सोमवार, ९ मार्च, २०२६

समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती या विषयावर बोलताना...





परिसंवादादरम्यान डॉ. आलोक जत्राटकर यांच्या विविध भावमुद्रा

(डॉ. आलोक जत्राटकर यांचे सविस्तर व्याख्यान येथे ऐका.)


ईश्वरपूर इथं झालेल्या ३० व्या साहित्य संमेलनात आमचे मार्गदर्शक मित्र आणि मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 'आजचे साहित्य, समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती' या विषयावरील परिसंवादात सविस्तर मांडणी करण्याची संधी लाभली. सोबत समुपदेशक अर्चना मुळ्ये याही सहपरिसंवादक होत्या.
आज समाजमाध्यमांनी साहित्याच्या प्रसारात मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक, ब्लॉग आणि ऑनलाइन वाचनगटांमुळे साहित्यिक चर्चा अधिक व्यापक झाल्या आहेत. पूर्वी साहित्यिक चर्चा मुख्यतः नियतकालिके, परिसंवाद किंवा साहित्य संमेलनांपुरत्या मर्यादित असत. आज मात्र कोणताही वाचक सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू शकतो. यामुळे साहित्याभोवती लोकशाही स्वरूपाचा संवाद निर्माण झाला आहे.
नव्या डिजीटल युगात वाचनाचे स्वरूप बदलते आहे. नव्या पिढीचे वाचनाचे फॉर्म्स आणि रूची वेगळी आहे. मात्र, ती वाचत नाही, असे म्हणता येणार नाही. पुस्तक मेळ्यांमधील लाखो रूपयांची उलाढाल, लिट-फेस्टसारख्या उपक्रमांना तरूणांचा लाभणारा प्रतिसाद हे त्याचेच निदर्शक आहे.
पारंपरिक मुद्रित पुस्तकांबरोबरच डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. आज अनेक लोक दीर्घ कादंबऱ्यांपेक्षा लघुलेखन वाचणे पसंत करतात. वाचन ही आज सामूहिक चर्चेची प्रक्रिया बनली आहे. यातूनही अनेक सृजनात्मक साहित्यकृती निर्माण होत आहेत.
लेखन-वाचनापूर्वी अस्तित्वात असणारी श्रवण संस्कृती ही आता डिजीटल युगात पुनरुज्जीवित झाली असून स्टोरीटेल, ऑडिबल, कुकू इत्यादी प्लॅटफॉर्मवर आता पुस्तके ऐकण्याकडे कल वाढला आहे. जागतिक १५० अब्ज डॉलरच्या पुस्तक बाजारात १० अब्ज डॉलर इतका वाटा या ऑडिओ बुक्सचा आहे. या श्रवण संस्कृतीमध्ये स्मरण संस्कृतीचा मात्र ऱ्हास होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे.
आज वाचनसंस्कृती एका संक्रमणाच्या टप्प्यात आहे. परंपरागत मुद्रित पुस्तकांची परंपरा अजूनही जिवंत आहे, परंतु डिजिटल माध्यमांमुळे वाचनाचे नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. म्हणून आजचा प्रश्न “वाचनसंस्कृती टिकेल का?” असा नाही. खरा प्रश्न असा आहे—आपण वाचनसंस्कृतीला नव्या तंत्रज्ञानाशी कसे जोडणार? जर आपण परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधू शकलो, तर वाचनसंस्कृती अधिक व्यापक आणि समृद्ध होईल.
वाचन ही केवळ सवय नाही; ती संस्कृती आहे. वाचन ही केवळ माहिती नाही; ती विवेकी विचारांची निर्मिती आहे.
आणि विवेकवादी विचार करणारा समाजच आपल्या भविष्याचा खरा शिल्पकार असतो.
उपरोक्तप्रमाणे साधारणतः चाळीसेक मिनिटे मांडणी केली. समाजमाध्यमांवर सुरू असलेले वाचनसंबंधित उपक्रम, प्रत्यक्ष फिल्डवर सुरू असणारे उपक्रम यांचाही वेध घेतला.
महत्त्वाचे म्हणजे माझ्या या मांडणीचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्रज्ञा दया पवार यांनीही कौतुक केले, ही माझ्यासाठी 'ट्रॅक'वर असल्याची पोचपावती. अनेक श्रोत्यांनीही स्वागत केले.
एकूणच, परिसंवाद चांगला रंगला आणि एका चांगल्या उपक्रमात सहभागाचे समाधानही देऊन गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा