social media लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
social media लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ मार्च, २०२६

समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती या विषयावर बोलताना...





परिसंवादादरम्यान डॉ. आलोक जत्राटकर यांच्या विविध भावमुद्रा

(डॉ. आलोक जत्राटकर यांचे सविस्तर व्याख्यान येथे ऐका.)


ईश्वरपूर इथं झालेल्या ३० व्या साहित्य संमेलनात आमचे मार्गदर्शक मित्र आणि मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 'आजचे साहित्य, समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती' या विषयावरील परिसंवादात सविस्तर मांडणी करण्याची संधी लाभली. सोबत समुपदेशक अर्चना मुळ्ये याही सहपरिसंवादक होत्या.
आज समाजमाध्यमांनी साहित्याच्या प्रसारात मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक, ब्लॉग आणि ऑनलाइन वाचनगटांमुळे साहित्यिक चर्चा अधिक व्यापक झाल्या आहेत. पूर्वी साहित्यिक चर्चा मुख्यतः नियतकालिके, परिसंवाद किंवा साहित्य संमेलनांपुरत्या मर्यादित असत. आज मात्र कोणताही वाचक सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू शकतो. यामुळे साहित्याभोवती लोकशाही स्वरूपाचा संवाद निर्माण झाला आहे.
नव्या डिजीटल युगात वाचनाचे स्वरूप बदलते आहे. नव्या पिढीचे वाचनाचे फॉर्म्स आणि रूची वेगळी आहे. मात्र, ती वाचत नाही, असे म्हणता येणार नाही. पुस्तक मेळ्यांमधील लाखो रूपयांची उलाढाल, लिट-फेस्टसारख्या उपक्रमांना तरूणांचा लाभणारा प्रतिसाद हे त्याचेच निदर्शक आहे.
पारंपरिक मुद्रित पुस्तकांबरोबरच डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. आज अनेक लोक दीर्घ कादंबऱ्यांपेक्षा लघुलेखन वाचणे पसंत करतात. वाचन ही आज सामूहिक चर्चेची प्रक्रिया बनली आहे. यातूनही अनेक सृजनात्मक साहित्यकृती निर्माण होत आहेत.
लेखन-वाचनापूर्वी अस्तित्वात असणारी श्रवण संस्कृती ही आता डिजीटल युगात पुनरुज्जीवित झाली असून स्टोरीटेल, ऑडिबल, कुकू इत्यादी प्लॅटफॉर्मवर आता पुस्तके ऐकण्याकडे कल वाढला आहे. जागतिक १५० अब्ज डॉलरच्या पुस्तक बाजारात १० अब्ज डॉलर इतका वाटा या ऑडिओ बुक्सचा आहे. या श्रवण संस्कृतीमध्ये स्मरण संस्कृतीचा मात्र ऱ्हास होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे.
आज वाचनसंस्कृती एका संक्रमणाच्या टप्प्यात आहे. परंपरागत मुद्रित पुस्तकांची परंपरा अजूनही जिवंत आहे, परंतु डिजिटल माध्यमांमुळे वाचनाचे नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. म्हणून आजचा प्रश्न “वाचनसंस्कृती टिकेल का?” असा नाही. खरा प्रश्न असा आहे—आपण वाचनसंस्कृतीला नव्या तंत्रज्ञानाशी कसे जोडणार? जर आपण परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधू शकलो, तर वाचनसंस्कृती अधिक व्यापक आणि समृद्ध होईल.
वाचन ही केवळ सवय नाही; ती संस्कृती आहे. वाचन ही केवळ माहिती नाही; ती विवेकी विचारांची निर्मिती आहे.
आणि विवेकवादी विचार करणारा समाजच आपल्या भविष्याचा खरा शिल्पकार असतो.
उपरोक्तप्रमाणे साधारणतः चाळीसेक मिनिटे मांडणी केली. समाजमाध्यमांवर सुरू असलेले वाचनसंबंधित उपक्रम, प्रत्यक्ष फिल्डवर सुरू असणारे उपक्रम यांचाही वेध घेतला.
महत्त्वाचे म्हणजे माझ्या या मांडणीचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्रज्ञा दया पवार यांनीही कौतुक केले, ही माझ्यासाठी 'ट्रॅक'वर असल्याची पोचपावती. अनेक श्रोत्यांनीही स्वागत केले.
एकूणच, परिसंवाद चांगला रंगला आणि एका चांगल्या उपक्रमात सहभागाचे समाधानही देऊन गेला.

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमे

 ('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्ताने 'कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष पुरवण्यांमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख येथे माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



(दै. पुढारी, बेळगाव आवृत्ती, दि. १ जानेवारी २०२५)

(दै. पुढारी, कोल्हापूर आवृत्ती, दि. २ जानेवारी २०२५)


(दै. पुढारी, कोल्हापूर आवृत्ती, दि. ४ जानेवारी २०२५)


जर कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपले ध्येय असेल आणि मानवता त्याच्या आड येत असेल, तर कोणताही मागचा पुढचा विचार न करता कृत्रिम बुद्धिमत्ता तिचा नाश करेल. - एलॉन मस्क

सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्टया डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचा केवळ मानवाच्या बाबतीत विचार करून उद्या पृथ्वीवर एखादे जीवघेणे संकट आल्यास मानवातील सर्वोत्कृष्ट (अर्थातच, ज्या ग्रहीय स्थलांतराचा खर्च करू शकतील अशा) प्रजातींनाच वाचवून अन्य ग्रहावर नेऊन त्यांचे पुनर्वसन करून तेवढ्याच टिकविण्याचा दूरगामी विचार करणारा स्पेसएक्स, टेस्ला आणि एक्स या कंपन्यांचा मालक, व्यावसायिक असलेल्या मस्क यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा उपरोक्तप्रमाणे आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ आस्तित्वात येऊ घातलेली वैज्ञानिक कल्पना असणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.) हे आजचे वास्तव आहे. चहूबाजूंनी आपण ए.आय.ने घेरले गेलेलो आहोत. विशेषतः ज्या समाजमाध्यमांवरील आपला वावर हा जवळपास आपल्याही नियंत्रणाबाहेर जाऊ पाहतो आहे, किंबहुना गेलेला आहे, त्या माध्यमांद्वारे आपल्या सर्वंकष वर्तनाचे आकलन करवून घेऊन त्यावर ए.आय.द्वारे नियंत्रण मिळवले जात आहे- आपली व्यावसायिक गणिते साध्य करवून घेण्यासाठी. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आज जगावर कोणतीही उत्पादक कंपनी राज्य करीत नाही, तर जगभरातल्या वापरकर्त्यांचा डाटा सहजी हाताशी उपलब्ध असणाऱ्या समाजमाध्यम कंपन्यांचे वर्चस्व सर्वदूर प्रस्थापित झाले आहे. यामध्ये गुगल, मेटा, एक्स, मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि अॅमेझॉन या कंपन्यांमध्ये त्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या वापरकर्त्यांच्या डाटावर अधिकार प्रस्थापित करून त्या डाटाच्या आधारे बाजारपेठेवरील आपापले वर्चस्व अबाधित राखण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे यातील प्रत्येक कंपनीने आपला संशोधन व विकास हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने केंद्रित केला आहे.

माहितीची देवाणघेवाण, संवाद साधणे आणि लोकांशी जोडले जाणे यासाठी समाजमाध्यमे निर्माण झाली. पण आता ए.आय.ची जोड मिळाल्याने या संवादाची अवघी दिशाच बदलून गेली आहे. समाज माध्यमांची केवळ संवादाची पद्धतच बदलली नाही, तर त्याचा व्यवसाय, मनोरंजन, आणि सामाजिक बदलांवरही मोठा परिणाम झाला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेने संगणकीय प्रक्रियांना मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे कार्य करण्याची क्षमता प्रदान केली आहे. यामध्ये मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP), आणि इमेज/व्हिडिओ प्रोसेसिंग, ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअॅलिटी यांसारख्या अनेक उपशाखांचा समावेश आहे. समाज माध्यमांमध्ये ए.आय.चा वापर प्रामुख्याने डाटा व्यवस्थापन, ग्राहकांचे वर्तन विश्लेषण आणि आभासी संवादासाठी होतो. समाज माध्यमे ही आता केवळ संवादाचे साधन न राहता, ब्रँड मार्केटिंग, राजकीय प्रचार आणि व्यक्तिगत ओळख निर्माण करण्यासाठीचे प्लॅटफॉर्म बनले आहेत. एआयने या क्षेत्रात अनेक मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या बाबींचा आढावा येथे घेऊ.

कंन्टेंट निर्मितीमध्ये क्रांती:

ए.आय.च्या सहाय्याने कंन्टेंटची निर्मिती अधिक सोपी, स्वयंचलित आणि पर्सनलाइज्ड (वैयक्तिक अगर व्यक्तीसापेक्ष) होऊ शकते. म्हणजे कोट्यवधी ग्राहकांच्या वर्तन व्यवहाराचे निरीक्षण करून त्यातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार अगदी स्वतंत्र असा कंन्टेंट सादर करणे आजघडीला शक्य झाले आहे ते केवळ ए.आय.मुळे. पूर्वी ट्रेंडिंग म्हटले की, जे सर्वाधिक अॅक्सेस केले जायचे, ते दर्शकाला सादर केले जात असे. आता त्या ट्रेंडिंगला एआयची जोड मिळाल्याने वैयक्तिक पातळीवर आपण काय पाहता, पाहू इच्छिता, त्याची जोड देऊन हा ट्रेंड अधिक पर्सनलाइज्ड करून दाखविल्याने ग्राहक तेथे अधिक वेळ व्यतित करण्याच्या शक्यता वृद्धिंगत होतात.

टेक्स्ट जनरेशन: आज एखाद्या विषयावर माहिती, लेख लिहीण्यासाठी ग्राहकाला इंटरनेटवर सर्फिंग करण्याची, योग्य माहिती शोधण्याची अगर ती शोधून नव्याने लिहीण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तर, चॅटजीपीटी, जॅस्पर-एआय इतकेच नव्हे तर अगदी मेटा कंपनीने वॉट्सअॅपमध्येही एआय असिस्टंट दिला आहे, त्यांच्या सहाय्याने वापरकर्त्याला लेख, कॅप्शन्स, ब्लॉग पोस्ट अगदी काही क्षणांत तयार करून मिळतात.

व्हिडिओ आणि फोटो एडिटिंग: नव्या पिढीच्या मोबाईल फोन्समध्ये कॅमेरा आणि फोटो व व्हिडिओ अॅप्लिकेशन्सना ए.आय.ने मोठा सपोर्ट दिला आहे. फोटो आकर्षक दिसण्यासाठी आणि सुव्यवस्थित उमटण्यासाठी फोटो काढत असतानाच फोटो एनहान्समेंट केली जाते. त्याखेरीज फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग अॅप्समध्ये AI-आधारित टूल्सही समाविष्ट केली आहेत, ज्यांच्या सहाय्याने मॅन्युअली एडिटिंगची प्रक्रिया बहुतांशी कमी-जवळपास शून्य झालेली आहे. अगदी फोटो क्रॉपिंगसाठी सुद्धा सजेशन दिले जाते. कॅन्व्हा, रनअवे-एमएल इत्यादी अॅप्स फोटो आणि व्हिडिओ संपादनासाठी सर्जनशील टेम्प्लेट, डिझाइन्स पुरवितात.

ऑडिओ निर्मिती: विविध विषयांवरील पॉडकास्टिंगसाठी आता स्क्रीप्टची निर्मिती, आवाजाची जोड, ऑडिओचे संपादन इत्यादी सर्व बाबी आता एआयच्या सहाय्याने अधिक सहजसोप्या झालेल्या आहेत. एआय पॉडकास्ट्ससाठी स्वयंचलित ऑडिओ स्क्रिप्ट तयार करते. रॉयल्टी फ्री संगीत, आवाजाचे विविध इफेक्ट्सची जोडही त्याला दिली जाते. वीड.आयओ सारखा व्हॉईस जनरेटर त्यासाठी उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे वंडरक्राफ्ट, पॉडकॅसल, औफोनिक, रिसाऊंड, एडोब पॉडकास्ट एआय असे अनेक प्लॅटफॉर्म आज उपलब्ध आहेत.

हे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, संगीतकार ए.आर. रेहमान याने आपल्या एका गीतामध्ये एआयच्या सहाय्याने दिवंगत गायक सहूल हमीद आणि बांबा बाक्या यांचे आवाज वापरल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराबाबत मोठेच वादळ निर्माण झाले.

सोशल मीडिया मॅनेजमेंट: प्रभावी व्यक्तीमत्त्वांसह अनेक लहानमोठ्या व्यावसायिक कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अनिवार्य आहे. मात्र विविध समाजमाध्यमांवरील वावराचे स्वतंत्र व्यवस्थापन करण्याऐवजी ते एकाच वेळी एकाच ठिकाणावरून करणे अधिक सोयीचे असते. त्यासाठी हूटसूट, बफर आदी प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. आता एआयमुळे सर्व समाजमाध्यमे एकाच डॅशबोर्डवर असण्यापलिकडे यांची उपयुक्तता वाढली आहे. या एआय आधारित साधनांच्या सहाय्याने विविध समाजमाध्यमांवरील आपल्या पोस्ट्स शेड्यूल करणे, तेथील ट्रेंडिंग टॉपिक्स शोधणे आणि विश्लेषण करणे अधिक सोपे झाले आहे. या पोस्ट्सचे वेळापत्रकही निर्धारित करता येते. एआयमुळे हॅशटॅग आणि ट्रेंड्सचा अंदाज देखील बांधणे सोयीचे झालेले आहे.

डाटा विश्लेषण आणि ग्राहक वर्तनाचा अभ्यास: सुरवातीला म्हटल्याप्रमाणे एआयचा मोठा वापर ग्राहक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी केला जात आहे. समाजमाध्यमांकडे वापरकर्त्यांचा डाटा उपलब्ध आहे. वापरकर्ते काय पाहतात, कोणत्या पोस्टवर ते काय प्रतिक्रिया देतात, कोठे किती वेळ घालवतात, त्यांच्या आवडीनिवडी काय, त्याचा कल काय, या साऱ्या बाबी समाजमाध्यमांवरील त्यांच्या वावरातून समोर येत असते. या साऱ्या माहितीचे सखोल विश्लेषण करून अधिक नेमकेपणाने वापरकर्त्याचा अर्थात ग्राहकाचा कल ओळखला जातो. त्या प्रकारच्या अनुषंगिक उत्पादन आणि सेवांच्या जाहिराती त्याला सादर केल्या जातात. तसेच एआयच्या मदतीने ग्राहकांचे वय, आवड आणि भौगोलिक ठिकाण यानुसार अचूक जाहिराती दाखविल्या जातात. गुगल अॅडसेन्स आणि फेसबुक अॅड्स यांसारखे प्लॅटफॉर्म एआयच्या सहाय्याने या जाहिरातींची अचूकता वाढवतात. एआयमुळे विविध ब्रँड्सना अधिकाधिक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (ROI) मिळतो. अर्थात टार्गेटेड ग्राहकापर्यंत जाहिरात पोहोचल्यामुळे संबंधित उत्पादन अथवा सेवा खरेदी केली जाण्याची शक्यता वृद्धिंगत होते. त्यातून या कंपन्यांचे अर्थकारण साधले जाते. तसेच, आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याला अधिक वेळ गुंतवून ठेवण्यासाठी एआयच्या आधारे त्याच्या आवडीनुसार फीड दाखविण्यात येतात. फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपण काही विशिष्ट व्यक्ती वा विषयांच्या पोस्ट अथवा रील पाहू लागलो की पुढे सातत्याने त्याच प्रकारच्या पोस्ट आपल्या स्क्रीनवर यायला सुरवात होते, यामागे एआय फीड ऑप्टीमायझेशनची कारागिरी करीत असते.

प्रभावी संवादासाठी: आजकाल आपण पाहतो की आपण कोणत्याही सेवा पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली, तर तेथे अधिकांश उजव्या कोपऱ्यात वर किंवा खाली मे आय हेल्प यू?’ किंवा आस्क मी अशा स्वरुपाचे डायलॉग बॉक्स दिसतात. तिथे कोणी माणूस नाही तर चॅटबॉट्स किंवा व्हर्च्युअल असिस्टंट्स आपल्याला माहिती देण्यासाठी असतात. ग्राहकाला आवश्यक असणारी सर्वसाधारण माहिती ते सहजी पुरविण्यास सक्षम असतात. एआय-आधारित चॅटबॉट्स ग्राहकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात. त्यांची सेवा २४x७ उपलब्ध  असते. ग्राहकांच्या तक्रारींना स्वयंचलित उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यासाठी त्यांचे उपयोजन केलेले असते. अलिकडे विविध कंपन्या ग्राहकांशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधतात. यावरही शंकासमाधानासाठी अशा एआय-आधारित यंत्रणेचाच वापर केलेला असतो. त्याखेरीज चॅट-जीपीटीसारखी यंत्रणा ओपन-एआयमार्फत तयार करण्यात आली आहे. ती वापरकर्त्यांना हवी ती माहिती अगदी क्षणांत सादर करण्याइतकी सक्षम करण्यात आली आहे.

भाषांतर आणि स्थानिकीकरण: गुगलसारखी कंपनी एका भाषेतील मजकूर जगातील अन्य भाषांमध्ये उत्तम प्रकारे सादर करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधन करीत आहे. आता एआयमुळे या भाषांतर क्षमतेला जणू पंख लाभले आहेत. हे भाषांतर आता अधिकाधिक अचूकतेच्या जवळ जाऊ लागले आहे. एआयच्या भाषांतर क्षमतेमुळे विविध भाषांमध्ये रिअल टाईम संवाद साधणे सोपे झाले आहे. मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी आपले डिव्हाईसेस त्या पद्धतीने कॉन्फिगर केले आहेत. स्थानिक भाषांमध्ये कंटेंट तयार करण्यासाठी सुद्धा आता एआय उपयुक्त ठरते आहे. गुगल ट्रान्सलेटसारखी साधने ग्लोबल ऑडियन्सशी संवाद साधण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात.

याठिकाणी जगातील आघाडीच्या समाजमाध्यम कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा किती प्रभावी आणि गतिमान वापर करीत आहेत, हे समजून घेतल्याखेरीज तिचा आवाका आपल्या लक्षात येणार नाही.

मेटाचा कृत्रिम बुद्धिमत्तेत मोठा सहभाग

मेटा (पूर्वीची फेसबुक) ही जगातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने डिजिटल जगात क्रांती घडवून आणत आहे. मेटा ही केवळ एक सोशल मीडिया कंपनी न राहता, एआयच्या मदतीने मेटाव्हर्स, डेटा विश्लेषण, आणि वैयक्तिकृत अनुभव यांसारख्या क्षेत्रांत नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवत आहे.

मेटा तिच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या समाज माध्यम प्लॅटफॉर्म्समध्ये एआयचा वापर करतेच आहे, मात्र प्रामुख्याने नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या मेटाव्हर्स या संकल्पनेत खूप मोठ्या प्रमाणात वापरते आहे. याचा थेट परिणाम डिजिटल संवाद, डेटा व्यवस्थापन, आणि ग्राहक अनुभवावर होतो.

मेटाच्या समाज माध्यम प्लॅटफॉर्म्सवर कस्टमाइज्ड फीड, व्हिज्युअल आणि व्हॉईस रिकग्निशन, ट्रेंड विश्लेषण तसेच स्पॅम आणि गैरवर्तन नियंत्रण यासाठी एआय वापरले जाते. मात्र, मेटाच्या व्हर्चुअल रिअॅलिटीवर आधारित विश्व असलेल्या मेटाव्हर्सची संकल्पना विकसित करण्यासाठी एआयचा उपयोग अनेक प्रकारे केला आहे. तिथे एआयच्या मदतीने लोकांचे व्हर्चुअल अवतार तयार केले जातात, जे मेटाव्हर्समध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करतात. मेटाव्हर्समधील आभासी जागांना (virtual spaces) एआयच्या सहाय्याने अधिक संवादक्षम आणि स्मार्ट बनवले जाते. त्याचप्रमाणे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या सहाय्याने मेटाव्हर्समध्ये वापरकर्ते नैसर्गिक संवाद सहज साधू शकतात.

मेटाने फेअर (FAIR- फेसबुक एआय रिसर्च) या संशोधन केंद्राची स्थापना केली आहे, जिथे एआयच्या प्रगत तंत्रज्ञानावर काम केले जाते. तेथे मेटाने जगातील दोनशेहून अधिक भाषांमध्ये भाषांतर करणारी एआय यंत्रणा विकसित केली आहे. एआयच्या मदतीने मेटा स्वयंचलित रोबोटिक्स प्रणालीही विकसित करत आहे. मेटाने विकसित केलेले पायटॉर्च (PyTorch) हे एआय संशोधन आणि मशीन लर्निंगचे ओपन-सोर्स साधन आहे. शास्त्रज्ञ आणि डेव्हलपर यांच्यासाठी हे एआय मॉडेल तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. एआयच्या मदतीने मेटा जनरेटिव्ह तंत्रज्ञान वापरत आहे, ज्यामध्ये स्वयंचलित इमेज आणि व्हिडिओ निर्मिती, थ्री-डी आणि व्हर्चुअल रिअॅलिटी आधारित इमर्सिव्ह कंन्टेंट तयार केला जातो. थोडक्यात, मेटा ही आता फक्त समाज माध्यम कंपनी न राहता, एआयच्या सहाय्याने मेटाव्हर्ससारख्या नव्या जगाची उभारणी करणारी बनली आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे, ग्राहकांना अधिक चांगला अनुभव आणि व्यवसायांना वाढीची संधी मिळेल. मात्र, त्याचवेळी नैतिकता, डेटा गोपनीयता, आणि गैरवापर टाळण्यासाठी योग्य धोरणांची गरज आहे.

व्हॉट्सॲप हे मेटाचे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा, सुरक्षित आणि सानुकूल बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मेसेजिंग अनुभवात सुधारणा, ऑटो-सजेशन (Smart Replies), टेक्स्ट प्रेडिक्शन, भाषांतर आणि बहुभाषिक समर्थन, रिअल टाइम भाषांतर, एंड-टू-एंड एनक्रिप्शन लागू करून वापरकर्त्यांच्या संदेशांची सुरक्षा आणि गोपनीयता, स्पॅम आणि फ्रॉड अलर्ट, फेक अकाउंट्सचा शोध, व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये एआयच्या सहाय्याने व्यवसायांसाठी सुलभ संवाद, चॅटबॉट्स सेवा, कस्टमाइज्ड अनुभव, मल्टीमीडिया सुविधा, स्पॅम मिडिया फिल्टर, मेसेज फिल्टरिंग, व्हॉईस असिस्टंट इंटिग्रेशन, एआय-आधारित फॉरवर्ड लिमिट असे अनेक नवनवे फीचर मेटाने एआयच्या सहाय्याने वापरकर्त्यांना प्रदान केले आहेत.

गुगलची आधुनिक तंत्रज्ञानात क्रांती

गुगल ही जगातील सर्वात प्रगत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. तिच्या यशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे. गुगलने एआयचा वापर विविध सेवा सुधारण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, आणि ग्राहकांना अधिक चांगले अनुभव देण्यासाठी केला आहे. गुगलच्या कोअर सर्च इंजिनमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. रँकब्रेन (RankBrain) हा गुगलच्या सर्च अल्गोरिदमचा एआय आधारित भाग आहे, जो युजरच्या सर्च क्वेरीचा अर्थ समजावून घेऊन अचूक परिणाम शोधतो. गुगलने बर्ट (BERT- Bidirectional Encoder Representations from Transformers) या मॉडेलच्या आधारे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग पद्धती विकसित केली असल्याने गुगल सर्चला वापरकर्त्याच्या क्वेरीचा अधिक चांगला संदर्भ समजतो. एआयमुळे वापरकर्त्याच्या शोध इतिहासावर आधारित अधिक वैयक्तिकृत परिणाम दाखवले जातात. गुगलची ट्रान्सलेट ही भाषांतर सेवा एआय आणि मशीन लर्निंगवर आधारित आहे. ती शंभरहून अधिक भाषांचे अचूक आणि वेगवान भाषांतर करू शकते. न्यूरल मशीन ट्रान्सलेशनद्वारे भाषांतर अधिक सुसंगत बनते. टेक्स्ट, आवाज आणि प्रतिमांमधूनही भाषांतर करण्याची क्षमता गुगलने विकसित केली आहे.

गुगल असिस्टंट हा गुगलचा एआय-आधारित सहाय्यक स्मार्टफोन, स्मार्ट होम डिव्हाइसेससह विविध उपकरणांवर उपलब्ध आहे. व्हॉईस रेकग्निशन आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मदतीने ते वापरकर्त्याच्या आदेशांचे अचूक पालन करते. वैयक्तिकृत सूचना, वेळापत्रक व्यवस्थापन आणि विविध माहिती शोधण्यास मदत करते. गुगलच्या सर्वच अॅप्समध्ये एआयचा वापर करण्यात आला असून त्यांचे कार्य अधिक अचूक, प्रभावी व गतिमान करण्यात येत आहे.

गुगल फोटोज या अॅपमध्ये फोटो व्यवस्थापनासाठी एआयचा मोठ्या प्रमाणावर केला जातो. एआयचे अल्गोरिदम चेहऱ्यांची ओळख, वस्तू वर्गीकरण आणि फोटो टॅगिंगही करतात. एआय-आधारित टूल्स फोटो संपादनासाठी ऑटोमॅटिक सुधारणा आणि फिल्टर्स देतात. मेमरी फीचर हे वापरकर्त्याच्या जुन्या फोटोंमधील महत्त्वाचे क्षण ओळखून ते एकत्रित संकलित करते.

गुगलचे युट्यूब हे व्हिडिओ कंन्टेंट सेवा पुरविणारे मंच आहे. येथे एआय वापरकर्त्याच्या कंन्टेंट पाहण्याच्या सवयीचा अभ्यास करून कस्टमाइज्ड कंन्टेंटची शिफारस करते.  स्पॅम नियंत्रण, अपमानास्पद किंवा अवांछित टिप्पण्या फिल्टर करणे, व्हिडिओचे स्वयंचलित ट्रान्सक्रिप्ट तयार करणे इत्यादीसाठी एआय उपयुक्त ठरते.

डीपमाईंड (DeepMind) ही गुगलची एआय संशोधन संस्था आहे. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी एआय-आधारित समाधान शोधण्याच्या कामी उपयुक्त ठरते आहे. विशेषतः एआयच्या मदतीने कर्करोग, नेत्ररोग, आणि हृदयविकार ओळखणे सोपे झाले आहे. अल्फागो (AlphaGo) आणि अल्फाफोल्ड (AlphaFold) यांसारखी अत्याधुनिक एआय प्रणाली विकसित करणे ही कामे इथे केली जातात. त्याचप्रमाणे टेन्सरफ्लो (TensorFlow) हे गुगलने विकसित केलेले एआय आणि मशीन लर्निंगसाठीचे ओपन-सोर्स सॉफ्टवेअर आहे. संशोधक आणि डेव्हलपर्स यांच्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे न्यूरल नेटवर्क्स तयार करण्यासाठीही ते प्रभावी साधन आहे.

गुगल-बार्ड हा गुगलचा जनरेटिव्ह एआय प्रकल्प आहे, जो चॅटबॉटसाठी वापरला जातो. वापरकर्त्याच्या तो प्रश्नांना सर्जनशील आणि अचूक उत्तरे देतो. कंटेंट जनरेशन आणि संवाद व्यवस्थापनात उपयुक्त आहे. तसेच, गुगलने विकसित केलेले वेमो (Waymo) हे स्वयंचलित वाहनांसाठी उपयुक्त आहे. यात एआयचा वापर वाहतूक नियंत्रण, मार्ग नियोजन आणि ड्रायव्हिंगविषयक निर्णय अधिक अचूक व सुरक्षित बनवले जातात. अशा प्रकारे एआयच्या सहाय्याने गुगलने अक्षरशः क्रांती घडविली आहे.

उद्योग-व्यवसायांना मायक्रोसॉफ्टच्या एआयचे बळ

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्ट ही विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे, ग्राहकांशी संवाद साधण्याबरोबरच विविध व्यावसायिक प्रक्रियांना सुलभ करण्याच्या कामी आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यात ती पुढे आहे. विशेषतः विविध उद्योग-व्यवसायांना आपल्या एआयचे पाठबळ मायक्रोसॉफ्ट पुरविते.

मायक्रोसॉफ्ट ३६५ को-पायलट हा मायक्रोसॉफ्टचा एआय-चालित सहाय्यक वापरकर्त्यांना दस्तऐवजांचा सारांश तयार करणे, डाटा विश्लेषण करून अहवाल तयार करणे तसेच ईमेल लिहिण्यासही मदत करतो. विविध सादरीकरणे तयार करण्यासाठी, कार्यसूची आणि वेळापत्रकाचे व्यवस्थापन यांसाठी देखील मदत करतो, ज्यामुळे वापरकर्त्याची उत्पादकता साधने अधिक प्रभावी आणि सुलभ बनतात.

अॅझ्यूर एआय हा मायक्रोसॉफ्टची क्लाउड प्लॅटफॉर्म असून तो जो व्यवसायांना आणि विकसकांना अॅप्लिकेशनमध्ये एआय तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात मदत करतो. याच्या विविध एआय सेवांमध्ये मशीन लर्निंग, कॉग्निटिव्ह सर्विसेस अर्थात पूर्व-निर्मित एआय मॉडेल्स, बॉट सर्व्हिसेस, प्रतिमा व व्हिडिओ विश्लेषणासाठी संगणक दृष्टी (Computer Vision) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) समाविष्ट आहेत, ज्यामुळे व्यवसायांना एआय आधारित उपाय तयार करणे आणि ते अंमलात आणणे सोपे जाते. विकासकांना उच्च गुणवत्ता असलेल्या एआय ओपन डेटासेट्सही प्रदान करण्यात येतात, जे त्यांच्या एआय मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी वापरू शकतात. व्यवसाय व्यवस्थापन, ग्राहक सेवा, आरोग्य सेवा, (वैद्यकीय माहिती विश्लेषण), सुरक्षाविषयक डेटा विश्लेषण तसेच कार्बन क्रेडिट्स मॅपिंगच्या व्यवस्थापन आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्येही हे उपयुक्त आहे. कोकाकोलासारख्या कंपन्या एआय-चालित विपणन मोहिम तयार करण्यासाठी अॅझ्यूर ओपनएआय वापरतात, ज्यामुळे ग्राहकांच्या अनुभवांमध्ये आणि संवादात सुधारणा होते.

गिटहब को-पायलट विकसकांसाठी एक महत्वपूर्ण साधन आहे, जे त्यांना अधिक जलद, कार्यक्षम आणि प्रभावी कोड लिहिण्यात मदत करते. हे एआय-चालित कोड कंप्लीशन टूल विकसकांना कोड पूर्ण करण्यासाठी संबंधित कोड ब्लॉक्स सुचवणे, त्यातील त्रुटी शोधणे आणि कोड गुणवत्ता सुधारणे यासाठी मदत करतो. त्याचप्रमाणे सामान्य कोड लेखन कार्ये ऑटोमेट करून वापरकर्त्याचा वेळ वाचवून कार्यक्षमता वाढवतो. कोपायलट विकसकांना नवीनतंत्रज्ञान, टूल्स आणि सर्वोत्तम पद्धती शिकवतो.

याखेरीज मायक्रोसॉफ्ट आरोग्य सेवा व्यावसायिकांना वैद्यकीय माहिती प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषित करण्यासाठी एआयची मदत पुरविते. ज्यामुळे आरोग्यविषयक निर्णय अधिक चांगले घेता येतात आणि रुग्ण परिणामांमध्ये सुधारणा करता येते.

मायक्रोसॉफ्टच्या एआय उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय परिणाम साध्य होत आहेत. अनेक फॉर्च्युन-५०० कंपन्या या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत.

अॅपलमध्ये इनोव्हेशनचा नवा टप्पा

अॅपल ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्या उत्पादनांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी सातत्याने संशोधन व विकासात अग्रेसर राहिली आहे. आयफोन, आयपॅड, मॅकबुक यांसह आपल्या विविध सेवांमध्ये अॅपलने एआयचा वापर करून डिजिटल जगात क्रांती घडवून आणली आहे.

सिरी हा अॅपलचा एआय-आधारित व्हॉईस असिस्टंट असून जो वापरकर्त्यांना विविध कामे सोप्या पद्धतीने पार पाडण्यास मदत करतो. नॅचरल लँग्वेज प्रोसिंगचा वापर करून युजरच्या बोलण्याचा अर्थ समजून त्याला अचूक उत्तर देतो. युजरच्या सवयी, दिनचर्या, आणि आवडीनुसार सेवा सादर करतो. आयफोन आणि आयपॅडसाठी अॅपलने चेहरा ओळखणारी अत्याधुनिक प्रणाली विकसित केली गेली आहे. फिंगरप्रिंट किंवा पासवर्डच्या तुलनेत ती अधिक सुरक्षितता प्रदान करते. वापरकर्त्याचे लक्ष ओळखून डिव्हाइस अनलॉक करता येते.

अॅपलच्या नवीन डिव्हाइससाठी खास तयार केलेल्या A-सिरीज (A16 Bionic) आणि M-सिरीज (M1, M2) प्रोसेसर्समध्ये एआय आणि मशीन लर्निंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. न्यूरल इंजिनमुळे एआय-आधारित कामे जसे की, फोटो प्रोसेसिंग, भाषा ओळख आणि आवाज विश्लेषण इ., जलद आणि प्रभावी होतात. वापरकर्त्याचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अॅपल विशेष काम करते.

अॅपलच्या कॅमेरा प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. स्मार्ट एचडीआर फीचर प्रकाश, छायाचित्र आणि रंग अधिक नैसर्गिक बनवतो. डीप फ्यूजनमुळे कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे फोटो घेणे शक्य होते. कंन्टेंट अवेअर एडिटिंगमुळे फोटोमधील अनावश्यक घटक काढून टाकणे किंवा त्यात बदल करणे सहजशक्य होते. अॅपल म्युझिक एआयच्या सहाय्याने वापरकर्त्याला वैयक्तिकृत संगीत सिफारशी देते, आवडीनुसार प्लेलिस्ट तयार करते, संगीताचा प्रकार, मूड आणि वापरकर्त्याच्या ऐकण्याच्या सवयींचा अभ्यास करते.

अॅपलच्या विविध उपकरणांत आरोग्य आणि फिटनेस तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जातो. अॅपल वॉच आणि हेल्थ अॅपमध्ये एआयचा वापर केला जातो. हृदयाचे ठोके ओळखून आरोग्यविषयक सूचना करणे, झोपेच्या सवयींवर आधारित वैयक्तिक आरोग्य सल्ला देणे, वापरकर्त्याचा अचानक पडण्याचा प्रसंग ओळखून मदतीसाठी संपर्क साधणे इत्यादी बाबी यामध्ये आहेत.

अॅपलच्या उत्पादनांसाठी वापरकर्त्याची गोपनीयता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी ऑन-डिव्हाइस प्रोसेसिंगसाठी एआय वापरले जाते, ज्यामुळे वापरकर्त्याला डेटा इंटरनेटवर अपलोड करण्याची गरज उरत नाही. डेटा एनक्रिप्शनच्या मदतीने वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते. त्याचप्रमाणे अॅपलने एआयच्या मदतीने आयफोन, मॅकबुक, अॅपल वॉच आणि होमपॅडसारख्या डिव्हाईसअंतर्गत अखंडित संवाद साधणारी इकोसिस्टीम विकसित केल्याने एअरपॉड्स वापरताना कॉल आला तर यापैकी कोणत्याही उपकरणावर तो सहजपणे स्वीकारता येतो.

दिव्यांग व्यक्तींसाठी अॅपलने स्क्रीनवरील मजकूर वाचून दाखविणारी व्हॉईसओव्हर, आवाजाचे रिअल टाइम ट्रान्सक्रिप्शन दाखविणारी लाइव्ह कॅप्शन्स, फक्त डोळ्यांच्या हालचालींनी नियंत्रित होणारी स्वीच कन्ट्रोल इत्यादी प्रणाली विकसित केल्या आहेत.

अॅपलने आपल्या संशोधन व विकास प्रकल्पांत सिरी (Siri)च्या पुढील पिढीचा विकास करण्याचे ठरवून त्याच्या अल्गॉरिदममध्ये सुधारणा चालविली आहे. वैयक्तिक डाटा सुरक्षेच्या अनुषंगाने तर सातत्याने काम करण्यात येत आहे. अॅपलची ऑगमेंटेड रिअलिटी यंत्रणा असणाऱ्या आर्किट (ARkit) मध्येही एआयचा वापर सुरू केला आहे. याच्या सहाय्याने वास्तविक जगात व्हर्च्युअल घटक अधिकाधिक समायोजित करता येतील. गेमिंग, शिक्षण आणि डिझाइनमध्येही याचे उपयोजन करण्याचे संशोधन आहे.

ऑटोमोटिव्ह एआय हे तंत्रज्ञान अॅपल विकसित करीत आहे. अॅपलच्या स्वयंचलित कार प्रकल्पामध्ये मार्ग नियोजन, अपघात टाळण्यासाठी प्रेडिक्शन आणि चालकविरहित वाहतुकीसाठी एआयचा प्रभावी वापर करण्याचेही संशोधन सुरू आहे.

एक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

एक्स (पूर्वीचे ट्विटर) कंपनीने समाजमाध्यमांच्या संवाद पद्धतीत आमुलाग्र बदल केले आहेत. एआयच्या सहाय्याने एक्सने आपल्या सेवा अधिक प्रभावी, वैयक्तिकृत आणि सुरक्षित केल्या आहेत. कंन्टेंट मॉडरेशन, हेट स्पीच, फेक न्यूज आणि गैरवर्तन यांचा शोध, त्यांवर स्वयंचलित अॅक्शन, ट्रेंड्स आणि अल्गोरिदम मॅपिंग, ट्रेंडिंग हॅशटॅग्स, कस्टमाइज्ड फीड, स्पॅम आणि बॉट्स नियंत्रण आदी प्रक्रियांच्या आधारे ग्राहक संवादात सुधारणा करण्यात एक्स यशस्वी ठरते आहे. ग्राहकांसाठी चॅटबॉट्स आणि ऑटोमेटेड रिप्लाय सिस्टिमही विकसित केल्या आहेत. एक्सही मेटाप्रमाणे डाटा विश्लेषण, ग्राहक वर्तनावर आधारित मार्केटिंग धोरण आखणे, नैसर्गिक संवादासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर, जाहिरातींचे व्यवस्थापन, रिअल-टाईम विश्लेषण यांसाठी एआयचा प्रभावी वापर करते.

उपरोक्त उदाहरणांवरुन आपल्या लक्षात येईल की, आपण सारेच कसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांनी आणि तंत्रज्ञानाने घेरले गेलेलो आहोत. त्यामुळे याचे काही धोकेही सामोरे आलेले आहेत, येत आहेत. तेही याठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे.

धोके आणि आव्हाने:

समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्म्सवर एआयचा वापर सकारात्मकतेसाठी होत असला तरी त्याच्यामुळे काही आव्हाने आणि धोकेही निर्माण झालेले आहेत. त्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे चुकीच्या माहितीचा प्रसार होय. एआयच्या सहाय्याने फेक न्यूज किंवा थेट डीपफेक व्हिडिओ सुद्धा तयार करून प्रसारित करण्यात येत आहेत. विशेषतः राजकीय प्रचारासाठी चुकीच्या बातम्या पसरवण्याचे प्रकार वारंवार होताना दिसतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा देखील डीपफेक व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे माहितीच्या, माध्यमाच्या विश्वासार्हतेचा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. दुसरी बाब म्हणजे एआय वापरताना लोकांचा वैयक्तिक डाटा गोळा केला जातो, ज्यामुळे गोपनीयतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. डाटा चोरीचे प्रकार वाढले आहेत. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या माहितीचा वापर होतो. या पार्श्वभूमीवर, एआय-निर्मित कंटेंटमुळे खऱ्या आणि बनावट माहितीमधील सीमारेषा पुसली जाते. एआय जनरेटेड फोटो किंवा व्हिडिओ वास्तवातील माहितीशी विसंगत असू शकतात. समाजमाध्यम कंपन्या अशा प्रकारच्या कंन्टेटला रोखण्यासाठी काम करीत असल्या तरी अंतिमतः माहिती, व्हिडिओ, छायाचित्रे यांची शहानिशा करण्याची जबाबदारी वापरकर्त्यावरच येते. त्यामुळे कोणतीही माहिती समोर आली की लगोलग त्यावर विश्वास न ठेवता अन्य माध्यमांमध्ये त्याची पडताळणी करून मगच ते पुढे पठवायचे की जागीच डिलीट करून रोखायचे, याचा निर्णय वापरकर्त्याच्या सारासार विवेकावर अवलंबून आहे.

भविष्यातील संधी:

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे समाज माध्यमांमध्ये अनेक नवनवीन संधी निर्माण होत आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी काम करता येत असल्यामुळे अत्यंत सुस्पष्ट आणि व्यक्तिशः ब्रँडिंग शक्य होते. एआयच्या साथीने ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) यांचा समावेश केल्याने ग्राहकांसाठी अधिकाधिक आकर्षक व अभिनव अनुभव तयार करता येऊ शकतात.

भविष्यात एआय-आधारित साधनांचे ऑपरेशन, व्यवस्थापन आणि मॉडरेशन यासाठी तज्ज्ञांची मोठी आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे तरुणांनी एआयलाच आपल्या प्रगतीची शिडी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कंन्टेंट मॉडरेशन आणि एथिकल एआय या क्षेत्रातही नव्या भूमिका आणि संधी निर्माण होणार आहेत.

थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमे यांचा एकत्रित वापर संवादाचे स्वरूप बदलत आहे. एआयचा योग्य वापर केला तर व्यवसाय, संवाद, आणि सामाजिक कार्य यामध्ये क्रांती घडवून आणता येईल. पण, या तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी आणि नैतिकता जपण्यासाठी योग्य धोरणे आखणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नजीकच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांमधील एकत्रित कामगिरीने नव्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे दिग्दर्शन होईल. त्याचा अखिल मानवी समुदायाच्या उन्नतीसाठी वापर केला तरच त्याचे सकारात्मक फलस्वरुप निदर्शनास येईल. अन्यथा, महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनीही इशारा देऊन ठेवला आहेच की,

कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा टप्पा असू शकेल; पण त्याचे धोके ओळखून त्यांचे निराकरण वेळीच केले नाही, तर तो कदाचित अखेरचाही ठरू शकेल.

शुक्रवार, १ जुलै, २०२२

समाजमाध्यमांचे भवितव्य





('दै. सकाळ'च्या निपाणी कार्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'व्हिजन २०२५' ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली. सदर पुरवणीत प्रकाशित झालेला माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी 'सकाळ'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमे हे आजच्या काळातील एक महत्त्वाचे संवादसाधन आहे. वॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यापैकी एक तरी आपण वापरतोच. नवी पिढी त्यापलिकडं गेली आहे. ती आता स्नॅपचॅट, शेअरचॅट इथं तुम्हाला दिसेल. फेसबुक हे आता त्यांच्या दृष्टीनं जुन्या (थोडक्यात ज्येष्ठ) लोकांचं माध्यम बनलं आहे. तरीही फेसबुकनं आपलं स्वरुप सातत्यानं बदलत ठेवून नव्या-जुन्यांना जोडून ठेवण्याचं कसब दाखवलं आहे, जे अन्य स्पर्धक कंपन्यांना तुलनेत शक्य झालं नाही आणि त्या या स्पर्धेत काहीशा मागं पडल्या. फेसबुकनंच वॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यांची खरेदी करून या क्षेत्रातील ती एक दादा कंपनी बनली आहे.

चालू वर्षात समाजमाध्यम क्षेत्रातला सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे अग्रमानांकित उद्योजक इलॉन मस्क यांनी केलेला ट्विटरचा खरेदी व्यवहार आणि त्या व्यवहारासाठी त्यांनी या कंपनीचा पुरविलेला पिच्छा! त्यानंतर या कंपनीच्या वृद्धीमध्ये योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची गच्छंती ही सुद्धा चर्चेत राहिली. श्रीलंका हा देश जितक्या अब्जांचा कर्जबाजारी आहे, त्याहून वीसेक अब्ज अधिक रक्कम मस्क यांनी ट्विटरसाठी मोजली, अशीही वार्ता या दरम्यान आली.

फेसबुक असो, गुगल असो, मायक्रोसॉफ्ट असो अथवा ट्विटर, या समाजमाध्यम कंपन्यांनी आज जगावर वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आज फेसबुकवर आहे. सर्व समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांची संख्या एकत्रित केली तर ती जगातील सर्वाधिक लोकसंख्या केव्हाच बनलेली आहे. समाजमाध्यमांच्या या ताकदीचा अंदाज त्या कंपन्यांच्या कर्त्यांना तर आलेलाच आहे, पण त्याचप्रमाणे बलाढ्य मल्टिनॅशनल कंपन्या चालविणाऱ्या भांडवलदारांनाही तो आलेला आहे. त्यामुळेच पूर्वी ज्या प्रमाणे प्रसारमाध्यमे आपल्या हातात असावीत, म्हणून त्यांचा आटापिटा चालायचा आणि तो त्यांनी ज्या आक्रमकपणाने हस्तगत केला. त्याहूनही अधिक आक्रमकपणाने समाजमाध्यमांची मालकी प्राप्त करण्यासाठी आज जगात वेगवान हालचाली सुरू आहेत. जगाचे अर्थकारण आणि त्याहूनही राजकारणाची सूत्रे हलविण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली आहे, या जाणीवेतून समाजमाध्यमांनी विविध देशांत राजकारण प्रभावित करण्यासाठी आपल्या ताकदीचा वापर केला, आपल्या लाखो वापरकर्त्यांचा डाटा, माहिती व्यापारी कंपन्यांना प्रचंड किंमत घेऊन विकला. मात्र, केंब्रिज एनालिटिकाच्या माध्यमातून अखेरीस त्याची भांडाफोड झाली आणि ठिकठिकाणी त्यांना माफी मागावी लागली. फेसबुकला केंब्रिज एनालिटिका प्रकरणात मोठ्या नाचक्कीला सामोरे जावे लागले. त्यासाठी झुकेरबर्ग यांची अमेरिकन सिनेटमध्ये कानउघाडणी होऊन माफीनामाही सादर करावा लागला. तथापि, अमेरिकाच नव्हे, तर जगातील युके, जर्मनीमध्येही फेसबुकला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधातील हेट स्पीच आणि फेक न्यूजला वेळीच आळा न घातल्याचा ठपकाही फेसबुकवर ठेवण्यात आला. अगदी भारतात सुद्धा फेक न्यूज आणि हेट स्पीचला आळा घालण्याऐवजी सरकारधार्जिणे धोरण फेसबुक स्वीकारत असल्याच्या टीकेलाही कंपनीला सामोरे जावे लागले.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे समाजमाध्यमे ही आज केवळ संवादाची साधने राहिलेली नाहीत, तर जगावर भांडवलदारी सत्ता प्रस्थापित करण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांची हस्तक साधने म्हणून ती अधिक वापरली जात आहेत आणि वापरकर्ते हे या व्यवस्थेचे केवळ ग्राहक आहेत, या दिशेने समाजमाध्यमांची आणि त्यांच्या बलाढ्य मालकांची वाटचाल सुरू झालेली आहे. आगामी काळात ही पकड अधिकाधिक घट्टच होत जाणार आहे. याचे कारण म्हणजे भांडवलदार हा नफेखोरीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे आजच्या जगभरातील सर्वाधिक प्रभावी राजसत्तांना या समाजमाध्यमांच्या प्रभावाची, बलस्थानाची पुरेपूर कल्पना आलेली आहे. त्यामुळे समाजमाध्यमे आणि त्यांच्या वापरकर्त्यांचे नियंत्रण आपल्या हाती असावे, आपण जे सांगू त्यावर या समस्त जनतेचा विश्वास बसावा आणि त्यातून अंतिमतः आपली सत्ता अबाधित राहावी, हा राज्यकर्त्यांचा मानसहेतू पूर्ण करण्यात अगर जोपासण्यात समाजमाध्यमांचे भांडवलदार मालक संपूर्णतः सहकार्य करण्यास तत्पर आहेत. त्यामुळे राजसत्ता आणि ही नवमाध्यमसत्ता एकमेकांच्या हातात हात घालून वापरकर्त्यांवरील आपली पकड अधिकाधिक मजबूत करण्याच्या मागे लागलेली आहे. पुढील काळात ही पकड अधिकाधिक घट्ट होत जाणार आहे कारण तिला आधुनिक नवतंत्रज्ञानाचे पंखही गतीने लाभणार आहेत.

समाजमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये नवे तंत्रज्ञान मोठ्या गतीने विकसित होत आहे. किंबहुना, या तंत्रज्ञानामुळे समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांना संवादाचे नवनवे आयाम लाभणार आहेत. फाईव्ह-जी, इंटरनेट ऑफ थिंग्ज यांची सुरवात तर झाली आहेच. त्यामुळे डाटावहन क्षेत्राला प्रचंड गतीचे पर लाभले आहेत. त्याखेरीजही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (ए.आय.), मशीन लर्निंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आर.पी.ए.), एज कम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग, व्हर्चुअल रिअॅलिटी व ऑगमेंटेड रिअॅलिटी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे वास्तव म्हणून सामोरे येते आहे. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर, गेमिंग या क्षेत्रांत अत्यंत आमुलाग्र स्वरुपाचे बदल येऊ घातले आहेत. आताच वापरकर्त्यांचा ट्रेंड टेक्स्ट व इमेज शेअरिंगकडून व्हिडिओ शेअरिंगकडे वळलेला आहे. तीस सेकंदांपासून ते मिनिटभरापर्यंतच्या व्हिडिओ क्लिप्स आणि मिम्स सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये दिसताहेत. त्यांना लाखो व्ह्यूज मिळत आहेत. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुक, युट्यूबपर्यंत सर्वांनीच त्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक अत्यावश्यक बदल केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये रंजकता आहेच, मात्र आताच हे व्हिडिओ हळूहळू सॉफ्ट पोर्नकडे झुकल्याचे दिसताहेत. त्यांना मिळणारे व्ह्यूज आणि लोकप्रियता अचंबित करणारी आहे. या क्लिप्स पाहणाऱ्यांत सर्व स्तरांतील दर्शक तर आहेतच, पण शेअरिंग करणाऱ्यांत न कळत्या वयातील केवळ टीनएज मुले-मुली आहेत असे मात्र नाही. तर यामध्ये अगदी मध्यमवर्गातील गृहिणींचाही समावेश आहे. एरव्ही घरात पदर न ढळू देणारी ही गृहिणी समाजमाध्यमांवर ‘टिप टिप बरसा पानी’सारख्या गाण्यावर दर्शकांना शक्य तितके सिड्युस करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या महिलांवर टिप्पणी करण्याचा हेतू इथे नाही, तर समाजमाध्यमांनी कोणती दिशा पकडली आहे, या बाबीकडे अंगुलीनिर्देश करण्याचा प्रयत्न आहे. स्त्रीदेहाचे उत्तान प्रदर्शन मांडण्याचा हा प्रयत्न समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्याचा परीघ विस्तारतो आहे. दर्शकांच्या नजरा विटाव्यात, इतके हे प्रमाण वाढते आहे. समाजमाध्यमांमुळे आणि इंटरनेटमुळे झालेल्या माध्यमांच्या प्रचंड व्यक्तीगतीकरणामुळे पोर्न क्लिप्स, फिल्म्स हे आजचे तुमच्या आमच्या घरातले उघडेवाघडे वास्तव आहे, हे नाकारण्यात काहीही हशील नाही. आपली मुले आपल्याशेजारी बसून नेमक्या कोणत्या गोष्टी अॅक्सेस करताहेत, याचा थांगपत्ता पालकांना लागू न येण्याइतपत ही पिढी स्मार्ट आहे. सगळीकडेच हे असेच आहे, असे म्हणावयाचे नसले तरी बहुतांश वास्तव आणि आकडेवारी त्याकडे निर्देश करते, हेही खरे आहे.

या पार्श्वभूमीवर, उद्या व्हर्चुअल रिअॅलिटी वा ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या युगात अशा प्रकारचा कन्टेंट केवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण केला जाईल आणि पाहिला जाईल, या शक्यतेच्या विचारानेच छाती दडपून जाते. सध्या पब्जीसारख्या गेमिंगमुळे तरुणांच्या हिंसात्मकतेची पातळी केवढी तरी उंचावलेली आहे. सारखा खेळू नको, म्हणणाऱ्या आईबापाची निर्घृण हत्या करण्यापर्यंत ही मजल गेलेली आहे. त्यामुळे गेमिंग व समाजमाध्यमांच्या क्षेत्रात ऑगमेंटेड रिअॅलिटी दाखल झाल्यानंतरचे परिणाम, दुष्परिणाम कोणत्या स्तराला जातील, काय वळण घेतील, हे सांगणे आणि समजून घेणे अवघड नाही.

समाजमाध्यमे वाईट नाहीत. मात्र त्यांचा वापर कोणत्या कारणांसाठी केला जातो, ती कोणाच्या हातात आहेत, त्यांचे हेतू काय आहेत, यावर त्यांच्या परिणामांची दिशा अवलंबून असते. आजकाल समाजमाध्यमांवर स्वच्छ अभिव्यक्ती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. किंबहुना एखादी स्वच्छ अभिव्यक्ती सुद्धा तितक्याच स्वच्छपणाने घेतली जाईल, याची तीळमात्र शक्यता राहिलेली नाही, इतके वापरकर्त्यांचे मन ट्रोलिंगमुळे कलुषित झालेले आहे. तुम्ही समाजमाध्यमांवर आहात, याचा अर्थ तुम्ही कोणती ना कोणती भूमिका घेतलेले अथवा असलेले असायलाच हवेत, असा दुराग्रह त्यामागे आहे. किंबहुना, ट्रोलर्स तुम्हाला या बाजूचे अथवा त्या बाजूचे करूनच सोडतात. शिवीगाळ ही खरे तर आपली संस्कृती नाही. उच्च प्रतीचे वैचारिक आदानप्रदान होऊन चर्चाविमर्षातून एखादी भूमिका निश्चित होणे किंवा मतनिर्मिती होणे, यासाठी समाजमाध्यमांसारखा उत्तम मंच नाही. मात्र, समाजमानस प्रभावित करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचा आजचा कालखंड आहे. व्हॉट्सअॅपवर आलेले सारेच खरे, किंबहुना आपल्या मताला परिपोषक तेवढेच खरे, स्वीकारार्ह आणि अन्य भूमिका अस्वीकारार्ह किंवा चुकीच्या, असे मानण्याचा हा काळ. त्यात समोरची व्यक्ती ही व्हर्चुअली समोर आहे. या अप्रत्यक्षतेचा फायदा घेऊन गालीप्रदानाचा एक मोठा कार्यक्रम समाजमाध्यमांवर आज चालू असलेला दिसतो. समोरच्याचे म्हणणे समजून न घेता त्याला लक्ष्य करून त्याचा ‘कार्यक्रम’ करण्याचा एकमेव हेतू येथे दिसून येतो. हे समाजस्वास्थ्याला अतिशय घातक आहे. 

भविष्यामध्ये ही परिस्थिती बदलेल किंवा कसे, हे आताच सांगणे अवघड आहे. याचे कारण म्हणजे एकविसाव्या शतकात जन्मलेली पिढी ही एकीकडे अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख होत असताना त्याच तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आणि साधनांवर आरुढ होऊन त्यांना विज्ञानवादाऐवजी अधिकाकधिक सनातनी, प्रतिगामी बनविण्यासाठी प्रयत्न करणारी एक मोठी फळी समाजमाध्यमांवर कार्यरत आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठेऐवजी परंपरानिष्ठ पिढी घडविण्याकडे या साऱ्याचा कल दिसून येतो. समाजमाध्यमेच कशाला? आपली दूरचित्रवाणीसारखी माध्यमेही तेच करताहेत. एके काळी दूरदर्शनने जी सामाजिक व राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती, ती तर आता मागेच पडली आहेत. मात्र, भांडवलदारांच्या हातात एकवटलेली विविध वृत्तमाध्यमे असोत अथवा मनोरंजन वाहिन्या, त्या अधिकाधिक परंपरानिष्ठ कन्टेंट देण्याकडेच झुकलेल्या आहेत. सणसमारंभ, देवभोळेपणा, अंधश्रद्धा यांची रुजवात करण्याकडे त्यांचा सारा झुकाव आहे. त्याच प्रकारचा कन्टेंट अगदी ठरविल्याप्रमाणे साऱ्या वाहिन्या देताना दिसताहेत. विज्ञानवाद आणि विज्ञाननिष्ठा ही तर त्यांच्या जमेतच नाही. सत्ताधार्जिणा मजकूर तयार करणे आणि त्याचे व्यापक प्रसारण करणे हाच एककलमी कार्यक्रम जणू साऱ्यांनीच अंगिकारलेला आहे. त्यामुळे यासाठी केवळ समाजमाध्यमांनाच दोष देण्यात काही अर्थ नाही. तथापि, समाजमाध्यमांवर सर्वसामान्य नागरिकांची अभिव्यक्ती उमटत असल्याने त्या अभिव्यक्तीची दिशा कोणती आहे, याची नोंद घेणे अगत्याचे ठरते. म्हणूनच त्याची अभिव्यक्ती येथे विविध गैरप्रकारांचा अवलंब करून प्रभावित करण्याचे होणारे प्रयत्न चिंतेत भर घालणारे आहेत.

सर्वसामान्य वापरकर्त्याचे भावविश्व, मतक्षेत्र प्रभावित करून त्याचा आपल्या लाभासाठी वापर करून घेण्यासाठी टपलेल्या भांडवलदार, व्यापारी, सत्ताधीश, नटनट्या आणि असे तमाम इन्फ्युएन्सर्स यांचा हा जमाना आहे. अनुनय करणारे अनुयायी घडविण्यासाठी या साऱ्यांची सातत्यपूर्ण धडपड सुरू आहे. त्यातून त्यांना त्यांचे अर्थकारण आणि राजकारण साधून घ्यावयाचे आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. फेक न्यूज, हेट स्पीच हे सारे त्याचेच घटक आहेत. सामाजिक सौहार्द राखण्याऐवजी समाजामध्ये तेढ निर्माण होऊन त्याचा आपले राजकारण, सत्ताकारण साधून घेण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याचाच विचार करणाऱ्यांचे प्रमाण येथे मोठे आहे. ते समजून न घेता त्यांच्या अशा कोणत्याही चिथावणीला बळी पडणाऱ्यांचे प्रमाण तर त्याहून मोठे आहे. परिणामस्वरुप, देशात मोठे अराजक निर्माण करू शकणाऱ्यांची एक मोठी फौज या माध्यमातून समोर तयार आहे. त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत. अशा भडक माथेफिरुंनी निष्पापांना दगडांनी ठेचून मारलेले आहे, जिवंत जाळलेले आहे.

समाजमाध्यमे एकीकडे चांगली अशीच माझी एक वापरकर्ता म्हणून भावना असताना या सर्व गोष्टी सांगण्याचे कारण म्हणजे त्यांचा भविष्यात योग्य दिशेने, स्वच्छ आणि विधायक अभिव्यक्तीसाठी वापर झाला नाही, तर याच वास्तवाला आपल्याला भविष्यात अधिक प्रखरपणाने सामोरे जावे लागणार आहे. ही प्रखरता भीषणतेमध्ये केव्हा पालटेल, याचा पत्ताही आपल्याला लागणार नाही. त्यामुळे त्यांचा आपल्या सर्वंकष सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी जास्तीत जास्त वापर करण्यासाठी नवपिढ्यांना प्रवृत्त करणे, समाजमाध्यम वापराची साक्षरता व संस्कार रुजविणे, हे आपण आतापासून केले, तरच ते भविष्यात हितावह ठरणार आहे. अन्यथा नवनवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर समाजमाध्यमे अधिकाधिक प्रगत होत जातील, त्याचा परीघ विस्तारत जाईल, हे जितके खरे आहे, तितकेच त्यांचे दुष्परिणामांचे क्षेत्रही विस्तारत जाणार आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. कारण चांगल्याऐवजी वाईटाकडेच मानवाचा कल तातडीने झुकतो, हा अखिल मानवजातीचाच इतिहास आपल्याला सांगतो. अहिंसेचा संदेश देणारा एखादाच बुद्ध किंवा गांधी मानवजातीच्या इतिहासावर आपले नाव कोरतो कारण बाकीचा समग्र इतिहास हा सर्व प्रकारच्या मनोकायिक हिंसेनेच तर व्यापलेला आहे.

बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

समाजमाध्यमे अन् शिवराळपणा!


(संपादक मित्रवर्य श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या 'अक्षरभेट'च्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी साभार पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


सोशल मीडिया तथा समाजमाध्यमे ही आजच्या जगण्यातले एक प्रमुख अविभाज्य वास्तव आहे. टीनेजर, तरुण, मध्यमवर्गीय आणि आता ज्येष्ठ नागरिकही कोणत्या ना कोणत्या समाजमाध्यमाद्वारे एकमेकांशी कनेक्टेड राहण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत. प्रत्येक पिढीचे समाजमाध्यमांच्या वापराचे कारण वेगवेगळे असले तरी तरुण पिढी ही त्यामुळे एकलकोंडी होऊ लागली, तर दुसरीकडे ज्येष्ठांचा एकटेपणा थोडासा दूर होऊ लागला, असे याचे काही परिणाम होताहेत, हेही खरे आहे.
मी नेहमीच म्हणतो की, मी माध्यमांचा अभ्यासक या नात्याने समाजमाध्यमांचा कट्टर समर्थक समर्थक आहे. कारण कोणतेही माध्यम हे वाईट नसतेच मुळी. ते ज्या हातांत पडते, ते हात त्याचा वापर कसा करतात, त्यावर त्याची भलीबुरी दिशा, गती-दुर्गती ठरत असते. आजपर्यंत सर्वच माध्यमांच्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे. अणुचेच उदाहरण घेऊ या. अणुपासून समाजाच्या हितासाठी उपकारक अशी अणुऊर्जाही निर्माण करता येते आणि अणु बॉम्बही तयार करता येतो. आणि जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांचा कल हा कोणत्या बाजूला आहे, हे आपण पाहतो आहोतच. समाजमाध्यमेही याला अपवाद नाहीत. एक तर नवीन डिजीटल तंत्रज्ञानाच्या वारुवर आरुढ होऊन ज्या गतीने समाजमाध्यमांनी आपले अवकाश विस्तारले आहे, ती गती अचंबित करणारी आहे. मुद्रणकलेला शे-दोनशे वर्षे, रेडिओला चाळीसेक वर्षे आणि टीव्हीला विसेक वर्षे असा कालावधी लागला होता, जगभरात आपला परीघ विस्तारण्याला. परंतु, समाजमाध्यमांच्या विविध प्रकारांचे आयुष्यच मुळी आता कमाल दहा वर्षांपर्यंत सीमित झाले आहे. अत्यंत गतीने जगभरात विस्तारलेली समाजमाध्यमे अवघ्या दहाएक वर्षांतच लयाला गेल्याची उदाहरणे गेल्या दशकभरात आपल्यासमोर घडलेली आहेत. फेसबुकने यातली मेख जाणली, सातत्याने बदलण्याचे धोरण स्वीकारले आणि आपले रुप बदलत बदलत आपले अस्तित्व कायम राखण्यात यशस्वी ठरले आहे, आतापर्यंत तरी.
समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांच्या बाबतीत एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे या वापरकर्त्यांचा वयोगट हा सर्वसाधारणपणे आहे, १६ ते ४० या दरम्यानचा. त्यातही पौगंड वयातील मुलामुलींचे येथील प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यामुळे शिक्षणाचे, व्यवहाराचे, सर्वंकष ज्ञानाचे संस्करण ज्यांच्यावर अद्याप पूर्ण होणे बाकी आहे, किंवा होऊ घातले आहे, असा हा गट आहे. अत्यंत संस्कारक्षम असलेला हा गट म्हणजेच या देशाचे भवितव्य आहे, असेही आपल्याला म्हणता येऊ शकेल. मात्र, समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरुन ही संस्कारशील मने घडविण्याऐवजी बिघडविण्याकडे कल असणारा एक अत्यंत (कु)महत्त्वाकांक्षी गट या प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतो आहे आणि त्याच्या या धुमाकुळाला ही सारी मने बळी पडत आहेत, ते पाहता एक चिंतेचे वातावरण साऱ्या देशभरात निर्माण झाले आहे.
साधारणतः २०१४नंतरच्या कालखंडात ट्रोलिंग हा शब्द समाजमाध्यमांच्या संदर्भात सातत्याने ऐकू येऊ लागला. आणि २०१६मध्ये आलेल्या स्वाती चतुर्वेदी यांच्या आय एम अ ट्रोल या पुस्तकामुळे समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत असलेल्या ट्रोलर्सच्या फौजफाट्याची कहाणीच जगासमोर आली. समाजमाध्यमांच्या गैरवापराचं एक उघडंनागडं वास्तव या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आलं. कोणी आपल्याविरोधात काही लिहीतो आहे, असं दिसलं की त्याच्यामागे पगारी ट्रोलर्सची फौज सोडून द्यायची आणि इतकं संत्रस्त करून सोडायचं की, त्यानंही विचलित होऊन त्याच्या हातून काही चुकीचं लिहीलं जावं आणि त्यानंतर मग त्याला बरोबर कैचीत पकडता यावं, असा हा ट्रोलिंगचा ट्रॅप करून त्यात भल्याभल्यांना गुंडाळण्याचं एक मोठं षडयंत्र समाजमाध्यमांवर कार्यरत करण्यात आलं आहे. आणि आता तर पगारी ट्रोलर्सच्या पलिकडे स्वयंसेवी ट्रोलर्सनीच या माध्यमांवर धुमाकूळ सुरू केला असल्याचं दिसून येत आहे.
एखादी व्यक्ती आपली काही भूमिका घेऊन लिहीते आहे, समाजमाध्यमांवर व्यक्त होते आहे, घटनेच्या, कायद्याच्या चौकटीत तसेच सामाजिक भानाच्या बाबतीतही कुठेही तोल सुटलेला नाही, अशा प्रकारचे हे लेखन आहे; मात्र, काही इझमचे झेंडे घेऊन कार्यरत असलेल्या गटांना त्यात त्यांच्या हेतूंना बाधा आणणारं असं काही आढळलं की, त्या संबंधितावर पद्धतशीर वॉच ठेवला जातो आणि त्याच्याकडून अगदी प्रबोधनात्मक असंही काही पोस्ट झालं तरी, त्यावर अत्यंत विपर्यास करणारी, आक्षेपार्ह किंवा कधी कधी जाहीररित्या आपण उच्चारणार नाही, अशा अत्यंत असंसदीय, शिवराळ भाषेत टिप्पणी केली जाते. आणि मग लेखकाचा संबंधित पोस्ट टाकण्यामागचा मूळ हेतू, त्यातला विचार बाजूला पडून या ट्रोलर्सचा समाचार घेणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागतो. साहजिकच, इथे लेखकाचा प्रबोधनाचा मूळ हेतू आपोआपच बाजूला सारला जातो, चर्चा नको त्या दिशेला भरकटवली जाते. आणि आपोआपच ट्रोलिंगचा मूळ हेतू सफल होऊन जातो. पुढे या साऱ्या प्रकारांना कंटाळून संबंधित प्रबोधनकाराने या समाजमाध्यमांवरुन एक तर आपला गाशा गुंडाळावा किंवा त्याने येथे लिहीणे तरी थांबवावे, याच दिशेने त्याला हैराण केले जाऊ लागते. या पार्श्वभूमीवर, प्रबोधनकारांचे समर्थकही आक्रमक होऊ लागतात, ते ट्रोलर्सना तितक्याच चोख, अतिरेकी किंवा तशाच शिवराळ भाषेत प्रत्युतरे, दुरुत्तरे करू लागतात आणि येथे ट्रोलर्सचा हेतू पुन्हा दोनशे टक्के यशस्वी होतो कारण अँटी-ट्रोलर्सचीही एक फौज समाजमाध्यमांमध्ये आकार घेऊ लागते. अँटी जरी असले तरी ट्रोलिंगच ते! त्यामुळे ज्यांचे प्रबोधन करण्यासाठी संबंधिताने पोस्ट लिहीली, त्यांचे त्या मूळ पोस्टऐवजी दुसरीकडे लक्ष विचलित करण्यात ट्रोलर्स यशस्वी होऊन जातात. म्हणजे काही झाले तरी, इझमवाद्यांना आपले इझमिक हेतू साध्य करण्यामध्ये ज्या सुष्टांचा, विचारवंतांचा अडथळा होतो, त्या विचारवंतांचा व्हर्चुअल काटा काढण्यासाठी सरसावलेली, प्रशिक्षित केलेली, पगार देऊन पदरी बाळगलेली एक मोठी फौज येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.
याचे कारणही महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आज आपल्या देशाचे बहुसंख्य तरुण बळ हे समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर कार्यरत आहे, माहितीसाठी अवलंबून आहे. पुस्तके, वृत्तपत्रे यांच्यासारख्या अधिकृत माहिती देणाऱ्या व्यासपीठांपेक्षाही तत्काळ माहिती प्राप्त करून देणारे व्यासपीठ म्हणून समाजमाध्यमांचा वापर केला जातो खरा; मात्र, त्याच व्यासपीठाचा वापर करून फेक न्यूज, बनावटी पोस्टचा मारा करून या तरुणाला खऱ्या माहितीपासून वंचित ठेवून, माहितीची शहानिशाही न करता तिचा प्रसार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अपप्रवृत्ती येथे जोमाने फोफावल्या आहेत. खोटी माहिती, अफवा क्षणभरात देशात पसरवून त्या माध्यमातून देशात अराजक निर्माण करण्याचे, देशाला वेठीला धरण्याचे, भेदाभेद वाढविण्याचे प्रकार हरघडी घडताहेत. पाकिस्तानातल्या कराचीत एका बालकाचे अपहरण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल करून ते अपहरण आपल्या परिसरातच घडल्याची वार्ता समाजकंटकांनी पसरवली ती या समाजमाध्यमांमधूनच. त्यामुळे देशातील पालकांत अस्वस्थता पसरली आणि ठिकठिकाणी अपहरणकर्ते समजून गोरगरीब समाजातल्या लोकांना ठेचून मारण्यापर्यंत या देशातल्या निष्पाप जनतेची मजल गेली. पारधी समाजातल्या असहाय गरीब लोकांना गावच्या चावडीत कोंडून त्यांना दगडाने ठेचून मारणाऱ्या एकाच्याही मनाला त्यांच्या निष्पापतेची शहानिशा करावीशी वाटत नाही, दगड मारताना हात थरथरत नाही, इतकी असंवेदनशीलता या समाजात निर्माण होण्यास कारणीभूत कोणाला ठरवावे? लोकांना, व्यवस्थेला, समाजमाध्यमांना की त्यावरील या ट्रोल फौजेला? म्हणजे तुम्ही गरीब असा, पण गरीब दिसायचे मात्र नाही; अशी ही विचित्र कोंडी आहे. दुसरीकडे, साधे मटण घेऊन निघालेल्या लोकांना गोमांसाचे वहन करतात म्हणून पेटवून मारले जाते.
ही केवळ असंवेदनशीलता आहे का? हो आहे, मात्र असंवेदनशीलतेहून अधिक काही तरी यामागे गुंतले आहे, कार्यरत आहे. हे नेमके काय आहे? माझ्या मते, आपल्या समाजाला ज्या जातिधर्माच्या भेदाभेदांचा शाप गेली हजारो वर्षे ग्रासलेला होता आणि भारतीय राज्यघटनेने त्या सर्वांना कायद्याने कागदोपत्री समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि सहिष्णुतेचा संदेश देऊन तिलांजली दिलेली होती, देण्यास भाग पाडले होते आणि गेल्या साठ-सत्तर वर्षांत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपला जगभरात ठसा उमटविण्यात आपण यशस्वीही झालो आहोत. त्या सर्वांना आता तिलांजली देण्याचे प्रयत्न अत्यंत जोरदारपणे पुन्हा डोके वर काढत आहेत. समाजमाध्यमांना त्यासाठी हस्तक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहे.
आपल्या देशातल्या प्रत्येक समाजाच्या जातिगत संवेदनांना आवाहन करून त्या नव्याने नकारात्मक पद्धतीने चेतविल्या जात आहे, त्यांना आवाहन केले जात आहे, आव्हान दिले जात आहे, एकमेकांविरुद्ध उभे राहण्यास भाग पाडले जात आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभा राहावे, त्यांच्यादरम्यान कायमस्वरुपी एक दरी निर्माण व्हावी; त्यांनी एक राष्ट्र, एक समाज म्हणून पुन्हा उभे राहू नये, यासाठी एक कणखर यंत्रणा सक्षमपणे भूमिगत पद्धतीने, समाजमाध्यमांच्या व्हर्च्युअल व्यासपीठांचा वापर करून पद्धतशीरपणे कार्यरत करण्यात आली आहे. एके काळी एखादा समाज आपल्या हाताखाली गुलाम म्हणून काम करीत होता, तो आता शिक्षणाने विचारी, समंजस होऊन ताठ मानेने आपल्यासमोर उभा राहतो, हे गेल्या पिढीपर्यंत रुचत नव्हते, हे काही अंशी आपण मान्यही करू. पण, आता जागतिकीकरणाच्या कालखंडात जी पिढी जन्मली आहे, जी संपूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेते आहे, तिच्याकडून ग्लोबल भाषा बोलली जाण्याची, अवलंबली जाण्याची अपेक्षा धरायची की पुन्हा त्यांनी आपल्या बापजाद्यांच्या जातीचा दुराभिमान बाळगून नव्याने जातिव्यवस्थेचे समर्थक म्हणून तोंड वर काढावे, असा आग्रह धरायचा? नव्या पिढीमध्ये हा जात्याभिमान, धर्मातिरेकी असहिष्णुता नव्याने बिंबविणारी एक स्वतंत्र यंत्रणा गतिमान केली जाते आहे, समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरुन. आपल्याला प्रगतीपथावरुन च्युत करण्यासाठी, देशबांधवांप्रती आपल्या संवेदना, सहवेदना, सौहार्दाची भावना संकुचित करण्यासाठी या साऱ्याचा वापर करण्यात येतो आहे; अगदी आपलाही त्यासाठी वापर केला जातो आहे, याचे भानही या पिढीमध्ये न येऊ देता, जाणीवही होऊ न देता त्यांना इमानेइतबारे आपल्या सुप्त हेतूंसाठी वापरून घेण्याचा या ट्रोलर्सचा हेतू सफल होऊन जातो. हा जात्याभिमानाचा अंगार त्यांच्यात आत खोलवर कुठेतरी ठसठसत होताच, फक्त त्याला सातत्याने फुंकर घालून फुलवत ठेवण्याचे काम समाजमाध्यमांच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले आहे. मग कधी आरक्षणाने त्यांच्यावर झालेला अन्याय अतिरंजित स्वरुपात त्यांच्यासमोर मांडला जातो, तर कधी गोमातेचा अवमान केल्याचे दाखवून त्यांच्या धार्मिकतेला आव्हान दिले जाते. त्यामागचे वास्तव कधी उलगडून दाखविले जात नाही, किंवा जात्याभिमानाने अंध झालेले हे तरुण ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही करीत नाहीत. जे करतात, त्यांना देशद्रोही ठरवून त्यांचा न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशाच्या भूमिकेत हे ट्रोलर्स शिरताना दिसतात, तेही देशभक्तीचा, राष्ट्रवादाचा गोंडस बुरखा पांघरुन!
देशातल्या मूळ प्रश्नांना भिडण्याऐवजी सातत्याने निरुपयोगी, व्यवस्थेला निरुपद्रवी असे यक्षप्रश्न (?) निर्माण करून त्यांच्या सोडवणुकीच्या मागे लोकांना लावण्यात येते. देवधर्म, अध्यात्म यांच्या तात्त्विक चर्चेकडे सारा मोहरा वळविण्यात येतो. लोकांना त्यात गुरफटवून ठेवण्यात येते. सारी भांडवलशाही यंत्रणा त्या दिशेने कार्यान्वित करण्यात येते. त्यासाठी माध्यमबलाचा पुरेपूर वापर सातत्याने करण्यात येतो. जास्तीत जास्त उत्पादक मनुष्यबळ हे अनुत्पादक बाबींमध्येच कसे गुंतून राहील, या दृष्टीने सारी यंत्रणा काम करू लागते. या व्यवस्थेमध्ये लोक गुंतू लागले की, मूळ व्यवस्थेच्या प्रश्नांपासून तिचे लक्ष आपोआप हटते. एक मोठी पॅसिव्हिटी, अकार्यक्षमता, अक्षमता समाजमानसाचा ताबा घेऊन राहते. असा पॅसिव्ह, भांडवलशाहीद्वारा उपकृत समाज हा अशा व्यवस्थेचा मोठा आधार असतो. व्यवस्थेने, भांडवलशाहीने फेकलेल्या स्वादिष्ट तुकड्यांचा आस्वाद या समाजाने घ्यावयाचा असतो, त्यांना प्रश्न विचारावयाचे नसतात. प्रश्न विचारणारे, उपस्थित करणारे लोक या तंदुरुस्त (?) व्यवस्थेला आवडत नाहीत, नको असतात. अशा लोकांचा काटा काढण्यासाठी मग काही उपव्यवस्था कार्यरत करण्यात येत असतात. समाजमाध्यमांवरील ट्रोलिंग ही या उपव्यवस्थेची एक शाखा म्हणून काम करीत असते, हे इथे लक्षात घ्यायला हवे.
समाजमाध्यमांची व्हर्चुअलिटी हा जसा त्यांचा एक महत्त्वाचा लाभ आहे, तसाच तो एक मोठा तोटा म्हणूनही आता सामोरा येताना दिसतो आहे. एखाद्या विचारवंताला समारोसमोर प्रश्न विचारायचे, किंवा दुरुत्तरे करण्याची कोणाची प्राज्ञा असायची नाही. त्याच्या तोडीस तोड ज्ञान असणाराच एखादा विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या मताचा प्रतिवाद करण्यास पुढे येत असे. किंबहुना, ज्ञानाच्या क्षेत्रात अशा वाद-प्रतिवादांना अत्यंत मोलाचे, महत्त्वाचे स्थान असायचे, असते. मात्र, आज अशा विचारवंताच्या पायाचा धूलिकण होण्याचीही ज्याची पात्रता नाही, अशी व्यक्ती समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर त्याच्यावर अत्यंत असंसदीय शिवराळ भाषेत आगपाखड करताना दिसते, तेव्हा मनाला होणाऱ्या यातनांचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. योग्य ज्ञान मिळविणे दूरच, हाती आलेल्या माहितीचीही खातरजमा न करता त्यावरुन असा शिवराळपणा करणे हे कितपत संयुक्तिक, याचा विचारही होताना दिसत नाही. यामध्येही तरुणांचे प्रमाण अत्यधिक आहे, हे सांगताना तर अधिकच वेदना होतात. केवळ अरे ला कारे म्हणण्यापुरते हे मर्यादित नाही, तर त्यातून एकूणच या समाजाचा सामाजिक, मानसिक, वैचारिक असा ऱ्हास करण्यालाही या साऱ्या बाबी कारणीभूत ठरतात.
भारतीय राज्यघटनेने हा देश- स्वातंत्र्यापूर्वी कधीही एकसंध नसणारा भारत देश एकरुप, एकजीव करण्याचे काम केले. ज्या सांविधानिक मूल्यांची, मानवी मूल्यांची देणगी राज्यघटनेने आपल्याला प्रदान केली आहे, तिला हरताळ फासण्याचे, तिलांजली वाहण्याचे प्रकार समाजमाध्यमांच्या व्यासपीठांवरुन हरघडी होताना दिसत आहेत. व्हर्च्युअल माध्यमांपुरताच हा हिंसाचार मर्यादित असता तरी एकवार त्याकडे काणाडोळा करता येणे शक्य झाले असते. मात्र, प्रत्यक्षात या देशात ठिकठिकाणी माजलेल्या अराजकाच्या द्वारे कित्येक लोकांची प्राणाहुती, बळी आणि राष्ट्रीय, सामाजिक-आर्थिक संपत्तीचे नुकसान या देशाला सोसावे लागले आहे, गेल्या नजीकच्या कालखंडात. काही समाजकंटकांची तर राज्यघटनेची होळी करण्यापर्यंत मजल गेली. हे धाडस कसे होऊ शकते? येते कोठून? ज्या राज्यघटनेने स्वातंत्र्याचे मूल्य प्रदान केले, त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग राज्यघटनेचीच होळी करण्यासाठी केला जाणे, हे किती क्लेशकारक! मनुस्मृती आणि राज्यघटनेची तुलनाच कशी होऊ शकते? मनुस्मृतीच्या राज्यात या स्वातंत्र्याची तिरीप तरी आपल्यापर्यंत पोहोचू शकली असती का?, याचा विचारच केला जात नाही आणि अशा प्रकारे अविवेकी, अविचारी कृती केल्या जातात, जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात. त्यांना प्रोत्साहन दिले जाते. आज संपूर्ण जगभरात माजलेले अराजक, अस्वस्थता, दहशतवादाचे भीषण वास्तव आणि भारत देशातले सामाजिक, राजकीय चित्र पाहता, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जगातल्या भीषण वास्तवापासून या देशाचे संरक्षण जर कोण करीत असेल तर ते म्हणजे भारताचे संविधान. या संविधानाचे छत्र जर भारतीयांच्या माथ्यावरुन हरपले, तर मायबाप हरवलेल्या अनाथ मुलासारखी या देशाची आणि देशातल्या प्रत्येक समाजघटकाची अवस्था होऊन जाईल. त्यामुळे समाजमाध्यमांचे व्हर्चुअल व्यासपीठ असो की प्रत्यक्ष मैदानावरची लढाई असो, या सर्व ठिकाणी सांविधानिक मूल्ये, मानवी मूल्ये यांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने तत्पर राहायला हवे. दुष्प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी सुष्टांची फळी तयार होणे ही आजघडीची फार महत्त्वाची गरज आहे. चांगल्या लोकांनी, सत्प्रवृत्तींनी या क्षणी कोषात जाणे या देशाला कदापि परवडणारे नाही.