| डॉ. प्रकाश पवार |
कोल्हापूर, दि. ४ मे: विज्ञानवादी विवेकनिष्ठ विचारसरणीचा प्रसार हा सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार आज केले.
आ’लोकशाही
वाहिनीवरील डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत ते ‘भारताचा विज्ञानवाद’ या
विषयावर बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय समाजातील अंधश्रद्धा, परंपरा
आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला.
महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, राजर्षी
शाहू महाराज, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या
विचारांमधून विज्ञानवादी परंपरेचा विकास त्यांनी स्पष्ट केला. विवेकनिष्ठा, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगमच भारताच्या
प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
डॉ. प्रकाश पवार यांनी भारतीय
समाजरचनेतील विचारपरंपरा आणि वैज्ञानिक दृष्टी यांचा सखोल परामर्श घेतला. त्यांनी
सांगितले की, विज्ञानवाद म्हणजे केवळ तांत्रिक
प्रगती नसून ती एक जीवनदृष्टी आहे, जी
तर्क, प्रयोग आणि पुराव्यावर आधारलेली असते. भारतीय समाजात आजही अंधश्रद्धा, रूढी
आणि अवैज्ञानिक विश्वास यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे खऱ्या
अर्थाने प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे गरजेचे आहे.
समाजातील शिक्षण, माध्यमे आणि सार्वजनिक संवाद यामध्ये
विज्ञानवादी विचार रुजविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्याख्यानादरम्यान त्यांनी विज्ञानवाद
आणि मानवी मूल्ये यांचा संबंध स्पष्ट करताना, वैज्ञानिक
दृष्टिकोन हा लोकशाही, समानता आणि मानवतावाद यांना बळकटी
देणारा घटक असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताच्या सर्वांगीण विकासासाठी
विज्ञानवादी विचारसरणी स्वीकारणे अपरिहार्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला.
यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले.
--
सविस्तर व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा