मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

खुल्या दिलाचा ‘सत्यशोधक’ अभ्यासक

डॉ. संभाजी खराट यांच्या निवृत्तीदिनाच्या पूर्वसंध्येला अण्णासाहेब लठ्ठेकृत शाहूचरित्र ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देताना डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह फारूख बागवान.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय म्हणजे कामाची सातत्यानं धामधूम... या विभागामध्ये अधिकारी वा कर्मचारी होणं, म्हणजे पोलीस खात्यात भरती झाल्यासारखंच... सुटीच्या दिवशीही नित्यनियमानं काम सुरू असणारा हा विभाग. अशा व्हायब्रंट विभागामध्ये एखाद्या अधिकाऱ्यानं नियमित काम मार्गी लावलं तरी खूप असतं. कारण कामाचा ओघ आणि पसारा हा इथं कधी थांबतच नाही. त्यातूनही या विभागात काही असे अधिकारी आहेत की, या कामाच्या पलिकडं जाऊन त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. कोणी लेखक-साहित्यिक म्हणून, कोणी कवी-कवयित्री म्हणून तर कोणी संशोधक म्हणून... आपल्या सोशल कमिटमेंटच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा असाच ठसा उमटवणारे अधिकारी म्हणजे डॉ. संभाजी खराट सर... 

मराठवाड्याच्या मातीत उगवलेल्या या व्यक्तीत्वानं आपल्या संशोधकीय कर्तृत्वाची मोहोर अखिल महाराष्ट्रावर उमटविली. खराट सर जानेवारी अखेरीस नियत वयोमानाने निवृत्त झाले. सत्यशोधक चळवळीचा त्यांनी अतिशय चिकित्सक अभ्यास केला आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा घेऊन त्यांनी अत्यंत शांत व संयतपणाने आपले संशोधनाचे काम केले आहे. खराट सरांचे मला व्यक्तीशः भावणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शांत सुस्वभाव. कधी कोणाबद्दल त्यांच्या मनात वाईट भाव येत नाही की तोंडून एखादा वाकडा शब्द. त्यांच्या मनात सतत काही ना काही चिंतन सुरू असतं, हे त्यांच्याकडं पाहिलं की लगेच लक्षात येतं. एक घनगंभीरता त्यांचं व्यक्तीमत्त्व व्यापून असते. समोर गेलात की हलक्या स्मितहास्यानं स्वागत होणार... आपुलकीची चौकशी... नवनव्या गोष्टी जाणून घेण्याकडं त्यांचा विशेष कटाक्ष... काम कितीही असलं तरी त्या कामाचं प्रेशर ना कधी ते जाणवून देत, ना हाताखालच्या लोकांवर टाकत, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.

खराट सर आता निवृत्त होताहेत, याचाच अर्थ ते आता सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासासाठी व प्रसारासाठी फुल-टाईम उपलब्ध होणार आहेत. कित्येक विषय त्यांच्या डोक्यात घोळताहेत. आता ते कागदावर उतरावेत. नाही म्हटलं तरी कृतीशील कार्य करण्यावर नोकरीच्या, कामाच्या अन् वेळेच्या मर्यादा पडत असतातच. आता असे कोणतेही बंधन सरांवर असणार नाही. त्यामुळं त्यांनी आता या साऱ्या गोष्टी करण्यासाठी आयुष्याच्या खुल्या मैदानात उतरावं आणि मनमुराद काम करावं, याच या निमित्तानं अपेक्षा आणि त्यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, या सदिच्छा सुद्धा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा