सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

एका तेलियाने...



संत जगनाडे महाराज (इ.स. १६२४-१६८८) यांची जयंती उद्या ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याबाबतचं परिपत्रक ई-मेलवर आलं आणि ‘आता हे कोण ब्वा जगनाडे महाराज?’ असा प्रश्न मनात डोकावला. खरंच त्यांच्याविषयी माहिती नव्हती, याची सुरवातीलाच कबुली देतो. प्रश्न पडला म्हटल्यावर उत्तर शोधायला सुरवात केली. तर, या महात्म्याचे भन्नाट चरित्र आणि कार्य सामोरे आले. संत तुकाराम यांचे अत्यंत लाडके शिष्य असलेल्या जगनाडे महाराज यांचे उभ्या महाराष्ट्रावर आणि वारकरी संप्रदायावर थोर उपकार आहेत, हे समजून त्यांच्याविषयी हृदय कृतज्ञतेनं भरून आलं.

मावळ तालुक्यातल्या सुदुंबरे इथं विठोबा जगनाडे आणि माथाबाई यांच्या पोटी जन्मलेले संताजी जगनाडे हे आपल्या मायबापाप्रमाणंच विठ्ठलभक्तीत दंगणारं व्यक्तीमत्त्व. एका तेल्यानं हिशोबापुरतं जेवढं शिकायचं, तेवढं शिकलेले. संत तुकारामांची कीर्तनं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होती. संताजींनी एकदा तुकोबारायांना ऐकलं आणि त्यांच्या अभंगांनी ते नादावूनच गेले. संसारात राहूनही भक्तीप्रपंच मांडता येतो, हे तुकारामांनी स्वतःच्या उदाहरणानंच त्यांच्यावर बिंबवलं. तुकारामांच्या कीर्तनाला साथ करणाऱ्या टाळकऱ्यांपैकी ते एक बनले. तुकारामांचे लाडके बनले. तुकोबारायांना साथ करता करता त्यांनाही त्यांचे अभंग मुखोद्गत झाले. तुकारामांची गाथा लिहीताना तुकारामांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम केले. पुढे संत तुकारामांचा जनमानसावरील वाढता प्रभाव सहन न होऊन दुष्टाव्याने जेव्हा त्यांनी गाथा बुडविण्यात आली. ती गाथा तरली. गाथेला तारणारे इंद्रायणीचे पाणी नव्हते, तर संतु जगनाडे यांची आणि त्यांच्यासारख्या हजारो सर्वसामान्य लोकांची वाणी होती. तुकारामांच्या गाथेतले मुखोद्गत असणारे अभंग या तैलबुद्धीच्या तेल्याने लिहून काढले आणि गाथेला तारले. म्हणून मग तत्कालीन भटब्राह्मणांनी सकाळच्या प्रहरी तेल्याचे तोंडही पाहू नये; त्याने अपशकून होतो, असा अपसमज पसरविला, असे म्हणतात.

संत संतु जगनाडे यांनी तुकारामांच्या प्रभावाने आणि आशीर्वादाने अभंग रचनाही केल्या.

एकादशी दिनी संतु तुका वाणी ।

राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।।

तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।

पांडुरंग चरणा नमियेले ।।२।।

तेथुनी तो आला तुका जेथे होता ।

आलिंगन देता झाला त्याशी ।।३।।

तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।

सांगतो तुजला संतु म्हणे ।।४।।

असे गुरूकृपा सांगणारे अभंग जसे लिहीले, तसेच-

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।

तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।

नाही तर तुमची आमची एक जात ।

कमी नाही त्यात आणु रेणु ।।२।।

संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।

स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।३।।

असे मानवातील जातीभेदावर प्रहार करणारे अभंगही त्यांनी लिहीले आहेत. संत जगनाडे महाराज हा असा एक महान शिष्य आणि तितकाच महान संतही या महाराष्ट्र भूमीवर होऊन गेला.

सध्या आपण महापुरूषांबरोबरच या संतांच्याही जातबंदिस्तीचा बंदोबस्त करून टाकला आहे. मी जेव्हा इंटरनेटवर सर्च केलं, तेव्हा देशभरातल्या केवळ तेली समाजानंच त्यांचे फोटो आणि माहिती शेअर केली होती. त्याखेरीज विकिपिडियावर थोडी माहिती पाह्यला मिळाली. कदाचित ती सुद्धा कोण्या तेलियानेच टाकली असावी. या साऱ्या संतांना जातबंधनातून मुक्त करून जातविरहित दृष्टीकोनातून त्यांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आज हे सारे वाचताना नव्याने जाणवली. असो!

जगनाडे महाराजांप्रती या निमित्ताने आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

(ता.क.: उपरोक्त माहितीचा स्रोत इंटरनेट आहे. संतसाहित्याच्या अभ्यासकांनी या संदर्भात अधिक वस्तुनिष्ठ माहिती देण्यास हरकत नाही. चांगल्या माहितीचे आदानप्रदान त्या निमित्ताने व्हावे, ही अपेक्षा!)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा