मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

शिवरायांच्या हयातीमधील त्यांच्या शिल्पाचा इतिहास आणि कथा

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे यादवाड येथील हेच ते दुर्मिळ, ऐतिहासिक महत्त्वाचे शिल्प

शिल्पाच्या खालील भागातील छत्रपती शिवराय आणि मल्लाबाई यांचे शिल्प

यादवाड (धारवाड) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पमंदिर

यादवाड येथीलच एक अन्य अश्वारुढ प्रतिमाशिल्प


यादवाड... कर्नाटकातील धारवाडपासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवरील एक छोटंसं खेडं... एरव्ही या गावाची माहिती होण्याचं कारण नव्हतं. हे नाव ऐकलं ते माझे मित्र श्रीनिवास व्हनुंगरे यांच्या तोंडून. लॉकडाऊनपूर्वी एक दिवसाच्या शिरोडा ट्रीपवर गेलो असताना त्यानं मला या गावाच्या वैशिष्ट्याविषयी सांगितलं होतं. तेव्हापासूनच खरं तर इथं जाण्याची विलक्षण ओढ मनाला लागून राहिली होती. आणि लॉकडाऊननंतर जेव्हा पहिल्यांदाच बाहेर पडण्याचा विचार केला, तेव्हा यादवाडखेरीज अन्य दुसरं कोणतंही ठिकाण नजरेसमोर आलं नाही. असं काय आहे बरं तिथं?

मित्र हो, यादवाड या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीमध्ये निर्माण करण्यात आलेलं अतिशय सुंदर शिल्प आहे. आणि ते पाहण्यासाठीच आम्ही तिथे गेलो होतो. कोल्हापूर-निपाणीहून आपण धारवाडकडे जात असताना टाटा मोटर्स, उच्च न्यायालयाचे खंडपीठ ओलांडले की सर्व्हिस रोडवरुन डावीकडेच नरेंद्र या गावाकडे जाणारा फाटा फुटला आहे. दोन्ही बाजूला हरभरा आणि गव्हाची शेतवडी असणारा हाच रस्ता आपल्याला पुढे थेट यादवाडकडे घेऊन जातो. यादवाड स्टँडच्या चौकात पोहोचलो की डाव्या हातालाच अवघ्या पन्नास पावलांवर यादवाडकरांनी नव्यानेच जिर्णोद्धारित केलेलं (१८८५ साली स्थापन केलेलं) हनुमानाचं मंदिर (हनुमान गुडी) आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातच एक सुरेख कमान करून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प स्थापित केलेलं आहे. मराठी व कन्नडमधून त्या कमानीवर छत्रपती शिवाजी असं नावही कोरलेलं आहे.

या शिल्पाचा इतिहास जो सांगितला जातो तो असा- छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाहून उत्तरेस संपगावाकडे कूच करीत असताना वाटेत बेलवडीच्या येसाजी प्रभू देसाई याने राजांचे कहीकाबाडीचे बैल आपल्या गढीत पळवून नेले. कहीकाबाडी म्हणजे लाकूडफाटा, दाणा, अन्नधान्य वाहून नेणारे.[i] देसायास समज देऊन बैल परत आणण्यासाठी महाराजांनी सखुजी गायकवाड नामक सरदाराची नियुक्ती केली. छोटी गढी एका दिवसात ताब्यात घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र झाले विपरितच. देसाईंनी बैल परत केले नाहीतच, पण लढाई आरंभली. गढी छोटी असल्याने तोफा अगर मोठी शस्त्रे न वापरता ती जिंकावी, असा महाराजांचा प्रयत्न होता, जेणेकरून बदलौकिक न व्हावा. या लढाईत देसाई मारले गेले. मात्र, त्याची पत्नी मल्लाबाई (बखरींमध्ये हिचे नाव सावित्री असेही दिले आहे.) हिने लढा पुढे चालवला. सुमारे २७ दिवस तिने गढी राखली. अखेरीस गढीतील अन्नधान्य, दारुगोळा संपला, तेव्हा ती आपल्या सैन्यानिशी सखुजींच्या सैन्यावर तुटून पडली आणि तिने दिवसभर मराठा सैन्याला आवेशपूर्ण झुंज दिली. अखेरीस पराभव होऊन ती सखुजीच्या हाती सापडली. तिला महाराजांसमोर हजर करण्यात आले. मात्र स्त्रीजातीस शिक्षा करावयाची नाही, असा महाराजांचा नियम असल्याने त्यांनी मल्लाबाईंची मुक्तता केली आणि वस्त्राभूषणे देऊन त्यांना गौरविले. बेलवडी तर त्यांना दिलेच, शिवाय आणखी दोन गावेही त्यांना इनाम दिली.[ii] तारीख-ई-शिवाजी या यवनी बखरीत असे म्हटले आहे की, सखुजी गायकवाड या सरदाराने तिला पकडून वाईट रितीने वागविल्याबद्दल महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढून त्याला मानवली गावी कैदेत ठेवले.[iii] मल्लाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या या भेटीचे शिल्पांकन बेलवाडीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाल्याचे आढळते.[iv] त्यापैकीच हे एक शिल्प आहे. या हनुमान मंदिराच्या समोर एक पार आहे. त्यावरही काही छोटी शिल्पं आहेत. त्यात हनुमानाची काही, गणेशाचे एक आणि अश्वारुढ सैनिकाचेही एक शिल्प आहे. तेही या शिल्पांपैकीच एक आहे, असे ग्रामस्थ सांगतात.

या लढाईच्या संदर्भात राजापूरच्या एका इंग्रज व्यापाऱ्याची दि. २८ फेब्रुवारी १६७८ रोजीची नोंदही जदुनाथ सरकारांनी आपल्या शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात दिलेली आहे. त्यात हा व्यापारी सांगतो आहे की, “He (Shivaji) is at present besieging a fort where, by relation of their own people come from him, he has suffered more disgrace than ever he did from all power of the Mughal or the Deccans (=Bijapuria), and he, who hath conquered so many kingdoms is not able to reduce this woman Desai!”[v] शिवाजी महाराजांच्या सैन्याशी मल्लाबाईने किती प्रखर झुंज दिली असावी, हे या उद्गारांतून लक्षात येते.

हा इतिहास पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष या शिल्पाकृतीची माहिती घेणे सोपे होईल. शिवाजी महाराजांच्या या दिलदार उमदेपणाच्या स्मृतीप्रित्यर्थ मल्लाबाईंनी शिवरायांचे हे शिल्प निर्माण केले. सुमारे चार फूट उंचीच्या या शिल्पाला कोरीव खांब, पोपट आणि लतावेलींची सुबक महिरप कोरण्यात आली आहे. त्यात सुमारे तीन चतुर्थांश भागात शिवाजी महाराजांचे अश्वारुढ शिल्प आहे. दिग्विजयी सम्राटाला साजेशी त्यांची ही प्रतिमा आहे. महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज लपत नाही. कोरीव दाढीमिशा, लांब पायघोळ वेशभूषा, जिरेटोप, एका हातात तळपती नंगी तलवार, दुसऱ्या हातात ढाल आहे. शिरावर छत्र आहे. पुढेमागे भालदार, चोपदार, सैनिक आहेत. अश्व सम्राटाला साजेसा सजविलेला आहे. महाराजांच्या पायाशी एक इमानी कुत्रा आहे. पूर्वी सुद्धा सैन्यासोबत सुरक्षेसाठी कुत्रे नेण्याची प्रथा यातून दिसते. खालील एक चतुर्थांश भागात मल्लाबाईंची कथा आहे. या शिल्पात शिवाजी महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मूल आहे. त्याला ते दूधभात भरवताहेत. समोर मल्लाबाई एक वाटी घेऊन उभ्या आहेत. हे मूल मल्लाबाईंचे असून त्याच्या दूधभातासाठी म्हणून महाराजांनी त्यांना बेलवडी दोन गावांच्या इनामासह परत केली, असे सांगतात. या दृश्याच्या समोरील बाजूस एक सैनिक पाण्याची सुरई घेऊन उभा आहे आणि महाराजांच्या मागे एक धनुर्धारी योद्धा स्त्री संरक्षणार्थ उभी आहे, असे दाखविले आहे. हे शिल्प म्हणजे उत्तम कोरीव कामाचा नमुनाच आहे. त्यापेक्षाही महाराजांच्या हयातीमध्ये, त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या मल्लाबाईंनी ते करवून घेतलेले आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे शिल्प यादवाडवासियांनी चांगल्या पद्धतीने जतन केले आहे. मात्र, हनुमानाला तेल घालायला येणारे भाविक महाराजांच्या या शिल्पालाही तेल, साखर ऊद वाहतात. त्यांची भावना रास्त असली, तरी त्यामुळे या शिल्पाची झीज होते, ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या परिसरातील इतर शिल्पेही शोधण्याचे ठरविले आहे. ती सापडतील की नाही, माहीत नाही; मात्र तोपर्यंत जे आपल्यासमोर आहे, त्याचे अधिक योग्य पद्धतीने जतन करण्याची जबाबदारी तातडीने स्वीकारायला हवी. मराठा साम्राज्याच्या संस्थापकाची ही लाखमोलाची स्मृती जपायला हवी.


यादवाड येथे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुगल मॅपची लिंक अशी:- 

https://maps.app.goo.gl/Y78qttX7nU1hPudY9





[i] सभासदाची बखर, पृ. ९१

[ii] केळुसकर, कृष्णराव अर्जुन: क्षत्रियकुलावतंस छत्रपति शिवाजीमहाराज यांचे चरित्र, मनोरंजन छापखाना, मुंबई (१९२०), पृ. ४५६

[iii] कित्ता, पृ. ४५६

[iv] देशपांडे, प्र.न.: छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (२००२), पृ. ८६

[v] Sarkar, Jadunath: Shivaji and His Times, Longmans, Green & Co., London (Second and revised edition, 1920), p. 355

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा