंतर कुलगुरूंनी बाजूलाच असलेल्या
एका टपरीच्या शेजारी कार थांबविण्यास सांगितले. सरांना काही तरी घ्यावयाचे असेल,
असे समजून त्यांनी गाडी बाजूला घेतली. काही विचारणार इतक्यात सरांनी काच खाली करून
'मामू...' अशी हाक मारली. हाक ऐकून
४०-४५ वर्षे वयाची एक व्यक्ती चहाच्या टपरीतून लगबगीने गाडीकडे धावत आली. ते
जाफरभाई होते... त्यांनी सरांना नमस्कार केला आणि कॉफी घेण्याची विनंती केली. कॉफी
गाडीत न मागविता सर थेट गाडीतून उतरले आणि 'जनता टी हाऊस' नावाच्या त्या टपरीत गेले. जेमतेम आठ बाय आठची ती टपरी... चहा बनविण्याचे
साधन.. शेगडी आणि पाण्याचा पिंप एवढीच सामग्री असलेली... जाफरभाई कॉफी बनवू
लागले... कुलगुरू महोदय, तिथल्याच एखा खुर्चीवर बसले... जाफरभाईंच्या घरच्यांची
ख्यालीखुशाली त्यांनी विचारली... तोपर्यंत जाफरभाईच्या टपरीत बघ्यांची मोठी गर्दी
झाली... या फाटक्या टपरीत चहा प्यायला मोटारीतून कोण एवढा मोठा माणूस आलाय, ते
पाहायला!... पण, या दोन मित्रांना त्याची फिकीर नव्हती...
बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं दोघंही गप्पांत रमले... जाफरभाईंनी सरांना कॉफी
दिली... प्रल्हादनं विनंती करून दोघांची काही छायाचित्रं त्याच्या मोबाईलमध्ये
घेतली... सरांच्या या अनोख्या पैलूनं भारावलेल्या प्रल्हादनं
दौऱ्यावरुन परतल्यानंतर आवर्जून माझी भेट घेऊन कुलगुरू आणि जाफरभाईंच्या
मैत्रीचा किस्सा सांगितला...
आजच्या काळात असं मैत्र आढळणं, ही तशी दुर्मिळच बाब…
म्हणून मी प्रल्हादला सांगून जाफरभाईंचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि या संदर्भात त्यांच्याशी
मोबाईलवरुन आणखी बोललो… सरांच्या आणि त्यांच्या मैत्रीविषयी विचारताच जाफरभाई भरभरून
बोलू लागले… "देवानंद सर के बारे में मैं आपको क्या बताऊँ, सर!
इन्सान के रुप में भगवान समान हैं वो आदमी। उसके जहन में कोई जातपात
नहीं, कोई ऊँचा-नीचा, बडा-छोटा नहीं। सारे एक समान हैं। आदमी एक बार बडा बन जाए तो
पलट के नहीं देखता। टालने के लिए रास्ता बदल देता है। लेकिन ये सर, जब भी आएँगे
मिले बिना नहीं जातें, आज कुलगुरू हो जाने के बाद भी।"
जाफरभाई भरभरून बोलतच राहिले.
बोलण्याच्या ओघातच त्यांनी
दोन गोष्टी सांगितल्या. डॉ. देवानंद शिंदे यांनी घरी भेट दिल्याशिवाय त्यांच्या
घरी ते ईद साजरी करत नाहीत. "सर जैसे नेक इन्सान हमारे
घर आते हैं, वो दिन ही हमारे लिए ईद का होता है। बस, ईसी साल ऐसा हुआ के सर बाहर
देश गए थे और ईद के लिए नहीं आ सके।"
सर कुलगुरू व्हावेत, म्हणून
थेट अजमेर शरीफ दर्ग्यात दुआ मागणारे जाफरभाई अल्लाने आपली दुआ कबूल केली म्हणून
त्याचे लाख लाख शुक्रिया अदाही करतात. "अल्ला करे, देवानंद सर
जिंदगी में सफलता की और भी सिढीयाँ चढें और उनके जैसा बनने के लिए समाज को प्रेरित
करते रहें।" अशी सदिच्छाही व्यक्त करतात.
या आधुनिक कृष्ण-सुदाम्याचं
मैत्र असंच अखंडित राहो, ही सदिच्छा आपणही सारे मैत्री दिनाच्या निमित्ताने व्यक्त
करू या!!!
(जाफरभाईंचा भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०३४५३३३)

