बुधवार, ३० जुलै, २०२५

'समाज आणि माध्यमं’ कोणासाठी? - डॉ. राजेंद्र पारिजात



ज्याला काय बोलायचं नाही, ते कळतं किंवा ज्याला काय लिहायचं नाही, ते कळतं, तो खरा वक्ता किंवा लेखक असतो, असे म्हणतात.

आलोक हा अशा वर्गवारीतला एक सूज्ञ,चाणाक्ष, दक्ष संपर्क अधिकारी आहे़.

पण मुळातील लेखनाची उर्मी या क्षेत्रातल्या कोणालाही स्वस्थ बसू देत नाही आणि ही अस्वस्थताच सृजनाचे खरे कारण आहे. या जाणिवेतून आलेलं आलोकचं 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक अनेक प्रकाराने मुद्रित माध्यमांच्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि डिजिटल व्यवसायात झेप घेणाऱ्या नव्या दोन्ही पिढ्यांसाठी एक आवश्यक संदर्भ म्हणून पुढे येत आहे़.

आजचा समाज डिजिटल दैनंदिनीत जगतोय – सोशल मीडिया, ट्रोलिंग, गेमिंग, पॉर्न, ऑनलाइन शिक्षण या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. अशा परिस्थितीत ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक म्हणजे माध्यम-साक्षरतेचा दीपस्तंभ आहे.

डॉ. आलोक जत्राटकर हे माध्यम क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आणि अनुभवसंपन्न कार्यकर्ते असून, त्यांनी या पुस्तकात माध्यमांचा वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम समजावून सांगितला आहे.

हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर विचार करायला लावणारं, सावध करणारं आणि दिशा दाखवणारं आहे.

📘 हे पुस्तक कोणासाठी?

1. विद्यार्थी (विशेषतः किशोरवयीन व तरुण वर्ग)

सोशल मीडियाचा भुरळ पाडणारा प्रभाव समजून घेण्यासाठी

पॉर्नोग्राफी, गेमिंग व्यसन आणि ट्रोलिंगपासून स्वतःला जपण्यासाठी

डिजिटल साक्षरतेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी

2. शिक्षक व प्राध्यापक

माध्यमांचा शैक्षणिक वापर आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी

"स्मार्ट एज्युकेशन" आणि कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा यावर सखोल विचार करण्यासाठी

नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करता यावे म्हणून

3. पालक

मुलांच्या ऑनलाईन जगातील प्रवासाचे वास्तव ओळखण्यासाठी

किशोरवयीन मुलांमधील भावनिक बदल, सोशल मीडियाचा प्रभाव आणि मानसिक आरोग्य यावर सजग राहण्यासाठी

4. माध्यमकर्मी व पत्रकार

माध्यमांच्या वापरातील जबाबदारी, प्रभाव आणि सामाजिक भान यावर विचार करण्यासाठी

माध्यम साक्षरतेच्या अंगाने सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी

5. शासकीय धोरणकर्ते व सामाजिक कार्यकर्ते

डिजिटल युगात कायदेकानू, माध्यम धोरणं आणि जनजागृती मोहीम कशी असावी, याचा विचार करण्यासाठी

माध्यमांमुळे समाजात होणाऱ्या दुभंगांची चिकित्सा करण्यासाठी

6. राजकारणी व जनमत घडवणारे नेते

माध्यमांचा लोकमतावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी

प्रचार-प्रसार करताना वैचारिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी

हे पुस्तक फक्त माहितीपर नाही, तर मार्गदर्शक, सावध करणारा आणि अंतर्मुख करणारा आरसा आहे.

‘समाज आणि माध्यमं’ हे वाचणं म्हणजे आपल्या आभासी वास्तवाचं आत्मपरीक्षण करणं – एक जबाबदार नागरिक, पालक, शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणून.

- डॉ राजेंद्र पारिजात



An Essential Handbook for media literacy and media awareness: Dr. B. M. Hirdekar

(ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक वाचून आपला चिकित्सक अभिप्राय स्वतंत्र पत्राद्वारे कळविला आहे. तो येथे देत आहे. या प्रोत्साहनपर शब्दांसाठी हिर्डेकर सरांचा मी मनापासून ऋणी आहे.)





डॉ. आलोक जत्राटकर यांनी लिहिलेलं 'समाज आणि माध्यमं' हे एक अगदीच वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे हे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो.
भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देण्याची आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.
माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या, वयाने तरुण पण बौद्धिक प्रौढत्व असलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे.
मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया एडिक्ट होत चाललेल्या समाजाला विशेषतः तरुणांना हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला सांगायला हवे. दुभंगलेली माणसं, दुभंगलेली कुटुंबं, दुभंगलेला समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. डॉ. जत्राटकर यांनी एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यमांचा वापर, वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सोबती म्हणून दिलेले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक सेल्फ अवेअरनेस, सोशल अवेअरनेस आणि प्रॉब्लेम अवेअरनेस यासाठीचे आहे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. तरुण, ज्येष्ठ, समाज घडणीत जबाबदार म्हणून काम करणारे या सर्वांनी हा लेख आवर्जून वाचायला हवा. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते.
लेखक माध्यमाच्या विश्वात संचार करून, माध्यमांसंबंधित जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यापीठात आपल्या कामाची वेगळी शैली जपली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांचा शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्व घटकांशी जवळून संबंध आहे. या पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन फॉर ऑल, वाटा ऑनलाईन शिक्षणाच्या, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य करण्यात आले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. शिक्षण प्रक्रिया आणि नव्या युगातील नवे शिक्षण याविषयी शिक्षक लिहितातच; पण, माध्यमांत काम करणाऱ्या व्यक्तीने शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे लिहावे, हे कौतुकास्पद आहे.
बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक लिहिताना लेखक माध्यमकर्मी म्हणून कुठेही 'तटस्थ' असलेले पुस्तकात दिसत नाहीत. माझा या सर्व प्रश्नांची संबंध आहे, I am very much concerned and hence I have to write, अशी भूमिका- वैचारिक भूमिका घेऊन या पुस्तकाची निर्मिती झालेली दिसते. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. Content of the book, cause of the book, concern of the author, along with clarity of the message या सर्व गोष्टी सदर पुस्तकाला वेगळे परिमाण देतात. May be an Essential Handbook for media literacy and media awareness, असे या पुस्तकाबाबत मला म्हणावेसे वाटते.
Dr. Alok sir congratulations for this book- not for pleasure and fun- but to learn serious things, seriously!
- डॉ. बी. एम. हिर्डेकर

सोमवार, २८ जुलै, २०२५

आलोक: २ पुस्तकं; २ प्रस्तावना!

'न्यूज स्टोरी टुडे'वर आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचा परिचय (दि. २८ जुलै २०२५)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या 'न्यूजस्टोरी टुडे'च्या ऑनलाईन मंचावर माझ्या 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' व 'समाज आणि माध्यमं' या दोन्ही पुस्तकांची अगदी मनमुक्त दखल घेतली आहे. अगदी आवर्जून नोंद घेऊन प्रोत्साहनाचा हात पाठीवर ठेवल्याबद्दल भुजबळ साहेबांचा मी कृतज्ञ आहे. सरांच्या प्रस्तावनापर प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट येथे खाली सोबत दिला आहे. त्यासोबत अनुक्रमे डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. राजन गवस यांनी लिहीलेल्या या दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनांचा संपादित अंशही त्यांनी सोबत दिला आहे. आपणही ते पुढील लिंकवर जरूर वाचू शकता-

https://newsstorytoday.com/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5/





रविवार, २७ जुलै, २०२५

‘समाज आणि माध्यमं’ ः माध्यमभान वाढवणारं पुस्तक

(शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक तथा माझे मित्र डॉ. शिवाजी जाधव यांनी माझ्या 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयी फेसबुकवर लिहीलेली नोंद...)



सन्मित्र डॉ. आलोक जत्राटकर यांचे ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचले. दुसऱ्यांदा या अर्थाने की, यातील बहुतेक लेख यापूर्वी विविध दैनिके आणि नियतकालिके आणि दिवाळी अंकातून वाचनात आले होते आणि त्यावर वेळोवेळी चर्चाही झाली होती. पुस्तकात वेगळे काय म्हणून परत नव्याने वाचायला हाती घेतलं. वर्तमानपत्रं/नियतकालिकांतील लेखांपेक्षा पुस्तकातील लेखांनी वाचनाचा जास्त आनंद दिला, हे आतून जाणवलं. आपण पुस्तक वाचतोय, हा फिलच भारी असतो. त्यातही ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक निर्मितीच्या अंगाने तगडं झालं असल्यानं ते वाचलं गेलं आणि सोबतच लेखांचे पुस्तक करत असताना करावयाचे अनुषंगिक बदल लेखकाने काळजीपूर्वक केले असल्याने त्याचे वाचनमूल्य आणखी वाढले आहे. अत्यंत देखण्या, अनुरुप आणि औचित्याला धरुन असलेल्या आशयगर्भ मुखपृष्ठापासून पुस्तकाच्या आकर्षणाला सुरुवात होते. चांगल्या, सुटसुटीत पण उठावदार आणि आशयाची सुलभ अभिव्यक्ती करणार्या मुख्यपृष्ठासाठी गौरीश सोनार यांचं खास अभिनंदन! लेखकाचा विचार, चिंतन आणि आशय चांगला असून भागत नाही, तो वाचकांपर्यंत घेऊन जाणारा प्लॅटफॉर्मही तितकाच तगडा लागतो. अक्षर दालनने त्यात जराही कमतरता ठेवली नाही. कागद, फॉन्ट, लेआऊड, मलपृष्ठ अशा सर्वच पातळ्यांवर प्रकाशकाने मन लावून काम केल्याने पुस्तकाची निर्मिती सर्वांगसुंदर झाली आहे.
ख्यातनाम समीक्षक आणि कणा असलेले शिक्षक डॉ. राजन गवस यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे ही मोठी बाब. ‘मला डॉ. जत्राटकर गंभीर, व्यासंगी आणि तटस्थ अभ्यासक वाटतात,’ या शब्दांत प्रा. गवस सरांकडून शाबासकी मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. डॉ. आलोक यांनी गेली 25 वर्षे पत्रकारिता, प्रशासन आणि जनसंपर्क आदी महत्त्वाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची ही पावती म्हणावी लागेल. पत्रकार, लेखक, संवादक, प्रशासक, शिक्षक, वक्ता अशा अनेक भूमिकांत वावरत असताना डॉ. जत्राटकर यांच्यातील संवेदनशील माणूस कधीच बाजूला पडत नाही, हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक लिहिण्याची त्यांची प्रेरणा विचारात घेतली तर आपल्याला या संवेदना नीट कळतील. ‘मी स्वतः माध्यमांचा आणि समाजमाध्यमांचा समर्थक आहे. या माध्यमांचे समर्थन करत असताना माध्यमांचा वापर शुद्ध, चांगल्या अभिव्यक्तीसाठी तसेच वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी केला जावा. सर्वसामान्य वापरकर्त्यांनी जागरुकपणे माध्यमांचा वापर करावा आणि त्यांना त्या अनुषंगाने अवगत करीत राहण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, या भावनेतून हे सारे लेखन केले आहे,’ ही डॉ. जत्राटकर यांनी मनोगतात व्यक्त केलेली भावना त्यांची माध्यमांप्रती असलेली आस्था आणि माध्यमांच्या वापरकर्त्यांबद्दलचे उत्तरदायित्त्व स्पष्ट करते.
पत्रकारितेत प्रदीर्घ काळ काम केल्याने डॉ. आलोक यांच्या लिखाणात टोकदारपणा, संदर्भ आणि उपयुक्ततामूल्य पानोपानी जाणवते. त्यांना संशोधनाचा अनुभव असल्याने वर्तमानपत्रीय लेखांतही त्यांची संशोधनवृत्ती दिसते. अनेक लेखांमध्ये आकडेवारी, संदर्भ आणि विश्लेषणाचा सुयोग्य मेळ साधला आहे. साधारणतः गेल्या दहा वर्षातील माध्यमे आणि विशेषतः डिजिटल माध्यमांच्या विश्वात घडलेल्या ठळक घटना-घडामोडींचा हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा अविष्कार आहे. यात माध्यमांची केवळ माहिती नाही; तर लेखकाच्या बहुआयामी अनुभवाचा आणि त्यातून तयार झालेल्या चिंतनाचाही बराचसा भाग येतो. माध्यमांच्या अंतरंगापासून ते परिणामपर्यंतच्या अनेक गंभीर मुद्यांचा पुस्तकात उहापोह आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, डिजीटायझेशन, निवडणुका, राजकारण, कोरोना, लैंगिक शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जागतिकीकरण अशा अनेक विषयांना डॉ. जत्राटकर भिडले आहेत.
डॉ. जत्राटकर चित्रपटाचे अभ्यासक आहेत. कॅमेरा आणि चित्रपट या दोन्हीचे त्यांना विद्यार्थीदशेपासूनचे वेड. त्यांच्या लिखाणातही ते सातत्याने डोकावत राहते. ‘बचाओ नहीं, बेच डालो’ या लेखात ‘एक गाडी, बाकी अनाडी’ या चित्रपटाचा आणि मग लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा काही नावांचा संदर्भ येणे हा डॉ. जत्राटकर यांच्या चित्रपटवेडाचा परिणाम आहे. ‘बचाओ नहीं, बेच डालो’ असे मथळे देणे ही कला त्यांना पत्रकारितेने शिकवली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा वापर करुन सर्वसामान्य माणसांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी मथळ्यांची रचना केली आहे. हा भाषिक मोकळेपणाही पुन्हा त्यांना पत्रकारितेनेच शिकवला आहे. हे पुस्तक लेखकापेक्षा पत्रकाराचे जास्त आहे. पुस्तकांच्या अनेक पानांवर पत्रकारितेच्या खुणा दिसतात. ‘पोर्नबंदी’ आणि ‘पोर्नग्रस्त पौगंड’ हे दोन्ही लेख वाचत असताना डॉ. जत्राटकर यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयावर तितक्याच जबाबदारीने आणि विचारांच्या स्पष्टतेसह केलेले लिखाण त्यांच्यातील शिक्षकाची साक्ष देतो. इतर लेखांपेक्षा या दोन्ही लेखांच्या भाषेचा पोत निराळा आहे. हलक्याफुलक्या शब्दांत पण अणकुचीदार लेखन करुन त्यांनी अतिशय जोरकसपणे लैंगिक शिक्षणावर भर दिला आहे. प्रा. गवस सरांनी उल्लेख केलेल्या ‘लालित्यबळा’ची प्रचिती या दोन्ही लेखांत डॉ. जत्राटकर यांच्या लिखाणात येते.
डॉ. जत्राटकर यांच्या विद्यापीठाच्या जनसपंर्क कक्षाची मोठी जबाबदारी आहे. त्यासोबतच ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशीसुद्धा वेळ देतात. या सर्व धबडग्यातून वेगळा वेळ काढून ते नियमित लिहितात, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पत्रकारितेत असूनही स्वतंत्रपणे लिखाण करणारे कमी आहे. डॉ. जत्राटकर त्यापैकी एक. सतत वाचत-लिहित राहणं आणि नेहमी लिहित्या हातांना बळ देत, त्यांचा चांगुलपणा अधोरेखित करत पुढं जाणं हा त्यांचा स्वभावगुण. माध्यमविषयक वाचन-चिंतनातून त्यांचं ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक आकाराला आलं. त्यांच्याकडून यापुढील काळातही माध्यमविश्वाला असेच भरीव योगदान मिळावे. त्यांचे लिखाण पत्रकार, विद्यार्थी, संशोधक आणि माध्यमांच्या अभ्यासकांना निश्चित उपुयक्त ठरणार आहे. डॉ. जत्राटकर यांना भरपूर सदिच्छा!

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' : संविधानमूल्यांचा जागर करणारा लेखसंग्रह

(शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर यांनी 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या माझ्या पुस्तकाचा करून दिलेला परिचय...)



डॉ. आलोक जत्राटकर यांचा 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' हा ललित लेखसंग्रह भाग्यश्री प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला आहे. डॉ. आलोक हे पत्रकार, लेखक, संवादक आणि वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. शिवाजी विद्यापीठाचे पहिले 'जनसंपर्क अधिकारी' म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पत्रकारिता आणि नोकरी करत करत त्यांनी ललित लेखनात सातत्य ठेवलेले आहे. वेळोवेळचे अनुभव आणि प्रसंगपरत्वे केलेले चिंतन त्यांनी मुक्तपणे या लेखसंग्रहात मांडलेले आहे.
एकूण ३० लेखांचा हा संग्रह ग्रंथरूपात सिद्ध झालेला आहे. 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' हे एका लेखाचे शीर्षक ग्रंथाला देऊन लेखकाने आपल्या लेखनाचा सूचक हेतू साध्य केला आहे. रंगांवरून समाजातील वाढत जाणारी विषमता, राजकारण, पुरुषप्रधान मानसिकता, व्यक्ती आणि समुहाचे विसंगत सामाजिक वर्तन ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखक करत आहे. शीर्षकांची रचनाही मिश्रभाषी आहे. यातील १६ लेखशीर्षके मराठीत, १० शीर्षके हिंदीत; तर ४ इंग्रजीत आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांना हा ग्रंथ अर्पण करून डॉ. आलोक यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
पहिले दोन लेख म्हणजे डॉ. आलोक जत्राटकर यांचे आत्मकथन आहे. स्वतःची घडण कशाप्रकारे झाली याचे क्रमशः चित्रण आणि आईने केलेले मूलभूत संस्कार अत्यंत संक्षिप्तपणे डॉ. आलोक यांनी लेखांद्वारे लिहिले आहेत.
स्वतःला आलेले अनुभव विविध विषयांच्याद्वारे व्यामिश्रतेने लेखक मांडत आहे. शीर्षक लेखासह 'डि कास्ट व्हावं कसं?', 'सर फॅमिली हय क्या?', 'नाव... तिचं, माझं, तुमचं!', 'श्यामच्या आईचा अस्वीकार आणि आपण', 'शब्दप्रीती!', 'माकडाचं घर', 'सवलतींच्या देशा' हे लेख नवा विचार देऊन जातात. 'फॅमिली' या संकल्पनेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करताना लेखक लिहितो, 'भारतीय समाजात स्त्रीशिवाय कोणतेही कुटुंब पूर्ण होत नाही, किंबहुना त्याला कुटुंब- फॅमिली म्हणताच येणार नाही, हा मोठा संदेश हॉटेल-रेस्टॉरंट्सनी त्यांच्या कृतींमधून दिला आहे.'
'प. फो. आ. अन् बुडबुडा' हा लेख संवादात्मक आहे. वेगवेगळ्या चॅनेल्सवरील कार्यक्रमांचे अंतर्वास्तव लेखकाने चपखलपणे रेखाटलेले आहे. ब्रिटिश नंदी हे लेखक दैनिक 'सकाळ' मध्ये 'ढिंग- टांग' हे सदर लिहितात. या सदराची आठवण या निमित्ताने होते. लेखकाचे वडील प्राध्यापक होते. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. त्यांच्यासह सात भारतीयांनी नामांतर सत्याग्रहातील दिलेले योगदान दीर्घ लेखाद्वारे लेखकाने विवेचित केले आहे. हा लेख म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणता येईल.
'वाचन व्यासंग' हा डॉ. आलोक जत्राटकर यांचा स्थायीभाव आहे. त्यांच्या समग्र लेखनात त्यांच्या वाचन व्यासंगाचे प्रतिबिंब पडताना दिसते. समाजातील विसंगतीचे अचूक निरीक्षण ते करतात. स्वतःचे विचार आणि चिंतन प्रवाही आणि ओघवत्या भाषेत विविध रूपबंधातून लिहिणे, हे डॉ. जत्राटकर यांच्या लेखनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यासाठी ते समर्पक उदाहरणे आणि दृष्टांतांचा वापर करतात. त्यामुळेच प्रस्तुत संग्रहातील सर्वच लेख वाचनीय झाले आहेत. ते केवळ मनोरंजनपर नाहीत. ते अधिकतर प्रबोधनात्मक आहेत. वाचकाला मूलभूत संदेश देणे, हे डॉ. आलोक यांच्या लेखनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
प्रा. रणधीर शिंदे यांची साक्षेपी प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे. प्रा. शिंदे यांनी 'डॉ. आलोक जत्राटकर यांच्या लेखनामागे संविधानाची चौकट आहे' अशा शब्दांत काढलेले साररूप अत्यंत समर्पक आहे. भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि लेखनाचा डॉ. जत्राटकर यांच्या लेखनावर प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच संविधानातील मूल्यांचा जागर करणारा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे अशा संभ्रमित वर्तमानात डॉ. जत्राटकरांची लेखणी नवी उमेद देते, हे मात्र निश्चित !
✍️
(डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर (लेखक, गायक आणि शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी) ९४२०३५३४५२)

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

समाज आणि माध्यमं.. आलोक जत्राटकर सरांचं नवं पुस्तक..

(माझा अत्यंत लाडका आणि टेक्नोसॅव्ही विद्यार्थीमित्र दिनेश कुडचे याने 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयीची पहिली प्रतिक्रिया फेसबुकवर शेअर केली आहे. ती इथे माझ्या वाचकांसाठी साभार...)



माणूस समाजशील प्राणी आहे. जगण्यासाठीच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी त्याला संवादाची आवश्यकता आहे आणि त्या नंतरही संपर्कासाठी, तसेच मनोरंजनासाठीही..! याकरता आवाज, खाणाखुणा, चित्रं ही माध्यमं. गेल्या हजारो वर्षात या माध्यमांत प्रगती होत गेली. या बदलांचा वेग छपाईच्या शोधानंतर वाढला. पुस्तके, वृत्तपत्रे, तारा यंत्र, रेडिओ, टेलिफोन, टेलिव्हिजन, संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन..... आणि मग २ जी, ३ जी, ४ जी, ५ जी अशी संपर्क क्रांती..! यातून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ऑर्कुट, फेसबुक पासून ट्विटर, लिंक्डइन, इंस्टाग्राम, इत्यादी अनेक माध्यमे उदयाला आली, रुजली, फोफावली.
या अतिवेगवान माध्यमांचा, त्यांच्या अतिरेकाचा समाजावर, विशेषतः १५ ते ४० वयोगटातील तरुणाईवर विपरित परिणाम दिसू लागला आहे आणि म्हणून संपूर्ण समाजाला सावध करण्याच्या कळकळीतून एक लेखमाला डॉ. आलोककुमार नीलकुमार जत्राटकर यांच्या लेखणीतून साकारली. तिचे 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तकरुप. लेखक रसायनशास्त्र, संगणक आणि पत्रकारिता अशा वेगवेगळ्या विद्याशाखांतील पदवीधर. अनुभव आणि सखोल अभ्यास त्यांच्या लिखाणात ठायी ठायी जाणवतो. माध्यमांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम त्यांच्या चिंतनाचे विषय.
नवतंत्रज्ञानयुक्त, सशक्त अभिव्यक्तीची क्षमता असणाऱ्या मल्टीमिडियात लोकांचे भरकटणे आणि संकुचित स्वार्थासाठी पद्धतशीरपणे त्यांचा गैरवापर केला जाणे; त्यांनी अचूक हेरले आहे.
माध्यमप्रेरित सामाजिक - सांस्कृतिक साम्राज्यवाद, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, भेदांचे नव्याने बळकटीकरण, संविधानिक आणि मानवी मूल्यांची पायमल्ली, इत्यादी गोष्टी खरोखरच चिंताजनक आहेत. या सर्वांकडे सोदाहरण, आकडेवारी देत त्यांनी लक्ष वेधले आहे. त्या बरोबरच वैयक्तिक, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आणि ग्लोबल कम्युनिटीसाठी माध्यमांचा सकारात्मक वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
प्रत्येक लेखाचे समर्पक शीर्षक वाचकांना आकर्षित करेल.
१९८० मधील भारताच्या ८० कोटी लोकसंख्येत फक्त २५ लाख लोकांकडे फोन होते आणि केवळ १२००० सार्वजनिक फोन होते. ९७ टक्के गावांनी फोन पाहिलाच नव्हता. तिथून आजच्या १४५ कोटी लोकसंख्येतील ८७% टेलिडेन्सिटी, जगात दुसऱ्या क्रमांकाचे वायरलेस नेटवर्क इथपर्यंतची टेली-कॉम्प्युटर क्रांती पहिल्या लेखात आहे.
गटेनबर्गच्या छपाई यंत्रापासून आजच्या टिकटॉक, स्नॅप चॅट, वॉट्सॲप पर्यंतचं विश्वव्यापी माध्यमांतराचा आढावा दुसऱ्या लेखात घेतला आहे. भारताचे आजचे सरासरी वय २९ वर्षे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा सोशल मीडियात वापर, अभिव्यक्ती, प्रतिसाद, सोशल नेटवर्किंग साइटवर, ब्लॉग्स, मिडिया शेअरिंग, व्हॉईस ओव्हर आय पी, डॉक्युमेंट शेअरिंग, इत्यादी प्रकारचा असतो. या सर्वांचा विधायक उपयोग, तसेच विघातक पेरणी उदाहरणे देऊन समजावले आहे.
पुढील लेखांमध्ये फेसबुक, गुगल, त्यांची वाढ, तंत्रज्ञान प्रगती, मर्जर-ॲक्विझिशन्स, स्पर्धक उभा राहू न देण्याची प्रवृत्ती, इत्यादी आकडेवारीसह थोडक्यात सांगितले आहे.
पारंपरिक शिक्षणाला पूरक, त्याचवेळी छेद देणारे वाय फाय, स्मार्ट, ऑनलाईन शिक्षण, व्हर्चुअल क्लासरुम, डिजिटायझेशन, संशोधन क्रांती अशा बदलांचे विवेचन पुढे येते.
ऑनलाईन रिटेल क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आलेले परकीय भांडवल, त्यामुळे कोलमडणारे भारतीय व्यवसाय, बचतीची सवय मोडणारे आक्रमक मार्केटिंग या माहितीकडे फार डोळसपणे बघायला हवे.
नोआम चॉम्स्की यांनी माध्यमांचे वर्तन नियंत्रित करणारी पंचसूत्री सांगितली आहे. माध्यमांची मालकी आणि नफेबाजी, जाहिरातींचा महसूल, अधिकृत स्रोतांशी हितसंबंध, व्यवस्थेतील उच्चपदस्थांशी संघर्ष आणि कृत्रिम भयनिर्मिती! या आधारे हल्लीची नवमाध्यमे, अर्धसत्य व असत्य मिसळून केला जाणारा प्रचार, ट्रोलिंग,... या सगळ्यांनी अपरिपक्व नवमतदारांना भ्रमित करणारे सोशल मिडियातील संकुचित राजकारण, मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन देशासाठी कसे खतरनाक आहे याचे प्रत्ययकारी विश्लेषण.
बदलते मनोरंजन क्षेत्र, ओटीटी, वेबसिरीज, त्यातील आक्रमक भाषा, अश्लीलता, हिंसा आणि त्यातच तरुण पिढीला अडकवून ठेवणे हे फारच भीषण वर्तमान पुढील लेखात मांडले आहे. पोर्नग्रस्त पिढी विशेषतः पौगंड, पोर्नबंदीचे वास्तव त्याच अनुषंगाने येते. तितकाच काळजी करायला लावणारा गेमिंग हा प्रकार. साध्या मनोरंजक टाईमपास पासून आताच्या ॲंग्री बर्ड, पबजी, पोकेमॉन, ब्ल्यू व्हेल, इत्यादी व्यसन लावणाऱ्या खेळांविषयीचा दीर्घ चिंतनात्मक लेख प्रभावी आहे.
याच संदर्भात हल्ली वाढू लागलेला लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार, त्याची कारणे, काही उदाहरणे, कायदे, गुंतागुंत, इ., लाईफस्टाईल, स्वकेंद्रित मानसिकता, करिअर निमित्ताने महानगरांकडे वाढलेला ओढा, हा पण मोठा विषय मर्यादितपणे हाताळला आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या संबंधित कायदे, काही उदाहरणे, वापरकर्त्यांची जबाबदारी, यावरील लेख सुद्धा वाचकांना सावध करणारा.
समारोपाचा लेख जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे आणि कुटुंबव्यवस्था हा प्रत्येकानेच सदोदित सतर्क का राहावे लागणार आहे ते प्रभावीपणे मनावर बिंबवतो. मूठभर जागतिक कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी भारताला केवळ बाजारपेठ म्हणून वापरत आहेत. मोबाईल मार्फत बालपण हिरावले जात आहे. तरुणाईचा सारासार विवेक नष्ट केला जातो आहे. त्यांना जंकफूड, ड्रग्ज, अल्कोहोल, इत्यादी घातक गोष्टीत अडकवले जाते आहे. या सर्वांतून सामाजिक - आर्थिक दरी वाढत आहे. थेट संवाद संपत चालला आहे. आणि या सर्व नकारात्मक घडामोडी थोपवण्याचे सामर्थ्य आपल्या कुटुंबव्यवस्थेत आहे हा मोठा दिलासा. ती जपायलाच पाहिजे हा आग्रह.
या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य डॉ. राजन गवस यांची विचारगर्भ, विस्तृत प्रस्तावना आणि भावनिक अर्पणपत्रिका!
या समाजभान बाळगणाऱ्या व्यासंगी लेखकाचे, योग्य संदर्भ व तपशील देत केलेले पूर्वग्रहरहित, अभ्यासू तरीही सहजसुलभ भाषेतील हे लिखाण सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात पोहोचायलाच हवे. फारच गरजेचे आहे!
*समाज आणि माध्यमं*
लेखक : श्री. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
प्रकाशक : अक्षर दालन, कोल्हापूर.
प्रस्तावना : डॉ. राजन गवस
प्रथम आवृत्ती : १७ जून २०२५
पृष्ठ संख्या : १८४
मूल्य : ३०० रु.
दिनेश कुडचे, सांगली

रविवार, ६ जुलै, २०२५

हार्दिक कृतज्ञता आणि दिलगिरीही...



मित्र-मैत्रिणींनो, काल, शनिवारी (दि. ५ जुलै) माझ्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ (भाग्यश्री प्रकाशन) या मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रहाचे आणि ‘समाज आणि माध्यमं’ (अक्षर दालन) या माध्यमविषयक पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. रघुनाथ कडाकणे यांचे दोन्ही पुस्तकांवर सविस्तर प्रसंगोचित भाष्य झाले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनीही ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावर उपस्थितांना प्रबोधित केले. त्याविषयी सविस्तर पोस्ट स्वतंत्रपणे दिलेली आहेच. पण ही पोस्ट करण्याचे कारण म्हणजे या कार्यक्रमास लाभलेला प्रचंड प्रतिसाद.
खरे तर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करायचा म्हणजे लेखक-प्रकाशकांची छाती दडपते, ती अशासाठी की, कार्यक्रम तर करू, पण लोक येतील काय? स्वाभाविकपणे हाच प्रश्न माझ्यासह भाग्यश्री कासोटे-पाटील आणि अमेय जोशी यांच्यासमोरही होता. तशातच या दिवशी हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिलेला. म्हणजे आमच्या हृदयात ही सुद्धा भीतीची घंटा वाजली होतीच. त्यामुळे ऑन दि व्हेरी सेफर साईड आम्ही राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉल कार्यक्रमासाठी बुक केला. मिनी म्हटला तरी १२५ ते १५० क्षमता आहेच याची. हा निम्मा भरला तरी कार्यक्रम यशस्वी, असा आमचा ‘धोरणी’ हेतू होता. मात्र, कार्यक्रमाला शिक्षण, साहित्यासह विविध क्षेत्रांतील जाणकार नागरिक, मान्यवरांची इतकी मांदियाळी जमली की, कार्यक्रम सुरू होता होता हॉल पुरेपूर भरला. आणि सुरू झाल्यानंतरही पुन्हा पन्नासेक खुर्च्या वाढवून लोकांना बसण्याची सोय करावी लागली. हे आमच्यासमोरचे दृश्य होते. पण, बंधू अनुप, डॉ. विनोद यांच्यासह आमचा बराचसा मित्र परिवार अभ्यागतांना सभागृहात जागा देऊन बाहेर थांबला होता. त्यांनी सांगितले की, जवळजवळ दोनशेभर लोक सभास्थानी आले, मात्र, त्यांना केवळ जागेअभावी परत जावे लागले. हा प्रसंग फारच विरळा होता. अनुप यांच्या ‘दि प्रॉमिस’ या लघुपटाचा प्रिमिअर शो येथील मोठ्या हॉलमध्ये आम्ही केला होता, तेव्हा पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतकी दर्शकांची गर्दी होती. त्या अनुभवाची पुनरावृत्ती करणारा हा प्रसंग ठरला. आज आपण सर्वांनी जे प्रेम दर्शवलं, त्यानं एकीकडं हृदय भरून आलं, मनी कृतज्ञता दाटून आली, तर दुसरीकडं अनेक श्रोत्यांना जागेअभावी परत जावं लागलं, याचा विषादही वाटला. त्यामुळं एकाच वेळी जाहीर कृतज्ञता व्यक्त करत असतानाच दिलगिरी सुद्धा व्यक्त करणे मला उचित वाटते. आपण मोठ्या मनाने तिचा स्वीकार कराल, याची खात्री वाटते.

शनिवार, ५ जुलै, २०२५

माध्यमकर्मींनी माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा: डॉ. अशोक चौसाळकर

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

डॉ. आलोक जत्राटकर लिखित ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे व समाज आणि माध्यमं या दोन पुस्तकांचे प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) भाग्यश्री कासोटे-पाटील, डॉ. रघुनाथ कडाकणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जत्राटकर आणि अमेय जोशी. 


कोल्हापूर, दि. ५ जुलै: माध्यम हे दुधारी असते, माध्यमकर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, ब्लॉगर, संवादक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे हा भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारा मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रह आणि समाज आणि माध्यमं हे अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे माध्यमविषयक पुस्तक यांचा संयुक्त प्रकाशन सोहळा येथील राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. रघुनाथ कडाकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, संदेश प्रसार आणि अभिव्यक्तीसाठी प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही माध्यमे होती; केवळ त्यांचे स्वरुप वेगळे होते. माध्यमे असल्यामुळेच भगवान बुद्ध, महंमद पैगंबर, शंकराचार्य यांचे संदेश सर्वदूर पसरले. पानिपतच्या लढाईतील पराभवाची बातमी महाराष्ट्रात पोहोचण्याला दोन महिने लागले. व्यापाऱ्यांच्या संदेशाच्या माध्यमातून ती येथपर्यंत आली. हे स्वरुप बदलत आता आधुनिक स्वरुपाला येऊन ठेपले आहे. स्वच्छ अभिव्यक्ती ही आजची गरज आहे. आद्य मराठी संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यासाठी आग्रही प्रतिपादन केले होते. भारतीय संविधानही त्याच अभिव्यक्तीची अपेक्षा नागरिकांकडून आणि माध्यमकर्मीकडून बाळगते. मात्र, आज समाजमाध्यमांच्या आगमनामुळे विद्वेषी, विखारी, भेदाभेदाला बळ देणाऱ्या खालच्या दर्जाच्या अभिव्यक्तींचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच; पण, देशहितालाही मारक आहे. त्यामुळे माध्यम आणि अभिव्यक्ती साक्षरता ही काळाची गरज आहे. त्यामध्येही माध्यमांना मोलाची भूमिका बजावण्याची संधी आहे.

डॉ. जत्राटकर यांची दोन्ही पुस्तके चांगली झाली असून येथून पुढील काळात त्यांच्याकडून अधिक चांगल्या निर्मितीची अपेक्षा त्यांचा शिक्षक म्हणून मी बाळगून आहे, असेही चौसाळकर म्हणाले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. आलोक जत्राटकर हे भोवतालाकडे संवेदनशीलतेने आणि वैज्ञानिक चिकित्सक नजरेतून पाहणारे व्यक्तीमत्त्व आहे. आपले दिवंगत शास्त्रज्ञ मित्र डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला चालविण्याच्या त्यांच्या निरपेक्षभावातून या संवेदनशीलतेची प्रचिती येते. हीच संवेदनशीलता त्यांच्या लेखनातूनही पाझरताना दिसते.

यावेळी जत्राटकर यांच्या दोन्ही पुस्तकांवर राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ब्लॅक, व्हाईट अन् ग्रेसमाज आणि माध्यमं या दोन्ही पुस्तकांतून डॉ. जत्राटकर यांची दोन वेगवेगळी रुपे सामोरी येतात. पहिल्या पुस्तकामध्ये समाजातील, भोवतालातील छोट्या छोट्या घटना, प्रसंगांमध्ये मानवी मूल्यांचा आग्रह धरणारा समाजचिंतक दिसतो. भारतीय समाजात सौहार्द, समतेचा सहभाव निर्माण व्हावा, यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानिक मूल्यांच्या अंगिकाराचा आग्रह करणारा सहृदयी माणूस दिसतो. तर, समाज आणि माध्यमं या पुस्तकाद्वारे माध्यमांचे एक सजग आणि जाणकार अभ्यासक म्हणून ते सामोरे येतात. भारतात झालेल्या टेलिकॉम्प्युटर क्रांतीनंतर गेल्या दोन-तीन दशकांत प्रसारमाध्यमांच्या जगतात झालेल्या घडामोडी, नवमाध्यमांच्या नवप्रवाहांनी त्यामध्ये केलेला हस्तक्षेप यांसह गेमिंग, ट्रोलिंग, ई-कॉमर्स, ऑनलाईन शिक्षण इत्यादींनी आपल्या समाजजीवनावर टाकलेला प्रभाव यांसह अनेक बाबींचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि तपशीलवारपणे त्यांनी घेतलेला आढळतो.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, समाज आणि माध्यमं या पुस्तकातून डॉ. जत्राटकर यांनी नवमाध्यमांतील त्रुटींची अतिशय परखडपणे जाणीव करून दिलेली आहे. समाजाविषयीची चिंता, तळमळ त्यामध्ये आढळते. ते नकारात्मक नाहीत, पण सकारात्मक वापरासाठी, अभिव्यक्तीसाठी आग्रही आहेत. समाजाने त्यांची दखल घेऊन या माध्यमांचा सजग वापर करणे आवश्यक आहे. ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या पुस्तकातील प्रत्येक लेखामधून जगण्याचे, जीवनाचे एक मूल्य त्यांनी सांगितले आहे. एक संवेदनशील लेखक, माणूस म्हणून ते वाचकांच्या हृदयाला हात घालतात.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांना प्रस्तावना लिहीणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि डॉ. रणधीर शिंदे यांचा प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रकाशित पुस्तके प्रथम भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. जत्राटकर यांचे गुरू डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ संपादक दिलीप लोंढे, संजय पाटोळे आणि डॉ. विजय चोरमारे यांचा कृतज्ञता सत्कार कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री कासोटे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर अमेय जोशी यांनी आभार मानले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. एन.डी. जत्राटकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. विनोद कांबळे, डॉ. जगन कराडे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. जी.पी. माळी, डॉ. इस्माईल पठाण, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. श्रीराम पवार, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. अरुण शिंदे, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले, अॅड. अभिषेक मिठारी, नामदेवराव कांबळे, जी.बी. अंबपकर, अशोक चोकाककर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. केदार मारुलकर, डॉ. विनोद ठाकूर देसाई, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. प्रविण कोडोलीकर, मंजीत माने, मंदार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'बुके'ऐवजी 'बुक'

महत्त्वाची बाब म्हणजे निमंत्रण पत्रिकेत केलेल्या आवाहनानुसार एकाही व्यक्तीने पुष्पगुच्छ आणला नाही, तर त्याऐवजी पुस्तके खरेदी केली. या निमित्ताने एक नवा प्रघात डॉ. जत्राटकर यांनी सुरू केला.


समतोल, स्थिरता आणि परिपक्वता असणारे आलोक जत्राटकर यांचे ग्रंथ

(बंधूवर्य डॉ. विनोद कांबळे यांनी शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कर्टन रेझर लेख लिहीला आहे. तो येथे शेअर करीत आहे. या लेखातीलच संपादित अंश दि. १३ जुलै रोजी 'दै. लोकमत'मध्ये 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकाच्या परिचयात्मक स्वरुपात प्रकाशित झाला आहे. त्याचेही कात्रण येथे देत आहे.) 

(छाया. डॉ. विनोद कांबळे)


(व्हिडिओ संकल्पना व चित्रीकरण- डॉ. विनोद कांबळे)






डॉ. आलोक जत्राटकर यांचे हार्दिक अभिनंदन!

सन्मित्र बंधू डॉ. आलोक जत्राटकर यांचा 'ब्लॅक व्हाईट अन ग्रे ' हा मुक्तचिंतनपर लेखसंग्रह, 'समाज आणि माध्यमं' या दोन ग्रंथांचे प्रकाशन आज शाहू स्मारक भवन,दसरा चौक,कोल्हापूर या ठिकाणी सायंकाळी ६. ००वा. होत आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
डॉ.आलोक जत्राटकर यांची ओळख पत्रकार,लेखक,संवादक वक्ते आणि ब्लॉग लेखक म्हणून आहे. गेली जवळपास २५ वर्षे ते पत्रकारिता,प्रशासन आणि जनसंपर्क क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठाचे 'जनसंपर्क अधिकारी' म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे 'आलोकशाही'हे युट्युब चॅनेल देखील आहे.या अगोदर त्यांचा ' निखळ: जागर संवेदनांचा' हा ललित लेखसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाच्या दोन आवृत्ती संपलेल्या असून त्याला विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
'ब्लॅक व्हाईट अन ग्रे ' हा ग्रंथ म्हणजे, दै. नवशक्ती मध्ये 'नितळ' या सदरामध्ये लिहिलेले प्रस्तुतचे लेख आहेत. या ग्रंथाचे मुखपृष्ठ गौरीश सोनार यांनी अत्यंत सुबक असे केलेले आहे. भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. स्मृतीशेष ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके सर यांना पुस्तक अर्पण केलेले आहे.मराठीतील आघाडीचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे सर यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचताना डॉ. जत्राटकर यांचे आणि त्यांचे ऋणानुबंध लक्षात तर येतातच पण ललित लेखसंग्रहाबद्दलची शिंदे सरांची प्रस्तावना वाचताना या संग्रहाकडे कसे पहावे ही एक दृष्टी देखील तयार होते.म्हणजे, "डॉ. जत्राटकर यांच्या लेखनाचा विशेष म्हणजे,या सर्व लेखनामागे संविधानाची चौकट आहे.तो त्यांचा दर्शनबिंदू आहे. न्याय, स्वातंत्र्य,समता,बंधुभावाची मागणी करणारे हे लेखन आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीची छाया त्यांच्या लेखनावर आहे. माणूसपण अबाधित राहावे,अशी दृष्टी त्यामागे आहे ".( प्रस्तावनेमधून)
१२६ पानांच्या या ग्रंथामध्ये तीस लेख आहेत. प्रत्येक लेखाचे शीर्षक इतके अप्रतिम दिलेले आहे की, त्यामुळे प्रत्येक लेख वाचण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है, एक चेहरे पे कई चेहरे, कुछ तो लोग कहेंगे, अजीब दास्ता है ये, शहर मे शायद दंगा होनेवाला है! अशा शीर्षकांमधून गाणी आणि शायरी यांचा वापर केल्यामुळे तितकीच नितळता या लेखांमध्ये आहे.
सीमाप्रदेशातील मराठी भाषा जपणाऱ्या निपाणी या गावाबद्दलची त्यांची ओढ, गावातील लोकांची आत्मीयता, गाव सोडताना मनाची झालेली भावावस्था याबरोबरच हा लेख वाचल्यावर बऱ्यापैकी निपाणी या गावचा परिचय होतो. आई माझा गुरु या लेखामध्ये आईंनी लहानपणापासून दिलेली शिकवण, वक्तृत्व स्पर्धेत आणि एकूणच जगण्यामध्ये मिळालेली प्रेरणा याबद्दल आई बद्दलची आत्मीयता या लेखात आलेली आहे. विवेकानंदाच्या सानिध्यात, शिवरायांचे शिल्प, ब्लॅक व्हाईट अन ग्रे, अजीर्ण :खाण आणि जगण्याचं, तू तू तुम आणि आप, डि-कास्ट व्हावं कसं, दुःखनिवृती, नामांतर सत्याग्रहातील सात भारतीय, पणती तेवत आहे, सेल्फ अप्रायझल या सर्व लेखांमधून एक स्वतंत्र भूमिका डॉ. जत्राटकर यांची दिसून येते.
आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला उत्स्फूर्तपणे बदलवण्याची प्रतिक्रिया या संग्रहातील लेखांमध्ये असल्याचे जाणवते. त्यामुळे सगळीकडे काळाकुट्ट अंधार(ब्लॅक) दाटून आलेला असताना, माणुसकीचा उजेड ( व्हाईट ) देत 'ग्रे'म्हणजे समतोल, स्थिरता आणि परिपक्वता असणारा हा ग्रंथ आहे.
डॉ. जत्राटकर यांचा ' समाज आणि माध्यमं ' हा दुसरा ग्रंथ अक्षरदालन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केला असून याला ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या ग्रंथामध्ये एकूण २५ लेख आहेत. माध्यमं आणि समाज याविषयीचे विचार या ग्रंथातून प्रस्तुत झाले आहेत. विविध आशय सूत्रांची मांडणी असलेल्या सोशल मीडियावरील फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर माध्यमांनी नातेसंबंधांमध्ये अनेक प्रश्न कसे निर्माण केलेले आहेत. याचा परिणाम नात्यांवरती कसा झालेला आहे. आज घडत असलेल्या गुन्ह्यामध्ये सोशल माध्यमांचा वापर कसा होत आहे.या माध्यमांचा चांगला वापर होण्याऐवजी गैरवापर कसा केला जातोय याचे नेमके चित्रण इथे येते. कोरोना काळानंतर सुरू झालेले ऑनलाइन एज्युकेशन याचे बेगडी वातावरण आपल्या जीवनावर काय परिणाम करते त्यातून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचा वेध यामध्ये घेतलेला आहे. डिजिटल क्रांतीने जग कसे बदलते आहे याची मांडणी त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनी आपल्या जीवनात काय काय बदल घडवले आहेत याचा शोध प्रस्तुतच्या ग्रंथामध्ये घेण्यात आलेला आहे.
एकूणच वरील दोन्ही ग्रंथांमधून डॉ. जत्राटकर यांची वैचारिक आणि सामाजिक भूमिका, विचारांची संवेदनशीलता, आंबेडकरी विचारांचा अविष्कार, एक माध्यमकर्मी म्हणून असलेली त्यांची जाण यांचे मनोवेधक चित्रण या ग्रंथामधून दिसून येते. आपल्याला व्यक्त होण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असताना सोशल माध्यम हे आजच्या माणसांना खूप जवळच वाटू लागलं आहे. पण याचा वापर करताना कोणती जबाबदारी आणि काळजी घ्यावी याचा विचारदेखील या ग्रंथातून दिसून येतो. त्यामुळे हे दोन्ही ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवेत.
आज या ग्रंथ प्रकाशन समारंभाला येत असताना आपण हार, बुके याऐवजी ग्रंथ खरेदी करावीत असे पत्रिकेत नमूद केले आहे. साहित्यिक,सांस्कृतिक,सामाजिक भान असणारी माणसे निश्चितच या गोष्टीचे स्वागत करतील आणि ग्रंथ खरेदी करतील.
-डॉ. विनोद कांबळे, कोल्हापूर

रविवार, ४ मे, २०२५

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष चौथे):

संविधान, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच दृष्टी घेणेही आवश्यक: राजवैभव शोभा रामचंद्र

 

संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र

(राजवैभव शोभा रामचंद्र यांचे संपूर्ण व्याख्यान येथे ऐका)


कोल्हापूर, दि. ४ मे: भारतीय नागरिकांनी संविधान आणि विज्ञानाची सृष्टी घेतली, मात्र अद्याप दृष्टी घेणे बाकी आहे, असे प्रतिपादन संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी आज केले. आलोकशाही युट्यूब वाहिनीवर आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये चौथ्या वर्षीचे पुष्प गुंफताना ते भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलत होते.

राजवैभव शोभा रामचंद्र यांनी भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या दोहोंच्या अनुषंगाने अत्यंत चिकित्सक मांडणी केली. ते म्हणाले, भारतीय संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक चेहरा, स्वतःची ओळख दिली. ते आपल्या जगण्याचा एक भाग आहेच, पण ती प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता प्रदान करणारी एक मूल्यव्यवस्था आहे. तर कार्यकारणभाव हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. प्रत्येक घटनेमागे काही तरी कारण आहे आणि त्या कारणांचा शोध घेणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. विज्ञान नावाची गोष्ट ही खूप विनम्र असते. सर्वच शोध लागलेले नाहीत, पण कधी तरी लागतील, हा विश्वास ती प्रदान देते. त्याचप्रमाणे भारतीय संविधानही खूप विनम्र आहे. विज्ञानवादी असूनही ते या देशातल्या नागरिकांच्या विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांना मान्यता देते. त्यावर घाला घालणाऱ्यांनाही ते पाठीशी घालत नाही. ही फार मोठी खुबी या संविधानामध्ये आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्पष्टपणे उल्लेख असणारे भारतीय संविधान हे जगातील एकमेव असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, भारतीय संविधानाने विज्ञानवादाला आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. ५१ व्या कलमामध्ये आम्ही विज्ञानवादाचा प्रचार, प्रसार करू. वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व गोष्टींकडे चिकित्सकपणे पाहू, याची ग्वाही ते देते. स्वातंत्र्य, समता या मूल्यांना विज्ञानाचा आधार आहे. विज्ञान विषमतेला, भेदांना मान्यता देत नाही. जाती, धर्म, भाषा, प्रांत या आधारे श्रेष्ठत्वाचा दावा करणाऱ्यांचे दावे फोल आहेत, कारण त्यांना वैज्ञानिक आधार नाही.

राजवैभव पुढे म्हणाले, संविधान सभेत आस्तिक, नास्तिक आणि वास्तविक असे सर्व प्रकारचे लोक असूनही संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरवात ही आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होणे, हाच या संविधान सभेचा मोठा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. संविधान या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य देत नाही, तर ते त्यांचे स्वातंत्र्य मान्य करते. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच स्वातंत्र्ये संविधान मान्य करते. ही स्वातंत्र्ये उल्लेखत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन हे कर्तव्यामध्ये दिले आहे. स्वातंत्र्य आपण घेऊ शकतो, मात्र कर्तव्य हे निभावलेच पाहिजे, असा दृष्टीकोन त्यामागे आहे. या देशात संविधानाने प्रत्येक नागरिकाला जिविताचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मरण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. याचे कारण म्हणजे भारतीय नागरिक हे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर राष्ट्राची संपत्ती आहेत, हा दृष्टीकोन त्यामागे आहे.

विज्ञान आणि संविधानाची या दोन्ही बाबींची आपण सृष्टी घेतली मात्र दृष्टी घेतली नाही, ही फार मोठी समस्या असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, सुखाच्या गावाचा रस्ता शोधणारा मार्ग हे संविधान आणि विज्ञान या दोहोंचेही अंतिम ध्येय आहे. एकाच वेळेला सर्वांचे भले व्हावे, असे मानणारी ही बाब असून सगळ्यांना सर्व मिळावे आणि तेही सगळ्यांना समान पद्धतीने मिळावे, अशी भूमिका त्यामागे आहे. त्याची मूल्येही स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हीच आहेत. भेदभावाच्या मूल्यांना आपण कवटाळून राहणे घातक ठरणारे आहे. वैज्ञानिक शोधांचा देशाच्या भल्यासाठी, जगाच्या भल्यासाठी वापर करण्याची भावना संविधानातील विज्ञानवाद देतो. दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींकडे आपण विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहात असू, तर आपण योग्य मार्गावर असतो. संविधानाचा विचार घेऊन पुढे जायचे असेल तर संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोनच आवश्यक आहे. या देशात जे चांगले घडते, ते संविधानाच्या अंगिकारामुळे, जे वाईट घडते ते संविधान नाकारल्याने ही जाणीव सर्वदूर निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

यावेळी आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले.

 

 

शुक्रवार, २ मे, २०२५

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा

संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र

 

(दिवंगत) डॉ. भालचंद्र काकडे

राजवैभव शोभा रामचंद्र


कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालाऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये संविधान संवादक म्हणून देशभरात प्रसिद्ध असणारे राजवैभव शोभा रामचंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ४ मे २०२ रोजी सायंकाळी ७.० वाजता आलोकशाही (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होईल. व्याख्यानमालेचे योजक डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी ही माहिती दिली.

दि. ४ मे २०२५ रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा चतुर्थ स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर राजवैभव यांचे व्याख्यान होईल. राजवैभव यांनी भारतीय संविधानाबाबत समाजात सर्वदूर जागृती निर्माण करण्यासाठी काम चालविले आहे. संविधान संवाद समितीचे ते सचिवही आहेत.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या तीन वर्षांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे, ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे, कोविड-१९वरील लस संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चमूमध्ये योगदान देणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, पाच विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी यांची अतिशय लक्षवेधक व्याख्याने झालेली आहेत. ती आजही मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात. सदर व्याख्यानमाला आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना युट्यूबवर @alokshahi या वाहिनीवर जाऊन सहभागी होता येईल.