मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

संवेदनशील माध्यमकर्मीचे जाणिवासमृद्ध लेखन

('दै. सकाळ'च्या साप्ताहिक 'सप्तरंग' या रविवार विशेष पुरवणीमध्ये 'समाज आणि माध्यमं' व 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकांविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी लिहीलेला परिचयपर लेख...)



शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि लेखक, वक्ते डॉ. आलोक जत्राटकर यांची ‘समाज आणि माध्यमं’ आणि ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. एका संवेदनशील आणि जबाबदार माध्यमकर्मीने केलेले अत्यंत जाणिवासमृद्ध आणि समाजभान विस्तारणारे असे हे लेखन आहे. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’चा शोध व वेध, त्यांचे समस्यासूचन आणि निराकरण यामध्ये त्यांना स्वारस्य आहे. या जाणिवांतूनच ही दोन्ही पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. या पुस्तकांना अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत, यावरून या दोन्ही पुस्तकांचा दर्जा लक्षात यावा.

डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा मुक्तचिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. विविध विषयांवरील लेख असले तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा त्यांत आहेत. लेखांमधील व्यक्तिगत संदर्भ व्यापक सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

संग्रहातील पहिल्याच लेखात ते निपाणी या शहराबद्दल, त्याने दिलेल्या संस्काराबद्दल ते आत्मीयतेने लिहितात. ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. ‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच जपावे, असे त्यांना वाटते. डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. यातील लेखांना सजग चिंतनाची बैठक आहे.

डॉ. जत्राटकर यांनी लिहिलेले 'समाज आणि माध्यमं' हे आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देणारे आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.

माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे. मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया अॅडिक्ट होत चाललेल्या समाजाने विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला हवे. दुभंगलेली माणसे, कुटुंबे, समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यम वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते. पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य केले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, महिला, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचायलाच हवे.

१.      ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे- १२६

किंमत- रु. २५०/-

 

२.      समाज आणि माध्यमं

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

अक्षर दालन, कोल्हापूर

पृष्ठे- १८४

किंमत- रु. ३००/-


 

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

ब्लॅक व्हाईट अन ग्रे’: सामाजिक समावेशनाबाबत जबाबदार भाष्य करणारा लेखसंग्रह

( ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ पुस्तकाविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रतिक्रिया...)



डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा चिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांच्या नावातच ‘लोक’ हा शब्द आहे आणि त्यांच्या सहवासातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण ‘लोक’ आहेत. शिवाय, ते संवेदनशील आणि जबाबदार पत्रकार असल्यामुळे त्यांच्या डोक्यात ‘लोक’ म्हणजे ‘people and their problems’ नेहमीच असतात. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’च्या शोधात, त्यांच्या समस्यांमध्ये आलोकना स्वारस्य आहे. 

डॉ. आलोक यांच्या या संग्रहात, पहिल्याच लेखात ते निपाणी या आपल्या शहराबद्दल मनापासून लिहिताहेत. सजग जाणीवांचं हे गाव आलोक यांच्या जाणिवा जागृत करणारं गाव आहे. अनेक प्रकारच्या लढ्यांचे केंद्र असलेले गाव, तेथील लढवय्ये लोक, त्यांना भेटलेले आणि त्यांना प्रभावित करणारे शिक्षक, त्यांच्या आठवणी या सर्व गोष्टी आत्मीयतेने या लेखात त्यांनी मांडल्या आहेत. 

सांगलीच्या राजवाड्यातील शाळेतील शिक्षिका आणि पुढे कागलच्या राजाच्या शाळेत दाखल झालेल्या आलोक यांच्या आई, त्यांचे इंग्रजीचे अध्यापन, इंग्रजी साहित्याचा अभ्यास आणि विस्तृत वाचन या सर्वांमुळे ‘मी कसा घडलो’ याचे कृतज्ञतापूर्वक वर्णन ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात आहेत. लेखन, वाचन, वक्तृत्व या सर्वच गोष्टींचे धडे आईने त्यांना कसे दिले, याची संपूर्ण हृद्य माहिती ते या लेखात मांडतात. दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. 

डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. लेखसंग्रह अनेक विषयांवरील लेखांचा असला तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा या लेखांना आहेत. या सर्व लेखांना व्यक्तिगत संदर्भ असला तरी तो सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. लेखसंग्रहातील अनेक लेखांना चिंतनाची बैठक आहे. पत्रकारितेतून कधीकधी डोकावणारा उतावीळपणा, प्रचारकी स्वरूप आलोक यांनी या लेखसंग्रहात येऊ दिलेले नाही.

‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. त्यांना या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच असावे, असे वाटते. Coloured life and Colourful life यावरचे रंगभाष्य या लेखात आहे. या लेखसंग्रहात अनेक व्यक्ती आलेल्या आहेत. नात्यांमधील भावबंध आहेत; पण, एकूणच लेखसंग्रह सामाजिक समावेशकता, विवेक, विचार, संवेदनशीलता या गोष्टी ठळकपणे अधोरेखित करणारा आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरलेले डॉ. आलोक आणि आता विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी असलेले डॉ. आलोक या भूमिकांमुळे हा लेखसंग्रह जबाबदार माणसाने, अत्यंत जबाबदारीने, महत्त्वाच्या विषयांवर गांभीर्याने भाष्य करणारा असा लिहिलेला आहे.


बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कार

ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट

अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

 

ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते 'कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक' म्हणून पुरस्कार स्वीकारताना 'गाभ' चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर. शेजारी प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर.



प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते 'कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार स्वीकारताना 'गाभ' चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे. शेजारी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल.



(पुरस्कार प्रदान सोहळ्याची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाभ या चित्रपटाने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले.

गाभ या चित्रपटाला कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार प्राप्त झाले. वरळी (मुंबई) येथे काल (दि. ५) रात्री झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

गाभ चित्रपटाला ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट चित्रपटांसह अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट दिग्दर्शक या गटातही नामांकन मिळाले होते. त्याचप्रमाणे प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या गटात अनुप जत्राटकर यांना आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री या गटात अभिनेत्री सायली बांदकर हिलाही नामांकन मिळाले होते. तथापि, चित्रपटाला कै. दादा कोंडके यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटासाठीचा आणि कै. अनंत माने यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकासाठीचा, असे दोन महत्त्वाचे विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

कोल्हापुरी योगायोग

सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहे, ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कै. अनंत माने कोल्हापूरचे, मंचावर पुरस्कार वितरण करण्यासाठी उपस्थित प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही कोल्हापूरचे आणि गाभ या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे हेही कोल्हापूरचे! असा त्रिवेणी संगम या पुरस्काराच्या निमित्ताने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जमून आला.

बुधवार, ३० जुलै, २०२५

'समाज आणि माध्यमं’ कोणासाठी? - डॉ. राजेंद्र पारिजात



ज्याला काय बोलायचं नाही, ते कळतं किंवा ज्याला काय लिहायचं नाही, ते कळतं, तो खरा वक्ता किंवा लेखक असतो, असे म्हणतात.

आलोक हा अशा वर्गवारीतला एक सूज्ञ,चाणाक्ष, दक्ष संपर्क अधिकारी आहे़.

पण मुळातील लेखनाची उर्मी या क्षेत्रातल्या कोणालाही स्वस्थ बसू देत नाही आणि ही अस्वस्थताच सृजनाचे खरे कारण आहे. या जाणिवेतून आलेलं आलोकचं 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक अनेक प्रकाराने मुद्रित माध्यमांच्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि डिजिटल व्यवसायात झेप घेणाऱ्या नव्या दोन्ही पिढ्यांसाठी एक आवश्यक संदर्भ म्हणून पुढे येत आहे़.

आजचा समाज डिजिटल दैनंदिनीत जगतोय – सोशल मीडिया, ट्रोलिंग, गेमिंग, पॉर्न, ऑनलाइन शिक्षण या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. अशा परिस्थितीत ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक म्हणजे माध्यम-साक्षरतेचा दीपस्तंभ आहे.

डॉ. आलोक जत्राटकर हे माध्यम क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आणि अनुभवसंपन्न कार्यकर्ते असून, त्यांनी या पुस्तकात माध्यमांचा वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम समजावून सांगितला आहे.

हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर विचार करायला लावणारं, सावध करणारं आणि दिशा दाखवणारं आहे.

📘 हे पुस्तक कोणासाठी?

1. विद्यार्थी (विशेषतः किशोरवयीन व तरुण वर्ग)

सोशल मीडियाचा भुरळ पाडणारा प्रभाव समजून घेण्यासाठी

पॉर्नोग्राफी, गेमिंग व्यसन आणि ट्रोलिंगपासून स्वतःला जपण्यासाठी

डिजिटल साक्षरतेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी

2. शिक्षक व प्राध्यापक

माध्यमांचा शैक्षणिक वापर आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी

"स्मार्ट एज्युकेशन" आणि कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा यावर सखोल विचार करण्यासाठी

नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करता यावे म्हणून

3. पालक

मुलांच्या ऑनलाईन जगातील प्रवासाचे वास्तव ओळखण्यासाठी

किशोरवयीन मुलांमधील भावनिक बदल, सोशल मीडियाचा प्रभाव आणि मानसिक आरोग्य यावर सजग राहण्यासाठी

4. माध्यमकर्मी व पत्रकार

माध्यमांच्या वापरातील जबाबदारी, प्रभाव आणि सामाजिक भान यावर विचार करण्यासाठी

माध्यम साक्षरतेच्या अंगाने सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी

5. शासकीय धोरणकर्ते व सामाजिक कार्यकर्ते

डिजिटल युगात कायदेकानू, माध्यम धोरणं आणि जनजागृती मोहीम कशी असावी, याचा विचार करण्यासाठी

माध्यमांमुळे समाजात होणाऱ्या दुभंगांची चिकित्सा करण्यासाठी

6. राजकारणी व जनमत घडवणारे नेते

माध्यमांचा लोकमतावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी

प्रचार-प्रसार करताना वैचारिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी

हे पुस्तक फक्त माहितीपर नाही, तर मार्गदर्शक, सावध करणारा आणि अंतर्मुख करणारा आरसा आहे.

‘समाज आणि माध्यमं’ हे वाचणं म्हणजे आपल्या आभासी वास्तवाचं आत्मपरीक्षण करणं – एक जबाबदार नागरिक, पालक, शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणून.

- डॉ राजेंद्र पारिजात



An Essential Handbook for media literacy and media awareness: Dr. B. M. Hirdekar

(ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक वाचून आपला चिकित्सक अभिप्राय स्वतंत्र पत्राद्वारे कळविला आहे. तो येथे देत आहे. या प्रोत्साहनपर शब्दांसाठी हिर्डेकर सरांचा मी मनापासून ऋणी आहे.)





डॉ. आलोक जत्राटकर यांनी लिहिलेलं 'समाज आणि माध्यमं' हे एक अगदीच वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे हे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो.
भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देण्याची आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.
माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या, वयाने तरुण पण बौद्धिक प्रौढत्व असलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे.
मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया एडिक्ट होत चाललेल्या समाजाला विशेषतः तरुणांना हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला सांगायला हवे. दुभंगलेली माणसं, दुभंगलेली कुटुंबं, दुभंगलेला समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. डॉ. जत्राटकर यांनी एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यमांचा वापर, वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सोबती म्हणून दिलेले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक सेल्फ अवेअरनेस, सोशल अवेअरनेस आणि प्रॉब्लेम अवेअरनेस यासाठीचे आहे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. तरुण, ज्येष्ठ, समाज घडणीत जबाबदार म्हणून काम करणारे या सर्वांनी हा लेख आवर्जून वाचायला हवा. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते.
लेखक माध्यमाच्या विश्वात संचार करून, माध्यमांसंबंधित जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यापीठात आपल्या कामाची वेगळी शैली जपली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांचा शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्व घटकांशी जवळून संबंध आहे. या पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन फॉर ऑल, वाटा ऑनलाईन शिक्षणाच्या, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य करण्यात आले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. शिक्षण प्रक्रिया आणि नव्या युगातील नवे शिक्षण याविषयी शिक्षक लिहितातच; पण, माध्यमांत काम करणाऱ्या व्यक्तीने शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे लिहावे, हे कौतुकास्पद आहे.
बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे.
'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक लिहिताना लेखक माध्यमकर्मी म्हणून कुठेही 'तटस्थ' असलेले पुस्तकात दिसत नाहीत. माझा या सर्व प्रश्नांची संबंध आहे, I am very much concerned and hence I have to write, अशी भूमिका- वैचारिक भूमिका घेऊन या पुस्तकाची निर्मिती झालेली दिसते. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी या सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. Content of the book, cause of the book, concern of the author, along with clarity of the message या सर्व गोष्टी सदर पुस्तकाला वेगळे परिमाण देतात. May be an Essential Handbook for media literacy and media awareness, असे या पुस्तकाबाबत मला म्हणावेसे वाटते.
Dr. Alok sir congratulations for this book- not for pleasure and fun- but to learn serious things, seriously!
- डॉ. बी. एम. हिर्डेकर

सोमवार, २८ जुलै, २०२५

आलोक: २ पुस्तकं; २ प्रस्तावना!

'न्यूज स्टोरी टुडे'वर आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचा परिचय (दि. २८ जुलै २०२५)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या 'न्यूजस्टोरी टुडे'च्या ऑनलाईन मंचावर माझ्या 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' व 'समाज आणि माध्यमं' या दोन्ही पुस्तकांची अगदी मनमुक्त दखल घेतली आहे. अगदी आवर्जून नोंद घेऊन प्रोत्साहनाचा हात पाठीवर ठेवल्याबद्दल भुजबळ साहेबांचा मी कृतज्ञ आहे. सरांच्या प्रस्तावनापर प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट येथे खाली सोबत दिला आहे. त्यासोबत अनुक्रमे डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. राजन गवस यांनी लिहीलेल्या या दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनांचा संपादित अंशही त्यांनी सोबत दिला आहे. आपणही ते पुढील लिंकवर जरूर वाचू शकता-

https://newsstorytoday.com/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5/





रविवार, २७ जुलै, २०२५

‘समाज आणि माध्यमं’ ः माध्यमभान वाढवणारं पुस्तक

(शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक तथा माझे मित्र डॉ. शिवाजी जाधव यांनी माझ्या 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयी फेसबुकवर लिहीलेली नोंद...)



सन्मित्र डॉ. आलोक जत्राटकर यांचे ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचले. दुसऱ्यांदा या अर्थाने की, यातील बहुतेक लेख यापूर्वी विविध दैनिके आणि नियतकालिके आणि दिवाळी अंकातून वाचनात आले होते आणि त्यावर वेळोवेळी चर्चाही झाली होती. पुस्तकात वेगळे काय म्हणून परत नव्याने वाचायला हाती घेतलं. वर्तमानपत्रं/नियतकालिकांतील लेखांपेक्षा पुस्तकातील लेखांनी वाचनाचा जास्त आनंद दिला, हे आतून जाणवलं. आपण पुस्तक वाचतोय, हा फिलच भारी असतो. त्यातही ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक निर्मितीच्या अंगाने तगडं झालं असल्यानं ते वाचलं गेलं आणि सोबतच लेखांचे पुस्तक करत असताना करावयाचे अनुषंगिक बदल लेखकाने काळजीपूर्वक केले असल्याने त्याचे वाचनमूल्य आणखी वाढले आहे. अत्यंत देखण्या, अनुरुप आणि औचित्याला धरुन असलेल्या आशयगर्भ मुखपृष्ठापासून पुस्तकाच्या आकर्षणाला सुरुवात होते. चांगल्या, सुटसुटीत पण उठावदार आणि आशयाची सुलभ अभिव्यक्ती करणार्या मुख्यपृष्ठासाठी गौरीश सोनार यांचं खास अभिनंदन! लेखकाचा विचार, चिंतन आणि आशय चांगला असून भागत नाही, तो वाचकांपर्यंत घेऊन जाणारा प्लॅटफॉर्मही तितकाच तगडा लागतो. अक्षर दालनने त्यात जराही कमतरता ठेवली नाही. कागद, फॉन्ट, लेआऊड, मलपृष्ठ अशा सर्वच पातळ्यांवर प्रकाशकाने मन लावून काम केल्याने पुस्तकाची निर्मिती सर्वांगसुंदर झाली आहे.
ख्यातनाम समीक्षक आणि कणा असलेले शिक्षक डॉ. राजन गवस यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे ही मोठी बाब. ‘मला डॉ. जत्राटकर गंभीर, व्यासंगी आणि तटस्थ अभ्यासक वाटतात,’ या शब्दांत प्रा. गवस सरांकडून शाबासकी मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. डॉ. आलोक यांनी गेली 25 वर्षे पत्रकारिता, प्रशासन आणि जनसंपर्क आदी महत्त्वाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची ही पावती म्हणावी लागेल. पत्रकार, लेखक, संवादक, प्रशासक, शिक्षक, वक्ता अशा अनेक भूमिकांत वावरत असताना डॉ. जत्राटकर यांच्यातील संवेदनशील माणूस कधीच बाजूला पडत नाही, हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक लिहिण्याची त्यांची प्रेरणा विचारात घेतली तर आपल्याला या संवेदना नीट कळतील. ‘मी स्वतः माध्यमांचा आणि समाजमाध्यमांचा समर्थक आहे. या माध्यमांचे समर्थन करत असताना माध्यमांचा वापर शुद्ध, चांगल्या अभिव्यक्तीसाठी तसेच वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी केला जावा. सर्वसामान्य वापरकर्त्यांनी जागरुकपणे माध्यमांचा वापर करावा आणि त्यांना त्या अनुषंगाने अवगत करीत राहण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, या भावनेतून हे सारे लेखन केले आहे,’ ही डॉ. जत्राटकर यांनी मनोगतात व्यक्त केलेली भावना त्यांची माध्यमांप्रती असलेली आस्था आणि माध्यमांच्या वापरकर्त्यांबद्दलचे उत्तरदायित्त्व स्पष्ट करते.
पत्रकारितेत प्रदीर्घ काळ काम केल्याने डॉ. आलोक यांच्या लिखाणात टोकदारपणा, संदर्भ आणि उपयुक्ततामूल्य पानोपानी जाणवते. त्यांना संशोधनाचा अनुभव असल्याने वर्तमानपत्रीय लेखांतही त्यांची संशोधनवृत्ती दिसते. अनेक लेखांमध्ये आकडेवारी, संदर्भ आणि विश्लेषणाचा सुयोग्य मेळ साधला आहे. साधारणतः गेल्या दहा वर्षातील माध्यमे आणि विशेषतः डिजिटल माध्यमांच्या विश्वात घडलेल्या ठळक घटना-घडामोडींचा हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा अविष्कार आहे. यात माध्यमांची केवळ माहिती नाही; तर लेखकाच्या बहुआयामी अनुभवाचा आणि त्यातून तयार झालेल्या चिंतनाचाही बराचसा भाग येतो. माध्यमांच्या अंतरंगापासून ते परिणामपर्यंतच्या अनेक गंभीर मुद्यांचा पुस्तकात उहापोह आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, डिजीटायझेशन, निवडणुका, राजकारण, कोरोना, लैंगिक शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जागतिकीकरण अशा अनेक विषयांना डॉ. जत्राटकर भिडले आहेत.
डॉ. जत्राटकर चित्रपटाचे अभ्यासक आहेत. कॅमेरा आणि चित्रपट या दोन्हीचे त्यांना विद्यार्थीदशेपासूनचे वेड. त्यांच्या लिखाणातही ते सातत्याने डोकावत राहते. ‘बचाओ नहीं, बेच डालो’ या लेखात ‘एक गाडी, बाकी अनाडी’ या चित्रपटाचा आणि मग लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा काही नावांचा संदर्भ येणे हा डॉ. जत्राटकर यांच्या चित्रपटवेडाचा परिणाम आहे. ‘बचाओ नहीं, बेच डालो’ असे मथळे देणे ही कला त्यांना पत्रकारितेने शिकवली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा वापर करुन सर्वसामान्य माणसांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी मथळ्यांची रचना केली आहे. हा भाषिक मोकळेपणाही पुन्हा त्यांना पत्रकारितेनेच शिकवला आहे. हे पुस्तक लेखकापेक्षा पत्रकाराचे जास्त आहे. पुस्तकांच्या अनेक पानांवर पत्रकारितेच्या खुणा दिसतात. ‘पोर्नबंदी’ आणि ‘पोर्नग्रस्त पौगंड’ हे दोन्ही लेख वाचत असताना डॉ. जत्राटकर यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयावर तितक्याच जबाबदारीने आणि विचारांच्या स्पष्टतेसह केलेले लिखाण त्यांच्यातील शिक्षकाची साक्ष देतो. इतर लेखांपेक्षा या दोन्ही लेखांच्या भाषेचा पोत निराळा आहे. हलक्याफुलक्या शब्दांत पण अणकुचीदार लेखन करुन त्यांनी अतिशय जोरकसपणे लैंगिक शिक्षणावर भर दिला आहे. प्रा. गवस सरांनी उल्लेख केलेल्या ‘लालित्यबळा’ची प्रचिती या दोन्ही लेखांत डॉ. जत्राटकर यांच्या लिखाणात येते.
डॉ. जत्राटकर यांच्या विद्यापीठाच्या जनसपंर्क कक्षाची मोठी जबाबदारी आहे. त्यासोबतच ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशीसुद्धा वेळ देतात. या सर्व धबडग्यातून वेगळा वेळ काढून ते नियमित लिहितात, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पत्रकारितेत असूनही स्वतंत्रपणे लिखाण करणारे कमी आहे. डॉ. जत्राटकर त्यापैकी एक. सतत वाचत-लिहित राहणं आणि नेहमी लिहित्या हातांना बळ देत, त्यांचा चांगुलपणा अधोरेखित करत पुढं जाणं हा त्यांचा स्वभावगुण. माध्यमविषयक वाचन-चिंतनातून त्यांचं ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक आकाराला आलं. त्यांच्याकडून यापुढील काळातही माध्यमविश्वाला असेच भरीव योगदान मिळावे. त्यांचे लिखाण पत्रकार, विद्यार्थी, संशोधक आणि माध्यमांच्या अभ्यासकांना निश्चित उपुयक्त ठरणार आहे. डॉ. जत्राटकर यांना भरपूर सदिच्छा!

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' : संविधानमूल्यांचा जागर करणारा लेखसंग्रह

(शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर यांनी 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या माझ्या पुस्तकाचा करून दिलेला परिचय...)



डॉ. आलोक जत्राटकर यांचा 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' हा ललित लेखसंग्रह भाग्यश्री प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला आहे. डॉ. आलोक हे पत्रकार, लेखक, संवादक आणि वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. शिवाजी विद्यापीठाचे पहिले 'जनसंपर्क अधिकारी' म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पत्रकारिता आणि नोकरी करत करत त्यांनी ललित लेखनात सातत्य ठेवलेले आहे. वेळोवेळचे अनुभव आणि प्रसंगपरत्वे केलेले चिंतन त्यांनी मुक्तपणे या लेखसंग्रहात मांडलेले आहे.
एकूण ३० लेखांचा हा संग्रह ग्रंथरूपात सिद्ध झालेला आहे. 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' हे एका लेखाचे शीर्षक ग्रंथाला देऊन लेखकाने आपल्या लेखनाचा सूचक हेतू साध्य केला आहे. रंगांवरून समाजातील वाढत जाणारी विषमता, राजकारण, पुरुषप्रधान मानसिकता, व्यक्ती आणि समुहाचे विसंगत सामाजिक वर्तन ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखक करत आहे. शीर्षकांची रचनाही मिश्रभाषी आहे. यातील १६ लेखशीर्षके मराठीत, १० शीर्षके हिंदीत; तर ४ इंग्रजीत आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांना हा ग्रंथ अर्पण करून डॉ. आलोक यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
पहिले दोन लेख म्हणजे डॉ. आलोक जत्राटकर यांचे आत्मकथन आहे. स्वतःची घडण कशाप्रकारे झाली याचे क्रमशः चित्रण आणि आईने केलेले मूलभूत संस्कार अत्यंत संक्षिप्तपणे डॉ. आलोक यांनी लेखांद्वारे लिहिले आहेत.
स्वतःला आलेले अनुभव विविध विषयांच्याद्वारे व्यामिश्रतेने लेखक मांडत आहे. शीर्षक लेखासह 'डि कास्ट व्हावं कसं?', 'सर फॅमिली हय क्या?', 'नाव... तिचं, माझं, तुमचं!', 'श्यामच्या आईचा अस्वीकार आणि आपण', 'शब्दप्रीती!', 'माकडाचं घर', 'सवलतींच्या देशा' हे लेख नवा विचार देऊन जातात. 'फॅमिली' या संकल्पनेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करताना लेखक लिहितो, 'भारतीय समाजात स्त्रीशिवाय कोणतेही कुटुंब पूर्ण होत नाही, किंबहुना त्याला कुटुंब- फॅमिली म्हणताच येणार नाही, हा मोठा संदेश हॉटेल-रेस्टॉरंट्सनी त्यांच्या कृतींमधून दिला आहे.'
'प. फो. आ. अन् बुडबुडा' हा लेख संवादात्मक आहे. वेगवेगळ्या चॅनेल्सवरील कार्यक्रमांचे अंतर्वास्तव लेखकाने चपखलपणे रेखाटलेले आहे. ब्रिटिश नंदी हे लेखक दैनिक 'सकाळ' मध्ये 'ढिंग- टांग' हे सदर लिहितात. या सदराची आठवण या निमित्ताने होते. लेखकाचे वडील प्राध्यापक होते. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. त्यांच्यासह सात भारतीयांनी नामांतर सत्याग्रहातील दिलेले योगदान दीर्घ लेखाद्वारे लेखकाने विवेचित केले आहे. हा लेख म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणता येईल.
'वाचन व्यासंग' हा डॉ. आलोक जत्राटकर यांचा स्थायीभाव आहे. त्यांच्या समग्र लेखनात त्यांच्या वाचन व्यासंगाचे प्रतिबिंब पडताना दिसते. समाजातील विसंगतीचे अचूक निरीक्षण ते करतात. स्वतःचे विचार आणि चिंतन प्रवाही आणि ओघवत्या भाषेत विविध रूपबंधातून लिहिणे, हे डॉ. जत्राटकर यांच्या लेखनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यासाठी ते समर्पक उदाहरणे आणि दृष्टांतांचा वापर करतात. त्यामुळेच प्रस्तुत संग्रहातील सर्वच लेख वाचनीय झाले आहेत. ते केवळ मनोरंजनपर नाहीत. ते अधिकतर प्रबोधनात्मक आहेत. वाचकाला मूलभूत संदेश देणे, हे डॉ. आलोक यांच्या लेखनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
प्रा. रणधीर शिंदे यांची साक्षेपी प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे. प्रा. शिंदे यांनी 'डॉ. आलोक जत्राटकर यांच्या लेखनामागे संविधानाची चौकट आहे' अशा शब्दांत काढलेले साररूप अत्यंत समर्पक आहे. भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि लेखनाचा डॉ. जत्राटकर यांच्या लेखनावर प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच संविधानातील मूल्यांचा जागर करणारा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे अशा संभ्रमित वर्तमानात डॉ. जत्राटकरांची लेखणी नवी उमेद देते, हे मात्र निश्चित !
✍️
(डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर (लेखक, गायक आणि शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी) ९४२०३५३४५२)

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

समाज आणि माध्यमं.. आलोक जत्राटकर सरांचं नवं पुस्तक..

(माझा अत्यंत लाडका आणि टेक्नोसॅव्ही विद्यार्थीमित्र दिनेश कुडचे याने 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयीची पहिली प्रतिक्रिया फेसबुकवर शेअर केली आहे. ती इथे माझ्या वाचकांसाठी साभार...)



माणूस समाजशील प्राणी आहे. जगण्यासाठीच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी त्याला संवादाची आवश्यकता आहे आणि त्या नंतरही संपर्कासाठी, तसेच मनोरंजनासाठीही..! याकरता आवाज, खाणाखुणा, चित्रं ही माध्यमं. गेल्या हजारो वर्षात या माध्यमांत प्रगती होत गेली. या बदलांचा वेग छपाईच्या शोधानंतर वाढला. पुस्तके, वृत्तपत्रे, तारा यंत्र, रेडिओ, टेलिफोन, टेलिव्हिजन, संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन..... आणि मग २ जी, ३ जी, ४ जी, ५ जी अशी संपर्क क्रांती..! यातून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ऑर्कुट, फेसबुक पासून ट्विटर, लिंक्डइन, इंस्टाग्राम, इत्यादी अनेक माध्यमे उदयाला आली, रुजली, फोफावली.
या अतिवेगवान माध्यमांचा, त्यांच्या अतिरेकाचा समाजावर, विशेषतः १५ ते ४० वयोगटातील तरुणाईवर विपरित परिणाम दिसू लागला आहे आणि म्हणून संपूर्ण समाजाला सावध करण्याच्या कळकळीतून एक लेखमाला डॉ. आलोककुमार नीलकुमार जत्राटकर यांच्या लेखणीतून साकारली. तिचे 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तकरुप. लेखक रसायनशास्त्र, संगणक आणि पत्रकारिता अशा वेगवेगळ्या विद्याशाखांतील पदवीधर. अनुभव आणि सखोल अभ्यास त्यांच्या लिखाणात ठायी ठायी जाणवतो. माध्यमांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम त्यांच्या चिंतनाचे विषय.
नवतंत्रज्ञानयुक्त, सशक्त अभिव्यक्तीची क्षमता असणाऱ्या मल्टीमिडियात लोकांचे भरकटणे आणि संकुचित स्वार्थासाठी पद्धतशीरपणे त्यांचा गैरवापर केला जाणे; त्यांनी अचूक हेरले आहे.
माध्यमप्रेरित सामाजिक - सांस्कृतिक साम्राज्यवाद, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, भेदांचे नव्याने बळकटीकरण, संविधानिक आणि मानवी मूल्यांची पायमल्ली, इत्यादी गोष्टी खरोखरच चिंताजनक आहेत. या सर्वांकडे सोदाहरण, आकडेवारी देत त्यांनी लक्ष वेधले आहे. त्या बरोबरच वैयक्तिक, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आणि ग्लोबल कम्युनिटीसाठी माध्यमांचा सकारात्मक वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
प्रत्येक लेखाचे समर्पक शीर्षक वाचकांना आकर्षित करेल.
१९८० मधील भारताच्या ८० कोटी लोकसंख्येत फक्त २५ लाख लोकांकडे फोन होते आणि केवळ १२००० सार्वजनिक फोन होते. ९७ टक्के गावांनी फोन पाहिलाच नव्हता. तिथून आजच्या १४५ कोटी लोकसंख्येतील ८७% टेलिडेन्सिटी, जगात दुसऱ्या क्रमांकाचे वायरलेस नेटवर्क इथपर्यंतची टेली-कॉम्प्युटर क्रांती पहिल्या लेखात आहे.
गटेनबर्गच्या छपाई यंत्रापासून आजच्या टिकटॉक, स्नॅप चॅट, वॉट्सॲप पर्यंतचं विश्वव्यापी माध्यमांतराचा आढावा दुसऱ्या लेखात घेतला आहे. भारताचे आजचे सरासरी वय २९ वर्षे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा सोशल मीडियात वापर, अभिव्यक्ती, प्रतिसाद, सोशल नेटवर्किंग साइटवर, ब्लॉग्स, मिडिया शेअरिंग, व्हॉईस ओव्हर आय पी, डॉक्युमेंट शेअरिंग, इत्यादी प्रकारचा असतो. या सर्वांचा विधायक उपयोग, तसेच विघातक पेरणी उदाहरणे देऊन समजावले आहे.
पुढील लेखांमध्ये फेसबुक, गुगल, त्यांची वाढ, तंत्रज्ञान प्रगती, मर्जर-ॲक्विझिशन्स, स्पर्धक उभा राहू न देण्याची प्रवृत्ती, इत्यादी आकडेवारीसह थोडक्यात सांगितले आहे.
पारंपरिक शिक्षणाला पूरक, त्याचवेळी छेद देणारे वाय फाय, स्मार्ट, ऑनलाईन शिक्षण, व्हर्चुअल क्लासरुम, डिजिटायझेशन, संशोधन क्रांती अशा बदलांचे विवेचन पुढे येते.
ऑनलाईन रिटेल क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आलेले परकीय भांडवल, त्यामुळे कोलमडणारे भारतीय व्यवसाय, बचतीची सवय मोडणारे आक्रमक मार्केटिंग या माहितीकडे फार डोळसपणे बघायला हवे.
नोआम चॉम्स्की यांनी माध्यमांचे वर्तन नियंत्रित करणारी पंचसूत्री सांगितली आहे. माध्यमांची मालकी आणि नफेबाजी, जाहिरातींचा महसूल, अधिकृत स्रोतांशी हितसंबंध, व्यवस्थेतील उच्चपदस्थांशी संघर्ष आणि कृत्रिम भयनिर्मिती! या आधारे हल्लीची नवमाध्यमे, अर्धसत्य व असत्य मिसळून केला जाणारा प्रचार, ट्रोलिंग,... या सगळ्यांनी अपरिपक्व नवमतदारांना भ्रमित करणारे सोशल मिडियातील संकुचित राजकारण, मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन देशासाठी कसे खतरनाक आहे याचे प्रत्ययकारी विश्लेषण.
बदलते मनोरंजन क्षेत्र, ओटीटी, वेबसिरीज, त्यातील आक्रमक भाषा, अश्लीलता, हिंसा आणि त्यातच तरुण पिढीला अडकवून ठेवणे हे फारच भीषण वर्तमान पुढील लेखात मांडले आहे. पोर्नग्रस्त पिढी विशेषतः पौगंड, पोर्नबंदीचे वास्तव त्याच अनुषंगाने येते. तितकाच काळजी करायला लावणारा गेमिंग हा प्रकार. साध्या मनोरंजक टाईमपास पासून आताच्या ॲंग्री बर्ड, पबजी, पोकेमॉन, ब्ल्यू व्हेल, इत्यादी व्यसन लावणाऱ्या खेळांविषयीचा दीर्घ चिंतनात्मक लेख प्रभावी आहे.
याच संदर्भात हल्ली वाढू लागलेला लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार, त्याची कारणे, काही उदाहरणे, कायदे, गुंतागुंत, इ., लाईफस्टाईल, स्वकेंद्रित मानसिकता, करिअर निमित्ताने महानगरांकडे वाढलेला ओढा, हा पण मोठा विषय मर्यादितपणे हाताळला आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या संबंधित कायदे, काही उदाहरणे, वापरकर्त्यांची जबाबदारी, यावरील लेख सुद्धा वाचकांना सावध करणारा.
समारोपाचा लेख जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे आणि कुटुंबव्यवस्था हा प्रत्येकानेच सदोदित सतर्क का राहावे लागणार आहे ते प्रभावीपणे मनावर बिंबवतो. मूठभर जागतिक कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी भारताला केवळ बाजारपेठ म्हणून वापरत आहेत. मोबाईल मार्फत बालपण हिरावले जात आहे. तरुणाईचा सारासार विवेक नष्ट केला जातो आहे. त्यांना जंकफूड, ड्रग्ज, अल्कोहोल, इत्यादी घातक गोष्टीत अडकवले जाते आहे. या सर्वांतून सामाजिक - आर्थिक दरी वाढत आहे. थेट संवाद संपत चालला आहे. आणि या सर्व नकारात्मक घडामोडी थोपवण्याचे सामर्थ्य आपल्या कुटुंबव्यवस्थेत आहे हा मोठा दिलासा. ती जपायलाच पाहिजे हा आग्रह.
या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य डॉ. राजन गवस यांची विचारगर्भ, विस्तृत प्रस्तावना आणि भावनिक अर्पणपत्रिका!
या समाजभान बाळगणाऱ्या व्यासंगी लेखकाचे, योग्य संदर्भ व तपशील देत केलेले पूर्वग्रहरहित, अभ्यासू तरीही सहजसुलभ भाषेतील हे लिखाण सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात पोहोचायलाच हवे. फारच गरजेचे आहे!
*समाज आणि माध्यमं*
लेखक : श्री. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
प्रकाशक : अक्षर दालन, कोल्हापूर.
प्रस्तावना : डॉ. राजन गवस
प्रथम आवृत्ती : १७ जून २०२५
पृष्ठ संख्या : १८४
मूल्य : ३०० रु.
दिनेश कुडचे, सांगली