शुक्रवार, ६ मे, २०११

'सोन्याचा' दिवस!

आज अक्षयतृतीया... हिंदू मान्यतेनुसार साडेतीन मुहूर्तांमधला एक श्रेष्ठ मुहूर्त... माझा कल निर्मिकाचं अस्तित्व मानून नास्तिकतेकडे झुकणारा असल्यानं या दिवसाबद्दलचं माझं आकर्षण यथातथाच! पण आज सकाळी सकाळी माझा जीवलग मित्र प्रशांतचा फोन आला, त्याचं लग्न जुळत असल्याची बातमी त्यानं मला दिली आणि आजचा आपला दिवस खऱ्या अर्थानं 'सोन्याचा' झाला, अशी भावना मनात दाटून आली.
आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की, मित्राचं लग्न ठरलं, हे ठीक आहे. पण त्यात अगदी माझा दिवस सोन्याचा होण्यासारखं काय विशेष? सांगतो. याठिकाणी एक खुलासा करतो, तो म्हणजे प्रशांतचं लग्न पुन्हा (म्हणजे दुसऱ्यांदा) ठरतं आहे. पहिलं लग्न (सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं!) मोडलं. तो काडीमोड व्यवस्थित मिळवून देण्यात मलाच मोठी भूमिका पार पाडावी लागली होती. त्यानंतरचा मधला दोन वर्षांचा काळ माझ्यासाठी तर जड गेलाच, पण प्रशांतसाठी सुध्दा त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक जड गेला.
काही व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे माझा हा मित्र! तो लहान असतानाच वडिल वारलेले, घरची ना शेती ना अन्य काही उत्पन्न! आई निपाणीत विडया वळायची. त्यातून मिळणारी तुटपुंजी पेन्शन हाच काय तो घरखर्चाचा स्रोत. मधली बहिण आणि भावोजी हायवेवर चहाचा गाडा चालवायचे. त्या दोघांची चंद्रमौळी झोपडी, (चंद्रमौळी हा शब्द ऐकायला भारी वाटतो, पण प्रत्यक्षात ऊन्हापावसात त्या झोपडीची आणि त्यात राहणाऱ्यांची काय अवस्था होते, हे मी जवळून पाहिलंय.) तिथंच ही दोघं मायालेकरंही राहायची.
आठवीपर्यंत प्रशांत आपल्या मोठया बहिणीकडं जयसिंगपूरमध्ये शिकायला असायचा. अर्जुननगरच्या मोहनलाल दोशी विद्यालयात नववीत नवीन ऍडमिशन घेणारे तो आणि मी असे दोघेच होते. त्यामुळं साहजिकच जुन्यांपेक्षा आमच्या दोघांची ओळख, मैत्री आधी झाली. एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला, तो अगदी आजतागायत कायम आहे. अभ्यासात हुशार, अत्यंत प्रामाणिक, मित व मृदू भाषी, अतिशय सुंदर हस्ताक्षर (इतकं की त्या दोन वर्षांत शाळेतर्फे देण्यात आलेलं प्रत्येक प्रशस्तीपत्र त्याच्याच हस्ताक्षरातलं आहे.), रिंगटेनिस, क्रिकेट या खेळांमध्ये गती अशी अनेक वैशिष्टयं प्रशांतमध्ये होती. तसंच तो राहायलाही आमच्या घरापासून थोडयाच अंतरावर होता. आम्ही दोघं एकमेकांच्या घरी जायचो. त्याच्या घरची परिस्थिती मी माझ्या आई बाबांना सांगितली. त्याची हुशारी वाया जाऊ द्यायची नाही, असा निर्धार करून मी तेव्हापासूनच त्याला आमच्या घरी अभ्यासाला बोलवायला सुरवात केली. नववीपासून ते अगदी फायनल इयर (माझी बीएस्सी आणि त्याचं बीए) यात खंड पडला नाही.
तोपर्यंत प्रशांतची घरची परिस्थिती हळूहळू सुधारतेय, असं चित्र निर्माण झालं. बीएस्सीला मी फर्स्ट क्लास कव्हर करायच्या मागं असताना प्रशांतनं बीए इकॉनॉमिक्समध्ये डिस्टींक्शन मिळवलं. त्यानं एमए करावं, यासाठी माझ्या बाबांनी त्याला पूर्ण पाठबळ द्यायचं ठरवलं. (एक उत्कृष्ट प्राध्यापक होण्याच्या क्वालिटीज् त्याच्यामध्ये आहेत, असं आमचं ठाम मत होतं.) शिवाजी विद्यापीठात ऍडमिशनही घेतलं. नेमक्या त्याचवेळी त्याच्या कौटुंबिक अडचणींनी तोंड वर काढायला सुरवात केली. हायवेच्या चौपदरीकरणाच्या कामात चहाचा गाडा गेला, भावोजी परागंदा झाले, आईला अर्धांगाचा मायनर झटका आला, तिच्या औषधोपचाराचा आणि भाच्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचं आव्हान होतं. आमचं त्याला पाठबळ होतंच, पण त्याच्यासारख्या स्वाभिमानी व्यक्तीनं अशा परिस्थितीत घरची जबाबदारी टाळणं शक्यच नव्हतं. त्याला शिक्षण सोडावं लागलं. तत्पूर्वी, टेलिफोन बूथवर काम करणारा प्रशांत आता निपाणीत रिक्षा चालवू लागला. (तुम्ही कधी निपाणीत आलात, तर एक से एक 'टकाटक' रिक्षावाले दिसतील, इतकं या व्यवसायाला इथं ग्लॅमर आहे. आम्ही 1991मध्ये इथं राहायला आलो तर स्टँडवर मोजून पाच दहा रिक्षा असतील. आता स्टँडभोवतीच पाच स्टॉप आहेत. रिक्षांची तर गणतीच नाही.) दुसऱ्याची रिक्षा रोजंदारीवर चालवता चालवता एक दिवस स्वत:ची रिक्षा घेण्यापर्यंत प्रशांतची प्रगती झाली. स्वत:चं चार खोल्याचं घरही बांधून झालं. ज्या भाच्याच्या शिक्षणासाठी प्रशांत डे-नाईट डयुटी करत होता, त्या भाच्याला दहावी होण्याआधीच शिक्षणापेक्षा मामाचा रिक्षाचा धंदाच अधिक ग्लॅमरस वाटू लागला. त्याला आम्ही किती समजावलं, पण तो ऐकायला तयार होईना. शेवटी प्रशांतनं आपली रिक्षा त्याला चालवायला दिली.
दरम्यानच्या काळात त्याला मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये ओळखीनं वसुलीचं काम मिळालं. तेही त्यानं स्वीकारलं. इथं वर्षभर काढलं सुध्दा! पण इतकी वर्षं रिक्षा चालवल्यानंतर त्याची मानसिकता बदलली होती. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर,
'आम्हाला रोजच्या रोज ताजा पैसा लागतो, महिनाभराचा एकदम शिळा पैसा आता नकोसा वाटतो.'
त्याच्या या एका वाक्यानं मला निपाणीतल्या तमाम रिक्षाचालक मित्रांच्या या व्यवसायातल्या वावराचं स्पष्टीकरण मिळून गेलं. प्रशांत पुन्हा निपाणीत परतला. भाच्यासह डे-नाइट असा आलटून पालटून रिक्षा चालवू लागला.
याच दरम्यान, आईला पुन्हा ब्रेन-हॅमोरेजचा झटका आला. त्यात तिची दृष्टी गेली. पण उपचारानं चालता बोलता येऊ लागलं. याचं श्रेय प्रशांतनं केलेल्या सेवेला होतं.
पुढं कोल्हापूरजवळच्या एका गावातल्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं, झालं. आणि तिथंच त्याच्या कौटुंबिक संघर्षाचा नवा अंक सुरू झाला. लग्नानंतर ती मुलगी मोजून दोन ते तीन दिवस त्याच्या घरी राहिली असेल. 'आपण कोल्हापुरात राहू', 'मी जॉब करते', 'तू सुध्दा रिक्षा सोडून नोकरी कर', 'आई नको', असे एक ना अनेक नखरे सुरू झाले. यावरुनच बहिणीशीही खटके उडू लागले. अखेर जड मनानं प्रशांतनं कोल्हापुरात भाडयानं घर घेतलं. बहिणीनं टोकाची भूमिका घेतल्यानं आईला सुध्दा बरोबर घेणं आवश्यक होतं. तरीही त्याच्या बायकोला काय हवं होतं, कोण जाणे! तिनं त्याच्याशी अजिबात जुळवून घेतलं नाही. त्याच्या विनवण्यांना काडीची किंमत न देता ती माहेरी निघून गेली. मोजून महिनाभरही हा संसार झाला नाही.
प्रकरण माझ्यापर्यंत आलं. समजावून सांगून, रागावून काहीही उपयोग झाला नाही. प्रकरण सामोपचारानं मिटवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आता तिच्या माहेरचे लोकही फारच टोकाची भूमिका घेऊ लागले. मऊ स्वभावाच्या प्रशांतला कोपरानं खणायचे, त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पै न् पै जमवून प्रशांतनं मोठया हौशेनं तिला केलेले दागिने सुध्दा त्यांनी घरातून गायब केले. ज्या खोलीचं भाडं हा भरत होता, त्या खोलीला यानं लावलेल्या कुलुपावर तिच्या घरच्यांनी दुसरं कुलूप आणून लावण्यापर्यंत मजल गेली. घरातले स्वत:चे कपडेही त्याला घेता येणार नाहीत, अशी सारी व्यवस्था केली गेली. आणि याला कारण काय? तर ठोस असं कोणतंही कारण दिलं जात नव्हतं. एकूणच ही गंभीर परिस्थिती पाहता मलाही टोकाची भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. प्रशांतला घटस्फोटासाठी राजी केलं. त्याशिवाय त्याची या दुष्टचक्रातून सुटका नसल्याचंही पटवून दिलं. माझ्यासारखंच अन्य मित्रांचंही मत पडलं. त्यानंतर माझे सर्व सोर्सेस वापरून पध्दतशीरपणे प्रशांतला या बंधनातून रितसर सोडवला. दरम्यानच्या काळात वर्षभर गेलं.
प्रशांतवर ओढवलेली परिस्थिती स्पष्टीकरणापलिकडची होती. आम्हा साऱ्यांनाच वाईट वाटलं. तो आईसह पुन्हा निपाणीत आला. मी मुंबईत राहून फार काही करू शकत नसलो तरी त्याला सावरण्यासाठी माझ्या साऱ्या मित्रांनी कंबर कसली. गजू, बबलू, संतोष या सांगावकर बंधूंनी तर त्याला खूप आधार दिला. संतोषनं स्वत:ची रिक्षा चालवायला देऊन त्याला आर्थिक आधार दिला. बबलू गरज पडेल त्यावेळी जेवण देत होता. प्रशांतच्या मनातल्या दु:खावर मात्र आमच्याकडं समजावणीची फुंकर घालण्यापलिकडं दुसरा उपाय नव्हता. घराच्या वाटण्या झाल्यानं आईची जबाबदारी त्याच्यावरच आलेली. यातून दु:ख विसरण्यासाठी अखेर ड्रिंक्सवरचा त्याचा भर वाढला. अधूनमधून मित्रांसोबत बसणारा प्रशांत दररोज एकटाच जाऊ लागला. मित्रांच्या समजावण्यांच्याही पलिकडं गेला. ही गोष्ट माझ्या कानावर आली. त्याला भेटून मी त्याला बरंच समजावलं. त्याला सांगितलं, `यापुढं तुझं हे प्रमाण कमी झाल्याशिवाय मी तुला फोन करणार नाही`, आणि त्यासाठी मी त्याला आठवडयाची मुदत दिली होती. मला माहित होतं, पुढच्या आठवडयात त्याचा फोन येणार नाही. तसंच झालं! चार महिने उलटल्यानंतर गेल्या महिन्यात त्याचा फोन आला.
'मी आता माझ्यावर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलाय. तू नाराज होऊ नको.'
माझ्या डोळयात टचकन् पाणी आलं. तो माझ्याशी खोटं बोलणार नाही, याची मला खात्री होती. त्याला पुन्हा पंधरा मिनिटं समजावलं.
आणि आज पुन्हा प्रशांतचा फोन आला. मुलीकडच्यांनीही त्याला पसंत केलं आहे. आता येत्या महिन्याभरात त्याचं (रेकॉर्डनुसार) दुसरं लग्न होईल. पण तसं हे पहिलंच लग्न असेल कारण पहिला संसार मांडलाच कुठं होता? नुसताच आयुष्याचा खेळखंडोबा! आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, ही मुलगी पाहायला त्याची बहीणसुध्दा सोबत गेली होती. म्हणजे घरच्या आघाडीवरही आता चांगलं वातावरण निर्माण होतंय. आता मात्र प्रशांतला सुख मिळू दे. यापुढं कोणतंही संकट त्याच्यावर येऊ नये, अशी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आज सकाळीच मी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसं झालं तर, अक्षयतृतीया हा खरंच चांगला मुहूर्त आहे, योग आहे, असं मानायला मी अजिबात मागंपुढं पाहणार नाही.
गुड लक माय फ्रेंड...गुड लक...!
--
आलोक जत्राटकर

सोमवार, २ मे, २०११

इशारा लादेनच्या मृत्यूचा!

कुख्यात दहशतवादी आणि जगभरातील तमाम दहशतवादी संघटनांचा प्रेरणास्रोत असलेला ओसामा बिन लादेन अमेरिकन सीआयएकडून पाकिस्तानात मारला गेल्याचं आज सकाळी लोकल ट्रेनमध्येच एसएमएसद्वारे समजलं. (थँक्स टू न्यू टेक्नॉलॉजी!) साहजिकच ट्रेनमध्ये दुसरं काहीच करता येत नसल्यानं याच बातमीच्या अनुषंगानं डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एखादी बातमी ही जशी विचारांना चालना देत असते, त्याचप्रमाणं लादेनसारख्यांचे मृत्यू आपल्यासमोरचे प्रश्न संपुष्टात न आणता नव्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना जन्म देत असतात. त्या प्रश्नांची उत्तर आपण कशा पध्दतीनं शोधतो, यावर येणाऱ्या काळाची वाटचाल ठरत असते.
लादेनच्या मृत्यूनं अशाच काही विचारांची, प्रश्नांची आवर्तनं माझ्या मनात उमटली. अमेरिकेनं पोसलेल्या एका भस्मासुराचा त्यांच्याच एजन्सीकडून अंत होण्यानं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर 9 सप्टेंबर, 2001 रोजी साऱ्या जगाच्या साक्षीनं अमेरिकेच्या टि्वन टॉवर्सवर विमानहल्ला करून या इमारतीबरोबरच अमेरिकेच्या अतिआत्मविश्वासाच्याही चिंधडया उडवणाऱ्या लादेनच्या मृत्यूनं सुडाचं चक्रही पूर्ण झालं आहे.
अमेरिकेवर दहशतवादी हल्ला होईपर्यंत भारतानंच दहशतवादाच्या सर्वाधिक झळा सोसल्या होत्या. कित्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून भारतानं या प्रकाराचं गांभीर्य पटवून देण्याचा आतोनात प्रयत्न चालवला होता. पण त्याकडं म्हणावं तितकं कोणी लक्ष दिलं नाही. 9/11च्या हल्ल्यानंतर मात्र दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी आणि भीषण समस्या असल्याचा साक्षात्कार अमेरिकेला झाला आणि मग गेली दहा-अकरा वर्षे लादेनला पकडून अथवा मारुन दहशतवादाचा खातमा करण्यासाठी अमेरिकेनं दक्षिण आशियामध्ये आपल्या फौजा उतरवल्या. दरम्यानच्या काळात सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर मध्य-पूर्वेमध्ये अमेरिकेचं बऱ्यापैकी (की उत्तमपैकी?) बस्तान बसलं. जोडीनं लादेनच्या निमित्तानं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही फौजा उतरवण्याची नामी संधी अमेरिकेला चालून आली आणि अशा संधींचं सोन्यात रुपांतर करण्यात अमेरिकेचा हात कोणीही धरू शकत नाही.
आता लादेनच्या मृत्यूची घोषणा करून अमेरिकेचं पाकिस्तानमध्ये फौजा उतरवण्यामागचं (छुपं) इप्सित साध्य झालं असल्याची शक्यताच मोठया प्रमाणात जाणवते आहे. कारण लादेनला पाकिस्तानसारख्या छोटया देशामध्ये किती काळ पळू द्यायचं, किती काळ लपू द्यायचं आणि पकडायचं की मारायचं, याचा निर्णय हा सर्वस्वी अमेरिकेवरच अवलंबून होता आणि त्यांनी तो योग आज साधला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी, गेल्या आठवडयात आपण स्वत:च लादेनला मारण्याची परवानगी सीआयएला दिल्याचं आजच्या निवेदनामध्ये सांगितलं. (इथं आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर सिनिअर बुश असोत, ज्युनिअर बुश असोत, क्लिंटन असोत की ओबामा, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये फारसा फेरफार होत नाही, केला जाऊ शकत नाही!) त्यामुळं आता आशिया खंडात अमेरिकन वर्चस्ववादाच्या हिटलिस्टमध्ये पुढचं टारगेट हे भारत किंवा चीन असणार आहे. त्यातही चीनची भिंत भेदणं, अमेरिकेला सहजशक्य नसल्यानं हे टारगेट भारतच असेल, अशी अधिक शक्यता वाटते. इथल्या बाजारपेठेमध्ये मोठया प्रमाणावर शिरकाव करून त्यांनी याची सुरवात फार आधीच केली आहे. आता त्याला नवे आयाम ते कुठल्या पध्दतीनं लावतात, याकडं भारतानं फार सजगतेनं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
लादेनचा मृत्यू पाकिस्तानात झाल्यानं आणि ते थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तोंडूनच जगजाहीर झाल्यानं भारतानं वेळोवेळी पाकिस्तानच्या दहशतवादी लिंक्सचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरुन उच्चार केला आहे, त्याला बळकटी मिळाली आहे. दहशतवादी आणि माफिया-डॉन यांना पाकिस्तान फार आधीपासून आश्रय देत आला आहे. अद्यापही भारताचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम सुध्दा तिथंच आहे. एक बरं झालं, आपले केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना, पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रवृत्ती जगासमोर आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणं मुंबईवर 26 नोव्हेंबर, 2008 रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना भारताच्या हवाली करण्याची पाकिस्तानकडं मागणीही केली.
पंजाब, काश्मीर इथं फोफावलेला दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत होता किंवा आहे, हे एक आता खुलं रहस्य आहे. त्याचबरोबर मुंबईसह भारतातल्या कित्येक शहरांनी बाँबस्फोटांच्या रुपानं या दहशतवादाचं उग्र रुप पाहिलं आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामधल्या कसाबला जिवंत पकडून भारतानंच सर्वप्रथम दहशतवादाचा चेहरा जगासमोर आणला. लक्षात घ्या, लादेनला जिवंत पकडण्यासाठी दहा वर्षे आंतरराष्ट्रीय मोहीम चालवणाऱ्या अमेरिकेला सुध्दा ही गोष्ट शक्य झालेली नाही. (किंवा त्याला जिवंत पकडणं हे त्यांच्या हिताचं नसेलही कदाचित! त्यांनाच ठाऊक!!) त्यामुळं भारतानं कसाबवर चालविलेल्या खटल्याचा शक्य तितक्या लवकर निकाल लावून त्याचा सोक्षमोक्ष लावणं, ही बाब आता अधिक निकडीची झालेली आहे.
लादेनच्या मृत्यूनं एक दहशतवादी आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा, तो जगभर फोफावण्यासाठी कारणीभूत ठरलेला व्यक्ती नाहीसा झाला असला तरी, त्यामुळं दहशतवाद संपुष्टात आला किंवा येईल, असं समजणं हास्यास्पद ठरेल. दहशतवाद हा व्यक्तीमध्ये कधीच नसतो, तो असतो त्या व्यक्तीला फशी पाडणाऱ्या एक्स्ट्रिमिस्ट (अतिरेकी) विचारसरणीमध्ये! कोणताही मूलतत्त्ववाद हा अशा प्रकारच्या अतिरेकी विचारसरणीला अधिक पोसत असतो. आणि या विचारसरणीच्या मुळावर घाव घालून ती नष्ट करणं, हे महाकर्मकठीण काम असतं. कारण त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास लवचिकता या विचारसरणीत कधीच नसते. सारासार विचार, विवेक या गोष्टींपासून हे अतिरेकी कोसों दूर असतात. भगवान बुध्दाचा मध्यममार्ग किंवा महात्मा गांधींचा अहिंसा विचार स्वीकारणं हे तसं फारसं अवघड नाही, पण तितकंसं सोपंही नाही. कारण मध्यममार्ग स्वीकारण्यासाठी विवेकानं विचार करणं आवश्यक असतं. त्यापेक्षा अशा अतिरेक्यांना एक बाजू घेणं अधिक सोपं वाटत असतं. कट्टर मूलतत्त्ववादी लोक आपला वापर करून घेत आहेत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. आणि एकदा वापर करून घेतल्यानंतर पुढं त्यांचं काहीही झालं तरी या चळवळीचं काहीही नुकसान होत नसतं कारण असे 'प्रभावित' झालेले, परिस्थितीनं गांजलेले तरुण त्यांच्याकडं येतच असतात. वापर होऊन गेल्यानंतर पश्चाताप झाला तरी त्याचा फारसा उपयोगही नसतो.
लादेनच्या मारल्या जाण्यानं दहशतवादी 'चळवळी'ला धक्का बसलाय, ही गोष्ट खरी असली तरी तो जगातल्या तमाम दहशतवादी संघटनांसाठी 'हुतात्मा' ठरणार नाही, असं थोडंच आहे? त्यामुळंच नजीकच्या काळात दहशतवाद अधिक भीषण स्वरुप धारण करेल, याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळंच साऱ्या जगानं या दहशतवादाला तोंड देण्यासाठी अधिक सजगतेनं सज्ज झालं पाहिजे. भारतानं तर अधिकच सज्ज झालं पाहिजे- कारण दहशतवादाबरोबरच साऱ्या जगासाठी आपण सॉफ्ट टारगेट असतो- नेहमीच!

मंगळवार, २२ मार्च, २०११

Intersesting Neurological Test

Dear Readers,
This interesting test and information, I got through email. You will also enjoy it. Just Scroll down and see.......

A Short Neurological Test

1- Find the C below..
Please do not use any cursor help.

OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOCOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO

2- If you already found the C, now find the 6 below.

99999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999
69999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999

3 - Now find the N below. It's a little more difficult.

MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMNMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM

This is NOT a joke. If you were able to pass these 3 tests, you can cancel your annual visit to your neurologist. Your brain is great and you're far from having a close relationship with Alzheimer.

Congratulations!

Eonvrye that can raed this rsaie your hnad.
To my 'selected' strange-minded friends:

If you can read the following paragraph, forward it on to your friends and the person that sent it to you with 'yes' in the subject line.




Only great minds can read this
This is weird, but interesting!

If you can raed this, you have a sgtrane mnid too

Can you raed this? Olny 55 plepoe out of 100 can.

I cdnuolt blveiee that I cluod aulaclty uesdnatnrd what I was rdanieg. The phaonmneal pweor of the hmuan mnid, aoccdrnig to a rscheearch at Cmabrigde Uinervtisy, it dseno't mtaetr in what oerdr the ltteres in a word are, the olny iproamtnt tihng is that the frsit and last ltteer be in the rghit pclae. The rset can be a taotl mses and you can still raed it whotuit a pboerlm. This is bcuseae the huamn mnid deos not raed ervey lteter by istlef, but the word as a wlohe. Azanmig huh? Yaeh and I awlyas tghuhot slpeling was ipmorantt!

Isn't it Interesting! Still is there anybody to blame anyone's spelling mistake?

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स


जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेच्या मदतीने अजिंठा येथे पर्यटनाच्या वृध्दीसाठी व पर्यटकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प टुरिस्ट कॉम्प्लेक्सच्या रुपाने साकार होत आहे. या प्रकल्पाविषयी...

बौध्द धर्म... इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुध्दाने शांती, करूणा, अहिंसेचा दाखविलेला मार्ग... भारताने जगाला दिलेली एक महान देणगी... आज व्हिएतनाम, जपान, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, भूतान, दक्षिण कोरिया, तैवान, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, चीन अशा अनेक देशांनी या मार्गाचा अंगिकार केला... जगभरात बुध्दाचे अनुयायी 33 कोटीच्या घरात आहेत... पण मधल्या काळात उद्गात्या भारतातच बौध्द धर्माने अस्ताचल पाहिला... मुस्लीम चढाया, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन... कारणे काही असोत, बौध्द धर्माची पीछेहाट झाली. धर्माचा प्रसार कमी झाला तरी एके काळी अत्यंत भरभराट पाहिलेल्या या धर्माच्या भिक्षूंनी, अनुयायांनी, प्रचारकांनी धर्मप्रसारासाठी केलेले प्रयत्न आजही साहित्य, चित्रे, कलाकृती वा भग्नावशेषांच्या रुपात का असेना पाहता येतात... या धर्माच्या तत्कालीन लोकप्रियतेची जाणीव आपल्याला नक्कीच होते. या धर्माचा अमूल्य ठेवा आपल्या महाराष्ट्रात अजिंठा, वेरुळ, घारापुरी, औरंगाबाद येथे लेण्यांच्या स्वरुपात उभा आहे.
अजिंठा हा तर केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक दर्जाचा प्राचीन वारसा असल्याचे युनेस्कोनेही जाहीर केले आहे. अशा या ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील बौध्द अनुयायी अत्यंत भाविकतेने येत असतात. त्यामध्ये जपानी अनुयायांची संख्याही लक्षणीय असते. जपानच्या जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेने अजिंठा-वेरुळचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व जाणूनच त्याच्या जतनासाठी पुढाकार घेतला आणि भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयास 7331 दशलक्ष येन इतक्या खर्चाचा प्रस्तावही सादर केला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांना एक्झिक्युटीव्ह एजन्सी नेमण्यात आले. जेबीआयसीमार्फत देण्यात येणारा काही निधी पुरातत्त्व खात्याकडेही जतनाच्या कार्यासाठी देण्यात आला असून अन्य निधीच्या माध्यमातून अजिंठयानजीक अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स व व्हिजिटर सेंटर साकार करण्यात येत आहे.
अजिंठयाच्या पायथ्याशी टी-जंक्शन येथे सध्या एल ऍन्ड टी कंपनीतर्फे भव्यदिव्य असे टुरिस्ट कॉम्प्लेक्स उभे राहात आहे. सुमारे 56 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे स्वरुप अत्यंत भव्य, देखणे व आकर्षक असे आहे. पाच म्युझियम, चार गुहांच्या प्रतिकृती, सायक्लोरामा, ऍंम्फी थिएटर, स्टडी सेंटर, रेस्टॉरंट अशा अनेक अभिनव गोष्टींचा या प्रकल्पात समावेश आहे. सुमारे 45 हजार चौरस मीटरच्या लँडस्केप जागेवर 15 हजार चौरस मीटरवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे 55 हजार घनमीटर इतका दगड खोदल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाचा ढाचा उभा राहिला असून लवकरच काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पातील सायक्लोरामा ही एक अभिनव अशी संकल्पना आहे. यामध्ये एक दुमजली घुमटाकार इमारत आहे. त्या घुमटावर भगवान बुध्दाच्या चरित्रातील प्रसंग, जातक कथा, अजिंठा-वेरुळच्या गुहांची माहिती, भारतीय कला-संस्कृती आदी विविध विषयांबाबत अत्याधुनिक ऑडिओव्हिज्युअल तंत्रज्ञानाच्या साह्याने सातत्याने प्रदर्शन केले जाणार आहे. ते पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बसण्यासाठीही आरामदायी आसनव्यवस्था असेल.
अजिंठा येथील गुहा क्र.1, 2, 16 व 17 या चार गुहांच्या प्रतिकृती हा तर या प्रकल्पाच्या ठळक आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. या गुहांचे अंतर्गत व बाह्य स्वरुप, त्यांची रचना, बुध्दमूर्तींसह अन्य शिल्पाकृती, चित्रकृती, ध्यानगृह, निद्रागृह आदी सर्व गोष्टी अगदी हुबेहुब साकारण्यात येणार आहेत. या गुहांतील खांबांवर हेडफोन बसविण्यात आलेले असतील. त्याठिकाणी जगातल्या प्रत्येक प्रमुख भाषेत तत्कालीन इतिहास व माहिती ऐकविण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाच संग्रहालयांत बौध्द तसेच अन्य पुरातन भारतीय साहित्य, कला आदींची माहिती देणारे विभाग असतील. गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, मल्टिमिडिया ऑडिटोरिया, गाईड पोस्ट, कल्चरल प्लाझा आदींचा यामध्ये समावेश आहे. देशी परदेशी अभ्यासकांना तेथे संशोधन करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. खुल्या ऍम्फी थिएटरमध्येही संध्याकाळच्या वेळी विविध मनोरंजनाचे व स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करता येतील.
याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी एक प्रशस्त रेस्टॉरंट, शॉपिंग कोर्ट, बैठक व्यवस्थेसह सज्ज कॉरिडॉर, उद्यान, ऍडल्ट्स व किड्स ओरिएंटेशन, एस्केलेटर, लिफ्ट्स अशा सुविधा असतील. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या कॉरिडॉरमध्ये विविध सुविधा पुरविणाऱ्या दुकानांसाठी गाळयांचीही व्यवस्था आहे. या संपूर्ण बांधकामाला प्राचीन काळाच्या बांधकामाचा लूक देण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात गुहांचे डिझाईन, पेंटिंग आदी जिकीरीची कामे करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या रुपाने अजिंठयाच्या पायथ्याशी एक आकर्षक पर्यटनस्थळ साकार होत आहे, एवढे निश्चित!

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

अनमोल अजिंठा


प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून साऱ्या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...

कोणत्याही गोष्टीची एक वेळ यावी लागते, असं म्हणतात. त्यावर विश्वास बसावा, अशी माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट म्हणजे माझी अजिंठा लेण्यांना भेट. बी.एस्सी. एफ. वाय.च्या सहलीपासून म्हणजे साधारण 1995पासून एप्रिल 2008पर्यंत अशा सुमारे तेरा वर्षांच्या काळात अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देता येईल, अशा अनेक संधी माझ्याकडे चालून येत होत्या. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं योग जुळून येत नव्हता. या काळात औरंगाबादलाही कितीतरी वेळा गेलो पण परिसरातील प्राचीन कला-संस्कृतीच्या या अनमोल खजिन्याचं दर्शन मी घेऊ शकलेलो नव्हतो. मात्र लोकराज्य पर्यटन विशेषांकाच्या निमित्तानं ही बहुप्रतिक्षित व बहुप्रलंबित संधी मी घेण्याचं ठरवलं. याला आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं ते हे की अजिंठयाला मी प्रथमच जाणार असल्यानं तिथल्या सर्वच गोष्टी माझ्यासाठी नवीन असणार होत्या, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं मला अप्रूप असणार होतं आणि या दृष्टीनंच मी तिथल्या प्रत्येक कलाकृतीकडं पाहू शकणार होतो, तिचा आस्वाद घेऊ शकणार होतो आणि जमेल तितकं, जमेल तसं वाचकांना सांगू शकणार होतो. माझ्या दृष्टीनं ही जमेची बाजू होती.

या अजिंठा भेटीच्या निमित्तानं आणखीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे अजिंठयाला जोडून नेहमीच वेरूळचं नाव येत असल्यानं (अजिंठा-वेरूळ असं) अत्यंत धावपळीत या ठिकाणांना भेट देऊन जाणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या मनात या दोन्ही लेण्यांबद्दल संभ्रम आढळतो. औरंगाबादला गेलेल्या माझ्या काही मित्रांनी अजिंठयापेक्षा तुलनेत जवळ असलेल्या वेरूळ लेण्या पाहिल्या होत्या. मी अजिंठयाला जातोय असं समजल्यावर त्यांनी मला कैलास लेण्यांपासून अन्य काही लेण्यांमध्ये छायाचित्र काढण्यासारखं काय काय आहे, याची माहिती दिली होती. साहजिकच ती माझ्या (निदान आता तरी) उपयोगाची नव्हती. अजिंठयाची माहिती काढत असताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हाच मी ठरवलं की यावेळी आपण फक्त अजिंठा एके अजिंठाच पाहायचा. वेरूळ फिर कभी देखा जाए।

युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोडयाच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठयाच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठयापर्यंतच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासात मी प्रत्येक डोंगराकडे पाहायचो, कुठे एखादी लेणी दिसत्येय का म्हणून. पण अजिंठयाच्या कर्त्या-करवित्यांनी माझी पूर्ण निराशा केली. टी- जंक्शनपासून अजिंठयाच्या डोंगरावर एमटीडीसीच्या एसी-बसने गेलो तरी एखादा कोरीव दगडही दिसला नाही. तिथून काँक्रीटच्या बांधीव रस्त्यावरुन वर चढून गेलो अन् एका क्षणात साऱ्या लेण्या दृष्टीपथात आल्या. त्याच जागी कित्येक वेळ उभा राहून ते शेकडो वर्षांपूर्वीचं देखणं कोरीव रुप मी मनात साठवत राहिलो आणि थोडया वेळानं कॅमेऱ्यात. त्याक्षणी मी ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन यालाही शतश: धन्यवाद दिले कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौध्द लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं मला खरंच कौतुक वाटलं. बौध्द भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण असतं. अंधाऱ्या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.
या तीस लेण्यांपैकी 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बौध्द धर्माच्या हीनयानपंथाच्या काळात झाली. यामध्ये 9, 10 या चैत्यगृहांसह 12, 13 व 15 अ या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुध्दप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर 19 क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुध्दप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुध्दप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणि केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.
बुध्दाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास 26 व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.
पहिल्या गुहेतील भगवान बुध्दाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहऱ्यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहऱ्यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच.
याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं. याठिकाणी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे 14-15 व्या शतकात मायकेल एंजेलोनं चित्रकलेत द्विमितीचा आभास निर्माण केला आणि तो महान ठरला. त्याच्याही आधी आठशे वर्षे अशा कलाकृती निर्माण करणारे ते अज्ञात कलाकार किती महान असतील!
पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहे. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वाऱ्याच्या झुळुकीसरशी फडफडणाऱ्या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृध्द व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते. आज आपल्याकडे साहेबाच्या पोशाखावरुन ज्या रंगाची पँट, त्या रंगाचे मोजे घालावेत, असा संकेत रूढ झालाय, पण इथल्या चित्रांवरुन त्या काळात ज्या रंगाचा फेटा, त्या रंगाचे मोजे घालावेत, इतकी पोषाखी टापटीप सांभाळल्याचं दिसतं. बहुरंगी, बहुआयामी मानवी प्रवृत्तीचं दर्शन इथल्या विविध जातक कथा घडवतातच, त्याचबरोबर कलियुगाविषयी भाष्य करायलाही इथली शिल्पं कमी पडत नाहीत. पत्नीचे पाय चेपणारा पती हे शिल्प याचंच द्योतक.
बौध्द लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुध्दांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील 24 फुटी बुध्द मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत. केवळ एका संपूर्ण दिवसातच अजिंठयाविषयी सांगण्या-बोलण्यासारखं इतकं काही मला मिळालं की कितीही लिहीलं तरी शब्द तोकडे पडतील. संध्याकाळी परतताना वाटत होतं की अजूनही या शिल्पचित्रांकडून पुष्कळ काही समजून घ्यायचं, पाहायचं राहून गेलंय. माझी रितेपणाची ही भावना लिहीताना अजिंठयाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांना मला एकच सांगायचंय, ते म्हणजे अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठया आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते. या शिल्प-चित्रांना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी जिवाचे रान करत आहेत. या कामगिरीत आपणही असा हातभार नको का लावायला?

--

अजिंठा येथील गुहांची यादी

पहिला टप्पा : ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तपूर्व पहिले शतक लेणी क्र. 9 व 10 : चैत्यगृह लेणी क्र. 12, 13 व 15 अ : विहार
दुसरा टप्पा : इसवी सन 5 ते 6वे शतक लेणी क्र. 19, 26, 29 : चैत्यगृह लेणी क्र. 1 ते 7, 11, 14 ते 18, 20 ते 25, 27 व 28 : विहार
अपूर्ण लेणी : 3, 5, 8, 23 ते 25, 28 व 2
--
कसे जावे अजिंठयाला?
मुंबई- अजिंठा अंतर : जळगावमार्गे 491 कि.मी., मनमाडमार्गे 487 कि.मी. व पुणेमार्गे 499 कि.मी.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने औरंगाबाद व जळगाव येथून साध्या व लक्झरी गाडयांची सोय, अन्य खाजगी टूर ऑपरेटर कंपन्यांतर्फेही मुबलक वाहन सुविधा उपलब्ध.
नजीकचे रेल्वे स्थानक : मध्य रेल्वेचे जळगाव स्थानक (58 कि.मी.), औरंगाबाद (107 कि.मी.)
नजीकचे विमानतळ : औरंगाबाद 108 कि.मी.
राहण्याची सुविधा : अजिंठा, फर्दापूर तसेच औरंगाबाद येथे एमटीडीसीची पर्यटक निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. औरंगाबाद येथे आयटीडीसीचेही निवासस्थान. त्याखेरीज औरंगाबाद, जळगाव येथे अनेक खाजगी हॉटेल्स, लॉज उपलब्ध.

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

मनाची मशागत

उत्क्रांतीनंतरच्या कालखंडात मानवाच्या प्रगतीची सुरवात ही खऱ्या अर्थानं शेतीपासून झाली. सुरक्षिततेसाठी टोळया करून राहणाऱ्या मानवानं उपजिविकेसाठी शेती करण्यास प्रारंभ केला आणि एका वेगळया संस्कृतीची मूळ या पृथ्वीतलावर रुजली. मातीची मशागत करत मानवानं तेथपासून आजतागायत आपल्या प्रगतीचा विस्तार केला. पुढं त्याला औद्योगिकीकरणाची, माहिती तंत्रज्ञान क्रांतीची जोड मिळत गेली असली तरी या सर्व प्रगतीचा मूळ पाया हा शेतीकरणात होता, किंबहुना आजही मानवी जीवनाचा प्रमुख पाया हा शेतीच आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
जमिनीची मशागत करण्याचा शोध लावण्यामागं मानवाची विचारशक्ती ही खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. विचार करण्याची, आपल्या भावभावना वेगवेगळया माध्यमांतून व्यक्त करण्याची, अभिव्यक्त होण्याची शक्ती मानवाला लाभली. त्याचा प्रगत होत जाणारा, अधिकाधिक विचारक्षम होत जाणारा मेंदू हा त्यामागं आहे. या विचारशक्तीच्या, मन:शक्तीच्या बळावर माणसानं साऱ्या पृथ्वीवर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. इतर प्राण्यांना एकतर त्यानं आपला गुलाम केलं किंवा त्यांची निवासस्थानं असलेली अरण्यं प्रगतीच्या नावाखाली गिळंकृत करून त्यांच्या आस्तित्वालाच धक्का पोहोचवला. कित्येक वनस्पती-प्राण्यांच्या स्पेसीज त्यानं आजपर्यंत नष्ट करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
मानवाचं मन हे एक असं प्रकरण आहे की सातत्यानं ते आपल्या प्रगतीसाठी (की स्वार्थासाठी?) सातत्यानं वेगवेगळया क्लृप्त्या शोधण्यात मग्न असतं. मानवी जीवनाच्या इतिहासाच्या सुरवातीपासून पाहिलं तर असं लक्षात येईल की मातीची मशागत सुरू होण्यापूर्वी मानवाच्या मनाच्या मशागतीला सुरवात झाली होती. ही प्रक्रिया आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. मानवाच्या सो कॉल्ड प्रगतीला त्यानं केलेली मनाची मशागतच पूर्णत: कारणीभूत ठरली आहे. काहीवेळा ही मशागत चुकीच्या मार्गानं गेली आणि मानवी इतिहासाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि जिथं उत्तम मशागत झाली त्यावेळी अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टी मानवी इतिहासात नोंदल्या गेल्या.
म्हणजेच लौकिकार्थानं मानवी संस्कृतीची सुरवात ही मातीच्या मशागतीपासून सुरू झाली, असं आपण ढोबळ मानानं मानत असलो तरी त्यापूर्वी त्याच्या मनाच्या मशागतीपासूनच, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीमधूनच त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग मानव शोधत गेला, चोखाळत गेला, असं म्हणता येईल.
मानवाच्या या प्रगतीला विज्ञानाच्या विविध शोधांनी नवे आयाम प्राप्त करून दिले. औद्योगिकीकरणानं तर त्याच्या आकांक्षांना भरारी मारण्यासाठी नवे पंख दिले. कष्ट करून जीवनाची वाटचाल साध्यासरळ पध्दतीनं करणाऱ्या मानवाला औद्योगिकीकरणानं कमी कष्टात भरपूर सुखं मिळविण्याचा राजमार्ग दाखवला. त्या मार्गानं वेगवान वाटचाल करणाऱ्या मानवानं मग इकडंतिकडं न पाहता केवळ भौतिक सुखांची पाठ धरली. लाइफस्टाइल अधिकाधिक उच्च दर्जाची करण्याकडं त्याचा कल वाढला, अधिकाधिक भौतिक सोयीसुविधा आणि साधनांच्या तो मागं लागला. मानवाला या दिखावटी, कचकडयाच्या दुनियादारीचा मोठा मोह पडला आहे. विवध माध्यमांमधून हीच लाइफस्टाइल खरी आणि योग्य म्हणून या महागडया लाइफस्टाइलचं प्रचंड स्तोम माजवत मार्केटिंग सुरू आहे. या गोष्टी पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या अथवा परवडणाऱ्या आणि न परवडणाऱ्या अशा सर्व प्रकारचे लोक तिचा स्वीकार करत आहेत. स्वीकार न करणारे लोकही तिला प्रतिकार अथवा प्रतिवाद करू शकत नाहीत, इतकी तिचा भुरळ समाजमनावर पडली आहे. अशा गोष्टींच्या मागं लागत असताना मानवतावाद किंवा माणुसकी मात्र मागं पडू लागली आहे, ही खेदाची बाब आहे.
मानवी मन काळाबरोबर प्रगत आणि प्रगल्भ होत गेलं असलं तरी आज या प्रगल्भतेलाही संकुचिततेची एक काळी किनार लाभताना दिसत आहे. माणूस भौतिक अर्थानं कितीही मोठा होत गेला तरी मनानं मात्र आक्रसत असलेला दिसतो आहे. आजचा जमाना शहरीकरणाचा आहे, मात्र शहरात माणसं वाढत चालली असली तरी या शहरांतून माणुसकी मात्र हद्दपार होत चाललेली दिसते. जागतिकीकरणानं या शहरी माणसाला लाइफस्टाइलच्या एका अभेद्य चक्रव्यूहात असं काही बांधून टाकलं आहे की तो अखंडितपणे फिरत राहिला तरी तो भेदणं त्याला शक्य होत नाही. या लाइफस्टाइलच्या नादाता आणि स्वत:च्या व्यापात तो इतका गुंतून गेला आहे की स्वत:चा शेजारी कोण, हेही त्याला माहित नसतं. माहिती तंत्रज्ञानानं जगात मोठी क्रांती झाली. मार्शल मॅक्लुहानच्या म्हणण्यानुसार सारं जग एक खेडं बनलं. सारं जग जवळ आलं, मात्र आपला शेजारी मात्र दुरावला. आता हे दुरावणं शेजाऱ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर मोबाईल क्रांतीनं त्याच्याही पुढची मजल मारली आहे. घरातल्या माणसांतही आज संवाद राहिलेला नाही. मोबाईल कंपन्यांना पैसे देऊन त्यावरून एकमेकांशी तासंतास गप्पा मारणारी मंडळी समोरासमोर आल्यावर हाय-हॅलो च्या पलीकडं सरकू शकत नाहीत, ही या माहिती क्रांतीच्या युगातली सर्वात खेदजनक अशी बाब आहे.
सर्व प्रकारच्या नात्यांना आपण हाताच्या अंतरावर ठेवता ठेवता काही किलोमीटरपर्यंत नेऊन ठेवतो आहोत. कोणालाही कोणाविषयी ऍटेचमेंट राहिली नाही. नात्यांचे बंध-अनुबंध सुटे होत चालले आहेत. एकत्र कुटुंबं तर आता टीव्हीवरच्या मालिकांपुरतीच आणि ती सुध्दा एकमेकांविषयी द्वेषभाव जोपासण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहेत. सर्वच नातीगोती आपण व्यावहारिक पातळीवर नेऊन ठेवली आहेत. आईबापाचं नातंही त्याला अपवाद राहिलेलं नाही. आईबाप जे करतात, ते त्यांचं कर्तव्य असतं. मुलं जन्माला घातली तर ही कर्तव्यं त्यांनी पार पाडायलाच हवीत, अशी भावना आजच्या मुलामुलींमध्ये बळावत चाललेली दिसते. आईवडलांविषयी एवढी कृतज्ञता असेल, तर अन्य नात्यांच्या विषयी बोलायलाच नको? निस्वार्थ मैत्र तर हल्ली पाहायलाच मिळत नाही. मिळालेल्या मोकळिकीला स्वैराचाराचं आणि पुढं व्यभिचाराचं रुप येताना दिसतं आहे. आणि त्याचंही कुणाला काही वाटेनासं झालंय, इतका कोरडेपणा सर्वत्र निर्माण होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांचा कल देवाकडं वाढू लागलाय, ही चांगली बाब आहे, असं म्हणावं तर त्यातही भक्तीपेक्षा स्वार्थाचाच अधिक वास येतो. धकाधकीच्या जीवनातली वाढती असुरक्षितता ही त्याला सर्वाधिक कारणीभूत असल्याचं दिसतं. गरीबाला जिथं पोट भरण्यासाठी पोटोबाच्या मागं धावावं लागतं, तिथं पोटं भरलेल्या, करू भागलेल्या लोकांनी अशा लोकांनाही आपल्याबरोबर या देवाच्या भजनी लावण्याचा उद्योग चालवलाय. या जाळयात सारेच सापडू लागलेत. प्रसारमाध्यमंही अशा प्रवृत्तींचं उदात्तीकरण करू लागली आहेत. त्यामुळं डोळे झाकून अशा लोकांचं अनुकरण करणाऱ्याचं प्रमाणही वाढीस लागलं आहे.
अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आपली डोकी गहाण ठेवली आहेत की काय, असा प्रश्न भेडसावू लागला आहे. माणसानं सुरवातीच्या टप्प्यापासून आपल्या मनाची जी मशागत केली होती, ती मनाची जमीन क्षारपड होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुसऱ्यांच्या चकचकीत मानसिक गुलामगिरीच्या मॉलमधला माल उसना घेण्यापेक्षा आपल्या मनाच्या जमिनीवर सातत्यानं विचार करून जितकं मिळेल तितकं पीक आपण घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली तरच तिला एखादेवेळेस सामूहिक, सामाजिक शक्तीचं स्वरुप प्राप्त होईल. अन्यथा ज्या चाकोरी मोडत, उध्वस्त करत आपण वाटचाल करत इथवर आलो आहोत, पुन्हा त्या चाकोरीमध्ये बांधून टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाच्या सर्वच पातळीवरील प्रगतीच्या वाटा त्यामुळं अधिक व्यापक होतीलच शिवाय त्या वाटचालीला एक ठोस असं अधिष्ठान प्राप्त होईल.
माती हाच शेतीचा जीव की प्राण. पण माणसाच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्तीमुळं मातीचा कस कमी होत चालला आहे आणि मातीशी नातं सांगमारी माणसंही कमी होत चालली आहेत. मातीचा कस आणि तिच्याशी इमान कायम राखण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढं आहे. हावरटपणामुळं मातीचा कस जसा कमी होत आहे, तशी नातीसुध्दा दुरावत चालली आहेत. मातीचं आणि नात्यांचं सारखंच आहे. अधिकारांविषयी आपण फार जागरूकता दाखवतो; कर्तव्यांना मात्र सोयीस्कररित्या विसरतो. जमिनीतून वारेमाप पीक घेताना तिला योग्य त्या प्रमाणात आणि योग्य ते घटकही परत द्यावे लागतात. पण आपण ते देत नाही. तसंच नात्यांच्या व्यवहारात आपण फक्त अधिकार जाणतो, कर्तव्यच विसरतो. हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून आता दोन्ही ठिकाणी नव्यानं खतपाणी आणि मशागतीची आवश्यकता आहे.

रविवार, ३० जानेवारी, २०११

निर्मलाताईंची 'निर्मल' मोहीम


एक मध्यमवर्गीय गृहिणी... अभियंता पती, तीन मुलं एवढंच तिचं विश्व... इतरांप्रमाणंच तीही वाढत्या महागाईनं त्रस्त... इतरांहून फरक इतकाच की वाचनामुळं आणि पूर्वाश्रमीच्या शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळं सामाजिक अन् पर्यावरणविषयक जाणीवा तीव्र झालेल्या... त्यातून ती स्वत:चं घर कचरामुक्त करून त्यापासून गांडूळखत, गॅस तयार करण्याच्या मागे लागते... तिच्या या प्रयत्नांना यश येतं... या यशानं हुरूप वाढून ती हळूहळू आपली कार्यकक्षा वाढवते... आणि तिच्या प्रकल्पाला वीजनिर्मितीचीही जोड लाभते... घरापासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा केवळ पाच वर्षांतच सव्वादोन कोटीची उलाढाल असणाऱ्या 'विवम् ऍग्रोटेक'च्या रुपात देशभर विस्तार झाला... आणि या प्रकल्पांना देशातीलच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञांकडून प्रशंसेची पोचपावती मिळाली. ही यशोगाथा आहे औरंगाबादच्या निर्मला कांदळगावकर यांची.
निर्मलाताईंचं शिक्षण बीएस्सी. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात एम. ए. ही केलं. पर्यावरण विषयाची सुरवातीपासूनच आवड. त्यामुळं दिल्ली विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्राची पदविका परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. वाचनाची त्यांना मोठी आवड. या आवडीपोटी शेती, पर्यावरण या विषयावर पुष्कळ वाचन केलं, अभ्यास केला. आपल्या दैनंदिन बेजबाबदार वर्तनातून आपण पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत, याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच शेतकरी व पर्यावरण या दोन्ही घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या भावनेनं त्यांना अस्वस्थ केलं. अभ्यासाअंती त्यांना मार्गही सापडला. हा मार्ग होता गांडूळ खतनिर्मितीचा.
गांडूळखत निर्मिती :
पारंपरिक पध्दतीतील तोटे दूर करून निर्मलाताईंनी स्वरुप गांडूळ खत निर्मिती संयंत्राची निर्मिती केली. यात कमी श्रमात व कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यापासून खत तयार करता येते. शेतकरी आपल्या शेतातील कचरा, शेण वापरून शेतातच खत तयार करू शकतात. खत उत्तम प्रकारचे व शुध्द असल्यामुळे, पीक चांगले येतेच, शिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. निर्मलाताईंच्याच शब्दांत सांगायचे तर रासायनिक खताचा वापर न केल्याने अगदी विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खामखेडासारख्या गावात महिलांनी बचतगट स्थापन करून गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही अथवा श्रमही जास्त पडत नाहीत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे एक साधन सुरू झाले आहे.
शहरातील कचरा, त्याच्या विल्हेवाटीची अशास्त्रीय पध्दत, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान व पर्यायाने मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांवरही गांडूळखत हा योग्य व शास्त्रीय उपाय होऊ शकतो, असे निर्मलाताईंच्या लक्षात आले. शहरी कचऱ्याचेही गांडूळखतात रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जिथे कचरा निर्माण होतो, तिथेच त्याचे गांडूळखत केले तर खर्च कमी होतोच, आणि कचरा रस्त्यावरही जाणार नाही व परिसरही स्वच्छ राहील, असे त्यांना वाटले. त्यामुळे घरात तयार होणारा कचरा वेगळा केला तर त्यातील कुजणाऱ्या कचऱ्यापासून गांडूळखत होऊ शकते आणि न कुजणाऱ्या प्लास्टीकसारखा कचरा पुन्हा वापरात येऊ शकतो. ही बाब लक्षात येताच त्यांनी घरातील कचऱ्यापासून गांडूळखत तयार करणारे छोटे मॉडेल तयार केले. या कचऱ्यात विशिष्ट जीवाणू घातले की त्याचा वासही येत नाही, त्यामुळे ते घरात ठेवले तरी त्यात कचरा असल्याचे लक्षात येत नाही. निर्मलाताईंनी औरंगाबादच्या घरातच गांडूळखत उत्पादन, त्यासाठी लागणारी यंत्रे व गांडुळांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी बनविलेल्या 'स्वरुप' गांडूळखत निर्मिती संयंत्राच्या साह्याने एका महिन्यात 1 ते 1.5 टन गांडूळखत बनविता येते. गॅल्व्हनाइज्ड जाळी आणि लोखंडापासून त्यांनी घडी पध्दतीचे संयंत्र बनविले आहे. त्यामुळे ते कोठेही नेण्यास सोपे आहे. आपल्या घरातील एक किलोच्या कचऱ्यापासून ते दरमहा 75 टन गांडूळखत बनविणारी प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या उभारले आहेत. आज केवळ पाच वर्षांत नेपाळपासून, पंजाब, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील 222 तालुक्यांत त्यांचे प्रकल्प पोहोचले आहेत. पाच हजारहून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. एकटया औरंगाबाद शहरात हे गांडूळखत निर्मिती संयंत्र घेणारे सुमारे चार हजार नागरिक आणि दीडशे संस्था आहेत.
निर्मलाताईंच्या या शास्त्रीय व बहुपयोगी उपक्रमाची भारत सरकारच्या कृषी खात्यानेही दखल घेतली असून दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांच्या स्टॉलसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली. राज्याच्या तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक शासकीय उपक्रमांच्या जागेवर (उदा. कृषी, वनीकरण आदी) तसेच अनेक मान्यवरांच्या घरांतही निर्मलाताईंची स्वरुप संयंत्रे बसविण्यात आली आहेत. याठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे गांडूळखताच्या प्लँटमधून गांडूळपाणी मिळवले तर ते एक अत्यंत उपयुक्त कीटकनाशक आहे आणि त्याचे अन्य दुष्परिणामही नाहीत.
बायोगॅस निर्मिती :
गांडूळखत निर्मितीनंतर काय, हा प्रश्न पुढे निर्मलाताईंना पडलाच नाही. कारण त्याचे उत्तर त्यांनी शोधून ठेवले होते, ते म्हणजे बायोगॅस निर्मिती. घरातील कचऱ्याचे त्यांनी सुका कचरा, ओला कचरा आणि नष्ट न होणारा कचरा असे वर्गीकरण केले. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंडया, कांद्याची टरफले थोडक्यात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पदार्थांचे उरलेले भाग, कागदाचे तुकडे- हा झाला हिरवा कचरा. यापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्माण होते. त्यानंतर जेवणाच्या ताटातील, भांडयातील उष्टे अथवा शिल्लक अन्नपदार्थ, चहाच्या पातेल्यातला चोथा, खरकटे पाणी हा झाला ओला कचरा. हा कचरा बायोगॅसच्या संयंत्रामध्ये टाकून गॅस तयार केला जातो. तो गॅस पाइपच्या साह्याने स्वयंपाकघरात आणून थेट वापरता येतो. नष्ट न होणाऱ्या सुक्या कचऱ्यात रिकाम्या बाटल्या, टयूब, खराब बल्ब, प्लास्टीकचे तुकडे व पिशव्या, धातू, काच यांचा समावेश होतो. या वस्तू आपण भंगारवाल्याला देऊ शकतो. त्याच्या विक्रीतून पैसा मिळू शकतो. याठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे घरातील कोणताच कचरा या पध्दतीमुळे डंपिंग ग्राऊंडवर जाणार नाही. तयार होणारे गांडूळखत 10 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाते. खरकटया पाण्यापासून बायोगॅस मिळतो. त्यामुळे गॅसची बचत होते.
साधारण सकाळी दोन किलो अन्न व सायंकाळी दोन किलो अन्न बायोगॅस संयंत्रात टाकले तर त्यापासून 3 तास पुरेल एवढा गॅस मिळतो. त्याची ज्योतही निळया रंगात जळते. निर्मलाताईंनी त्यांच्या घरातच या गॅसचं प्रात्यक्षिकच आम्हाला दाखवलं. शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्रात्यक्षित पाहण्यासाठी त्यांच्या घरी येऊन गेले आहेत.
या गॅसला कोणताही वास येत नाही. त्याचप्रमाणे त्या स्फोट होण्याचीही भिती नाही. जमिनीमधला मिथेन वायू काढून जाळण्याऐवजी कचऱ्यापासून निर्माण होणारा मिथेन वापरणे कधीही हितावहच ना!
आज राज्यभरात बसविलेल्या विवम् ऍग्रोटेकच्या संयंत्रांमधून दररोज सुमारे 500 टन कचऱ्याचे गांडूळखत अथवा बायोगॅसमध्ये रुपांतर होत आहे. यामध्ये आणखी भरच पडत आहे. औरंगाबादसह राज्यात 50 शहरांत असे बायोगॅसचे प्रकल्प बसविले आहेत. पुणे महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 11 नगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयातील कॅन्टीनसह अनेक शासकीय इमारती, खासगी कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये ही संयंत्रे बसविली आहेत. प्रतिष्ठेच्या आयएसओ मानांकन मिळवण्यासाठीही अनेक कंपन्या आता हे संयंत्र बसविण्याला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. हॉटेल, धाबे यांनाही डंपिंग ग्राऊंडऐवजी असा प्रकल्प परवडतो.
निर्मलाताईंनी नुकताच चंद्रपूर नगरपरिषदेसाठी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केला आहे. गंजवार्ड भाजी मार्केटमधील रोजच्या 1500 किलो कचऱ्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते. त्यातून निर्माण होणारा गॅस शेजारच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या कॅन्टीनला देण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प स्वर्णजयंती महिला बचत गटामार्फत चालविला जातो.
वीजनिर्मिती प्रकल्प :
केवळ बायोगॅस निर्मितीवर निर्मलाताई थांबल्या नाहीत. त्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. याअंतर्गत जनरेटरमध्ये (डिझेलऐवजी बायोगॅस प्रकल्पांत तयार होणारा) बायोगॅस वापरला जातो. आज वीज तयार करण्यासाठी कोळशाचे ज्वलन केले जाते. यासाठी ऑक्सिजन मोठया प्रमाणात जळतो. ऑक्सिजनची किंमत पाहायला गेलो तर ती 36 रुपये प्रतिकिलो आहेच, पण जीवनासाठी अनमोल आहे. अशा वीजनिर्मितीचा खर्च ऑक्सिजनच्या किंमतीसह 120 रुपये प्रतियुनिटपर्यंत असू शकतो. मात्र कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा खर्च 3 रुपये प्रतियुनिट इतका असतो आणि प्रकल्पही पूर्णत: पर्यावरण सुसंगत.
नांदेड येथील केळी मार्केटमध्ये एक बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. तिथल्या केळीच्या लिलावानंतर उरणारे देठ, बुंधे, पाने असा रोजचा 1500 किलो कचरा प्रकल्पात टाकला जातो. याठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव आहे. याखेरीज चंद्रपूर नगरपालिका, वर्धा नगरपालिका, पंढरपूर नगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, रामटेक नगरपालिका व कागल नगरपालिका या ठिकाणी दीड ते पाच टनांपर्यंतचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोकणात चिपळूण आणि विदर्भात अंजनगाव- सुर्जी येथेही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
निर्मलाताईंच्या कार्याची आज अनेक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अधिकारीही त्यांचे काम पाहून प्रभावित झाले आहेत. केंद्र शासनाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या स्टॉलला मोफत जागा उपलब्ध केलीच शिवाय ठिकठिकाणी त्यांची मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली. महाराष्ट्र शासनाने कृषी सल्लागार समितीमध्ये स्थान देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला आहे. नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांत बायोगॅस व गांडूळखत या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा पुरस्कार, माँसाहेब मीनाताई ठाकरे विशेष गौरव पुरस्कार, बेस्ट प्रोजेक्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध नगरपालिकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याच्या कामाचा ओघही त्यांच्याकडे पुष्कळ आहे.
'आधी केले, मग सांगितले' अशा वृत्तीने निर्मलाताईंनी कचऱ्यापासून वीजनिर्मितीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. यापुढे सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याबरोबरच 'व्हर्मीकंपोस्टिंग' या विषयावर पीएच. डी. करण्याचा त्यांचा मानस आहे. शाळा व मंदिरे याठिकाणी प्रबोधन शिबिरे घेण्याचे प्रमाणही त्या वाढविणार आहेत. अत्यंत साधी राहणी, मनमोकळं बोलणं यामुळं आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या निर्मलाताई आजही 'जमिनीवर'च असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवतं. या जमिनीचे उपकार फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अथक सुरू आहेत. त्या प्रयत्नांत आपणही सहभागी होण्याची गरज आहे.

बचतगटांना काम
चंद्रपूर येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आले आहे. या महिला सायकलवरुन कचरा गोळा करतात. प्रत्येक महिलेकडे साधारण 250 घरे आहेत. घरगुती स्तरावरच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांच्या ताब्यात मिळते. यामध्ये हिरवा भाजीपाला, अन्य सुका कचरा व ओला कचरा असा त्या गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा दहा रुपये त्यांना मिळतात. जर कोणी ही मामुली रक्कम देण्यासही का- कु केले तर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे संबंधिताची तक्रार करण्याची मुभा त्या महिलेला असते. दरम्यान गोळा केलेल्या कचऱ्यातील हिरवा कचऱ्यापासून गांडूळखत केले जाते. प्लास्टीक, धातू, काच, बाटल्या वगैरे सामान विकूनही या महिलेला पैसे मिळतात. त्यामुळे कचरा गोळा करण्याचा मोबदला, गांडूळखत विक्री व भंगार विक्री यातून महिन्याकाठी तिला तीन ते चार हजार रुपये सुटू शकतात. तसेच त्यासाठी संपूर्ण दिवस न राबता केवळ चार तास द्यावे लागतात, अशी माहिती निर्मलाताईंनी दिली.
--
संपर्कासाठी पत्ता :
निर्मला कांदळगावकर,
विवम् ऍग्रोटेक,
ए-6, वेदांत गृहकुल, नवे श्रेयानगर,
औरंगाबाद, 431 005.
दूरध्वनी क्र. 0240- 2346532, 2321863
इ-मेल : vivamgroup@rediffmail.com
वेबपेज : http://vivamgroup.tripod.com