सोमवार, २६ जानेवारी, २०२६

विश्वकोश हा माहितीच्या लोकशाहीकरणाचा महत्त्वाचा प्रकल्प: डॉ. आलोक जत्राटकर

आजरा महाविद्यालयात विज्ञान नोंदलेखन कार्यशाळा

आजरा येथे आयोजित मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेत उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. अशोक सादळे, डॉ. रविंद्र घोडराज, डॉ. स्नेहा खोब्रागडे, कृष्णा येसने, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. विजय लाळे.

आजरा येथे आयोजित मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेत डॉ. आलोक जत्राटकर यांचे स्वागत करताना डॉ. अनिल देशपांडे. मंचावर (डावीकडून) डॉ. अशोक सादळे, डॉ. रविंद्र घोडराज, डॉ. स्नेहा खोब्रागडे, कृष्णा येसने, डॉ. विजय लाळे.

आजरा येथे आयोजित मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेत उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. अशोक सादळे, डॉ. रविंद्र घोडराज, डॉ. स्नेहा खोब्रागडे, कृष्णा येसने, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. विजय लाळे.

आजरा येथे आयोजित मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेत उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. स्नेहा खोब्रागडे, कृष्णा येसने, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. विजय लाळे.


कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: मराठी विश्वकोशाच्या नोंदलेखकांना माहितीच्या लोकशाहीकरणाच्या राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाचे भागीदार होण्याची संधी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आज आजरा येथे केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि आजरा महाविद्यालय, आजरा येथील मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी विश्वकोश विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जनता एज्युकेशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. जत्राटकर म्हणाले, वर्तमानात माहिती पुरविणारी अनेक साधने मानवाच्या हाती असली तरी माहितीचे अधिकृत स्रोत हे विश्वकोश आहेत. समाजमाध्यमे अर्धवट, चुकीची अथवा एकदम खोटी माहितीही पसरवित आहेत. आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खऱ्या माहितीशी जोडण्याचे काम विश्वकोश करते. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदलेखकांवर वस्तुनिष्ठ, पारदर्शक आणि निष्पक्ष माहिती संकलित करण्याची जबाबदारी आहे. त्यातही कुमारकोश हा १४ ते १८ या वयोगटातील नवतरुण वर्गासाठी आहे. त्यामुळे विश्वकोशाच्या मूल्यांशी, संदर्भांशी तडजोड न करता या वर्गाला रुचेल, आवडेल अशा शब्दांत माहिती देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९८०मध्ये कुमारकोशाच्या १२ खंडांची संकल्पना सविस्तर मांडली आहे. त्यामधील जीवसृष्टी आणि पर्यावरण कोश हा चार खंडांमध्ये साकार झाला आहे. त्यामुळे उर्वरित ११ खंड गतीने पूर्ण करण्याची जबाबदारी नोंदलेखकांवर आहे. ती ते सुनियोजितरित्या पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रोजच्या जीवनव्यवहारात व्हॉट्सअप विद्यापीठाच्या आहारी न जाता अधिकृत माहितीचा स्रोत म्हणून विश्वकोश हाताळले पाहिजेत, असे सांगून डॉ. जत्राटकर पुढे म्हणाले की, एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिकाच्या धर्तीवर निर्माण केलेल्या या मराठी विश्वकोशास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारतीय चेहरा प्रदान केला आहे. विश्वकोशामध्ये नोंदलेखन करण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाने संबंधित विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, लेखक व संशोधकांचे सहाय्य घेण्याचे ठरवले आहे. नोंदलेखन करत असताना ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे. सत्याशी कोणतीही तडजोड न करता, सत्यापलाप होऊ न देता नोंदलेखन केले पाहिजे. नोंदलेखन करताना पूर्वग्रहाचा प्रभावही असू नये, असेही ते म्हणाले.

तीन सत्रामध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेत डॉ. होमी भाभा संशोधन केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विजय लाळे, विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा खोब्रागडे आणि डॉ. रवींद्र घोडराज यांनी नोंद लेखनासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यशाळेस जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. कृष्णा येसणे, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह गडहिंग्लज,आजरा, चंदगड, गारगोटी परिसरातील सत्तरहून अधिक प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी केले, तर कार्यशाळेचे समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार मानले.

रविवार, ११ जानेवारी, २०२६

विठोबाचा ‘युटोपिया’...



कथा-कादंबऱ्यात अलिकडं जीव रमत नाही. वर्तमानातील भोवताल अस्वस्थकारक असताना कल्पनाविश्वात रमावं, अशी मनोवस्था नाहीय. मात्र, काही वर्षांपूर्वी डियर तुकोबा या कादंबरीकडं तिच्या नावामुळं खेचला गेलो होतो आणि ती वाचल्यानंतर तिच्या लेखकाकडं खेचला गेलो.

विनायक होगाडे या युवा लेखकाचा मी चाहता झालो आहे. त्याचं डियर तुकोबा वाचलं आणि तोच त्याला- मला जोडणारा धागा ठरला. ऐतिहासिक पात्रांची वर्तमानाच्या प्रतलावर फेररचना करीत मिथककथा, लोककथा, इतिहासातील नेमके संदर्भ यांचा अत्यंत चपखल वापर करीत कथाबीज फुलवत नेत वाचकाला आपसूक कह्यात घेणारे मर्मग्राही लेखन हे विनायकचे वैशिष्ट्य. तुकोबामध्ये त्याने संत तुकारामांची मीडिया ट्रायल ज्या पद्धतीनं मांडली आहे, तिला तोडच नाही. आता विनायकचीच ताजी कादंबरी वाचून पूर्ण झाली आहे.

तुकोबानंतर पुढचं पाऊल टाकताना विठोबा मिसिंग इन पंढरपूर या पुस्तकाची विनायकनं घोषणा केली होती, तेव्हापासूनच आता विठोबाचं तो काय करणार, हे वाचण्याची उत्सुकता लागून राहिली होती. त्या उत्सुकतेपोटीच पुस्तक प्रकाशित होताच मागवून वाचून संपवलं. एकच सांगतो, विनायक आपली अजिबात निराशा करीत नाही. आजच्या तरुणाईला संतपरंपरा समजून घ्यायची, तर त्यांचं समग्र साहित्य किमान नजरेखालून घालणं आवश्यकच ठरतं. तथापि, विनायक त्यांचा हा भार थोडा हलका करतो आणि या मुलांनी किमान विठोबा वाचलं, तरी त्यांना आपल्या या परंपरेची एक झलक निश्चितपणानं समजून घेता येऊ शकेल, अशी मांडणी करतो. मात्र ही मांडणी ओढूनताणून येत नाही, तर कथाबीजाची आवश्यकता म्हणून हा काळाचा व्यापक पट आपल्यासमोर उलगडत जातो.

पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पनाच वेगळी आहे. आजवर संत विठोबाच्या वारीला येत आले आहेत. इथं मात्र साक्षात विठोबाच संतवारीला निघालेला आहे. तो का आणि कसा, हे कादंबरीतच वाचणं खरं रंजक आहे. समकाळासह भूत-वर्तमानाच्या पटलावर आंदोलने घेत अत्यंत गतीने या कादंबरीचा पट आकार घेत राहतो आणि आपल्यालाही विठोबासमवेत ही विस्मयकारक वारी घडवतो. समताग्रही संतांना सामाजिक आंदोलने आणि बहिष्कारांना तोंड देत आपले दायित्व वेळोवेळी सिद्ध करीत राहावे लागले. त्यांचा विषमतेवरील प्रहार, वंचितांप्रती कळवळा या साऱ्यांचा वेध विनायक इथे घेतोच, पण काळाच्या पटलावर या संतविचारांचा अनुयायांकडूनच झालेला पराभव, नैतिक मूल्यांची घसरण यावरही मर्मभेदी प्रकाश टाकतो. मुखी हरीनाम, संतविचार आणि कृतीमध्ये, आचरणामध्ये मात्र भेदाभेद अशा दांभिक विसंगतीमध्ये जगणाऱ्या या समाजाचे दर्शन इथे घडते. संतांच्या विचारांचं, उपदेशाचं आपण नेमकं काय करून ठेवलं आहे, त्याचा अत्यंत बोचरा वेध ही कादंबरी घेते आणि तीही विठोबाच्या परिप्रेक्ष्यातून.

अनेक संतांनी एका अशा नगरीची कल्पना केली आहे की, जिथे दुःख नाही, सुख आहे, आनंद आहे, समता आहे आणि म्हणूनच समाधान आहे. आजच्या भोवतालावर नजर टाकल्यानंतर विठोबालाही तशाच एका नगरीची आस लागून राहिलेली आहे. पण वास्तव काय आहे? हा युटोपिया प्रत्यक्षात येणार का? मानवी समाजानं ज्या दिशेनं वाटचाल चालवली आहे, ती पाहता तो युटोपियाच राहणार, हे खरं असलं तरी विनायकसारखे युवक त्यातला काही अंश सत्यात उतरविण्यासाठी आपापल्या परीनं कार्यरत आहेत, ही मोलाची, आशेची बाब आहे. या युवकांमधली ही सकारात्मकता, सामाजिक आस्था, कणव, संवेदनशीलतेनं समग्राकडं पाहण्याची दृष्टी हे सारं प्रचंड आश्वासक आहे. डियर तुकोबाप्रमाणंच हा विठोबाही नक्कीच इतिहास घडविणार आहे. विनायककडून अशा अनेकानेक दर्जेदार साहित्यकृतींची अपेक्षा आहे. खऱ्या अर्थानं बुद्धप्राप्तीच्या दिशेनं वाटचाल करणारा समकाळातला एक अतिशय महत्त्वाचा लेखक म्हणून त्याचा झालेला उदय मला खूप आश्वासक वाटतो.


विठोबा मिसिंग इन पंढरपूर

लेखक: विनायक होगाडे

प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन, पुणे

पृष्ठे: ३६७

किंमत: रु. ४००/-


मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

संवेदनशील माध्यमकर्मीचे जाणिवासमृद्ध लेखन

('दै. सकाळ'च्या साप्ताहिक 'सप्तरंग' या रविवार विशेष पुरवणीमध्ये 'समाज आणि माध्यमं' व 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकांविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी लिहीलेला परिचयपर लेख...)



शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि लेखक, वक्ते डॉ. आलोक जत्राटकर यांची ‘समाज आणि माध्यमं’ आणि ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. एका संवेदनशील आणि जबाबदार माध्यमकर्मीने केलेले अत्यंत जाणिवासमृद्ध आणि समाजभान विस्तारणारे असे हे लेखन आहे. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’चा शोध व वेध, त्यांचे समस्यासूचन आणि निराकरण यामध्ये त्यांना स्वारस्य आहे. या जाणिवांतूनच ही दोन्ही पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. या पुस्तकांना अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत, यावरून या दोन्ही पुस्तकांचा दर्जा लक्षात यावा.

डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा मुक्तचिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. विविध विषयांवरील लेख असले तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा त्यांत आहेत. लेखांमधील व्यक्तिगत संदर्भ व्यापक सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

संग्रहातील पहिल्याच लेखात ते निपाणी या शहराबद्दल, त्याने दिलेल्या संस्काराबद्दल ते आत्मीयतेने लिहितात. ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. ‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच जपावे, असे त्यांना वाटते. डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. यातील लेखांना सजग चिंतनाची बैठक आहे.

डॉ. जत्राटकर यांनी लिहिलेले 'समाज आणि माध्यमं' हे आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देणारे आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.

माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे. मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया अॅडिक्ट होत चाललेल्या समाजाने विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला हवे. दुभंगलेली माणसे, कुटुंबे, समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यम वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते. पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य केले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, महिला, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचायलाच हवे.

१.      ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे- १२६

किंमत- रु. २५०/-

 

२.      समाज आणि माध्यमं

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

अक्षर दालन, कोल्हापूर

पृष्ठे- १८४

किंमत- रु. ३००/-


 

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

ब्लॅक व्हाईट अन ग्रे’: सामाजिक समावेशनाबाबत जबाबदार भाष्य करणारा लेखसंग्रह

( ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ पुस्तकाविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रतिक्रिया...)



डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा चिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांच्या नावातच ‘लोक’ हा शब्द आहे आणि त्यांच्या सहवासातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण ‘लोक’ आहेत. शिवाय, ते संवेदनशील आणि जबाबदार पत्रकार असल्यामुळे त्यांच्या डोक्यात ‘लोक’ म्हणजे ‘people and their problems’ नेहमीच असतात. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’च्या शोधात, त्यांच्या समस्यांमध्ये आलोकना स्वारस्य आहे. 

डॉ. आलोक यांच्या या संग्रहात, पहिल्याच लेखात ते निपाणी या आपल्या शहराबद्दल मनापासून लिहिताहेत. सजग जाणीवांचं हे गाव आलोक यांच्या जाणिवा जागृत करणारं गाव आहे. अनेक प्रकारच्या लढ्यांचे केंद्र असलेले गाव, तेथील लढवय्ये लोक, त्यांना भेटलेले आणि त्यांना प्रभावित करणारे शिक्षक, त्यांच्या आठवणी या सर्व गोष्टी आत्मीयतेने या लेखात त्यांनी मांडल्या आहेत. 

सांगलीच्या राजवाड्यातील शाळेतील शिक्षिका आणि पुढे कागलच्या राजाच्या शाळेत दाखल झालेल्या आलोक यांच्या आई, त्यांचे इंग्रजीचे अध्यापन, इंग्रजी साहित्याचा अभ्यास आणि विस्तृत वाचन या सर्वांमुळे ‘मी कसा घडलो’ याचे कृतज्ञतापूर्वक वर्णन ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात आहेत. लेखन, वाचन, वक्तृत्व या सर्वच गोष्टींचे धडे आईने त्यांना कसे दिले, याची संपूर्ण हृद्य माहिती ते या लेखात मांडतात. दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. 

डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. लेखसंग्रह अनेक विषयांवरील लेखांचा असला तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा या लेखांना आहेत. या सर्व लेखांना व्यक्तिगत संदर्भ असला तरी तो सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. लेखसंग्रहातील अनेक लेखांना चिंतनाची बैठक आहे. पत्रकारितेतून कधीकधी डोकावणारा उतावीळपणा, प्रचारकी स्वरूप आलोक यांनी या लेखसंग्रहात येऊ दिलेले नाही.

‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. त्यांना या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच असावे, असे वाटते. Coloured life and Colourful life यावरचे रंगभाष्य या लेखात आहे. या लेखसंग्रहात अनेक व्यक्ती आलेल्या आहेत. नात्यांमधील भावबंध आहेत; पण, एकूणच लेखसंग्रह सामाजिक समावेशकता, विवेक, विचार, संवेदनशीलता या गोष्टी ठळकपणे अधोरेखित करणारा आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरलेले डॉ. आलोक आणि आता विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी असलेले डॉ. आलोक या भूमिकांमुळे हा लेखसंग्रह जबाबदार माणसाने, अत्यंत जबाबदारीने, महत्त्वाच्या विषयांवर गांभीर्याने भाष्य करणारा असा लिहिलेला आहे.


बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कार

ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट

अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

 

ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते 'कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक' म्हणून पुरस्कार स्वीकारताना 'गाभ' चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर. शेजारी प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर.



प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते 'कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार स्वीकारताना 'गाभ' चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे. शेजारी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल.



(पुरस्कार प्रदान सोहळ्याची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाभ या चित्रपटाने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले.

गाभ या चित्रपटाला कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार प्राप्त झाले. वरळी (मुंबई) येथे काल (दि. ५) रात्री झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

गाभ चित्रपटाला ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट चित्रपटांसह अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट दिग्दर्शक या गटातही नामांकन मिळाले होते. त्याचप्रमाणे प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या गटात अनुप जत्राटकर यांना आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री या गटात अभिनेत्री सायली बांदकर हिलाही नामांकन मिळाले होते. तथापि, चित्रपटाला कै. दादा कोंडके यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटासाठीचा आणि कै. अनंत माने यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकासाठीचा, असे दोन महत्त्वाचे विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

कोल्हापुरी योगायोग

सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहे, ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कै. अनंत माने कोल्हापूरचे, मंचावर पुरस्कार वितरण करण्यासाठी उपस्थित प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही कोल्हापूरचे आणि गाभ या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे हेही कोल्हापूरचे! असा त्रिवेणी संगम या पुरस्काराच्या निमित्ताने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जमून आला.

बुधवार, ३० जुलै, २०२५

'समाज आणि माध्यमं’ कोणासाठी? - डॉ. राजेंद्र पारिजात



ज्याला काय बोलायचं नाही, ते कळतं किंवा ज्याला काय लिहायचं नाही, ते कळतं, तो खरा वक्ता किंवा लेखक असतो, असे म्हणतात.

आलोक हा अशा वर्गवारीतला एक सूज्ञ,चाणाक्ष, दक्ष संपर्क अधिकारी आहे़.

पण मुळातील लेखनाची उर्मी या क्षेत्रातल्या कोणालाही स्वस्थ बसू देत नाही आणि ही अस्वस्थताच सृजनाचे खरे कारण आहे. या जाणिवेतून आलेलं आलोकचं 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक अनेक प्रकाराने मुद्रित माध्यमांच्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि डिजिटल व्यवसायात झेप घेणाऱ्या नव्या दोन्ही पिढ्यांसाठी एक आवश्यक संदर्भ म्हणून पुढे येत आहे़.

आजचा समाज डिजिटल दैनंदिनीत जगतोय – सोशल मीडिया, ट्रोलिंग, गेमिंग, पॉर्न, ऑनलाइन शिक्षण या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. अशा परिस्थितीत ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक म्हणजे माध्यम-साक्षरतेचा दीपस्तंभ आहे.

डॉ. आलोक जत्राटकर हे माध्यम क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आणि अनुभवसंपन्न कार्यकर्ते असून, त्यांनी या पुस्तकात माध्यमांचा वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम समजावून सांगितला आहे.

हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर विचार करायला लावणारं, सावध करणारं आणि दिशा दाखवणारं आहे.

📘 हे पुस्तक कोणासाठी?

1. विद्यार्थी (विशेषतः किशोरवयीन व तरुण वर्ग)

सोशल मीडियाचा भुरळ पाडणारा प्रभाव समजून घेण्यासाठी

पॉर्नोग्राफी, गेमिंग व्यसन आणि ट्रोलिंगपासून स्वतःला जपण्यासाठी

डिजिटल साक्षरतेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी

2. शिक्षक व प्राध्यापक

माध्यमांचा शैक्षणिक वापर आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी

"स्मार्ट एज्युकेशन" आणि कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा यावर सखोल विचार करण्यासाठी

नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करता यावे म्हणून

3. पालक

मुलांच्या ऑनलाईन जगातील प्रवासाचे वास्तव ओळखण्यासाठी

किशोरवयीन मुलांमधील भावनिक बदल, सोशल मीडियाचा प्रभाव आणि मानसिक आरोग्य यावर सजग राहण्यासाठी

4. माध्यमकर्मी व पत्रकार

माध्यमांच्या वापरातील जबाबदारी, प्रभाव आणि सामाजिक भान यावर विचार करण्यासाठी

माध्यम साक्षरतेच्या अंगाने सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी

5. शासकीय धोरणकर्ते व सामाजिक कार्यकर्ते

डिजिटल युगात कायदेकानू, माध्यम धोरणं आणि जनजागृती मोहीम कशी असावी, याचा विचार करण्यासाठी

माध्यमांमुळे समाजात होणाऱ्या दुभंगांची चिकित्सा करण्यासाठी

6. राजकारणी व जनमत घडवणारे नेते

माध्यमांचा लोकमतावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी

प्रचार-प्रसार करताना वैचारिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी

हे पुस्तक फक्त माहितीपर नाही, तर मार्गदर्शक, सावध करणारा आणि अंतर्मुख करणारा आरसा आहे.

‘समाज आणि माध्यमं’ हे वाचणं म्हणजे आपल्या आभासी वास्तवाचं आत्मपरीक्षण करणं – एक जबाबदार नागरिक, पालक, शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणून.

- डॉ राजेंद्र पारिजात



An Essential Handbook for media literacy and media awareness: Dr. B. M. Hirdekar

(ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक वाचून आपला चिकित्सक अभिप्राय स्वतंत्र पत्राद्वारे कळविला आहे. तो येथे देत आहे. या प्रोत्साहनपर शब्दांसाठी हिर्डेकर सरांचा मी मनापासून ऋणी आहे.)





डॉ. आलोक जत्राटकर यांनी लिहिलेलं 'समाज आणि माध्यमं' हे एक अगदीच वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे हे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो.
भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देण्याची आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.
माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या, वयाने तरुण पण बौद्धिक प्रौढत्व असलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे.
मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया एडिक्ट होत चाललेल्या समाजाला विशेषतः तरुणांना हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला सांगायला हवे. दुभंगलेली माणसं, दुभंगलेली कुटुंबं, दुभंगलेला समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. डॉ. जत्राटकर यांनी एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यमांचा वापर, वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सोबती म्हणून दिलेले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक सेल्फ अवेअरनेस, सोशल अवेअरनेस आणि प्रॉब्लेम अवेअरनेस यासाठीचे आहे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. तरुण, ज्येष्ठ, समाज घडणीत जबाबदार म्हणून काम करणारे या सर्वांनी हा लेख आवर्जून वाचायला हवा. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते.
लेखक माध्यमाच्या विश्वात संचार करून, माध्यमांसंबंधित जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यापीठात आपल्या कामाची वेगळी शैली जपली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांचा शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्व घटकांशी जवळून संबंध आहे. या पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन फॉर ऑल, वाटा ऑनलाईन शिक्षणाच्या, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य करण्यात आले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. शिक्षण प्रक्रिया आणि नव्या युगातील नवे शिक्षण याविषयी शिक्षक लिहितातच; पण, माध्यमांत काम करणाऱ्या व्यक्तीने शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे लिहावे, हे कौतुकास्पद आहे.
बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक लिहिताना लेखक माध्यमकर्मी म्हणून कुठेही 'तटस्थ' असलेले पुस्तकात दिसत नाहीत. माझा या सर्व प्रश्नांची संबंध आहे, I am very much concerned and hence I have to write, अशी भूमिका- वैचारिक भूमिका घेऊन या पुस्तकाची निर्मिती झालेली दिसते. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. Content of the book, cause of the book, concern of the author, along with clarity of the message या सर्व गोष्टी सदर पुस्तकाला वेगळे परिमाण देतात. May be an Essential Handbook for media literacy and media awareness, असे या पुस्तकाबाबत मला म्हणावेसे वाटते.
Dr. Alok sir congratulations for this book- not for pleasure and fun- but to learn serious things, seriously!
- डॉ. बी. एम. हिर्डेकर