रविवार, ६ जुलै, २०२५
हार्दिक कृतज्ञता आणि दिलगिरीही...
शनिवार, ५ जुलै, २०२५
माध्यमकर्मींनी माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा: डॉ. अशोक चौसाळकर
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
कोल्हापूर, दि. ५ जुलै: माध्यम हे दुधारी
असते, माध्यमकर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर
केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, ब्लॉगर, संवादक डॉ. आलोक
जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा भाग्यश्री
प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारा मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रह आणि ‘समाज आणि माध्यमं’ हे अक्षर दालन
प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे माध्यमविषयक पुस्तक यांचा संयुक्त प्रकाशन सोहळा येथील
राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी ‘समाज, माध्यमं आणि
संविधानिक मूल्ये’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. रघुनाथ कडाकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित
होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, संदेश प्रसार आणि
अभिव्यक्तीसाठी प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही माध्यमे होती; केवळ त्यांचे
स्वरुप वेगळे होते. माध्यमे असल्यामुळेच भगवान बुद्ध, महंमद पैगंबर, शंकराचार्य
यांचे संदेश सर्वदूर पसरले. पानिपतच्या लढाईतील पराभवाची बातमी महाराष्ट्रात
पोहोचण्याला दोन महिने लागले. व्यापाऱ्यांच्या संदेशाच्या माध्यमातून ती येथपर्यंत
आली. हे स्वरुप बदलत आता आधुनिक स्वरुपाला येऊन ठेपले आहे. स्वच्छ अभिव्यक्ती ही आजची
गरज आहे. आद्य मराठी संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यासाठी आग्रही प्रतिपादन
केले होते. भारतीय संविधानही त्याच अभिव्यक्तीची अपेक्षा नागरिकांकडून आणि
माध्यमकर्मीकडून बाळगते. मात्र, आज समाजमाध्यमांच्या आगमनामुळे विद्वेषी, विखारी,
भेदाभेदाला बळ देणाऱ्या खालच्या दर्जाच्या अभिव्यक्तींचे वाढते प्रमाण चिंताजनक
आहेच; पण,
देशहितालाही मारक आहे. त्यामुळे माध्यम आणि अभिव्यक्ती साक्षरता ही काळाची गरज
आहे. त्यामध्येही माध्यमांना मोलाची भूमिका बजावण्याची संधी आहे.
डॉ. जत्राटकर यांची दोन्ही पुस्तके चांगली झाली
असून येथून पुढील काळात त्यांच्याकडून अधिक चांगल्या निर्मितीची अपेक्षा त्यांचा
शिक्षक म्हणून मी बाळगून आहे, असेही चौसाळकर म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. आलोक
जत्राटकर हे भोवतालाकडे संवेदनशीलतेने आणि वैज्ञानिक चिकित्सक नजरेतून पाहणारे
व्यक्तीमत्त्व आहे. आपले दिवंगत शास्त्रज्ञ मित्र डॉ. भालचंद्र काकडे यांच्या
स्मरणार्थ व्याख्यानमाला चालविण्याच्या त्यांच्या निरपेक्षभावातून या
संवेदनशीलतेची प्रचिती येते. हीच संवेदनशीलता त्यांच्या लेखनातूनही पाझरताना
दिसते.
यावेळी जत्राटकर यांच्या दोन्ही पुस्तकांवर
राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी भाष्य
केले. ते म्हणाले, ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ व ‘समाज आणि माध्यमं’ या दोन्ही
पुस्तकांतून डॉ. जत्राटकर यांची दोन वेगवेगळी रुपे सामोरी येतात. पहिल्या
पुस्तकामध्ये समाजातील, भोवतालातील छोट्या छोट्या घटना, प्रसंगांमध्ये मानवी
मूल्यांचा आग्रह धरणारा समाजचिंतक दिसतो. भारतीय समाजात सौहार्द, समतेचा सहभाव निर्माण
व्हावा, यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानिक
मूल्यांच्या अंगिकाराचा आग्रह करणारा सहृदयी माणूस दिसतो. तर, ‘समाज आणि माध्यमं’ या पुस्तकाद्वारे
माध्यमांचे एक सजग आणि जाणकार अभ्यासक म्हणून ते सामोरे येतात. भारतात झालेल्या
टेलिकॉम्प्युटर क्रांतीनंतर गेल्या दोन-तीन दशकांत प्रसारमाध्यमांच्या जगतात
झालेल्या घडामोडी, नवमाध्यमांच्या नवप्रवाहांनी त्यामध्ये केलेला हस्तक्षेप यांसह
गेमिंग, ट्रोलिंग, ई-कॉमर्स, ऑनलाईन शिक्षण इत्यादींनी आपल्या समाजजीवनावर टाकलेला
प्रभाव यांसह अनेक बाबींचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि तपशीलवारपणे
त्यांनी घेतलेला आढळतो.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
म्हणाले, समाज आणि माध्यमं या पुस्तकातून डॉ. जत्राटकर यांनी नवमाध्यमांतील
त्रुटींची अतिशय परखडपणे जाणीव करून दिलेली आहे. समाजाविषयीची चिंता, तळमळ
त्यामध्ये आढळते. ते नकारात्मक नाहीत, पण सकारात्मक वापरासाठी, अभिव्यक्तीसाठी
आग्रही आहेत. समाजाने त्यांची दखल घेऊन या माध्यमांचा सजग वापर करणे आवश्यक आहे.
ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या पुस्तकातील प्रत्येक लेखामधून जगण्याचे, जीवनाचे एक
मूल्य त्यांनी सांगितले आहे. एक संवेदनशील लेखक, माणूस म्हणून ते वाचकांच्या
हृदयाला हात घालतात.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते
पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांना प्रस्तावना लिहीणारे ज्येष्ठ
साहित्यिक डॉ. राजन गवस आणि डॉ. रणधीर शिंदे यांचा प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्या हस्ते प्रकाशित पुस्तके प्रथम भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे डॉ. जत्राटकर यांचे गुरू डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ संपादक दिलीप
लोंढे, संजय पाटोळे आणि डॉ. विजय चोरमारे यांचा कृतज्ञता सत्कार कुलगुरू डॉ.
शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त
केले. भाग्यश्री कासोटे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयश्री देसाई
यांनी सूत्रसंचालन केले, तर अमेय जोशी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. एन.डी. जत्राटकर, डॉ.
सागर डेळेकर, डॉ. विनोद कांबळे, डॉ. जगन कराडे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. जी.पी. माळी, डॉ. इस्माईल
पठाण, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. श्रीराम पवार, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. अरुण शिंदे, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले,
अॅड. अभिषेक मिठारी, नामदेवराव कांबळे, जी.बी. अंबपकर, अशोक चोकाककर,
डॉ. कैलास सोनवणे, डॉ. केदार मारुलकर, डॉ. विनोद ठाकूर देसाई, डॉ. गजानन राशिनकर,
डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. प्रविण कोडोलीकर, मंजीत माने, मंदार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
'बुके'ऐवजी 'बुक'
महत्त्वाची बाब म्हणजे निमंत्रण पत्रिकेत केलेल्या आवाहनानुसार एकाही व्यक्तीने पुष्पगुच्छ आणला नाही, तर त्याऐवजी पुस्तके खरेदी केली. या निमित्ताने एक नवा प्रघात डॉ. जत्राटकर यांनी सुरू केला.
समतोल, स्थिरता आणि परिपक्वता असणारे आलोक जत्राटकर यांचे ग्रंथ
(बंधूवर्य डॉ. विनोद कांबळे यांनी शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कर्टन रेझर लेख लिहीला आहे. तो येथे शेअर करीत आहे. या लेखातीलच संपादित अंश दि. १३ जुलै रोजी 'दै. लोकमत'मध्ये 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकाच्या परिचयात्मक स्वरुपात प्रकाशित झाला आहे. त्याचेही कात्रण येथे देत आहे.)
![]() |
| (छाया. डॉ. विनोद कांबळे) |
डॉ. आलोक जत्राटकर यांचे हार्दिक अभिनंदन!
रविवार, ४ मे, २०२५
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष चौथे): संविधान, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच दृष्टी घेणेही आवश्यक: राजवैभव शोभा रामचंद्र
![]() |
| संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र |
कोल्हापूर, दि. ४ मे: भारतीय नागरिकांनी संविधान आणि विज्ञानाची सृष्टी
घेतली, मात्र अद्याप दृष्टी घेणे बाकी आहे, असे प्रतिपादन संविधान संवादक राजवैभव
शोभा रामचंद्र यांनी आज केले. आ’लोकशाही युट्यूब वाहिनीवर
आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये चौथ्या वर्षीचे पुष्प
गुंफताना ते ‘भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर बोलत होते.
राजवैभव शोभा रामचंद्र यांनी भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन
या दोहोंच्या अनुषंगाने अत्यंत चिकित्सक मांडणी केली. ते म्हणाले, भारतीय
संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक चेहरा, स्वतःची ओळख दिली. ते आपल्या
जगण्याचा एक भाग आहेच, पण ती प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि
बंधुता प्रदान करणारी एक मूल्यव्यवस्था आहे. तर कार्यकारणभाव हा वैज्ञानिक
दृष्टीकोन आहे. प्रत्येक घटनेमागे काही तरी कारण आहे आणि त्या कारणांचा शोध घेणे
हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. विज्ञान नावाची गोष्ट ही खूप विनम्र असते. सर्वच शोध
लागलेले नाहीत, पण कधी तरी लागतील, हा विश्वास ती प्रदान देते. त्याचप्रमाणे भारतीय
संविधानही खूप विनम्र आहे. विज्ञानवादी असूनही ते या देशातल्या नागरिकांच्या
विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांना मान्यता देते. त्यावर घाला घालणाऱ्यांनाही ते पाठीशी
घालत नाही. ही फार मोठी खुबी या संविधानामध्ये आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्पष्टपणे उल्लेख असणारे भारतीय संविधान हे
जगातील एकमेव असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, भारतीय संविधानाने विज्ञानवादाला
आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. ५१ व्या कलमामध्ये आम्ही विज्ञानवादाचा
प्रचार, प्रसार करू. वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व गोष्टींकडे चिकित्सकपणे पाहू, याची
ग्वाही ते देते. स्वातंत्र्य, समता या मूल्यांना विज्ञानाचा आधार आहे. विज्ञान
विषमतेला, भेदांना मान्यता देत नाही. जाती, धर्म, भाषा, प्रांत या आधारे
श्रेष्ठत्वाचा दावा करणाऱ्यांचे दावे फोल आहेत, कारण त्यांना वैज्ञानिक आधार नाही.
राजवैभव पुढे म्हणाले, संविधान सभेत आस्तिक, नास्तिक आणि वास्तविक असे
सर्व प्रकारचे लोक असूनही संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरवात ही ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी होणे, हाच या संविधान सभेचा मोठा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. संविधान
या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य देत नाही, तर ते त्यांचे स्वातंत्र्य मान्य
करते. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच स्वातंत्र्ये
संविधान मान्य करते. ही स्वातंत्र्ये उल्लेखत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन हे
कर्तव्यामध्ये दिले आहे. स्वातंत्र्य आपण घेऊ शकतो, मात्र कर्तव्य हे निभावलेच
पाहिजे, असा दृष्टीकोन त्यामागे आहे. या देशात संविधानाने प्रत्येक नागरिकाला जिविताचा,
सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मरण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही.
याचे कारण म्हणजे भारतीय नागरिक हे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर राष्ट्राची संपत्ती
आहेत, हा दृष्टीकोन त्यामागे आहे.
विज्ञान आणि संविधानाची या दोन्ही बाबींची आपण सृष्टी घेतली मात्र
दृष्टी घेतली नाही, ही फार मोठी समस्या असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, सुखाच्या
गावाचा रस्ता शोधणारा मार्ग हे संविधान आणि विज्ञान या दोहोंचेही अंतिम ध्येय आहे.
एकाच वेळेला सर्वांचे भले व्हावे, असे मानणारी ही बाब असून सगळ्यांना सर्व मिळावे आणि
तेही सगळ्यांना समान पद्धतीने मिळावे, अशी भूमिका त्यामागे आहे. त्याची मूल्येही
स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हीच आहेत. भेदभावाच्या मूल्यांना आपण कवटाळून
राहणे घातक ठरणारे आहे. वैज्ञानिक शोधांचा देशाच्या भल्यासाठी, जगाच्या भल्यासाठी
वापर करण्याची भावना संविधानातील विज्ञानवाद देतो. दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींकडे
आपण विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहात असू, तर आपण योग्य मार्गावर असतो.
संविधानाचा विचार घेऊन पुढे जायचे असेल तर संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोनच
आवश्यक आहे. या देशात जे चांगले घडते, ते संविधानाच्या अंगिकारामुळे, जे वाईट घडते
ते संविधान नाकारल्याने ही जाणीव सर्वदूर निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही
त्यांनी केले.
यावेळी आ’लोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत, प्रास्ताविक
करून आभार मानले.
शुक्रवार, २ मे, २०२५
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र
![]() |
| (दिवंगत) डॉ. भालचंद्र काकडे |
![]() |
| राजवैभव शोभा रामचंद्र |
कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये संविधान संवादक म्हणून देशभरात प्रसिद्ध असणारे राजवैभव शोभा रामचंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आ’लोकशाही (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होईल. व्याख्यानमालेचे आयोजक डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी ही माहिती दिली.
दि. ४ मे २०२५ रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा चतुर्थ स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत ‘भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर राजवैभव यांचे व्याख्यान होईल. राजवैभव यांनी भारतीय संविधानाबाबत समाजात सर्वदूर जागृती निर्माण करण्यासाठी काम चालविले आहे. संविधान संवाद समितीचे ते सचिवही आहेत.
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या तीन वर्षांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे, ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे, ‘कोविड-१९’वरील लस संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चमूमध्ये योगदान देणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, पाच विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी यांची अतिशय लक्षवेधक व्याख्याने झालेली आहेत. ती आजही मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात. सदर व्याख्यानमाला आ’लोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना युट्यूबवर @alokshahi या वाहिनीवर जाऊन सहभागी होता येईल.
बुधवार, ३० एप्रिल, २०२५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जलनिती
“चवदार तळ्याचे पाणी
प्याल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ, असे नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो
नव्हतो, म्हणून तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ
त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता नव्हे; तर इतरांप्रमाणेच
आम्हीही माणसे आहोत, हे सिद्ध करण्याकरिताच आपणास त्या तळ्यावर जावयाचे आहे.” दि. २६ डिसेंबर
१९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह परिषदेवेळी भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका उपरोक्त शब्दांत स्पष्ट केली आहे.
बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला असेल अथवा मंदिर प्रवेशाचा, त्यांना तेथे प्रवेश
मिळविण्यात स्वारस्य नव्हते, तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये शूद्रातिशूद्रांना,
अस्पृश्यांना नाकारलेल्या समता हक्काची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी आपल्या
समग्र चळवळी उभारल्या, हे लक्षात घ्यायला हवे.
पाणी हा विषयही बाबासाहेबांसाठी समता आणि न्याय
प्रस्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. ‘जातिनिर्मूलन’ या ग्रंथामध्ये
बाबासाहेबांनी सामाजिक न्याय व समता प्रस्थापनेसाठी सुचविलेल्या उपायांमध्ये
संसाधनांच्या फेरवाटपाचा मुद्दा आहे. त्यामध्ये भूसंपत्ती व उद्योगधंद्यांचे समान
वाटप, सार्वजनिक क्षेत्राचे सक्षमीकरण, श्रमिक आणि शेतकऱ्यांचे संरक्षण आणि शिक्षण
आणि नोकऱ्यांमध्ये समान संधी यांचा समावेश होता. पाणी हा विषय सुद्धा संसाधनांच्या
फेरवाटपामध्ये महत्त्वाचा असून ते इतके मूलभूत संसाधन आहे की, त्याच्या वितरणातील
विषमता ही आर्थिक आणि सामाजिक अन्यायाला कारणीभूत ठरते. म्हणूनच आपल्या ‘स्टेट्स अँड
मायनॉरिटीज्’ या ग्रंथात पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क
असल्याचे प्रतिपादन करतात. जलसंपत्तीवर केवळ काही मूठभरांचा नव्हे, तर प्रत्येक
नागरिकाचा अधिकार असला पाहिजे, असे बाबासाहेब सांगतात. म्हणूनच राज्यघटनेमध्ये
त्यांनी जलसंपत्तीचा समावेश सार्वजनिक मालकीत करण्याची शिफारस केली. त्यासाठी
नद्यांचे व जलस्रोतांचे नियंत्रण हे केंद्र सरकारच्या हातात असावे, यासाठी ते
आग्रही राहिले.
बाबासाहेबांनी हे केवळ सैद्धांतिक पातळीवर
सांगितले असे नव्हे, तर अत्यंत कृतीशील पद्धतीने भारताला प्रथमच त्याचे स्वतंत्र
जल आणि ऊर्जा धोरण प्रदान केले. बाबासाहेबांची ही कामगिरी ऐतिहासिक स्वरुपाची आहे.
१९४२ ते १९४६ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटीश सरकारच्या प्रभारी
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा, जलनियोजन, कामगार, खनिकर्म आणि सार्वजनिक
बांधकाम विभागाचे मंत्री होते. त्याचप्रमाणे १९४७ ते १९५१ या कालावधीत
स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळात कायदेमंत्री होते.
या कालावधीत बाबासाहेबांनी अनेक
महत्त्वाची धोरणे आखली आणि भारताच्या जल आणि विद्युत ऊर्जा धोरणाची पायाभरणी केली.
जलधोरणाच्या नियोजन आणि विकासातील बाबासाहेबांचा सहभाग फारच कमी लोकांना ठाऊक आहे.
बाबासाहेबांनी या काळात प्रथमच केंद्रीय स्तरावर व्यापकपणे
पाणी, खनिज संसाधने, वीज इत्यादींसाठी नियोजन हा मूलभूत
विषय म्हणून विचारात घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये जल व विद्युत विकासासाठी
धोरण निश्चित करणे, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय आकृतीबंध तयार करणे, दामोदर, हिराकुड
आणि सोन धरण प्रकल्प सुरू करणे आणि देशातील विविध राज्यांतील नद्यांच्या
विकासासाठी प्रयत्न करणे आदी बाबींचा समावेश होता.
तत्पूर्वी, १९३७ पर्यंत भारतातील पाणी
वापरावर ब्रिटीश सरकारचे नियंत्रण होते. राज्यांना कालव्यामार्फत सिंचन सुविधा
पुरविण्यासाठीही तेव्हा ब्रिटीश सरकार आणि संबंधित राज्यकर्त्यांत करार होत असे.
१९३५ च्या कायद्यान्वये राज्यांना बरेच अधिकार मिळाले. पुढे केंद्राच्या अधिकार
कक्षेत भूजलमार्गावरील जहाज वाहतूक, मालवाहतूक यांचा समावेश केला गेला. या काळात
सिंचन अगर वीज विकासासाठी स्वतंत्र कार्यालय नव्हते. देशातील विजेचा वापर, वितरण
व्यवस्था यांचे कार्य आणि व्यवस्थापन याविषयी काहीही माहिती वा आकडेवारी उपलब्ध
नव्हती. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी या विभागांचा कार्यभार स्वीकारलेला होता.
बाबासाहेबांनी जलसिंचन, जलमार्ग,
नौकानयन यांच्या मूलभूत कामासाठी राष्ट्रीय पातळीवर आर्थिक नियोजनास सुरवात केली.
जलसंसाधनांची निर्मिती, जलविद्युत निर्मितीसाठी धोरण निश्चित करून त्याच्या
अंमलबजावणीस सुरवात केली. जलनियोजनासाठी जल मंत्रालय, जल आयोग स्थापन करण्यात आले.
देशातील नद्यांच्या विकासासाठी नदी खोरे प्राधिकरण सुरू करून जलनियोजनाला चालना
दिली. जलसिंचन, जलपुरवठा, पूरनियंत्रण, जलविद्युत निर्मिती या संदर्भात राज्य
सरकारांना मार्गदर्शन करणे, प्रकल्पांच्या कामासाठी वित्तीय मार्गदर्शन व सहकार्य
पुरविणे, तांत्रिक तरतुदींचा सखोल अभ्यास करणे, भारतातील महत्त्वाच्या मोठ्या
प्रकल्पांविषयी देखरेख करणे, देशातील विविध कार्यालयांकडून पाण्याविषयीची आकडेवारी
संकलित करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, पूरप्रवण नद्यांचा अंदाज बांधणे, पर्यावरण
नियंत्रण करणे, धरण सुरक्षितता आणि जलसिंचनविषयक संशोधनाला चालना देणे अशी विविध
प्रकारची कामे जल आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली. यामुळे देशाच्या पाणीविषयक
कार्याला मोठी चालना मिळाली. केंद्रीय वीज प्राधिकरणाची स्थापना ही बाबासाहेबांनीच
१९४४ मध्ये केली, ज्यामुळे वीज निर्मिती व वितरण क्षेत्राला योग्य शिस्त आणि दिशा
लाभली.
जलनियोजन करीत असताना त्याचा त्यांनी
सूक्ष्म पातळीवर विचार केला. पाणी नियोजन, पाणी उत्पत्ती, मातीची होणारी झीज
थांबविणे, जमिनी सुपीक करणे, शेतीची सुधारणा करणे, उद्योगासाठी वीजनिर्मिती करून
विकास साधणे, शेती व उद्योगधंद्यांतील विकासासाठी सिंचन आणि विजेची आवश्यकता
लक्षात घेऊन धरणांची बांधणी आणि त्याद्वारे वीजनिर्मितीकडे त्यांनी गांभीर्यपूर्वक
लक्ष पुरविले. त्याअंतर्गतच त्यांनी दामोदर नदी खोरे, सोन
नदी खोरे, महानदीसह ओरिसा नदी योजना, चंबळ
नदी योजना आणि दख्खन नदीसाठी योजनांची पायाभरणी केली.
भारतात रेल्वेचे जाळे निर्माण होण्यापूर्वी
जलवाहतूक मोठ्या प्रमाणात चाले. दुर्लक्षित झालेल्या जलवाहतुकीकडे बाबासाहेबांनी
लक्ष वेधले. जलमार्गाच्या विकासासाठी धोरण निश्चित केले. त्यात नदी, खाडी व इतर
जलमार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, सिंचन व कालव्यांचा वापर अंतर्गत
वाहतुकीसाठी करणे, कृत्रिम जलमार्गांची निर्मिती करणे, देशातील बंदरांचा विकास
करणे या बाबींवर त्यांनी भर दिला. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय नद्यांच्या अनुषंगाने
नदी खोरे प्राधिकरणाची स्थापना केली. यानुसार, आंतरराज्य नदी व तिच्या
उपनद्यांमधील पाण्याचा अधिकार प्रांत व राज्यांना देणे, धरण निर्मितीनंतर जमीन पाण्याखाली
गेल्यानंतर संबंधित नागरिकांचे विस्थापन व पुनर्वसन आदी बाबींचा समावेश यात
करण्यात आला. या नदी खोरे जलनियोजनाला १९४८ मध्ये संसदेने कायदा करून मान्यता दिली
आणि देशातील पहिले दामोदर खोरे प्राधिकरण अस्तित्वात आले. यामागे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे प्रयत्न कारणीभूत होते.
दामोदर नदी प्रामुख्याने बिहार व पश्चिम
बंगालमधून वाहते. ती बिहारमध्ये जमिनीची झीज करते, तर पश्चिम बंगालमध्ये
महापुरामुळे जनजीवन विस्कळित करते. त्यामुळे दोन्ही राज्यांना नैसर्गिक आपत्तीचा
सामना करावा लागत असे. १९४३ मध्ये नदीला प्रचंड महापूर आल्याने काठावरची गावेच्या
गावे पाण्याखाली गेली; रस्ते, रेल्वेचे रुळ वाहून गेले. मोठ्या शहरांशी
संपर्क तुटला. ही उद्ध्वस्त व भीषण परिस्थिती पाहिल्यानंतर बाबासाहेबांनी या
प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नियुक्त
करण्यात आली. या समितीने काही उपाययोजना सुचविल्या. त्यामध्ये दामोदर नदीचे
संपूर्ण सर्वेक्षण करून नदी आणि उपनद्यांवर धरणे बांधणे, जलसिंचनासाठी जलसंवर्धन
करणे, जमिनीची झीज थांबविण्याचे प्रयत्न करणे, धरणांवर वीजनिर्मिती करणे, नदी
परिसरातील जंगलांचा विकास करणे, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचाही अभ्यास करणे,
जलसिंचनाचा शेतीसाठी वापर करणे तसेच जलवाहतूक निर्मितीसाठी प्रयत्न करणे या
शिफारशींचा समावेश होता. बाबासाहेबांनी त्यांचा अभ्यास करून प्राधिकरण स्थापनेचा
निर्णय तत्काळ घेतला.
बाबासाहेबांचे याविषयीचे मत अगदी सुस्पष्ट होते. जास्तीचे
पाणी अगर पूर येणे ही लोकांना आपत्ती वाटत असे, पण बाबासाहेबांच्या मते ती आपत्ती
नसून फक्त त्या अतिरिक्त पाण्याचे योग्य नियोजन करता आले पाहिजे. पाश्चात्य
देशांप्रमाणे पाण्याचा वापर, जतन व संवर्धन यांवर भर देऊन योग्य पद्धतीने नियोजन
करता आले पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः अमेरिकेतील टेनेसी खोरे योजनेचा
सर्वंकष अभ्यास करून तेथील लाभ, समस्या आणि तंत्रज्ञान समजून घेतले होते. दामोदर
खोरे विकासासंदर्भात कोलकता येथे झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले
होते की, पाण्याच्या सोयीमुळे जलसिंचन सुविधा निर्माण होतील. त्यामुळे अन्नधान्य
वाढून शेतकऱ्यांची, खेड्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. स्वस्त दराने वीज निर्माण
झाल्यावर ती उद्योगांसाठी वापरता येईल. रस्ते, रेल्वेमार्गाला पर्याय म्हणून कमी
खर्चाची, वेळ वाचविणारी जलवाहतूक सुरू होईल. पाण्यामुळे मत्स्योद्योग वाढून रोजगार
संधी उपलब्ध होतील. राज्य सरकारांना त्याचा लाभ होईल.
दामोदर प्रकल्पामुळे ४७ लाख एकर फूट पाणी साठविले
जाणार होते. तेथे सात लाख साठ हजार एकर जमीन बारमाही ओलिताखाली येणार होती. तसेच
तेथे सुमारे तीन लाख किलोवॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार होती. याचा ५० लाख
लोकांना फायदा मिळणार होता. त्यामुळे या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय
घेण्याविषयी बाबासाहेबांनी बिहार व पश्चिम बंगाल राज्यांना तयार केले आणि
प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. यातून दामोदर नदीवर तिलैया, मैथान, कोणार, पंचेत
हिल, दुर्गापूर ही धरणे व बंधारे साकार झाले. एकीकडे प्रकल्पाची तयारी करीत असताना
दुसरीकडे बाबासाहेबांनी या प्रकल्पाखाली जाणारी जमीन, हजारो गावांतील विस्थापित
होणारे नागरिक यांच्या पुनर्वसनाचाही विचार केला. त्यांना केवळ नुकसान भरपाई न
देता नवीन घरे देणे आणि त्यांच्या कामधंद्याची व्यवस्था करणे याकडे त्यांचा कटाक्ष
होता. नुकसान भरपाईसह जमिनीच्या बदल्यात जमीन हे त्यांचे सूत्र दोन्ही राज्यांनी
मान्य केले. याच धर्तीवर पुढे बाबासाहेबांनी ओरिसातील महानदी प्रकल्पाचाही विकास
केला. त्यातून हिराकुड धरण हे देशातील सर्वात लांब आणि जगातील सर्वात विशाल असे
मातीचे धरण साकार झाले. त्यानंतर मध्य प्रदेशातून वाहत जाऊन गंगेला मिळणाऱ्या सोन
नदीचाही दामोदर नदीप्रमाणेच बहुउद्देशीय विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना
करण्यात आली. बाबासाहेबांनी अशा प्रकारे आपल्याकडील श्रम, जल आणि ऊर्जा
मंत्रालयांचा संयुक्त वापर करून जलधोरणाचा व्यापक कृतीशील विकास केला. त्याची फळे
आपण आजही उपभोगत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतकेच करून थांबत नाहीत,
तर जेव्हा ते भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, तेव्हा या
जलधोरणाला कायद्याचे स्वरुप देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. नदी खोरे
प्राधिकरणाची स्थापना राज्यघटनेत नोंद झाली. राज्यघटनेचा मसुदा तयार झाला, तेव्हा
त्यात भारताचे स्वतंत्र जलधोरण निश्चित करण्यात आले. यामध्ये बाबासाहेबांचा मोलाचा
वाटा राहिला. पूरनियंत्रण, जलसिंचन, नौकानयन, वीजनिर्मिती यासाठी आंतरराज्य
जलमार्ग विकासाचा मुद्दा तिथे समाविष्ट करण्यात आला. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने
तत्काळ कार्यवाही करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार किंवा संसदेच्या कायद्यानुसार
आंतरराज्य नद्यांचे नियमन व विकास साध्य करण्यात येईल, अशी घटनेत दुरुस्ती करण्यात
आली. तसेच दोन राज्यांमधील पाणी वाटप व नियंत्रण यांच्या वादाबाबत लवाद नेमण्याची
तरतूद संसद करू शकते, असे कलमही त्यात घातले. संसदेने १९५६ मध्ये केलेले आंतरराज्य
जलविवाद कायदा, नदी मंडळ कायदा आणि आंतरराज्य नद्या व नदीखोरे यांमधील
पाणीतंट्याबाबत लवादाची तरतूद हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचेच फलित म्हणावयास
हवे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, भाक्रा-नांगल
नदी खोरे विकासाचा प्रकल्प प्राधान्याने हाती घ्यावा यासाठी बाबासाहेबांनी १९४४
मध्ये युनायटेड स्टेट्स ब्युरो ऑफ रिक्लेमेशनच्या तज्ज्ञाला आमंत्रित करून या
प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळून पाहिली होती. सदरची जागा धरण बांधकामासाठी योग्य असून
पाया आणि बंधाऱ्यांसाठी पुढील शोध घेण्याचा सल्ला त्याने दिला होता. त्यानुसार या
धरणाच्या कामाला गती देण्यात आली. १९५४ मध्ये या धरणाच्या उद्घाटन प्रसंगी
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ‘धरणे
ही आधुनिक भारताच्या विकासाची मंदिरे आहेत,’
असे उद्गार काढले. त्या मंदिरांच्या पायाभरणीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
केले होते, ही बाब येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
तहानेने कासावीस झालेल्या ज्या अस्पृश्य
मुलाला घोटभर पाणी कोणीतरी ओंजळीत वरुन वाढेल यासाठी एखाद्याच्या दयाळूपणाची
तासंतास वाट पाहावी लागत असे, त्या मुलाने पुढे या देशातील सर्व स्तरांतील
नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी धोरणांची आखणी करावी, हा काळाचा आणि
त्या मुलाने पुढे ‘डॉ.
बाबासाहेब आंबेडकर’
होऊन संपादित केलेल्या प्रगाढ विद्वत्तेचा महिमा होता, याचे कृतज्ञ स्मरण या
देशातील नागरिकांनी पाण्याच्या प्रत्येक घोटागणिक ठेवावयास हवे!
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
‘निष्पर्ण...’मधून अनुप जत्राटकर यांच्या सृजनशील प्रतिभेची प्रचिती: बाबासाहेब सौदागर
दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन; अभिवाचनासही श्रोत्यांचा प्रतिसाद
![]() |
| 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिकेचे अभिवाचन करताना (डावीकडून) 'अभिरुची'चे जितेंद्र देशपांडे, अश्विनी टेंबे आणि चंद्रशेखर फडणीस. |
कोल्हापूर, दि. २२
एप्रिल: ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ या एकांकिका संग्रहातून लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर
यांच्या सृजनशील प्रतिभेची प्रचिती येते. भविष्यातही त्यांच्याकडून अशा उत्तमोत्तम
साहित्यकृतींची अपेक्षा वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, साहित्यिक
बाबासाहेब सौदागर यांनी आज येथे केले.
अनुप जत्राटकर
यांच्या ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन येथील शाहू
स्मारक भवनामध्ये झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सौदागर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक डॉ. शरद भुथाडिया होते.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांची विशेष
उपस्थिती होती. यावेळी झालेल्या एकांकिकेच्या अभिवाचनासही श्रोत्यांचा मोठा
प्रतिसाद लाभला.
श्री. सौदागर
म्हणाले, गाभ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनुप यांच्याशी परिचय करून घेण्याची
उत्सुकता वाढली. त्यातून स्नेह निर्माण झाला. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा
मोठा आहे. तो वारसा पुढे चालविण्याची क्षमता लेखक-दिग्दर्शक म्हणून अनुप
यांच्यामध्ये जाणवते. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
त्यांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम ते निश्चितपणे करतील, याची
खात्री आहे. लेखक म्हणूनही त्यांनी ‘निष्पर्ण...’सारख्याच प्रयोगशील साहित्यकृतींची निर्मिती करीत राहणे फार
आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या
अस्तित्वाच्या अनुषंगानेही सौदागर यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, जोपर्यंत आपण
आईला ‘आई’ म्हणतो, तोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व कायम राहील. मराठीच्या अस्तित्वाची
चिंता करण्यापेक्षा तिचा वापर करीत राहणे, तिचा शिक्षणातून प्रसार करणे महत्त्वाचे
आहे. हिंदी ही मराठीची मावशी आहे, तर इंग्रजी ही आण्टी आहे. त्यामुळे त्यांचा
द्वेष करण्याऐवजी त्याही आत्मसात करायला हव्यात.
यावेळी सौदागर यांनी
कोल्हापूरशी त्यांचे असणारे बंधही उलगडले. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर हे आपले
गुरू होते. त्यांच्या सूचनेवरुन यशवंत भालकर यांनी त्यांच्या चित्रपटासाठी गीतलेखनाची
पहिली संधी दिली आणि पहिले गीत हे डॉ. शरद भुथाडिया यांच्यावर चित्रित झाले. तेथून
खऱ्या अर्थाने माझ्या कारकीर्दीला सुरवात झाली, असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात
डॉ. शरद भुथाडिया म्हणाले, ‘निष्पर्ण...’मधील सर्वच एकांकिका आशयगर्भ आहेत. अनुप यांचे लेखन आणि
चित्रपट यांमधील संकल्पना खूप वेगळ्या असतात. एकूणच मानवाच्या भावभावना, त्याचं
जगणं, अस्तित्व याविषयी त्याच्या जाणीवा खूप सजग आणि समृद्ध आहेत. मनोरंजनापलिकडे
मानवी वर्तन आणि जगणे याविषयी त्यांचे लेखन नेमके भाष्य करते. म्हणून ते लोकांना
भावते.
यावेळी डॉ. शिवाजी
जाधव यांचेही शुभेच्छापर मनोगत झाले. मान्यवरांच्या हस्ते ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’च्या दुसऱ्या आवृत्तीचे
प्रकाशन करण्यात आले. डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अनुप जत्राटकर
यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ.
रणधीर शिंदे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. शरद बनसोडे, डॉ.
रामचंद्र पोवार, मयूर कुलकर्णी, प्रसाद जमदग्नी, दीपक बीडकर, संग्राम भालकर
यांच्यासह कला, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
‘निष्पर्ण…’च्या अभिवाचनाने
वातावरण धीरगंभीर
कार्यक्रमाच्या
दुसऱ्या सत्रात ‘अभिरुची’ या संस्थेच्या वतीने ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ या एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. जितेंद्र
देशपांडे यांनी तिचे दिग्दर्शन केले. देशपांडे यांनी सिद्धार्थ, अश्विनी टेंबे
यांनी यशोधरा आणि चंद्रशेखर फडणीस यांनी छंद या व्यक्तीरेखांचे वाचन केले. राजपुत्र
सिद्धार्थ राजवैभव त्यागून दुःखनिवारणाचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडला, त्या
रात्री पत्नी यशोधरेसोबतचा त्याचा संवाद, अशा संकल्पनेवर आधारित या एकांकिकेच्या
अभिवाचनाने सभागृहामध्ये मोठे धीरगंभीर वातावरण निर्माण केले. त्याला अवकाळी
पावसाच्या ढगांच्या गडगडाटाचे नैसर्गिक पार्श्वसंगीत आणि नेपथ्य लाभल्याने या
गांभिर्यात भरच पडली.





