शुक्रवार, ९ मे, २०१४

पांडुरंग पाटील यांचे अकाली जाणे धक्कादायक



(विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे जनसंपर्क अधिकारी आणि माझे एक वरिष्ठ सहकारी मित्र पांडुरंग पाटील यांचं मंगळवार, दि. ६ मे २०१४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं अकाली निधन झालं. हा खूप मोठा धक्का आहे. त्यांच्याविषयीच्या माझ्या भावना आपणा सर्वांसोबत शेअर करीत आहे. - आलोक जत्राटकर)
 
Pandurang Patil
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे जनसंपर्क अधिकारी पांडुरंग पाटील यांचं अचानक जाणं मनाला चटका लावणारं आहे. एक सहृदयी, हसतमुख आणि सदैव मदतीसाठी तत्पर असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्याहून एक चांगला माणूस म्हणून ज्या पांडुरंग पाटलांचा विधान भवन परिसरात लौकिक होता, त्यांना मॉर्निंग वॉकनंतर इतका तीव्र हृदयविकाराचा झटका यावा आणि उपचारांची थोडीही संधी न देता त्यांचे निधन व्हावे, ही खूप क्लेशदायक घटना आहे.
मंत्रालयात सहायक संचालक म्हणून रुजू झालो, तेव्हा आम्हा काही अधिकाऱ्यांना आमचे लाडके शिवाजी सोंडुलकर आणि आकाश जगधने हे आम्हाला पांडुरंग पाटील यांना भेटायला म्हणून घेऊन गेले. त्या बॅचमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आम्ही तिघे जण असल्याचे पाहून पांडुरंग पाटलांना झालेला आनंद आठवतोय आज. आपल्या भागातली मुलं बाहेर पडायला तयार नसतात, तुम्ही इथं आलात, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना मांडल्या होत्या. त्याचप्रमाणं सभापतींची वेळ घेऊन त्यांनी देशमुख साहेबांची आणि आमची भेटही घडवून आणली होती. आपल्या भागातली मुलं आहेत, असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. कुठलीही, काहीही अडचण आली तरी अगदी बिनधास्तपणे माझ्याकडं यायचं. काहीही काम असलं तरी बिनदिक्कतपणे सांगायचं, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आणि या शब्दाला ते जागतही राहिले कारण आम्ही अगदी आमच्या रेल्वे रिझर्वेशनच्या फॉर्मपासून अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांच्याकडं जात राहिलो आणि ते सुद्धा अगदी प्रेमळपणाने मदत करत राहिले.
पांडुरंग पाटलांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजिबात अभिनिवेश नसे. वागणं-बोलणं एकदम मनमोकळं आणि आपुलकीचं! कितीही कामात असले आणि तुम्ही त्यांच्याकडं गेलात तर त्यांचा चेहरा त्रासिक झालाय, असं कधीही घडत नसे. हातातलं काम बाजूला ठेवून आणि महत्त्वाचं असेल, तर तसं सांगून ते आलेल्याला वेळ देणार म्हणजे देणारच! विधान भवनात गेल्यानंतर तीन व्यक्तींची मी हमखास भेट घ्यायचो- एक म्हणजे पांडुरंग पाटील, दुसरे विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आणि तिसरे म्हणजे ग्रंथपाल बा.बा. वाघमारे! या सर्वांशी अनोखं मैत्र जुळलं गेलं. पांडुरंग पाटील साहेबांशी तर जरा जास्तच. याचं श्रेय आमच्यापेक्षा त्यांना जास्त होतं. कारण त्यांचा स्वभावच इतका मोकळा होता की, सिनिअर-ज्युनिअरच्या किंवा वयाच्या भिंती त्यांच्यासोबत असताना कधी विरघळल्या गेल्या, याचा पत्ताच लागला नाही.
नागपूरच्या हिंवाळी अधिवेशनादरम्यान कितीही व्यग्र असले तरी मुंबईपेक्षा एकमेकांशी सुसंवाद अधिक वाढवण्याचा तो कालखंड असे. त्यातही नागपूर विभागाचे माजी माहिती संचालक भि.म. कौशल साहेबांच्या वार्षिक स्नेहभोजनामध्ये तर हा सुसंवादाचा सोहळा अधिकच वृद्धिंगत होत असे. त्याठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे आम्ही सारे अधिकारी-कर्मचारी सहभोजनाचा आस्वाद तर घ्यायचोच, पण त्यापेक्षाही कार्यालयापलिकडलं व्यक्तिमत्त्व त्याठिकाणी माहिती व्हायचं. अनफॉर्मल बातचीत व्हायची. जाता जाता शासनातले, शासनाबाहेरचे अपडेट्स मिळायचे.. असे एक ना अनेक लाभ तिथंत असतं. त्याठिकाणी पाटील साहेबांचं आणि माझं दरवर्षी, न चुकता बऱ्याच विषयांवर बोलणं व्हायचं. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू आपसूक समजायचे. विशेषतः प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आणि मानवतावादी असे. शिवाजीराव देशमुख यांच्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्यातून डोकावायचा. देशमुख साहेबांच्या सामाजिक जाणिवेचा आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक, सहानुभूतीच्या दृष्टीने पाहण्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यात येत असे. त्यांच्या प्रकृतीविषयीही ते चिंतेत असत. अशा नेत्यांची वानवा राज्यात हळूहळू निर्माण होत चालल्याची खंतही डोकावत असे. पण, आपण शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापलं काम चांगलं केलं, तर अंतिम फलनिष्पत्ती चांगलीच होईल, असा विश्वासही त्यांच्या मनी असे. विधानभवनातील शोकसभेत पांडुरंग पाटील यांच्या निधनाने माझ्या व्यक्तिगत जीवनात खूप मोठी हानी झाली आहे, हे शिवाजीराव देशमुखांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.
पाटील साहेबांच्या अशा एक ना अनेक आठवणी मनात उसळताहेत. त्यांच्या निधनाचा धक्का हा आम्हा सहकाऱ्यांबरोबरच पत्रकार बंधू-भगिनींनाही सहज पचवता येण्यासारखा नाही. पण, एक मात्र खरं, की विधानभवनातला सभापती दालनाशी जोडणारा एक दुवा जसा त्यांच्या जाण्यानं हरपला आहे, तसंच विधान भवनातला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा पूलसुद्धा पांडुरंग पाटील यांच्या जाण्यानं कोसळला आहे. माझ्या या प्रेमळ सहकाऱ्याला माझी अगदी मनापासून श्रद्धांजली!

बुधवार, ७ मे, २०१४

महान्यूज आणि मी!

(माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' या वेबपोर्टलला नुकताच उत्कृष्ट ई-प्रशासनासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने दि. ५ मे २०१४ रोजी 'महान्यूज' वेबपोर्टलवर प्रकाशित झालेला माझा लेख ब्लॉग वाचक मित्रांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)
 
'महान्यूज आणि मी' या विषयावर लेख देण्यासंदर्भात काल महान्यूज शाखेतून  फोन आला आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका ध्यासपर्वाच्या स्मृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. 'महान्यूज' या वेब पोर्टलची निर्मिती ही जितकी महत्त्वाकांक्षी योजना होती, तितकीच ती निर्मिती प्रक्रिया खूप जिकीरीची आणि तरी सुद्धा एक समृद्ध अनुभव देणारी होती. साधारण सहा-एक महिन्यांचा तो कालखंड खूप भारावलेपणाचा होता. आमच्या कार्यक्षमतेची परीक्षा आणि कामाचा कस पाहणारा असा होता. आम्हा शासकीय अधिकाऱ्यांना अतिशय प्रोफेशनली काम करण्याची संधी आणि स्वातंत्र्य देऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची कॉर्पोरेट प्रतिमा इस्टॅब्लिश करण्यात 'महान्यूज'चा अतिशय मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासनातील घडामोडींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून राज्यातील वृत्तपत्रांसाठी अधिकृत आणि अपडेट शासकीय माहितीचा खजिना खुला करण्याचं काम महान्यूजनं केलं. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना हवी असणारी अनेक योजनांची माहिती त्यांना मिळू लागली आणि देशातील व जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या लोकहितैषि उपक्रमांची माहिती देऊन त्यांना शासनाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा महान्यूज बनलं. रोजगार संधी शोधणाऱ्या युवकांसाठी सार्वजनिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रांत उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती रोजच्या रोज अपडेट करून एका क्लिकवर देण्याचं फार महत्त्वाचं काम महान्यूज करत आहे. आणि त्यामागं तत्कालीन महासंचालक आणि आताच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची तळमळ आणि संचालक श्रद्धा बेलसरे व प्रल्हाद जाधव यांच्या सक्रिय मार्गदर्शनाचाही वाटा आहे.
'महान्यूज' या वेबपोर्टलची संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि दि. 19 सप्टेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पोर्टलचं लोकार्पण होण्यापूर्वी साधारणपणे दोन ते अडीच वर्षे म्हैसकर मॅडम यांनी महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची शासकीय चौकटबद्ध कार्यपद्धती बदलण्यासाठी केलेली मशागत ही खऱ्या अर्थानं भरीव पायाभरणी करणारी होती. 'केवळ खुलासे काढणारा आणि कळकट कागदावर मळकट बातम्या देणारा विभाग' (हे मॅडमचे शब्द!) अशी वृत्तपत्र प्रतिनिधींच्या मनातली महासंचालनालयाची सन 2006 पूर्वीची प्रतिमा तोपर्यंत पुसण्यात यश आलं होतं. सन 2006मध्ये मिडियामध्ये काम केलेल्या साधारण वीस सहाय्यक संचालकांची आमची नवी बॅच महासंचालनालयात दाखल झाली होती. या ताज्या दमाच्या टीमच्या जोरावर आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाच्या बळावर म्हैसकर मॅडमनी विभागाचा चेहरामोहरा पालटण्याचा ध्यास घेतला. त्यातून विभागीय संपर्क कक्षातून उत्तम प्रकारच्या निर्दोष प्रेस नोट, प्रासंगिक लेख, माहिती यांचा ओघ वाढीस लागला. ब्लॅक ॲन्ड व्हाईट 'लोकराज्य'चं संपूर्ण फोर कलर 'न्यू लूक लोकराज्य'मध्ये रुपांतर झालेलं होतं आणि त्याचं समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झालेलं होतं. गरज नसताना पण स्वतःला चाचपण्याच्या दृष्टीनं 'लोकराज्य' ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी)लाही सामोरं गेलं आणि देशातील विविध शासकीय मुखपत्रांमध्ये सर्वाधिक खपाचं (3,45,997) तर खाजगी मासिकांमध्ये 'वनिता' (मल्याळम) आणि 'मेरी सहेली' (हिंदी) यांच्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक खपाचं मासिक होण्याचा बहुमान 'लोकराज्य'नं पटकावला होता. या यशानं प्रेरित होऊन 'ऊर्दू लोकराज्य'चंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दणक्यात लोकार्पण करण्यात आलं होतं. त्याचीही यशस्वी आगेकूच सुरू झालेली होती. मुद्रित माध्यमांमध्ये अशी मोहोर उमटवित असतानाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही आकाशवाणीवरील 'दिलखुलास' आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'जय महाराष्ट्र' हे कार्यक्रम लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत होते. या यशाला आता नवमाध्यमाचं परिमाण मिळवून देण्याचा विचार म्हैसकर मॅडम यांच्या डोक्यात घोळत होता. त्या दृष्टीनं इंटरनेटवर वेबपोर्टल तयार करून राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांशी जोडण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनी होती. त्यातून त्यांनी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांमधून डॉ. गणेश मुळे यांची टीम लीडर म्हणून तर त्यांच्या जोडीला डॉ. किरण मोघे, मनीषा पिंगळे आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मयुरा देशपांडे, अरविंद जक्कल आणि आर्टिस्ट सुनील डुंभेरे यांची निवड केली होती. ही टीम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कामालाही लागली होती. त्यावेळी मी 'लोकराज्य'चा सहसंपादक म्हणून काम पाहात होतो. साधारण मे 2008मध्ये म्हैसकर मॅडमनी मला बोलावून 'महान्यूज टीममध्ये काम करणार का?' असं विचारलं. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कारण त्यापूर्वीही मॅडमनी मला अगदी विश्वासानं मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका, युरोप आणि दाव्होस दौऱ्याचं वार्तांकन, समन्वयन आणि अहवाल तयार करण्याचं काम माझ्यावर सोपवलं होतं. ते मी यशस्वीपणे केलं होतं. अतिशय महत्त्वाच्या अशा उद्योग, ऊर्जा या विभागांच्या विभागीय संपर्क अधिकारी पदाची जबाबदारी दिली होती. ती व्यवस्थितपणानं पार पाडली होती. 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र'साठी वेळोवेळी आदेशानुसार योगदान देत होतो. त्याचप्रमाणं 'लोकराज्य'च्या टीममध्येही अतिशय मनापासून काम करीत होतो. त्यामुळं मॅडमच्या कार्यपद्धतीची मला अगदी जवळून जाणीव झाली होती. त्यांना कन्टेंन्ट नेमका कसा हवा आहे, हे लक्षात येऊन हव्या त्या पद्धतीनं देण्यात माझा हातखंडा झाला होता, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कदाचित त्यामुळंच 'महान्यूज'च्या कन्टेन्टवर काम करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. मीही त्यांच्या आदेशाबरहुकूम महान्यूज टीमला जॉईन झालो. काम प्रचंड होतं. राज्यभरातून दररोज यशकथांच्या अक्षरशः शेकडो इ-मेल्स प्राप्त होत होत्या. त्यामुळं त्यातील मजकूर डाऊनलोड करून घेणं आणि त्यांचं विभागनिहाय, विषयनिहाय सॉर्टिंग करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं मी, मोघे सर आणि पिंगळे मॅडम यांच्यावर होती. बेलसरे मॅडम, मुळे सर हे प्रशासकीय तर देशपांडे मॅडम, जक्कल आणि तांत्रिक सल्लागार संजीव लाटकर हे तांत्रिक बाजू सांभाळत होते.
अनेक चर्चा, बैठकांमधून 'महान्यूज'मध्ये सुरवातीलाच एकूण तेरा सदरं आणि त्या दिवशीच्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पाच बातम्या असाव्यात, असं नियोजन होतं. सदरांमध्ये महाइव्हेंट, ई-बातम्या, साक्षात्कार (मुलाखती), महासंस्कृती, शलाका, तारांकित (यशकथा), चौकटीबाहेर, आलेख (शासकीय योजनांची तपशीलवार माहिती), फर्स्ट पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप (रोजगार संधी), हॅलो (वाचक प्रतिक्रिया), लोकराज्य (कर्टन रेझर), दिलखुलास व जय महाराष्ट्र (मुलाखतींचे शब्दांकन) यांचा समावेश होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सदरं आम्हाला रोजच्या रोज अपलोड करावयाची होती- अगदी रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा! हे म्हणजे एक स्वतंत्र दैनिक चालविल्याप्रमाणंच होतं. त्यामुळं कितीही मजकूर आला तरी या 'महान्यूज' नामक महाराक्षसाच्या पोटात तो लगेच गडप होईल, याची जाणीव आमच्या सर्व टीमला होतीच. त्यामुळंच आम्ही कन्टेन्ट जनरेशनवर खूप मेहनत घेत होतो. दैनंदिन बातम्या वगळता किमान पहिले दोन ते तीन महिने तरी सदरांचा मजकूर व्यवस्थित पुरला पाहिजे आणि त्या कालावधीत पुढल्या तीन महिन्यांचा मजकूर उभा करावयाचा, असं आमचं नियोजन होतं. त्यानुसार आम्ही कामाला सुरवात केली होती.
राज्यभरातून आलेला मजकूर ई-मेलवरून डाऊनलोड करून घेण्याच्या प्रक्रियेत असतानाच मनिषा पिंगळे मॅडमच्या इनबॉक्समध्ये आलेल्या एका स्पॅम-मेलनं त्यातल्या सर्व इ-मेल्स अक्षरशः करप्ट झाल्या. शेकडो इ-मेल्समधला सारा मजकूर नाहीसा झाला. हा एक मोठा धडा आम्हाला सुरवातीच्या टप्प्यातच मिळाला. तरीही त्यापूर्वीच्या नोंदी आम्ही घेतलेल्या असल्यामुळं पुन्हा सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत सारा डाटा जनरेट करण्यात आम्हाला यश आलं. त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेलं सर्वात प्रभावी ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आमच्या संगणकांवर तातडीनं इन्स्टॉल करण्यात आलं.
सर्व डाटा डाऊनलोड करून सॉर्ट करण्याचं काम आम्ही साधारण तीन आठवड्यांत संपवलं असेल. त्यानंतर आमचं महत्त्वाचं काम सुरू झालं, ते म्हणजे त्या संपूर्ण मजकुराचं संपादन करण्याचं! ऑनलाइन मिडियावरील मजकुरासाठीची महत्त्वाची पूर्वअट म्हणजे तो शॉर्ट बट स्वीट आणि क्रिस्पी असला पाहिजे. वाचकाला जास्त स्क्रोल न करावे लागता संपूर्ण स्टोरी आशयासह समजली पाहिजे. या आणि आणखी व्यवधानांसाठी डॉ. मुळे यांनी एक स्टाइलबुकच तयार केलं. त्यामुळं कन्टेन्टच्या आमच्या टीमवर जबाबदारी होती- ती प्रत्येक स्टोरीला शॉर्ट पण आशयसंपन्न बनवण्याची. राज्यभरातून आलेला मजकूर हा प्रिंटच्या साच्यातला असल्यामुळं एक हजार ते अडीच हजार इतक्या शब्दसंख्येचा प्रत्येक लेख होता. आम्ही त्या साऱ्या यशकथा वाटून घेऊन संपादनाचं काम सुरू केलं. कितीही शब्दसंख्येचा लेख असला तरी त्याला पाचशे ते आठशे शब्दांत बसवण्याचं काम आम्ही पत्रकारितेमधला सारा संपादनाचा अनुभव पणाला लावून करत होतो. पण, पुढं गंमत अशी झाली की, महान्यूजची ट्रायल पेजेस तयार झाली, तेव्हा त्यामध्ये आम्ही संपादित केलेला मजकूर एका सिंगल स्क्रोलमध्येच बसत होता. त्यामुळं आमच्या अपेक्षेपेक्षा तो खूपच शॉर्ट वाटत होता. म्हैसकर मॅडमनाही ते पटलं आणि आम्ही पुन्हा ते सारे लेख बाराशे ते दीड हजार शब्दांचे केले. मूळचे लेख माहीत असल्यामुळं ते फारसं अवघड गेलं नसलं तरी हे वाढीव कामही आम्ही तातडीनं पूर्ण केलं.
लाटकर सरांनी डमी साइट आमच्या हवाली केली. त्यावर काम सुरू झालं. साइटमधल्या त्रुटी जशा लक्षात येतील, तशा आम्ही आमच्या तांत्रिक टीमला आणि वरिष्ठांना सांगत होतो. त्यावर काम केलं जात होतं. ऑफिसमध्ये दररोज दिवसातून तीनवेळा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हायचं ते बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये. पहिलं सकाळी कार्यालयात आल्या आल्या- त्यात दिवसभराचं नियोजन केलं जायचं. दुपारी तीनच्या बैठकीत त्या नियोजनाचा फॉलोअप आणि स्टेटस पाहिला जायचा. आवश्यक तिथं ॲडिशन, डिलीशन व्हायचं आणि संध्याकाळी पाचच्या बैठकीत मजकुरावर अंतिम हात फिरवला जायचा. कामाची एक कॉर्पोरेट स्टाइल ठरुन गेली. दरम्यानच्या काळात वर्षा फडके-आंधळे या नव्या महिला अधिकाऱ्यासह बी.के. झंवर, संजय ओरके व नव्यानं निवड झालेले नंदकुमार वाघमारे, संतोष तोडकर, अंजू कांबळे, मंगेश वरकड आणि प्रमोद धोंगडे ही ताज्या दमाच्या माहिती अधिकाऱ्यांची फळीही महान्यूज टीमला जॉइन झाली आणि कामाचा झपाटा आणखीच वाढला. महान्यूज टीम त्यावेळी महासंचालनालयाच्या (चांगल्या अर्थाने) हेव्याचा विषय होती. कारण आम्ही सारे जण नेहमीच एकत्रित आणि युनिक राहण्याचा प्रयत्न करत असू. म्हैसकर मॅडम आणि बेलसरे मॅडमही हौशी! त्यामुळं महान्यूज टीमनं ठरविलेल्या ड्रेसकोडमध्ये त्याही सामील होत असत. किंबहुना, तो ठरविण्यात त्यांचाही पुढाकार असे.
असं असताना कामाचा ताणही होता. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उद्घाटनासाठी दिलेली 19 सप्टेंबर 2008 ही तारीख जवळ येईल, तसतसा आमचा उत्साह आणि मनावरचा तणाव वाढतच होता. त्या काळात सकाळच्या सत्रात बेलसरे मॅडमनी त्यांच्या केबीनमध्ये आमच्यासाठी योगाची सेशनही घेतली आहेत.
उद्घाटनासाठी आमच्या प्रत्येक टीम मेंबरनं काही घोषवाक्यही तयार केली होती. त्यावर चर्चा होऊन त्यातल्या काही निवडक घोषवाक्यांचे स्टँडी तयार करून उद्घाटनाच्या ठिकाणी लावण्याचं ठरलं. 'वर्षा' बंगल्यावर सकाळी उद्घाटन होणार होतं. त्यासाठी वेगळं काय करता येईल, यावर विचारमंथन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी फ्लॅशमध्ये एक प्रोग्राम तयार करून मुख्यमंत्र्यांनी माऊस क्लिक करताच अगदी चौघडे, ढोलताशांच्या गजरासह (हे सारं व्हर्च्युअलच!) एक महाद्वार उघडते आणि त्यातून महान्यूजचा लोगो सामोरा येतो आणि लगेच पोर्टलचे होम पेज उघडते, अशी कल्पना मांडली. महासंचालकांनी ती उचलून धरली आणि अष्टपुत्रे सरांनी तसा प्रोग्राम तयार करवूनही घेतला.
या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांना पोर्टलबद्दल लाइव्ह प्रेझेंटेशन देण्याचेही ठरले होते. त्यासाठी नॅरेशनला म्हैसकर मॅडम आणि प्रेझेंटेशनच्या लॅपटॉपवर मी बसावे, असे ठरले होते. या ठिकाणीही मॅडमच्या क्राइसिस मॅनेजमेंटच्या व्यवधानाची प्रचिती आली. समजा, पोर्टल ऐनवेळी ऑनलाइन उघडले नाही, तर प्लॅन ए, बी आणि सी अशी तयारी करण्यात आली. 'प्लॅन ए'मध्ये पोर्टलची एचटीएमएल पेजेस लॅपटॉपवर सेव्ह करण्यात आली. ऑनलाइन पोर्टल नाही उघडले तर ही पेजेस 'ॲज इट इज' दाखवायची. तोही प्लॅन वर्क नाही झाला तर, 'प्लॅन बी'मध्ये पोर्टलच्या सर्व पेजेसचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केले गेले. आणि 'प्लॅन सी'मध्ये त्या प्रेझेंटेशनची हँड-आऊट्सही तयार ठेवण्यात आली. प्लॅन सी पर्यंत जावे लागणे शोभादायक नव्हते, पण ती तयारी आम्ही ठेवली होती. उद्घाटनाच्या दिवशी क्रीम कलरच्या ड्रेसकोडमध्ये महान्यूज टीम 'वर्षा' बंगल्यावर पोहोचली. उद्घाटन समारंभ अगदी झोकात पार पडला. मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी या प्रकल्पाबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले आणि त्याच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. म्हैसकर मॅडमचे नॅरेशन आणि माझे प्रेझेंटेशन यांचं ट्युनिंग अगदी उत्तम जमलं. त्यामुळं दुपारी मंत्रालयाच्या मिनी-थिएटरमध्ये पत्रकार परिषदेमध्येही त्यांच्यासमवेत प्रेझेंटेशनला मीच उपस्थित राहिलो. अशाच पद्धतीनं मग राजभवनवर तत्कालीन राज्यपाल एस.सी. जमीर आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही प्रेझेंटेशन देण्यात आले. राज्यपालांनी त्यावेळी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता, "या तुमच्या उपक्रमाचा माझ्या चंद्रपुरातल्या आदिवासी बांधवांना काय लाभ होणार?" त्यावर म्हैसकर मॅडमनीही खूप प्रभावी उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "सर, आम्ही त्यांच्यासाठीच्या साऱ्या योजनांची माहिती या पोर्टलवर देणार आहोत, जेणे करून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय, अशासकीय व्यक्ती, संस्थांना त्यांची माहिती होईल आणि सरकारी दफ्तरातून त्यासंदर्भात थेट मदत मिळवून देता येईल किंवा काम करता येईल. भविष्यात त्यांच्यापर्यंत सहज पोहोचण्याचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय असेल. तंत्रज्ञानाचे लाभ तिथपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम आम्ही आरंभला आहे." आज त्यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला येते आहेच.
उद्घाटन झालं, पण आता महान्यूज टीमची जबाबदारी वाढली होती. पहिल्या तीन दिवसांतच दहा हजारांहून अधिक हिट्स पोर्टलला मिळाल्या. यावरुन लोकांचं पोर्टलवर बारकाईनं लक्ष आहे, हे दिसत होतं. माझ्याकडं त्यावेळी तारांकित हे यशकथांचं आणि आलेख हे विविध शासकीय योजनांची माहिती देणारं सदर आणि लोकराज्य यांची जबाबदारी होती. त्याशिवाय, अन्य साऱ्या सदरांचा आणि सर्व बातम्यांचा मजकूर प्रूफरिडींगसह फायनल करण्याची जबाबदारीही माझ्यावर होती. खूप काटेकोरपणे काम करावं लागत असे. एक चूकही महागात पडेल, असा तो नाजूक कालखंड होता. टीममधल्या सर्वांनाच याची जाणीव होती, म्हणून कित्येकांनी आपल्या कितीतरी सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्यांचा स्वखुशीनं बळी दिला होता. मी स्वतःही चार-पाच महिन्यांहून अधिक काळ एकही दिवस सुटी न घेता अखंडितपणे काम केले.
म्हैसकर मॅडमनाही आमच्यावरील या दडपणाची जाण होती. त्यामुळंच महान्यूजला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी त्यांनी सर्व टीमला एक मस्तपैकी पार्टी दिली आणि त्याचवेळी सर्वांच्या कामाचं कौतुक करणारी प्रशस्तीपत्रंही प्रदान केली. हा आम्हा साऱ्यांसाठी एक अनपेक्षित आणि सुखद धक्का होता.
या ॲप्रिसिएशननं भारावलेली महान्यूज टीम पुन्हा नव्या जोमानं कामाला लागली ती अगदी आजतागायत अथकपणे कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात म्हैसकर मॅडम मुंबई महानगरपालिकेत गेल्या. मी सुद्धा उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी झालो, एमटीडीसीत मॅनेजर, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी, रायगड जिल्ह्याचा माहिती अधिकारी आणि आता शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी झालो, तरी माझ्या महान्यूज टीमच्या प्रगतीवर मी नेहमीच नजर ठेवून असतो. अलीकडं पोर्टलनं नवं रुप धारण केलं, ऑनलाइन मिडियामध्ये असे कालसुसंगत बदल करणं आवश्यकही आहे. आता तर ई-प्रशासनाच्या सुवर्ण पुरस्काराची मोहोरही महान्यूज टीमच्या कामगिरीवर उमटली आहे. यावेळी पुन्हा म्हैसकर मॅडमच माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव आहेत, ही सुद्धा अत्यंत योगायोगाची गोष्ट. त्यामुळंही महान्यूज टीमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. मी आज त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नाही, पण या साऱ्या आठवणी उचंबळून येत असताना किती लिहू अन् काय लिहू, असं मला झालं आहे. महान्यूज टीमच्या कामगिरीचा मला निरतिशय अभिमान आहे. सुवर्ण पुरस्कार प्राप्त महान्यूजच्या पायोनिअर टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला काम करता आलं, अशी अभिमानाची भावना मनी दाटून येते आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलंच, हेच खरं!

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

दशक ‘फेसबुक’चं!



 
(रविवार, दि. २ फेब्रुवारी २०१४ रोजी 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीत 'फेसबुक'च्या दशकपूर्तीच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेला माझा लेख ब्लॉग वाचकांसाठी खास शेअर करीत आहे. पुरवणी संपादक आणि माझे ज्येष्ठ सहकारी-मार्गदर्शक श्री. जयसिंग पाटील यांनी आवर्जून लिहायला लावून तो प्रसिद्ध केला. याबद्दल त्यांना आणि पुढारी-बहार टीमला मनापासून धन्यवाद!- आलोक जत्राटकर)

दहा वर्षांपूर्वी फेसबुक तयार केले, तेव्हा वाटले होते- आमचे काम झाले; आता त्याची पुढची बांधणी जगासाठी कुणीतरी करेलच. पण, ते कुणीतरीआम्हीच असू, याची मात्र कल्पना नव्हती.” 
                                                                    - मार्क झुकेरबर्ग

येत्या मंगळवारी, तारीख ४ फेब्रुवारी आहे, असं मी आपल्याला सांगितलं, तर तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? दर मंगळवारी कुठली ना कुठली तारीख असतेच किंवा दर ४ फेब्रुवारीला कोणता ना कोणता वार असतोच! मग..? दहा वर्षांपूर्वी म्हणजे सन २००४च्या ४ फेब्रुवारीच्या पहाटे अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉर्मेटरीमध्ये राहणाऱ्या मार्क एलियॉट झुकेरबर्ग या विद्यार्थ्यालाही तसं काही विशेष वाटण्याचं कारण नव्हतं, जेव्हा त्यानं आपल्या चार साथीदारांसह गंमती-गंमतीत फेसमॅश हे ॲप्लीकेशन लाँच केलं होतं. पण, गेल्या दहा वर्षांत मात्र त्या ॲप्लीकेशननं फेसबुकच्या रुपात ४ फेब्रुवारीला जागतिक सोशल नेटवर्किंगच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान प्रदान केलं आहे.
येत्या ४ फेब्रुवारीला फेसबुकच्या स्थापनेला दहा वर्षं पूर्ण होताहेत. मार्क झुकेरबर्गनं फेसबुकची सुरवात कशी केली, एका ड्रॉप-आऊट विद्यार्थ्यानं जगातल्या सर्वाधिक प्रभावी कंपनीचा सर्वाधिक तरुण संस्थापक आणि सर्वात श्रीमंत सीईओ होण्यापर्यंत कशी मजल मारली, हा इतिहास तर आता जवळजवळ साऱ्यांनाच माहिती झालाय. आपल्या मैत्रिणीशी आठ वर्षांपर्यंत प्रामाणिक राहून तिच्याशीच त्यानं कित्ती साधेपणानं विवाह केला, याचीही चर्वितचर्वणं खूप झालीयेत. त्यामुळं त्या तपशीलात किंवा इतिहासात न शिरता गेल्या दहा वर्षांत फेसबुकनं आपल्याला काय दिलं किंवा फेसबुकच्या जागतिक यशाचं रहस्य काय, तसंच भवितव्य काय? याविषयी मात्र नक्कीच चर्चा व्हायला हवी.
दशकपूर्ती साजरी करत असतानाच गेल्या २९ जानेवारीला फेसबुकच्या गत वर्षाखेरीच्या (३१ डिसेंबर २०१३) कामगिरीचे आकडे जाहीर झाले आहेत आणि ते या कंपनीशी संबंधित सर्वच स्टेकहोल्डर्ससाठी आनंददायी असे आहेत. सन २०१३मध्ये फेसबुकनं ७.८७ अब्ज डॉलर इतकी उलाढाल केली. गतवर्षीच्या तुलनेत ५५ टक्क्यांहूनही ती अधिक आहे. विविध प्रकल्पांमधून फेसबुकनं वर्षभरात २.८० अब्ज डॉलर मिळविले. त्यामध्ये कंपनीची निव्वळ मिळकत दीड अब्ज डॉलर इतकी आहे. फेसबुकच्या दैनंदिन वापरकर्त्यांची (युझर) सरासरी संख्या ७५७ दशलक्षांवर गेली आहे. गतवर्षीपेक्षा ही संख्या २२ टक्क्यांनी वाढली आहे. त्यात मोबाईलवरून फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ५५६ दशलक्ष इतकी आहे. यामध्ये तर गतवर्षीपेक्षा विक्रमी ४९ टक्के वाढ झाली आहे. दरमहा सक्रिय सदस्यांची संख्या १.२३ अब्ज असून त्यातही १६ टक्के वाढ आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दैनंदिन फेसबुक वापरणाऱ्यांपैकी सुमारे ८१ टक्के लोक हे अमेरिका आणि कॅनडाबाहेरचे आहेत.
ही आकडेवारीच अतिशय बोलकी आहे. दहा वर्षे हा काही फार मोठा कालावधी नाही, तथापि, सोशल नेटवर्किंग साइट्सचा आज अक्षरशः भडीमार होत असताना त्या झंझावातामध्ये अशा सातत्यपूर्ण कामगिरीची नोंद करणं, ही खरं तर खूपच आव्हानात्मक बाब आहे आणि ती फेसबुकनं साध्य केली आहे.
माय-स्पेस, ऑर्कुट, बझ, गुगल प्लस अशा काही जगभरात पॉप्युलर असणाऱ्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या आस्तित्वाचा थोडासा आढावा घेतला तर फेसबुकच्या प्रगतीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. उपरोल्लेखित चारपैकी माय-स्पेस वगळता उर्वरित तीनही सेवा या गुगल कंपनीच्या आहेत. ऑर्कुटची सुरवात ही २००४च्याच जानेवारीमध्ये झाली, म्हणजे फेसबुकच्याच आसपास. ऑर्कुटने झटपट भरारीही घेतली, विशेषतः ब्राझील आणि भारतामध्ये मोठीच लोकप्रियता ऑर्कुटनं मिळवली. पण, एकूण वापरकर्त्यांपैकी सुमारे ५९ टक्के लोक हे एकट्या ब्राझीलमधील असल्यानं कंपनीनं ऑर्कुटचा बेस ब्राझीलला हलवला. दरम्यानच्या काळात फेसबुकनं ऑर्कुटची जागा अगदी वेगानं घेतली. बझ ही सेवा सुद्धा गुगलनं जी-मेलच्या वापरकर्त्यांना प्रदान केली खरी. मात्र फेब्रुवारी २०१०मध्ये सुरू झालेली ही सेवा डिसेंबर २०११मध्ये बंद सुद्धा करावी लागली. यातून धडा घेत गुगलनं आता गुगल प्लस ही सोशल नेटवर्किंगच्या पुढं जाऊन त्यांच्या सर्वच सेवांसाठीची आयडेंटिटी सर्व्हीस म्हणून सुरू केली आणि जी-मेल, यू-ट्यूबच्या वापरकर्त्यांचा खूप मोठा बेस आधीच तयार असल्यानं या सेवेच्या वापरकर्त्यांची संख्या २५ दशलक्षांवरुन (जुलै २०११) ५४० दशलक्षांवर (ऑक्टोबर २०१३) पोहोचली. यामध्ये वापरकर्त्यांपेक्षा कंपनीच्या क्लृप्त्यांचा मोठा वाटा आहे, असं म्हटलं पाहिजे. माय-स्पेस ही अमेरिकेतली संगीतविषयक आघाडीची सोशय नेटवर्किंग साइट होती. सन २००५पासून २००८पर्यंत सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात माय-स्पेस आघाडीवरच होती. जून २००६मध्ये तर माय-स्पेसला भेट देणाऱ्यांची संख्या ही गुगलपेक्षाही अधिक होती. सन २००९मध्ये माय-स्पेसला फेसबुकनं मागं टाकलं. त्यानंतर कित्येक बदल केल्यानंतरही आणि झिंगा, रॉक यू सारखे गेमिंग आणि म्युझिक प्लॅटफॉर्म लाँच केल्यानंतरही माय-स्पेसला आपलं पूर्वीचं स्थान मिळवणं काही शक्य झालेलं नाहीय. पाच वर्षांपेक्षाही कमी कालावधीत या सर्व घडामोडी घडल्या.
कितने आए, कितने गए तरीही फेसबुकचं स्थान, त्याची लोकप्रियता दहा वर्षे सातत्यानं कायम आहे. यामागे फेसबुकनं जाणीवपूर्वक स्वीकारलेलं बदलांचं धोरण सर्वाधिक कारणीभूत आहे, असं मला वाटतं. माझा एक तरुण मित्र विनायक पाचलग यानं या बदलांना थिअरी ऑफ चेंज (बदलते जग दीपावली विशेषांक २०१३) असं अगदी समर्पक नाव दिलंय. इंटरनेटचं, सोशल नेटवर्किंगचं जग हे आभासी आहे. प्रत्यक्ष जीवनात तोच-तो पणाचा आपल्याला कंटाळा येतो, ते तत्त्व या आभासी जगतालाही लागू आहे, कदाचित प्रत्यक्षाहूनही अधिक प्रकर्षानं! त्यामुळं झुकेरबर्ग यानं फेसबुकचं रुप अगदी सुरवातीपासून कमीअधिक प्रमाणात बदलतं ठेवलं आहे; कधी दृश्य स्वरुपात, तर कधी युझर फ्रेंडलीनेसच्या स्वरुपात. त्यामध्ये प्रामुख्यानं वॉलची निर्मिती (सप्टेंबर २००४), विद्यापीठांबरोबरच हायस्कूलपर्यंतही सेवेचा विस्तार (सप्टेंबर २००५), १३ वर्षांवरील सर्वांना फेसबुकवर येण्याची संधी आणि न्यूज फीड या सर्वाधिक लोकप्रिय सेवेची सुरवात (सप्टेंबर २००६), प्रोग्रामर डेव्हलपर्ससाठी प्लॅटफॉर्मची निर्मिती (मे २००७), फेसबुक चॅटची सुरवात (एप्रिल २००८), लाइक सेवा सुरू (फेब्रुवारी २००९), लोकेशन फीचर (ऑगस्ट २०१०), टाइमलाइनचे आगमन (सप्टेंबर २०११), जाहिरातदारांना स्टेटस, फोटो, मेसेज अपडेट करण्याची संधी (फेब्रुवारी २०१२), फोटो आणि प्रोफाइल सर्च करणाऱ्या ग्राफ सर्चची सुरवात (जानेवारी २०१३) आदी सेवांचा समावेश आहे. वापरकर्त्यांसाठी या सुविधांची निर्मिती करत असतानाच कंपनी म्हणूनही फेसबुकनं आपला विस्तार कौशल्यानं वाढवला आहे. नॅसडॅकमध्ये लिस्टेड कंपनी म्हणून पब्लीक होण्याबरोबरच इन्स्टाग्रामसारखी कंपनी टेकओव्हर करण्यासारख्या अनेक समयोचित निर्णयांचा त्यामध्ये समावेश आहे.
खरं तर केवळ ॲपिअर, कनेक्ट ॲन्ड शेअर या मूलभूत त्रिसूत्रीवर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटचा डोलारा अवलंबून असतो. पण, फेसबुकनं या तिन्ही गोष्टी उपलब्ध करून देत असतानाच त्यामध्ये जाणीवपूर्वक पण अगदी हळूवार असे काही बदल केले. ते लोकांच्या पचनी पडल्यानंतरच त्यांनी पुढच्या बदलांना हात घातला आणि त्याहूनही वापरकर्त्यांना अधिक आणखी काय सेवा देता येतील, याचा सातत्यानं विचार केल्याचं दिसतं. हे फेसबुकच्या यशाचं महत्त्वाचं कारण म्हणून अधोरेखित करता येईल.
फेसबुकच्या आस्तित्वानं आपल्याला काय दिलं, याचा विचार केला तर, या माध्यमानं आपली अर्थात मानवाची मूलभूत अशी संवादाची आणि अभिव्यक्त होण्याची गरज भागविण्यास मोठी मदत केली, असं म्हणता येईल. आजच्या धावपळीच्या युगात संवाद हरवत चालला आहे, असं सरधोपटपणे आपण म्हणत असलो, तरी त्यात शंभर टक्के तथ्यही आहे. हा संवाद प्रस्थापित करण्याचं, जुन्या-नव्या मित्रांशी, कुटुंबियांशी कनेक्ट करण्याचं आणि त्यांच्याशी नव्यानं जोडलं जाण्याचं महत्त्वाचं काम, भलेही ते आभासी असेल, पण फेसबुकनं केलं आहे. स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर तर हे प्रमाण अत्यधिक वाढल्याचंही वर दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. भारतामध्येही स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट, पर्यायानं सोशल नेटवर्किंग साइट वापराचं प्रमाण वाढत असल्याचं इंटरनेट अन्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालावरुन स्पष्ट झालं आहे. या अहवालानुसार, जून २०१२मध्ये देशातल्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १५ कोटी होती, त्यात स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणारे ६.८० कोटी लोक होते. जून २०१३मध्ये हे प्रमाण १९ कोटींमध्ये १३ कोटी इतकं वाढलं तर जून २०१४मध्ये ते २४.३० कोटींमध्ये १८.५० कोटी इतकं होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे स्मार्टफोनमुळंही फेसबुकच्या वापराला आणि शेअरिंगला अधिक बूस्ट मिळतो आहे, असं म्हणता येईल. आजच्या युगात हे शेअरिंग आणि कनेक्ट होणं, खूप महत्त्वाचं बनलं आहे- मूलभूत गरजांबरोबरच अनेक कृत्रिम-व्यावसायिक गरजा भागविण्यासाठी सुद्धा. त्यामुळं नजीकच्या काळात फेसबुकची गरज किंवा आस्तित्व संपुष्टात येईल, याची शक्यता दिसत नाही. मात्र, त्या धोक्याची जाणीव ठेवून झुकेरबर्गनं पुढची पावलं उचलायला सुरवात केली आहे.
ओपन कॉम्प्युट प्रोजेक्ट (Open Compute) आणि इंटरनेट डॉट ऑर्ग (Internet.org) ही त्याची पुढची दोन पावलं आहेत. फेसबुकच्या पुढाकारानं हाती घेण्यात आलेल्या ओपन कॉम्प्युट प्रकल्पामध्ये  संगणक, नेटवर्किंग क्षेत्रातल्या इंटेल, मायक्रोसॉफ्टसह जगभरातील १५० कंपन्यांना सामावून घेण्यामध्ये झुकेरबर्गला यश आलं आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची निर्मिती आणि वापर यांच्या साह्यानं व्यवस्थापन, ऊर्जा आणि क्रयशक्तीवरील खर्च वाचविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. विशेषतः इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या सर्व्हर नेटवर्किंग, सर्व्हर शेअरिंग, इंटरनेटवर्किंग, केबलिंग अशा अनेक गोष्टींचा या प्रकल्पांतर्गत फेरविचार करण्यात येणार आहे. सेकंदाला ४ अब्ज ऑपरेशन्स होणाऱ्या फेसबुकनं ओपन सोर्स संसाधनांचा वापर करून गेल्या तीन वर्षांत व्यवस्थापन आणि ऊर्जेवरील खर्च १.२ अब्जांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. जागतिक स्तरावर ही गोष्ट आता झुकेरबर्गला साध्य करायची आहे. भावी काळात ही मोठी क्रांतीकारक बाब ठरणार आहे. त्याचबरोबर आयोवा आणि स्वीडनमधील प्रकल्पांसाठी पवन ऊर्जा आणि हायड्रो-इलेक्ट्रीक सिस्टीमचा वापर करून सुमारे ४० हजार घरांना लागणाऱ्या ऊर्जेइतकी बचत फेसबुकनं साध्य केली आहे. ग्रीन प्लॅनेट हा त्याचा पाया आहे. इंटरनेट डॉट ऑर्ग या प्रकल्पाअंतर्गतही सध्या पृथ्वी ज्या पद्धतीनं जोडली गेली आहे, त्या पद्धतीमध्येही मूलभूत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं झुकेरबर्ग प्रयत्नशील आहे. म्हणजे फेसबुकचं पुढचं पाऊल हे वैश्विक कनेक्टिव्हीटीमध्येच प्रवर्तित करण्याचा फेसबुकच्या प्रवर्तकाचा मानस असल्याचं सध्या तरी दिसतंय.
----
काही नकारात्मक बाजू

फेसबुक फोबिया वाढतोय!
फेसबुकवर सर्वाधिक वावर हा पौगंडावस्थेतील आणि विशी-पंचविशीतल्या तरुणाईचा आहे. या व्हर्चुअल जगतामध्ये त्यांचा अतिशय सुरक्षित वावर आहे. त्यांना इथे थेट कोणताही धोका उद्भवण्याची शक्यता नसते. तथापि, या आभासी जगताची सवय झालेल्या मनाला वास्तव जगामधील अनुभव कदाचित खूप हार्ष, भयंकर वाटण्याची शक्यता अधिक निर्माण होते. मानसिकदृष्ट्या कोलमडून पडण्याची शक्यता इथे वाढते.
फेसबुकवर प्रत्येक गोष्ट विनाकारण शेअर करायची आणि त्यावर प्रतिक्रिया आजमावण्याची, तसंच तिथल्या लाइक्स आणि कॉमेंट्सवर आपलं सोशल स्टेटस ठरवण्याची अत्यंत चुकीची सवय इथं लागते. अभ्यास करण्याच्या वयामध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांचं लक्ष स्मार्टफोन किंवा टॅबकडं लागून राहणं याचा दुसरा अर्थ म्हणजे त्याचं अभ्यासावरचं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण कमी होणं, असा आहे. अभ्यासामधली प्रगती कमी म्हणजे भविष्यातल्या इतर शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधींचीही कमी, असा थेट परिणाम होण्याची शक्यता वाढते. या सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे भेडसावणाऱ्या व्यसनाधिनतापूर्ण मानसिक रोगालाही 'फेसबुक फोबिया' असं नाव मानसोपचार तज्ज्ञांनी दिलं आहे. या रोगाने ग्रस्त असणाऱ्या युवा वर्गाचं प्रमाण जागतिक स्तरावर चिंताजनकरित्या वाढू लागलं आहे. अत्यंत पराकोटीची नैराश्यग्रस्तता हा या रोगाचा अल्टिमेट अंतिम परिणाम आहे.
सायबर गुन्हेगारीत वाढ
व्यक्तिगत पातळीवर होणाऱ्या या रोगाबरोबरच आपण मांडलेली अतिरेकी, टोकाची मतेही दुराग्रही पद्धतीने रेटण्याची मानसिकता या माध्यमामुळे निर्माण होत असल्याचेही अलीकडे निदर्शनाला येऊ लागले आहे. व्यक्तिगत अजेंडा राबवायला कोणाची हरकत असण्याचं कारण नाही, परंतु ते विधायक असलं पाहिजे, समाजाचं, राष्ट्राचं आणि अखिल मानव जातीचं व्यापक हित त्यातून जपलं, जोपासलं गेलं पाहिजे. प्रत्यक्षात बऱ्याच जणांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. समाजविघातक, देशविरोधी कारवायांची किंवा व्यक्तिद्वेषमूलक आक्रमक आरोपणांची पेरणी इथं होताना दिसते आहे. असे विघातक समानधर्मी लोकांचे समूह इथं स्थापन होताहेत. रेव्ह पार्ट्यांची आमंत्रणं इथून वाटली जाताहेत, दहशतवादी हल्ल्यांचे कट इथं आखले जाताहेत, हे खूपच भयावह आहे. त्यामुळं सायबर गुन्हे शाखेचं कामही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आणि हे केवळ देशात नाही, तर एकूणच जगभरात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मैत्रीच्या आवरणाखाली फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. फेक अकाऊंट उघडून त्या माध्यमातून तरुण तरुणींची फसवणूक आणि चारित्र्यहननही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं आहे. नकळत्या वयामध्ये नको त्या पद्धतीने सेक्शुअल मटेरिअलचा मारा तारुण्यात येऊ घातलेल्या युवक-युवतींवर सुरू आहे. त्यातून एकूणच निकोप स्त्री-पुरूष संबंधांपेक्षा लिंगभेदसापेक्ष, लिंगवर्चस्ववादी विचारसरणीचा भडिमार त्यांच्यावर होतो आहे. त्यातूनही अनेक सामाजिक समस्या आणि गुन्हेगारीला खतपाणीही इथूनच मिळत आहे. आणि या माहितीच्या या प्रस्फोटाला नियंत्रित करणं, ही आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
गरज सेल्फ रेग्युलेशनची!
फेसबुक, पर्यायानं सोशल मिडिया हे आपलं भवितव्य आहेच, हे नाकारता येत नसलं तरी त्याचा संयमित, नियंत्रित आणि व्यापक सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून  वापर केला जाणे ही खूप आवश्यक बाब आहे. आणि ती केवळ सेल्फ रेग्युलेशनच्या माध्यमातूनच शक्य आहे. तरुणांनी जसा या माध्यमाला ॲक्सेप्टन्स दिला आहे, त्याच प्रमाणे सेल्फ रेग्युलेशन मेथडही त्यांनीच ॲडॉप्ट करणे, डेव्हलप करण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे.
--
'फेसबुक'संदर्भात काही मनोरंजक तथ्ये
·         गतवर्षी फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते त्या देशाचे नागरिक आहेत, असे गृहित धरले तर फेसबुक हा चीन आणि भारताच्या पाठोपाठ जगातील तिसरा सर्वात मोठा तसंच अमेरिकेपेक्षाही मोठा देश ठरला असता.
·         सन २०१०मध्ये झुकेरबर्गच्या आयुष्यावर बेतलेला द सोशल नेटवर्क हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेस्सी आयसेनबर्ग याने झुकेरबर्गची भूमिका केली होती. या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले.
·         सन २०११मध्ये जगातील एक तृतीअंश घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये फेसबुकचा मोलाचा वाटा असल्याचे दिसून आले.
·         सन १९४४मध्ये डेन्मार्कपासून स्वतंत्र झाल्यापासून आइसलँडला स्वतःची राज्यघटनाच नव्हती. सन २००८मधल्या आर्थिंक मंदीमुळे त्यांना ती तयार करावी लागली. आणि सुमारे २५ सदस्यांनी घटना तयार केल्यानंतर ती फेसबुकवर शेअर करून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या. अंतिम मसुदाही वेबसाइटबरोबरच फेसबुकवर ठेवण्यात आला.
·         फेसबुकच्या यु.आर.एल.च्या पुढे /4 हा आकडा टाकला की थेट मार्क झुकेरबर्गच्या वॉलवर पोहोचता येते.
·         फेसबुकची सॉफ्टवेअर यंत्रणा हॅक करून ती अधिकाधिक सक्षम करण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करणाऱ्याला ५०० डॉलरचे बक्षीस देण्यात येते.
·         आपल्या आईच्या मृत्यूविषयीची पोस्ट लाइक न केल्यामुळे एकाने आपल्या पत्नीला मारहाण केली, तर फ्रेंडलिस्टमधून अनफ्रेंड केल्याबद्दल संबंधिताचा खून केल्याचीही घटना घडली.
·         फेसबुकवर आल्यानंतर परत जाणाऱ्यांचे प्रमाण हे ३.७४ इतके अत्यल्प आहे.
·         फेसबुकवरील प्रोफाइल पिक बदलण्याचे प्रमाण २००६च्या तुलनेत तिप्पट झाले आहे.
--००--