बुधवार, २३ एप्रिल, २०२५

‘निष्पर्ण...’मधून अनुप जत्राटकर यांच्या सृजनशील प्रतिभेची प्रचिती: बाबासाहेब सौदागर

दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन; अभिवाचनासही श्रोत्यांचा प्रतिसाद


लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना बाबासाहेब सौदागर आणि डॉ. शरद भुथाडिया. सोबत डॉ. शिवाजी जाधव, अनुप जत्राटकर आणि डॉ. आलोक जत्राटकर

'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिकेचे अभिवाचन करताना (डावीकडून) 'अभिरुची'चे जितेंद्र देशपांडे, अश्विनी टेंबे आणि चंद्रशेखर फडणीस.



कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहातून लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या सृजनशील प्रतिभेची प्रचिती येते. भविष्यातही त्यांच्याकडून अशा उत्तमोत्तम साहित्यकृतींची अपेक्षा वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांनी आज येथे केले.

अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन येथील शाहू स्मारक भवनामध्ये झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सौदागर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक डॉ. शरद भुथाडिया होते. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी झालेल्या एकांकिकेच्या अभिवाचनासही श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

श्री. सौदागर म्हणाले, गाभ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनुप यांच्याशी परिचय करून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यातून स्नेह निर्माण झाला. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा मोठा आहे. तो वारसा पुढे चालविण्याची क्षमता लेखक-दिग्दर्शक म्हणून अनुप यांच्यामध्ये जाणवते. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम ते निश्चितपणे करतील, याची खात्री आहे. लेखक म्हणूनही त्यांनी निष्पर्ण...सारख्याच प्रयोगशील साहित्यकृतींची निर्मिती करीत राहणे फार आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या अनुषंगानेही सौदागर यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, जोपर्यंत आपण आईला आई म्हणतो, तोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व कायम राहील. मराठीच्या अस्तित्वाची चिंता करण्यापेक्षा तिचा वापर करीत राहणे, तिचा शिक्षणातून प्रसार करणे महत्त्वाचे आहे. हिंदी ही मराठीची मावशी आहे, तर इंग्रजी ही आण्टी आहे. त्यामुळे त्यांचा द्वेष करण्याऐवजी त्याही आत्मसात करायला हव्यात.

यावेळी सौदागर यांनी कोल्हापूरशी त्यांचे असणारे बंधही उलगडले. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर हे आपले गुरू होते. त्यांच्या सूचनेवरुन यशवंत भालकर यांनी त्यांच्या चित्रपटासाठी गीतलेखनाची पहिली संधी दिली आणि पहिले गीत हे डॉ. शरद भुथाडिया यांच्यावर चित्रित झाले. तेथून खऱ्या अर्थाने माझ्या कारकीर्दीला सुरवात झाली, असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शरद भुथाडिया म्हणाले, निष्पर्ण...मधील सर्वच एकांकिका आशयगर्भ आहेत. अनुप यांचे लेखन आणि चित्रपट यांमधील संकल्पना खूप वेगळ्या असतात. एकूणच मानवाच्या भावभावना, त्याचं जगणं, अस्तित्व याविषयी त्याच्या जाणीवा खूप सजग आणि समृद्ध आहेत. मनोरंजनापलिकडे मानवी वर्तन आणि जगणे याविषयी त्यांचे लेखन नेमके भाष्य करते. म्हणून ते लोकांना भावते.

यावेळी डॉ. शिवाजी जाधव यांचेही शुभेच्छापर मनोगत झाले. मान्यवरांच्या हस्ते निष्पर्ण पिंपळाच्या छायेतच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अनुप जत्राटकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास डॉ. रणधीर शिंदे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. शरद बनसोडे, डॉ. रामचंद्र पोवार, मयूर कुलकर्णी, प्रसाद जमदग्नी, दीपक बीडकर, संग्राम भालकर यांच्यासह कला, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्पर्ण…’च्या अभिवाचनाने वातावरण धीरगंभीर

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अभिरुची या संस्थेच्या वतीने निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. जितेंद्र देशपांडे यांनी तिचे दिग्दर्शन केले. देशपांडे यांनी सिद्धार्थ, अश्विनी टेंबे यांनी यशोधरा आणि चंद्रशेखर फडणीस यांनी छंद या व्यक्तीरेखांचे वाचन केले. राजपुत्र सिद्धार्थ राजवैभव त्यागून दुःखनिवारणाचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडला, त्या रात्री पत्नी यशोधरेसोबतचा त्याचा संवाद, अशा संकल्पनेवर आधारित या एकांकिकेच्या अभिवाचनाने सभागृहामध्ये मोठे धीरगंभीर वातावरण निर्माण केले. त्याला अवकाळी पावसाच्या ढगांच्या गडगडाटाचे नैसर्गिक पार्श्वसंगीत आणि नेपथ्य लाभल्याने या गांभिर्यात भरच पडली.

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

एका राजाची डायरी…



करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा फ्लोरेन्स (इटली) येथील अर्धपुतळा (छाया. सौजन्य- प्रा. पद्मा पाटील)

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे फ्लोरेन्स (इटली) येथील स्मारक (छाया. सौजन्य- प्रा. पद्मा पाटील)

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे नाव देण्यात आलेला फ्लोरेन्स (इटली) येथील इंडियाना ब्रिज (ऑफ प्रिन्स राजाराम महाराज) (छाया. सौजन्य- प्रा. पद्मा पाटील)

(शिवाजी विद्यापीठाच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे) यांच्या संदर्भातील दोन पुस्तकांचे आज, मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशन होत आहे. या निमित्ताने विशेष लेख...)


नुकतीच डॉ रणधीर शिंदे आणि शिवाजी जाधव यांची पुस्तकं वाचून काढली आणि त्यानंतर लगोलग प्रा. प्रकाश पवार यांचं सकलजनवादी छत्रपती शिवराय हे पुस्तक वाचायला घेतलं. छत्रपतींच्या इतर पुस्तकांहून हे खूप वेगळं पुस्तक आहे. त्याची प्रस्तावना कुमार केतकर यांची. ती मी वाचून काढली होती आणि पुस्तक हातात घेतलेलं वाचायला. पुस्तक असं आहे की, एखाद्या कादंबरीसारखं ते सलगपणानं वाचता येत नाही. संदर्भांची वाक्यावाक्यागणिक इतकी पखरण आहे की एक एक प्रकरण काळजीपूर्वक वाचून त्यावर चिंतन, मनन करतच पुढं जावं लागतं. अशी दोन-तीन प्रकरण वाचून होतात, तोवरच गेल्या आठवड्यात कोल्हापूरचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बाळ पाटणकर यांच्याकडून एक पार्सल प्राप्त झालं. बाळ पाटणकरांना मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पहात आलो असलो तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे अगर भेट कधी झालेली नव्हती; त्यामुळे मी थोडासा आश्चर्यचकित झालो. पार्सल घेऊन संध्याकाळी घरी आलो पाहतो तर त्यात दोन पुस्तकं आणि एक निमंत्रण पत्रिका. छत्रपती राजाराम महाराज करवीर दुसरे यांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी जयंती (१८५० ते २०२५) आणि ग्रंथ प्रकाशन समारंभ असं हे आज, मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ही पत्रिका होती. यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू. वेस्ट यांनी संपादित केलेलं यात्रा युरोपची: छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी (१८७०). याचा अनुवाद माझे ज्येष्ठ बंधू प्रा. रघुनाथ कडाकणे यांनी केलेला आहे आणि दुसरं पुस्तक म्हणजे प्रा. इस्माईल पठाण यांनी लिहिलेला छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे) १८६६ ते १८७०हा चरित्र ग्रंथ. ही पुस्तकं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, ती मला पाठवण्याची सूचना रघुदादानंच पाटणकरांना केलेली असली पाहिजे. आणि महावीर जयंतीचा माझा संपूर्ण दिवस ही रोजनिशी वाचण्यात रंगून गेला. कालपर्यंत मी ती दोन्ही पुस्तकं वाचून काढली.

कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू. वेस्ट यांनी संपादित केलेली छत्रपती राजाराम महाराजांची रोजनिशी हा या दोन्ही पुस्तकांचा आत्मा. या छत्रपती राजाराम महाराजांविषयी फारशी कोणाला माहिती नाही. अगदी ही डायरी सुद्धा! महाराजांसोबत असणाऱ्या कोल्हापूरचे असिस्टंट टू द पॉलिटिकल एजंट (कोल्हापूर अँड सदर्न मराठा कंट्री) अर्थात महाराजांचे सहाय्यक पॉलिटिकल एजंट कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू. वेस्ट यांनी ती संपादित केलेली आहे. अवघे वीस वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या या छत्रपती राजाराम महाराजांनी युरोपचा दौरा केला आणि त्या दौऱ्यावर असतानाच प्रकृती बिघडल्याने इटलीतील फ्लॉरेन्स इथं त्यांचं अकाली निधन झालं. या राजाराम महाराजांनी संस्थानचा कारभार हाती घेतल्यानंतर १८६७मध्ये बहुजनांच्या मुलामुलींना इंग्रजी शिक्षण मिळावे, या हेतूने कोल्हापूर हायस्कूलची स्थापना केली आणि युरोपच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यासाठीच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणीही केली होती. पुढे १८८० साली याच हायस्कूलचे रुपांतर महाविद्यालयात करण्यात आले. पुढे या महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याचे नामकरण राजाराम महाविद्यालय असे करण्यात आले. आपल्याला राजाराम कॉलेज माहिती असते, पण हे राजाराम महाराज माहिती नसतात. आज ते खऱ्या अर्थाने त्यांच्याच कोल्हापूर संस्थानात नव्याने प्रकाशझोतात येत आहेत.

राजाराम महाराजांच्या माहितीच्या अनुषंगाने मी अर्धा पाऊल पुढे होतो, ते अशासाठी की बरोबर दहा वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागाच्या प्रमुख प्रा. पद्मा पाटील या इटलीतील तुरिनो विद्यापीठात एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेल्या होत्या. तिथे हिंदीचा अधिविभाग आहे आणि अनेक विद्यार्थी हिंदी आवडीने शिकतात. तेथील प्रमुख प्रा. कॉन्सोलारो या शिवाजी विद्यापीठातही येऊन गेल्या आहेत. तर, तेथून परतल्यानंतर प्रा. पाटील यांनी परिषदेची माझ्याकडे प्रसिद्धीसाठी बातमी पाठविली. त्यामध्ये त्यांनी फ्लोरेन्समधील छत्रपती राजाराम महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्याचा उल्लेख होता. त्यानं माझं कुतूहल चाळवून मी मॅडमशी बोललो आणि त्यांनी दिलेल्या माहितीनं भारावूनच गेलो. त्यांनी काढलेली छायाचित्रंही मागवून घेतली. आता माझ्या बातमीचा टोनच बदलून गेला. आणि मी १० एप्रिल २०१५ रोजी फ्लोरेन्सवासियांनी जपलाय राजाराम महाराजांच्या स्मृतींचा गंध!’ अशी ती एक्स्क्लुजिव्ह बातमी केली. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत ती छायाचित्रांसह छापून आली. १३ एप्रिल हा महाराजांचा जयंतीदिन हे त्यावेळी मला माहिती नव्हते.

आज या दोन पुस्तकांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ या राजाच्या इतिहासाची पाने त्यांनीच लिहीलेल्या डायरीच्या पानांच्या आधारे प्रकाशात आणत आहे. ही डायरी वाचताना सुरवातीला संपादक वेस्ट यांच्याविषयी माझे मन कृतज्ञतेने भरून आले. एखाद्या दस्तावेजाचे महत्त्व ओळखून आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यतिरिक्त अशा दस्तावेजांचे जतन हे कोणी या ब्रिटीशांकडून शिकावे. केवळ ब्रिटीशांनी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहीला आणि आमच्या इतिहासावर अन्याय केला अशी ओरड करणाऱ्यांनी त्यांनी किमान तो लिहीला म्हणून तरी आज तो आपल्याला उपलब्ध आहे, याचे भान बाळगणे गरजेचे आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि छायाचित्र सुद्धा आपल्याला ब्रिटीश, डच, पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे साकारावे लागले आहे, हे त्याचेच उदाहरण. आता शिवरायांचा उल्लेख आलाच म्हणून सांगतो, सदरच्या डायरीच्या संपादकीयामध्ये वेस्ट यांनी शिवरायांच्या समग्र कारकीर्दीचं अगदी एकाच वाक्यात इतकं प्रभावी रसग्रहण केलं आहे की, मी मोठ्या अभिमानानं आणि प्रेमादरानं ती ओळ कितीदा तरी वाचून मनात साठविली. त्यात त्यानं म्हटलं आहे की, सतराव्या शतकाच्या मध्यवर्ती आणि अखेरच्या सुमारास इंग्लंडप्रमाणेच, पश्चिम भारतातही दूरगामी आणि महत्त्वपूर्ण घटनांनी इतिहास घडवला. त्या दरम्यान, एक नवे साम्राज्य स्थापन झाले आणि स्वतःची सामूहिक ओळख हरवलेल्या जनतेला एका महान पुरूषाच्या प्रतिभेने शक्तीशाली राष्ट्रात परिवर्तित केले- ते महापुरूष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांविषयीचे सारे चरित्रग्रंथ, साऱ्या कादंबऱ्या यावर ओवाळून टाकावं, असं हे विधान. ब्रिटीशांचं आकलन किती समर्पक स्वरुपाचं होतं, हे पटवून देणारं. अशा एका चांगल्या प्रतिभेची देण असलेल्या ब्रिटीश सहायकानं राजाराम महाराजांची डायरी संपादित केली, हे महत्त्वाचं आहे. आणि आपण आपल्या सवयीनं तिचं विस्मरण घडवलं, हेही आपल्या स्वभावधर्माला साजेसंच. पण, आता महाराजांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने ही डायरी आणि महाराजांचे चरित्र आपल्यासमोर येते आहे, हेही नसे थोडके! त्यासाठी महाराजांच्या जनक घराण्यातील वंशज बाळ पाटणकर यांच्यासह (राजाराम महाराज हे मूळचे नागोजीराव पाटणकर) त्यासाठी पाठपुरावा करणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात, आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह अनुवादक डॉ. रघुनाथ कडाकणे आणि चरित्रलेखक डॉ. इस्माईल पठाण हेही अभिनंदनास पात्र आहेत. विशेषतः रघुदादाने अवघ्या तीन आठवड्यांत तिचा अनुवाद केला, हे वाचून मी चाटच पडलो. हे काम सोपे नव्हते. भारावून जावून केल्याखेरीज इतक्या अल्पावधीत हे जबाबदारीचे काम करणे अशक्यप्रायच होते. त्यासाठी त्याचे हृदयपूर्वक अभिनंदन करावेच लागेल. इस्माईल पठाण सरांचा मी त्यांनी लिहीलेले शिवचरित्र वाचल्यापासून चाहता झालेलो आहे. अत्यंत निरलस आणि अनबायस्डपणे इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. आजच्या कालखंडात हे खूपच मोलाचे आहे- इतिहासाच्या बाबतीत तर फारच. त्यामुळे त्यांनी लिहीलेल्या चरित्रग्रंथाला एक संतुलितपणाचे भान लाभलेले आहे. यासाठी सरांचेही अभिनंदन!

खरे तर, राजाराम महाराजांची डायरी आणि त्यांचे चरित्र या मुळातूनच वाचण्याच्या बाबी आहेत. मात्र मला जाणवलेली तिची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलीच पाहिजेत. डॉ. अवनीश पाटील यांनी त्यांच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणं समुद्रप्रवास करणारा पहिला हिंदू राजा म्हणजे छ. राजाराम महाराज होत. त्या काळात सागर पार करणं, हे निषिद्ध मानलं जाई. मात्र, महाराजांनी ते केलं, यावरुनच त्यांच्या पुरोगामी आणि आधुनिक विचारसरणीची प्रचिती येते. त्यातही इंग्रजांशी संवाद आणि डायरी लिहीण्याइतकं इंग्रजीवर प्रभुत्व, ही गोष्टही त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि आकलन यांची साक्ष देणारी आहे. डायरी वाचताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते, ती म्हणजे महाराजांचा हा दौरा म्हणजे काही केवळ सहल वा पर्यटन नव्हतं, तर एक महत्त्वपूर्ण अभ्यासदौरा होता. त्यांच्या आकलनाच्या कक्षा विस्तारणारा, त्यांच्या चिकित्सक विचारसरणीला वाव देणारा आणि प्रगल्भसमृद्ध करणारा होता. इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणीपासून ते विविध प्रांतांचे प्रिन्स, प्रिन्सेस, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठांचे कुलगुरू, सरदार-दरकदार, गव्हर्नर जनरल, अभ्यासक, संशोधक, इतिहासकार अशा इंग्लंडमधील वरिष्ठ श्रेणीच्या मान्यवरांच्या गाठीभेटी त्यांनी या दौऱ्यात घेतल्या. त्याखेरीज मादाम तुसाँसह विविध वस्तुसंग्रहालये, विद्यापीठे, गिरण्या, कारखाने, लंडन टॉवर, हाईड पार्क, हाऊस ऑफ कॉमन्स, रॉयल अॅकेडमी, इंडिया हाऊस, बँका, करन्सी प्रेस व टांकसाळी, बंदरे, जगातील सर्वात मोठी आगबोट, मोठमोठी उद्याने अशा अनेक बाबी पाहात समजून घेत त्यांनी आपल्या अनुभवाची व ज्ञानाची कक्षा विस्तारण्यास प्राधान्य दिले. या सर्वांच्या नोंदी या डायरीत आहेत.

महाराजांच्या या डायरी लेखनाला एक प्रकारची शिस्त असल्याचे जाणवते. नोंदी अवघ्या काही ओळींच्या असल्या तरी त्यामध्ये तीन टप्पे दिसतात. पहिल्या टप्प्यात महाराज फॅक्ट्स नोंदवितात. म्हणजे जिथे भेट दिली, त्या व्यक्ती, त्यांची नावे वा भेट दिलेले ठिकाण, त्यांचे महत्त्व इत्यादी. पुढे त्या संबंधित व्यक्ती, ठिकाणाची निरीक्षणे नोंदवितात आणि पुढे अवघ्या एक किंवा दोन ओळींत त्यावर ते स्वतःची कॉमेंट, टिप्पणी करतात. भल्याभल्यांना जमणार नाही ती लेखनशिस्त या राजाने अवघ्या विशीच्या उंबरठ्यावर अवगत केली होती. त्यामुळेच खरे तर पठाण सरांना त्यांचे चरित्र लिहीणे थोडे सुकर गेले असावे.

राजाराम महाराजांचा मला आणखी एक गुणविशेष जाणवला, ते म्हणजे त्यांचा चोखंदळपणा. ते कलारसिक होते. तिथे त्यांनी अनेक थिएटरना भेट देऊन अनेक नाट्याविष्कार, गायनाविष्कार अनुभवले. त्याविषयीच्या नोंदीही डायरीत आहेत. संबंधित कलाकृतीविषयी आम्हाला ती फारशी भावली नाही, अमूक कलाकाराने चांगले काम केले, आम्हाला ही कलाकृती खूप आवडली, अशा टिप्पण्या केल्या आहेत. अगदी एखादे व्याख्यान अगर चर्चा ऐकल्यानंतर ती आवडली किंवा कसे, याच्याही नोंदी आहेत. याखेरीज, ते तेथील ग्रामीण जीवनाचीही पाहणी करतात, तेथील सरदारपुत्रांसमवेत क्रिकेटही खेळतात, या गोष्टीही त्यांच्या चौफेर वावराची आणि दृष्टीकोनाची साक्ष देणाऱ्या.

अनेक नोंदींमधून काही गोष्टी वाचकालाही समजून येतात, जशा की अनेक कोच फॅक्टऱ्यांना महाराज भेट देतात. तेथे विविध प्रकारच्या बग्गींची पाहणी करतात आणि त्याविषयी पसंती-नापसंतीची टिप्पणी करतात. यावरुन आपल्यासाठी एखादी नवी बग्गी खरेदी करावी, अशा हेतूने ते या फॅक्टरींना भेट देतात, हे लक्षात येते. एका ठिकाणी ते इंग्लंडच्या मंत्रीमंडळाचा फोटो खरेदी करून सोबत घेऊन येतात. आता ही नोंद वाचताना तो त्यांनी कशाला घेतला, असे वाटून जाते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांची मंत्रीमंडळासमवेत भेट ठरलेली असते, ते पुढील नोंदीवरुन लक्षात येते. तेव्हा मंत्रीमंडळाचे सदस्य कोण कोण आहेत, त्यांना भेटत असताना आंधळेपणाने जाण्यापेक्षा त्यांच्याविषयी जाणून घेऊन मगच भेटले पाहिजे, ही जाणीव त्यांच्या या कृतीतून दिसते. त्यातूनही त्यांच्या चाणाक्षपणाची प्रचिती येते.

महाराजांच्या या नोंदींमध्ये काही बिटविन दि लाइन्सही आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी ते काही मोठ्या व्यक्तींना भेटण्यासाठी जातात; मात्र त्यांची भेट न झाल्याने परत आलो, असे त्यांना नोंदवावे लागले आहे. ब्रिटीशांचे कितीही कौतुक केले, तरी आम्ही सत्ताधीश आहोत आणि आपण अंकित आहात, हे जाणवून देण्याचाच हा प्रयत्न दिसतो. अन्यथा, महाराजांच्या भेटीसाठी आधीच अपॉईंटमेंट घेऊन ठेवणे त्यांना सहजशक्य होते, मात्र तसे दिसत नाही. त्यामुळेच पुस्तकाच्या अखेरीस एका परिशिष्टात महाराजांनी त्यांच्या एका मित्राला लिहीलेल्या पत्रात आपण आणि आपले संस्थान किती छोटे आहोत, याची जाणीव झाली, असे जे म्हटले आहे, याला या सापत्न वागणुकीचाही संदर्भ असावा, असे एक वाचक म्हणून मला वाटले. त्यामुळे आता महाराजांची काही पत्रे असतील, तर त्यांचेही संकलन होणे आवश्यक आहे, असे त्यावेळी वाटून गेले.

मात्र, पाश्चात्यांविषयी कृतज्ञ राहावे, असा प्रसंग म्हणजे महाराजांचा मृत्यू. इटलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या दहनविधीला मान्यता नसताना आणि हा शिक्षापात्र गुन्हा असताना सुद्धा महाराजांच्या अंतिम संस्कारासाठी त्याला अपवाद करण्यात आले, ही त्या काळात तर मोठी बाब होतीच; आजच्या काळाच्या नजरेतून पाहता ती महानच वाटते. त्यापुढे जाऊन त्यांची छत्री आणि स्मारक उभारणे, परिसराचे सुशोभीकरण करणे, शेजारून जाणाऱ्या नदीवरील पुलाला त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देणे आणि त्यांच्या भेटीच्या स्मृती चिरंतन जपणे, याचे मोल आहेच, पण ते प्रचंड वाटण्याच्या काळात आपण आज आहोत.

हा राजा आणखी काही वर्षे जगता तर छत्रपती शाहू महाराजांच्या आधीच एका आधुनिक क्रांतीची रुजवात त्यांच्या हातून निश्चितपणे होऊ शकली असती, असे निश्चितपणाने वाटते. पण, या जर-तरला काही अर्थ नसतो. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीतही मला नेहमी तसंच वाटत राहतं. अवघी पाच वर्षांची छोटी कारकीर्द पण त्यातही मेन राजाराम हायस्कूलसारखी पायाभरणी, यातूनच सारे काही दृगोच्चर होते. याच स्मारकामध्ये आज पुन्हा छत्रपती राजाराम महाराजांच्या स्मृती करवीरकर जनतेबरोबरच जगासमोर येण्यास सिद्ध आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मेन राजाराम हायस्कूलच्या सभागृहात आज, मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. करवीरकर जनताही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक आहे. आपणा सर्वांचे स्वागत करण्यास आम्हीही उत्सुक आहोत! 


सोमवार, १४ एप्रिल, २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: विश्वप्रभावी नेता

 







('दै. पुढारी'च्या बहार पुरवणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेकविध पैलू आहेत. आपल्या प्रचंड व्यासंगामुळे ते ज्ञानाच्या क्षेत्रातले 'ग्लोबल सिटीझन' बनले होते. बाबासाहेबांच्या विद्वतासंपन्न व्यक्तीमत्वामध्ये वैश्वि जाणीवा ओतप्रोत भरलेल्या होत्या; म्हणूनच समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, संवैधानिक नैतिकता या मूल्यांच्या प्रस्थानेसाठी ते हयातभर आग्रही राहिले.

कोलंबिया विद्यापीठातील ज्येष्ठ विचारवंत मेंटॉर प्रा. जॉन डयुई यांच्या विचारांचा बाबासाहेबांवर मोठा प्रभाव राहिला. अमेरिकेतील शिक्षणादरम्यान त्यांचा तेथील समाजजीवनाशी जवळून परिचय झाला. तेथील कृष्णवर्णीयांच्या लढ्याशी, अमेरिकन विचारविश्वाशी आणि उदारमतवादी लोकशाही विचारांशीही त्यांचा परिचय झाला. हा प्रभाव बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर आणि राहणीमानावरही दिसतो. 'मल आयुष्यात चांगले पोशाख आणि पुस्तके या दोनच बाबी प्रिय आहेत', असे ते म्हणत. पाश्चात्य शिक्षणामुळे आपल्यातले नवचैतन्य जागले आणि स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा जागविली, असेही बाबासाहेब सांगतात. या स्वतंत्र विचार करण्याच्या प्रक्रियेतूनच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशास्त्र इत्यादी विषयांतले अत्यंत मूलभूत स्वरूपाचे संशोधन बाबासाहेबांच्या हातून साकार झाले.

बाबासाहेबांचा 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशा ब्दांत सारे जग गौरव करते. त्यांनी ज्ञानसंपादनासाठी घेतलेले ष्ट तर याला कारणीभूत आहेच; पण ज्ञाननिर्मितीसाठीचे त्यांचे होरात्र परिश्रमही त्यापाठी आहेत. जुलै १९१३ मध्ये बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठात प्रविष्ट झाले, तेव्हा त्यांनी राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. त्यात अर्थशास्त्र या प्रमुख विषयासह समाजशास्त्र, इतिहास, त्त्वज्ञान आणि राजकारण हे दुय्य विषय त्यांनी अभ्यासले. फ्रें आणि जर्मन भाषाही ते या दरम्यान शिकले. बाबासाहेबांच्या हातून या कालावधीत कास्ट्स इन इंडिया: देअर मॅकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, इंडियन एन्शिएंट कॉमर्स, दि नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी, दि प्रॉब्लेम ऑफ रुपीअशा महत्त्वाच्या विषयांवरील संशोधन साकार झाले.

बाबासाहेबांना प्रा. जॉन ड्यु यांच्याखेरीज प्रा. ए.ए. गोल्डनवाईजर यांच्यासारखे समाजशास्त्रज्ञ, प्रा. एडविन आर. ए. सेलिग्मन यांच्यासारखे जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ गुरू म्हणून लाभले. मला लाभलेला अतिशय उत्तम, उच्च त्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणजे भीमराव आंबेडकर असे उद्गार प्रा. सेलिग्मन यांनी त्यांच्याविषयी काढले, तेही महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्यासमोर! एक परदेशी शिक्ष आपल्या भारतीय विद्यार्थ्याची ओळख एका प्रतिष्ठि भारतीयाला अशा पद्धतीने करून देत होता, हे किती अभिमानास्पद!

कोलंबिया विद्यापीठाचे प्रा. गर यांनी, भीमरावांची अर्थशास्त्रातली प्रगती ही एखाद्या प्रोफेसरपेक्षाही अधिक आहे, असे म्हटल्याचे पाहून लंडन विद्यापीठातील प्रो. एडविन कॅनन श्चर्यचकित झाले. भीमरावांच्या ज्ञानाची तपासणी केल्यानंतर प्रा. सीगर यांच्या या विधानाची त्यांना खात्री पटली. लंडन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ प्रा. सिडने वेब यांनीही एक आदर्श विद्यार्थी आणि चांगला माणूस म्हणून बाबासाहेबांचा गौरव केला. प्रा. एडविन कॅनन यांनीही एका शिफारसपत्रात, डॉ. आंबेडकर हे अत्यंत ज्ञानपिपासू आणि गंभीर संशोधक वृत्तीचे विद्यार्थी असल्याचे म्हटले. बाबासाहेबांच्या बुद्धीसामर्थ्यावर अनेक जागतिक ग्रंथकारही फिदा होते. पिअर्सन या ग्रंथकाराने त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीचे आणि ज्ञानसंपादन कौशल्याचे कौतुक केले आहे.

बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तीमत्त्वातच एक प्रकारचे ग्लोबल अपील होते. त्यांनी १९२७ मध्ये बहिष्कृ हितकारिणी सभेचा अहवाल आणि एक पत्र त्यावेळच्या मुंबईचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांना पाठविले; तेव्हा संस्थेच्या बहिष्कृ द्धाराच्या चळवळीसाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी त्यांनी २५० रूपयांचा मदत निधी स्वखुशीने पाठविला होता.

सायमन कमिशनच्या वेळीही बाबासाहेबांचा प्रभाव दिसून आला. २३ ऑक्टोबर १९२८ रोजी बाबासाहेबांची कमिशनसमोर साक्ष झाली. अस्पृश्यांना हिंदूपेक्षा वेगळे मानून कायदेमंडळात २२ जागा द्याव्यात, अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश, जातवार मतदारसंघ, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र जागा, प्रांतिक स्वायत्तता, लॉ अँड ऑर्डर खाते सोपीव ठेवणे, वयात आलेल्या सर्व स्त्री पुरूषांस मताधिकार शा मागण्या त्यांनी नोंदविल्या. बाबासाहेबांचा स्पष्टवक्तेपणा आणि इंग्रजीवरील प्रभुत्व यामुळे कमिशनमधील मेजर ॲटली हे खूप प्रभावित झाले. बाबासाहेबांशी हस्तांदोलन करून ॲटलीनी त्यांना शाबासकी दिली.

बाबासाहेबांनी आपल्या तर्कशुद्ध विवेचनाच्या बळावर गोलमेज परिषदेतही मोठी प्रशंसा प्राप्त केली. आपली भूमिका पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी मजूर, उदारमतवादी आणि हुजूर पक्ष यांच्या सभासदांसमोर अनेक भाषणे केली. हाऊस ऑफ कॉमन्समधील सर्व पक्षांच्या निवडक लोकांसमोर त्यांनी पार्लमेंटमध्ये एक भाषण केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आर्थिक प्रश्नांची कशी गळचेपी होते, याचे ब्दचित्र रेखाटले. त्यात एक मुद्दा असा होता की, 'इंग्रज लोकांनी हिंदुस्थानात आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी अस्पृश्यांचा भरपूर उपयोग केला आणि त्यानंतर मात्र अस्पृश्यांना दूर ठेवले. हा इंग्रजांचा कृतघ्नपणा होय'. ही भाषणे इंग्रजांना खूपच झोंबली. तथापि, अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना पाठिंबा देण्याचे त्यांनी ठरविले आणि त्याप्रमाणे गोलमेज परिषदेत आपले वचन पाळले. हा बाबासाहेबांच्या अमोघ वाणीचा प्रभाव होता. पहिल्या गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांच्या कार्याचा लंडनमधील वृत्तपत्रांनी कॉन्फरन्सच्या सभासदांनी वेळोवेळी गौरव केला.

इंग्लंडच्या बादशहाने गोलमेज परिषदेच्या प्रतिनिधींसाठी एक चहापार्टी आयोजित केली. तिथे महात्मा गांधी यांच्यासह सर्व हिंदी संस्थानिक युरोपियन प्रतिनिधी होते. बादशहाशी शिष्टाचाराचे दोन-चार ब्द बोलण्यासाठी दहा सदस्यांची निवड केली होती. त्यात बाबासाहेब होते. बादशहा समोर आले, तेव्हा बाबासाहेबांची स्थिती थोडीशी संभ्रमित झाली. मात्र, स्वत: राजेसाहेबांनीच त्यांची ही अडचण दूर केली आणि प्रथम भारतातील अस्पृश्य बांधवांची एकूण परिस्थिती आयुष्यक्रमाबद्दल विचारणा केली. बाबासाहेब त्यांना त्याविषयी सांगत असताना राजेसाहेबांचे ओठ हातपाय थरथर कापत होते, इतका त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. बाबासाहेबांचे शिक्षण कसे, कोठे झाले, त्यांचे वडील का करीत होते, अशी विचारपूसही राजेसाहेबांनी मोठया स्थेने केली. त्यानंतर मुख्य प्रधानांशीही त्यांचे अस्पृश्यहिताच्या दृष्टीने का करता येईल, यावर बोलणे झाले. थेट इंग्लंडचा बादशहा आणि त्यांचा मुख्य प्रधान यांच्या कानी अस्पृश्यांच्या व्यथावेदना घालणारा, असा हा थोर नेता. त्यानंतर तेथील 'इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशन अफेअर्स' या संस्थेतही त्यांनी अस्पृश्यांच्या वतीने मांडलेल्या मागण्यांची आवश्यकता विषद केली.

दुसऱ्या गोलमेज परिषदेतही फेडरल स्ट्रक्चरल समितीच्या सर्व बैठकांना बाबासाहेब उपस्थित राहिले आणि आपले विचार भारताच्या राजकीय हिताच्या दृष्टीने अस्पृश्यांच्या हिताला अग्रक्रम देऊन स्पष्टपणे, विद्वत्तापूर्ण द्धतीने मांडले. मध्यवर्ती संयुक्त राज्यपद्धतीत कायदे, न्याय, फडणीशी, शिक्षण वगैरे खात्यासंबंधी दूरवरचे विचार त्यांनी इतक्या प्रभावी द्धतीने मांडले की, बाबासाहेबांचा या सर्व प्रश्नांचा आधीच सखोल अभ्यास झाला असला पाहिजे, अशी सदस्यांची खात्री पटली. सभासदांचे शंकानिरसन करताना बाबासाहेबांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड वगैरे देशांच्या राज्यघटनेतील कलमांचा आधार घेऊन, त्या त्या देशांतील ऐतिहासिक घटनांचे दाखले दिले. त्यावेळी बैठकीचे अध्यक्ष सभासद या सर्वांनीच त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. भारताच्या राजकीय स्वातंत्र्यासाठीची खटपट करायचीच, पण अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठीची आपली भूमिका सोडू नये, हे धोरण बाबासाहेबांनी गोलमेज परिषदांवेळी स्वीकारले होते. ते धोरण त्यांनी उच्च पातळीवरून हाताळले आणि जागतिक पातळीवर ऱ्या अंशी शस्वी केले, असे या घडामोडींवरून दिसते.

लेखक, पत्रकार बेव्हरली निकोल्स याने बाबासाहेबांचे बौद्धि सामर्थ्य विशाल असल्याचे उद्गार काढले. तो म्हणतो की, आंबेड हे इटलीतील क्रांतीकारक काव्हूरच्या विचारसरणीचे राजकारणी व्यवहारनिष्ठ पुढारी आहेत. ते सार्वजनिक सभेत बोलू लागले की, त्यांच्या वाक्ताडनांनी अनेक पुढारी घायाळ होतात आणि त्यांचे मुद्दे खोडून काढणे त्यांना शक्य होऊन बसते.'

क्रिप्स कॅबिनेट मिशन (१९४६) या दोहोंनी अस्पृश्यांच्या हिताची दखल घेतली नाही, याचा मोठा विषाद डॉ. बाबासाहेबांना वाटला. कमिशन परत गेल्यानंतर बाबासाहेबांनी पंतप्रधान ॲटली यांना (दि. १७ जून १९४६) तार पाठवून काँग्रे इतर अल्पसंख्य जातींना खू करण्यासाठी सरकार अस्पृश्यांवर अन्याय करीत आहे. हे अन्याय दूर व्हावेत, यासाठी तुम्ही स्वत: लक्ष घालणे जरूरी आहे, शी विनंती त्यांना केली.

याच बरोबरीने कॅबिनेट मिशनची योजना अस्पृश्यांसाठी किती घातक आहे, यासंबंधी सविस्तर पत्र तयार करून ते ॲटलींसह मजूर पक्षातील अन्य पुढारी आणि विन्स्ट चर्चिल यांनाही पाठविले. त्यात ते म्हणतात की, ‘कॅबिनेट योजनेमुळे अस्पृश्यांच्या राजकीय प्रगतीला पायबंद सेल. हे पायबंद भारताला स्वातंत्र्य देण्याअगोदर तोडणे, हे ब्रिटीश सरकारचे कर्तव्य आहे.

या प्रश्नाचे महत्त्व बाबासाहेबांना इतके वाटत होते की, केवळ पत्रव्यवहार करून ते थांबले नाहीत; तर, प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्याचे गांभीर्य पटवून देण्यासाठी त्यांनी थेट इंग्लंड गाठले. लंडनमधील सर्व पक्षांच्या प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेऊन बाबासाहेबांनी त्या कैफियतीच्या प्रती वाटल्या. अस्पृश्यांच्या एकंदर स्थितीची, विशेषतः राजकीय जीवनाची त्यांना स्पष्ट कल्पना दिली. भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, पंतप्रधान मेजर ॲटली आणि विन्स्टन चर्चिल यांच्याबरोबर बाबासाहेबांनी बराच वेळ अस्पृश्यांच्या भवितव्याबद्दल हापोह केला. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ आणि राजकीय सत्ता मिळाली की, त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्याद्वारे शैक्षणिक वा सांस्कृतिक स्थितीही सुधारेल, हे त्यांनी त्यांच्यासमोर ठामपणे मांडले.

बाबासाहेब विन्स्टन चर्चिलना त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील निवासस्थानी भेटले, तेव्हा तेथेच त्यांनी दुपारचे भोजन घेतले. चर्चिल यांनी बाबासाहेबांसमवेत अर्धा दिवस घालविला. अस्पृश्यांच्या सर्व प्रश्नांकडे हुजूर पक्ष जागरूकपणे सहानुभूती दाखविल, असे चर्चिल यांनी बाबासाहेबांना वचन दिले. या दौऱ्यात बाबासाहेबांनी आर.ए. बटलर, लॉर्ड टेंपलवूड (माजी सर सॅम्युअल होअर) यांच्यासह पार्लमेंटच्या अनेक भासदांच्याही गाठीभेटी घेतल्या.

भारतीय राज्यघटना निर्मितीच्या कामी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये आपल्या या महान विद्यार्थ्याचा मानद डॉक्टर ऑफ लॉज् (एलएलडी) पदवी देवू गौरव केला. या पदवीमध्ये बाबासाहेबांचा 'भारताचे एक सर्वश्रेष्ठ नागरिक, महान सामाजिक सुधारक आणि मानवी हक्कांचे शूर समर्थकया शब्दांत गौरव केला आहे.

बाबासाहेबांनी आयुष्याच्या अंतिम पर्वात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तरी तत्पूर्वी त्यांनी धम्माच्या अभ्यासाच्या अनुषंगाने सिलोन, ब्रहमदेश आदी देशांचे दौरे केले. धम्मदीक्षेनंतर मात्र ते नेपाळ या एकमेव देशाचा दौरा करू कले आणि काठमांडू येथे त्यांनी त्यांचे सुप्रसिद्ध 'बुद्ध की कार्ल मार्क्स?' हे भाषण दिले. मार्क्सच्या २५०० वर्षे आधी बुद्धाने 'पिळवणूक' ब्द वापरता 'दु:खाची मांडणी केली. दु:ख हा ब्द दारिद्र, गरीबी असा येथे अभिप्रेत आहे. यामुळे या दोन्ही त्त्वज्ञानांच्या मूलभूत पायात फरक नाही. तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्याची कोणत्याही बौद्धास मार्क्सचे दार ठोठावण्याची गरज नाही. बुद्धाने तो उत्तम प्रकारे प्रस्थापित केला असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब या भाषणात करतात.

बाबासाहेबांनी वेळोवेळी आपली ज्ञानसाधना, प्रखर चिंतन आणि बुद्धिमत्ता यांच्या बळावर आपल्या तेजस्वी वाणीने व व्यक्तीमत्त्वाने संपूर्ण जगाला प्रभावित करून सोडले. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वामधील हे ग्लोबल अपील फार महत्त्वाचे होते. त्या कालखंडात त्या ग्लोबलतेची तुलना केवळ महात्मा गांधी यांच्या प्रभावाशीच होऊ शकते. गांधींचा प्रभाव, त्याचे कंगोरे वेगळ्या स्वरुपाचे होते. बाबासाहेबांच्या ग्लोबल वावराला संघर्षाची धार होती. संघर्षातून त्यांनी आपल्या मुद्द्यांशी जगाला समन्वय करणे भाग पाडण्याची अचाट कामगिरी केलेली होती. समग्र भारतीय समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या मांडणीने अनेक जागतिक महत्त्वाचे नेते प्रभावित झाले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेला आपले सहकार्य व पाठिंबा प्रदान केला. त्याचप्रमाणे आजही जागतिक मंचावरील समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापनेच्या लढ्याचे आयकॉन म्हणून बाबासाहेबांकडे पाहिले जाते, हेच बाबासाहेबांच्या ग्लोबल राजनितीचे यश आहे.

(लेखक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचे अभ्यासक)

--00--