शुक्रवार, ८ मार्च, २०२४

'ब्रेकिंग न्यूज'चे स्वागत...




इट्स ऑल्वेज बेटर लेट, दॅन नेव्हर...  ती वेळ मात्र यावी लागते. 

पत्रकारितेमधील आमचे एक (खरेखुरे) अजातशत्रू मित्र विजयकुमार पाटील यांच्या 'ब्रेकिंग न्यूज' या पुस्तकाचा कच्चा मसुदा वाचून काही वर्षं झाली, तेव्हापासून हे पुस्तक लवकरात लवकर आलं पाहिजे, यासाठी आग्रही होतो. कारण न्यूजच्या अलीकडील माहिती देणारं आणि फीचरच्याही पलीकडील असं हे लेखन आहे. त्यांनी ज्या काही ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी केल्यात, त्यातीलच काही निवडक अद्भुतमय, रहस्याच्या जवळ जाणाऱ्या पण तरीही वास्तव अशा गोष्टींचं अतिशय वाचनीय असं हे संग्रहण आहे. केवळ स्टोरीजचं संग्रहण नाही, तर त्या स्टोरीमागील स्टोरीजचा यात समावेश आहे. यात बच्चनला 'पती' मानून त्याच्याच नावचे उखाणे घेणाऱ्या शानूरपासून ते शाहू महाराजांनी उभारलेल्या देशातल्या पहिल्या ग्रीनहाऊसच्या स्टोरीजचा समावेश आहे. अशा १८ स्टोरी पुस्तकात आहेत. मात्र, यातली शामराव -विशाखाची प्रेमकहाणी काळजात खोलवर रूतून बसणारी. पत्थरालाही पाझर फोडेल अशी. शंभर वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर अशी एकही प्रेमकथा रुपेरी पडद्यावर आलेली नाही, हे मी पैजेवर सांगतो. इतकी उदात्त, निर्मळ आणि खरीखुरी प्रेमकथा विजयरावांनी जगासमोर आणलीय. बाकी १७ कथा एकीकडे आणि ही एकीकडे. वाचकांनी केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी पुस्तक घेतलं तरी पैसावसूल.

 अशा या पुस्तकातून एका सजग पत्रकाराच्या वृत्तपत्रीय लेखनामागील प्रेरणांचा, सामाजिक संवेदनांचा एक उत्तम दस्तावेज या निमित्ताने साकार झाला आहे. त्यात विजयरावांची लेखनशैली संवादी अन् प्रवाही असल्यामुळं वाचक त्यात गुंततो आणि एकामागून एक स्टोरी वाचत जातो. वाचकाला भावनिक हिंदोळ्यावर झुलवत ठेवण्याचं काम या स्टोरी करतात. एखाद्या कथांचं पुस्तक असल्याप्रमाणं वाचक या स्टोरी पुनःपुन्हा वाचण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यामागील सच्च्या जाणीवा वाचकाच्या विवेकाला, माणूसपणाला आवाहन करीत राहतात, ही या पुस्तकाची जमेची बाजू. विजयरावांनी आता अधिक खुलेपणानं लिहीतं व्हावं, अशी एक मित्र म्हणून  अपेक्षा आहेच... त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

---

ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाविषयी...


पत्रकार विजय पाटील यांच्या ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाची प्रत माझ्या हाती आली, तेव्हा आणखी एक न्यूज फीचरचे पुस्तक बाजारात दाखल होते आहे, अशी प्रतिक्रिया माझ्या मनात उमटली. मात्र, घरी जाऊन मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतले, तेव्हा अगदी पहिल्या अमिताभला पती मानणाऱ्या शानूरच्या बातमीपासून माझ्या मनाची इतकी पकड घेतली की, ते वाचून संपवल्याखेरीज बाजूला ठेवणे झाले नाही. हे पुस्तक म्हणजे केवळ बातम्या किंवा फीचर यांचा संग्रह असल्याचा माझा गैरसमज या वाचनाने दूर झाला. एक वेगळे पुस्तक वाचल्याचे समाधानही लाभले.

लेखकाने खरे तर ब्रेकिंग न्यूजऐवजी ब्रेकिंग ऑफ न्यूज असे नाव द्यायला हवे होते, असाही विचार मनात चमकून गेला. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून पत्रकारिताविषयक साहित्याच्या क्षेत्रामध्ये लेखनाचा एक नवीन प्रवाह विजय पाटील सादर करीत आहेत, असे मला वाटते. हा प्रवाह म्हणजे एखाद्या अत्यंत वाचकप्रिय बातमीमागील बातमीची वाचकांना फोड करून सांगण्याचा आहे. विजय पाटील यांनी केवळ बातम्यांचा संग्रह केला असता तरी चालले असते कारण त्यांना मानवी संवेदनांना हात घालण्याची लेखनशैली साधलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बातम्या वाचकांना खिळवून ठेवतातच. मात्र, आपल्या लोकप्रिय बातम्यांमागील बातमी, त्यासाठी केलेली धडपड आणि त्या बातमीचा केलेला पाठपुरावा यासाठीची यातायात यांची खरी गोष्ट श्री. पाटील येथे सांगताहेत. आजकाल कॉलम भरण्याच्या नादात केवळ बातमी दिली जाते; मात्र, तिचा पाठपुरावा बातमीदारांकडून म्हणावा तितका होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, पाठपुरावा हा विजय पाटील यांच्या बातमीदारीचा एक महत्त्वाचा गुणविशेष आहे, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. हा पाठपुरावाही केवळ शब्दांचा अथवा घटनेचे वार्तांकन करण्यापुरता मर्यादित नाही, तर, संबंधित समस्या कायमस्वरुपी मिटविण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर संबंधितांना भेटून त्यावर तोडगा, मार्ग काढण्यास प्रवृत्त करणारा एक कृतीशील पाठपुरावा आहे. त्यांच्या या कृतीशीलतेचे दर्शन सदर पुस्तकात पानोपानी होते. तथापि, या निवेदनामध्ये विजय पाटील यांचा अभिनिवेश डोकावत नाही, तर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान त्यातून उमटलेले दिसते. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना आवश्यक असलेले पराकोटीचे सामाजिक जबाबदारीचे भान विजय पाटील यांच्या लेखणीत आणि व्यक्तीमत्त्वात आढळते. त्यांनी पत्रकार म्हणून पुस्तक लिहीले असले तरी त्यांच्यातल्या सहृदयी माणसाचे प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक आहे.

बातमीला किंवा वर्तमानपत्राला एक दिवसानंतरची रद्दी, असे काही जण उपहासाने म्हणतात. वर्तमानपत्रातील माहितीचा योग्य विनियोग नाही केला, तर त्या म्हणण्यातील वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही. तथापि, विजय पाटील यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या बातम्यांना चिरंतनत्व प्रदान केले आहे. हे चिरंतनत्व त्या बातमीबरोबरच तिच्या विषयालाही आपसूकच प्राप्त झाले आहे.

ह्युमन इंटरेस्ट स्टोरीजमध्ये किती प्रकारचे वैविध्य असू शकते, याची प्रचिती ब्रेकिंग न्यूज वाचताना येते. मात्र, हे वैविध्य जपत असताना विजय पाटील आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही हरपू देत नाहीत, ही बाब महत्त्वाची वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर, भुताच्या फोटोची बातमी असो, अगर प्रार्थना करणाऱ्या श्वानाची बातमी असो, त्यातील कुतुहलाचा भाग सांगण्याबरोबरच तज्ज्ञांची समर्पक प्रतिक्रिया घेऊन ते आपली बातमी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतात. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला घाबरून आत्महत्येला प्रवृत्त होणारी मुले असोत की अंधारात हरवलेली वसाहत असो, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते बातम्यांवर बातम्या लिहीतातच, पण बोर्डाच्या अध्यक्षांना भेटून, लोकप्रतिनिधींना भेटून त्या समस्येवर चोख तोडगा काढण्यासाठी प्रवृत्त करतात आणि त्यालाही व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्न करतात. हे विजय पाटील यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण, वैशिष्ट्य आहे.

हातात लेखणी आणि त्या लेखणीतून उमटणारा प्रत्येक शब्द छापणारे व्यासपीठ असले की, त्याची हवा पत्रकाराच्या डोक्यात जाण्यास वेळ लागत नाही. ती हवा त्याच्यातील अहंभावाला अधिकच वारे देत असते. ती कायम राखण्यासाठी मग कोणताही विधिनिषेध न बाळगता वाट्टेल त्या गोष्टीसाठी आपली लेखणी कोणाच्याही दावणीला बांधणारे अगर प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारे काही पत्रकार असतात. विजय पाटील त्यालाही अपवाद ठरतात. पत्रकारितेची हवा डोक्यात न जाऊ देता, सकारात्मकतेकडे झुकणारी त्यांची पत्रकारिता आहे, याचे दर्शनही या पुस्तकात घडते. ब्लॅक पार्टीची बातमी हे याचे ढळढळीत उदाहरण. पुण्यामध्ये अलीकडे स्तोम माजविलेल्या रेव्ह पार्टीच्या धर्तीवर कोल्हापुरातही ब्लॅक पार्टी झडत असल्याची बातमी अत्यंत कष्टाने, अगदी सप्रमाण मिळवून त्यांनी प्रसिद्ध केली. या बातमीमुळे प्रचंड सनसनाटी निर्माण होणे स्वाभाविक होते. तशी ती झालीही. या सनसनाटीच्या लाटेवर आरुढ होऊन इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्या पार्ट्यांचे फुटेज पुरवून ते आणखी पॉप्युलर होऊ शकले असते. पण, या क्षणीही त्यांनी कळत्या- न कळत्या वयात या पार्टीत सहभागी होणाऱ्या मुलांच्या भवितव्याचाच विचार केला. बातम्या छापून येतात, हे पाहून ती मुले पुन्हा तसे धाडस करणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या मनात होता. तो खराही ठरला. काही मुले त्यांना भेटावयास आली, त्यांचे यथाशक्ती कौन्सिलींगही त्यांनी केले आणि त्यांना या गर्तेत गुरफटण्यापूर्वीच बाहेर काढले. पत्रकार म्हणून बातमी दिली तेव्हाच त्यांचे काम संपले होते. पण, या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या परिघापलिकडे जाऊन आपले कर्तव्य बजावले, याचे समाधान मोठे आहे.

पर्यावरणाच्या रक्षणाप्रती असलेली त्यांची सजगता वाघाच्या आणि कासवांच्या तस्करीच्या बातम्यांतून झळकते. येथेही पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून रसद पुरवून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मदत करण्याची आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची त्यांची धडपड दिसून येते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याप्रती विजय पाटील यांच्या मनात असलेल्या निरतिशय आदराची प्रचितीही यातील काही बातम्यांतून येते. लोकोत्तर काम करणाऱ्या या राजाच्या कार्याचे जतन करण्याच्या जबाबदारीची जाणीव ते करून देतात.

यातील प्रत्येक बातमी आणि त्यामागील बातमी ही पानागणिक आपला पत्रकारितेवरील विश्वास अधिक दृढ करते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या स्तंभाला डळमळीत करण्याचे प्रयत्नही चहूबाजूंनी होत असल्याचेही दिसते. मात्र, विजय पाटील यांच्यासारख्या जागल्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या टोकावर हा स्तंभ तोलून धरला आहे. जोपर्यंत विजय पाटील यांच्यासारखे संवेदनशील पत्रकार या देशात आहेत, तोपर्यंत या देशातील नागरिकांचे घटनादत्त अधिकार आणि मानवी मूल्यांची प्रतिष्ठा सदोदित कायम राहील.

मंगळवार, ५ मार्च, २०२४

‘घरंदाज सावली’ अखेर प्रकाशात आली...




हॅलो, रजिस्ट्रार स्पिकिंग... माझ्याकडे अमूक नावाचा विद्यार्थी आला आहे... चांगला लायक आहे, शिकण्याची उमेद आहे. त्याला मी अॅडमिशन दिलं आहे. त्याला आपल्याकडं विभागात पाठवते. त्याचा फॉर्म वगैरे भरून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करा.... त्याला कमवा आणि शिका योजनेत सहभागी करून घेतलंय, प्रवेश द्या, खोली द्या.... भवनमधली प्रवेश क्षमता संपली असली तरी, या विद्यार्थ्याची आरोग्य केंद्रातल्या वाढीव विद्यार्थ्यांबरोबर राहायची सोय करा. शिकू द्या त्याला....

वर्तमानात एखाद्या विद्यार्थ्यालाच नव्हे, तर विद्यापीठाच्या कुलसचिवांना देखील स्वप्नवत आणि धाडसी वाटावं, असं हे विधान साधारण साठेक वर्षांपूर्वी एका महिला कुलसचिवांच्या तोंडून अनेक गरीब, होतकरू आणि उच्चशिक्षणेच्छु विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आलं आणि त्या विधानावर अनेकांची जीवननौका तरली, नव्हे महदअंतर कापून त्यांनी मोठमोठी पदे, प्रतिष्ठा मिळवली आणि आपल्या या मातेप्रती सदैव कृतज्ञता मनी बाळगली.

शिवाजी विद्यापीठात रुजू झाल्यापासून किंबहुना विद्यार्थीदशेपासून या विद्यापीठाच्या सुरवातीच्या कालखंडातील कुलसचिव डॉ. उषा इथापे मॅडम यांच्याविषयी प्रचंड कुतूहल मनी होतं. त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रंही मी संकलित केली. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि दुसऱ्या कुलसचिव डॉ. उषा इथापे या दोघांनी प्रदीर्घ काळ शिवाजी विद्यापीठाची पायाभरणी करून या रोपाचा वटवृक्ष करण्याचं कार्य आपल्या हयातीत केलं. डॉ. आप्पासाहेब पवार यांना पितामह म्हटलं, तर डॉ. इथापे या इथल्या प्रत्येक घटकाच्या माता होत्या. इथापे मॅडमचं एक छायाचित्र माझ्या मनात कायमचं ठसलं आहे, ते म्हणजे विद्यापीठाचा ज्ञानदंड घेऊन त्या विद्यापीठाच्या अगदी सुरवातीच्या काळातील एका दीक्षान्त मिरवणुकीचं नेतृत्व करताहेत आणि सारे कार्यकारिणी सदस्य, कुलगुरू, प्रमुख पाहुणे आदी सर्व त्यांना फॉलो करताहेत. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचं प्रशासकीय कामकाज जुन्या ओपल हॉटेलच्या इमारतीत चालायचं आणि तिथेच हा दीक्षान्त समारंभ झालेला. छायाचित्र पाहताक्षणी त्यांची आत्मविश्वासानं भारलेली बॉडी लँग्वेज आपल्या मनाचा ताबा घेते. डोक्यावरचा पदर घरंदाजपणाची ओळख देणारा, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रखर तेजही न लपून राहणारं. या तेजस्वितेनं शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार १९६६ ते १९८३ असा सुमारे १७ वर्षे  हाकला, त्याला आकार दिला. मात्र, त्यांच्याविषयी अन्य कोणतीही माहिती मला नव्हती. त्यांच्याविषयी अगदीच त्रोटक माहिती आणि तीही तुकड्या तुकड्यांत होती- जवळपास नसल्यासारखीच. मात्र, ही उणीव भरून काढणारं एक फार महत्त्वाचं पुस्तक हाती पडलं. मराठी अधिविभागातील आमचे सन्मित्र डॉ. रणधीर शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच त्यांनी संपादित केलेलं घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी हे पुस्तक दिलं आणि माझ्या कुतुहलाचा विषय असणारं इथापे मॅडम यांचं जीवनकार्य मी गेल्या दोन दिवसांतच वाचून काढलं. सुरवातीला मला डॉ. रणधीर शिंदे यांनी हा एक महत्त्वाचा आणि अलक्षित व्यक्तीमत्त्वाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा प्रकल्प हाती घेऊन तडीस नेला, याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत आणि या कार्यासाठी प्रेरित केल्याबद्दल माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

मंगळवेढ्याच्या शब्दशिवार प्रकाशनानं २१६ पृष्ठांच्या या ग्रंथाची देखणी निर्मिती केली आहे. तसं हे काही इथापे मॅडम यांचा सलग चरित्रग्रंथ नाही. तर इथंही त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी आलेल्या किंवा त्यांच्या कार्याची कृतज्ञ जाणीव असणाऱ्या लोकांच्या मनोगतांतून त्यांचं आयुष्य बरंचसं आपल्यासमोर येतं. अगदीच चित्रासारखं नसलं तरी कॅलिडोस्कोपिक व्ह्यू तरी नक्कीच साकार होतो, हे या पुस्तकाचं यश. प्रस्तावना आणि स्वतः इथापे मॅडम यांच्या दो स्मरण प्रसंग या लेखाखेरीज एकूण २६ व्यक्तींनी मॅडमविषयी इथं लिहीलंय, त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. या लेखकांत माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एस.एन. पठाण यांच्यासह शालिनीताई पाटील, चंद्रकुमार नलगे, डॉ. राजन गवस, डॉ. एस.एच. पवार, किसनराव कुराडे, डॉ. अरुण भोसले, डॉ. माया पंडित, विजय पाटील, निनाद शहा, प्रतिमा पवार, मानसिंगराव जगताप, कृष्णा इंगोले, जी.पी. माळी, सूर्यकांत जुगदर-पाटील, विजयसिंह पाटील, डॉ. सुनीलकुमार लवटे, राजेश पाटील, गजानन साळुंखे, विलास पोवार, अरुण साटम, महेंद्र शिंदे, रेखा नलवडे आणि रेखा शिंदे यांचा समावेश आहे. या लिहीणाऱ्यांतील बहुतांश जण मॅडमच्या कार्यकाळात विद्यार्थी म्हणून त्यांच्याशी संबंध आलेले, तर काही शिक्षक अन् काही नातेवाईकही आहेत.

ग्वाल्हेरच्या सरदार शिंदे घराण्यातून थेट आलेल्या इथापे मॅडम या राजघराण्यातील पहिल्या उच्च पदवीधर. हिंदी विषयातून त्यांनी पीएच.डी.चा प्रबंध सुद्धा स्वतंत्रपणे (विना-मार्गदर्शक) सादर केलेला. पुणे विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला पीएचडी धारक संशोधक. असं क्रांतीकारी शिक्षण घेऊन अखेरीस व्ही.टी. पाटील यांच्या कीर्ती कॉलेजद्वारा त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदापर्यंत प्रवास झाला आणि दोनच वर्षांत त्यांच्यावर कुलसचिव पदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली, ती त्यांनी अखेरपर्यंत प्रशासकीय कर्तव्यकठोरतेने आणि विद्यार्थ्यांप्रती मातृत्वभरल्या ममतापूर्णतेने निभावली. या पुस्तकांतल्या साऱ्यांच लेखांतून मॅडमची कर्तव्यकठोरता जितकी सामोरी येते, त्याहूनही अधिक त्यांची मातृहृदयी प्रतिमा अधिक झळाळून दिसते. त्यांच्या कारकीर्दीतली सारी मुलं त्यांना आईच्या जागी मानायची आणि त्याही या सर्व मुलांना आईच्या करारी आणि सहृदयी संस्कारी नजरेनं जपायच्या. त्या स्वतः मात्र विनापत्य होत्या, याला काय म्हणावं? विद्यापीठातील त्यांच्या कारकीर्दीची अखेर मात्र संघर्षपूर्ण पद्धतीनं झाली. आत्मसन्मानाची लढाई जिंकून त्यानंतरच त्यांनी पुन्हा पद स्वीकारणं नाकारलं, हे त्यांच्या फाईंटिंग स्पिरिटला आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या वृत्तीला साजेसंच होतं. दातृत्वतेज तर इतकं की अवयवदानाचा फारसा गाजावाजा नसण्याच्या काळात त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मृत्योपरांत देहदानही केलं.

या पुस्तकातून इथापे मॅडम यांचं चरित्र जसं समजतं, तसंच शिवाजी विद्यापीठाची जडणघडणही समजायला मदत होते. अनेक गोष्टी समजतात. आजही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विमान इमारतीत कंजारभाट समाजातील मुलांसाठी विद्यापीठ शाळा चालवित होतं, हे समजलं आणि अभिमानच दाटला मनी. आज आपण एक्स्टेंशनच्या गोष्टी करतो. पण त्या काळात वरून खाली असा शिक्षणाचा विस्तार करण्याचा विद्यापीठाचा हा प्रयत्न केवढा तरी स्तुत्यच होता. अशा अनेक गोष्टी इथं समजतात. इथापे मॅडमचं चरित्र तर इथं समजतंच, पण ज्या व्यक्तींनी त्यांच्याविषयी यात लिहीलंय, त्यांच्याही जडणघडणीचा, उभारणीचा असा तो कालखंड होता, ज्यामध्ये त्यांना इथापे मॅडमनी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आधार आणि उमेद दिलेली. त्यामुळं या चरित्रकारांचं चरित्रही इथं थोडंफार उलगडतंच. उदाहरणार्थ, चंद्रकुमार नलगे सरांचं विद्यापीठातलं योगदान आणि त्यांचं येथून पुनःश्च बाहेर पडणं, माया पंडित मॅडमचा विद्यापीठाच्या सेवेतील प्रवेश ते त्यांच्या विवाहाला इथापे मॅडमचा आशीर्वाद लाभणं अशा अनेक बाबी वाचायला मिळतात, ज्या एरव्ही पुन्हा त्यांच्या त्यांच्या आत्मकथनातच कधी तरी पुढं वाचता येऊ शकतील.

डॉ. अरुण भोसले सर म्हणतात, त्याप्रमाणं इथापे मॅडम या विद्यापीठाच्या यशोगाथेतील उपेक्षित मानकरीअसतील, तर गवस सर म्हणतात त्याप्रमाणं त्यांच्यावरील अन्यायाला कधीतरी वाचा फुटायला हवी आणि या रखरखत्या माळावरच्या सावलीला आपण नीट समजून घ्यायला हवं आहे.

शेवटी आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे डॉ. उषा इथापे मॅडम या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलसचिव होत्या, इथपर्यंत ठीकच आहे. पण, अलीकडच्या काळात साधारण २०१७ नंतरच्या काळात आंध्र प्रदेशात डॉ. आर.के. अनुराधा (श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटी), पश्चिम बंगालमध्ये नुपूर दास (नॉर्थ बेंगॉल युनिव्हर्सिटी) आणि आर. सुधा (मदुराई कामराज युनिव्हर्सिटी) या महिलांनी त्या त्या विद्यापीठांच्या ६० ते ८० वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारल्याच्या बातम्या वाचनात आलेल्या होत्या. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठांना जर महिला कुलसचिव लाभण्यास शतकभराचा कालावधी लागत असेल तर माझ्या अंदाजाने डॉ. उषा इथापे या केवळ महाराष्ट्रातील विद्यापीठांतीलच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठांच्या इतिहासातील कदाचित पहिल्या महिला कुलसचिव ठरतील. हा माझा अंदाज आहे. तो जर खरा असेल, तर विचार करा, इथापे मॅडमच्या कार्याचे मोल आणि त्यांनी जिथे घाम, रक्त आणि अखेरच्या काळात अश्रूही गाळले, त्या शिवाजी विद्यापीठाचे मोल कितीतरी पटीने अधिक वाढलेले असेल. त्या दृष्टीने मॅडमच्या जीवनचरित्राचा अधिक चिकित्सक संशोधकीय वेध घेण्याची गरज डॉ. रणधीर शिंदे यांच्या या संपादकीय कार्याने अधोरेखित केलेली आहे. त्यांना धन्यवाद!

 

पुस्तकाचे नाव: घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी

संपादक: डॉ. रणधीर शिंदे

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा

पृष्ठे: २१६

किंमत: रु. ३००/-


सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

'मानवमुक्तीच्या पथदर्शका'चा गौरव

प्रा. गौतमीपुत्र कांबळे

प्रा. गौतमीपुत्र कांबळे

प्रा. गौतमीपुत्र कांबळे







प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त 'संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी' आणि 'मानवमुक्तीचा पथदर्शक' या दोन ग्रंथांच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) प्रा. अविनाश सप्रे, डॉ. आलोक जत्राटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस, डॉ. कांबळे आणि सतीश बनसोडे. (वरील छायाचित्रांत, या समारंभातील विविध क्षणचित्रे...)

 

(फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत, साहित्यिक आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त रविवार, दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित सन्मान समारंभातील ग्रंथ प्रकाशन सोहळ्यामधील माझ्या भाषणाचा संपादित अंश...)

समकाळातील या महत्त्वाच्या समतादूताच्या गौरव समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे जाणीवासमृद्ध कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. अविनाश सप्रे, आयु. सतीश बनसोडे, आज प्रकाशित होत असलेल्या संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी आणि मानवमुक्तीचा पथदर्शक या दोन्ही ग्रंथांच्या संपादक मंडळाचे सदस्य डॉ. शशिकांत खिलारे, डॉ. हरिष भालेराव, प्रा. साहेबराव नितनवरे, प्रा. मिलींद वडमारे, डॉ. भरत नाईक, डॉ. प्रवीण चंदनशिवे, संजय पाटील, महेश कराडकर आणि प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यावरील प्रेमापोटी उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर जन हो,

या समारंभासाठी उपस्थित राहात असताना आणि त्यातही सदर प्रास्ताविक करीत असताना मला अतिशय आनंद होतो आहे. ही संधी मला दिल्याबद्दल संयोजन समितीला मी सुरवातीलाच धन्यवाद देतो.

मित्र हो, आज या प्रसंगी काही व्यक्तीगत आठवणी माझ्या मनी येत आहेत. प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या वाटचालीचा मी माझ्या लहानपणापासूनचा साक्षीदार आहे. काहींना माहिती असेल, कित्येकांना नसेलही की, सांगली ही माझी जन्मभूमी आहे. माझं सुरवातीचं शिक्षणही इथल्याच केसीसी प्राथमिक शाळेत झालं. धम्माचे ज्येष्ठ अभ्यासक कालकथित ए.दा. कांबळे गुरूजी हे माझे आजोबा. त्यांचं घर हे भिक्षू, धम्म विचारवंत आणि चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी चर्चेचं हक्काचं ठिकाण. त्यात प्रा. कांबळे आणि माझे वडील यांचंही चळवळीतल्या मैत्रीचं नातं. त्यामुळं सांगलीतील घरी मी माझे अण्णा आणि प्रा. कांबळे यांच्या चर्चा अनेकदा ऐकलेल्या आहेत. त्यावेळी फारसं समजायचं कारण नसलं तरी हे काही तरी वेगळं आणि गंभीर बोलताहेत, ते आपण ऐकायला हवं, असं वाटायचं. ऐंशीच्या त्या दशकातला तो कालखंड गौतमीपुत्र सरांच्या ऐन उमेदीचा होता. तेव्हाही त्यांच्यातील उमेद आणि उत्साह हा प्रेरणादायी होताच; आणि आजही तो तितकाच प्रेरक आहे.

सरांचं साधं राहणीमान, प्रकृती, शरीरयष्टी, बोलण्यातला ठाशीवपणा, हे इतक्या वर्षांत अजिबातच बदललेलं नाही. उलट काळानं आणि चळवळीप्रती त्यांच्या निष्ठेनं त्याला अधिकच प्रभावशीलता प्रदान केली आहे. आंबेडकरी मूल्यांप्रती त्यांची असणारी निष्ठा ही मला त्यांच्या विचार व कार्याकडं सातत्यानं आकर्षित करणारी बाब ठरली आहे. त्यांच्या विचारांतील स्पष्टता, संयत आणि तरीही आग्रही, आक्रमक अशी थेट राजाभाऊ ढाले यांच्याशी नातं जोडणारी प्रभावी मांडणी, हे मला त्यांच्या एकूण आंबेडकरी चळवळीतील यशाचं इंगित वाटतं. सरांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्त्वातली व्यापकता आणि प्रचंड सकारात्मकता. तत्त्वज्ञानाचा आणि आंबेडकरी मूल्यांचा पाया लाभलेला असल्यानं त्यांचे विचार आणि कार्य हे केवळ आंबेडकरी समाजापर्यंत सीमित नसून सर्वच समाजघटकांच्या हिताचा, कल्याणाचा विचार करणारं आहे. त्यांचं बोलणं, लिहीणं यांमध्ये शोषक व्यवस्था आणि तिला खतपाणी घालणारी शोषणमूल्यं, सनातनत्व यांविषयी चीड जरूर आहे, पण त्याचवेळी मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेचा आग्रह धरताना समग्र समाजघटकांमधील चांगुलपणाला ते सतत आवाहन करीत राहतात. त्यांचा विद्रोह हा नकाराचा नाही; तर, सर्वसमावेशक स्वीकाराचा आहे. म्हणूनच, तो खऱ्या अर्थानं बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारकार्याशी नातं सांगत राहतो.

रॅशनॅलिझम आणि सेक्युलॅरिझम यांच्या पायावर समताग्रही समाजाची मूल्यात्मक निर्मिती व्हावी, यासाठी केवळ राजकीय अथवा सामाजिकच नव्हे, तर सांस्कृतिक अभिसरणही महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांनी आपली ही चळवळ सामाजिक-सांस्कृतिक विकासाच्या दिशेनं केंद्रित केल्याचं दिसतं. यातून आपल्या मूल्यव्यवस्थेशी अधिक प्रत्ययकारितेनं जोडलं जाता येऊ शकतं, हे त्यांनी सेक्युलर मूव्हमेंट आणि सेक्युलर आर्ट मूव्हमेंटच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. सांविधानिक मूल्यांचाच आधार घेऊन स्तरित, विखंडित समाजनिर्मितीचे अश्लाघ्य प्रयत्न होत असल्याच्या या काळात तर त्यांच्या या कामाचं मोल खूप मोठं आहे.

सरांविषयी बोलण्यासारखं खूप आहे. मात्र, वेळेचं भान राखून प्रकाशित होऊ घातलेल्या ग्रंथांविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. त्यांच्याविषयी डॉ. सप्रे आणि आयु. बनसोडे विस्तारानं बोलणार आहेतच, पण, थोडी प्रास्ताविकपर माहिती मी इथं देतो.

आज आपण प्रा. गौतमीपुत्र कांबळे सरांच्या सन्मान सोहळ्याच्या अनुषंगानं संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी आणि मानवमुक्तीचा पथदर्शक या दोन महत्त्वाच्या ग्रंथांचं प्रकाशन करीत आहोत. महत्त्वाचे अशासाठी की हे दोन्ही ग्रंथ ‘ANOTHER TWO BOOKS’ अशा स्वरुपाचे नाहीत किंवा गौतमीपुत्र सरांचं केवळ गौरवीकरण करणं, असाही त्यांचा हेतू नाही. त्यापलिकडं एका मोठ्या व्यापक, उदात्त सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

यातील संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी हे सुमारे १८० पृष्ठांचं पुस्तक आहे. यामध्ये प्रा. गौतमीपुत्र सरांची प्रदीर्घ मुलाखत आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील एका सच्च्या कार्यकर्त्याची ही मुलाखत फार द्रष्टेपणातून आणि धोरणीपणाने घेण्यात आलेली आहे. केवळ गौतमीपुत्र सरांच्या कार्याचंच नव्हे, तर समग्र चळवळीचंच या निमित्ताने तत्त्वज्ञानात्मक डॉक्युमेंटेशन करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

आजचा काळ हा माणसांचं वास्तव कार्य आणि स्मृतींच्या विस्मरणाचा; तर, आभासी आणि फेक (बनावट) स्मृतींच्या निर्मितीचा आहे. माणसं, माणसांचं अस्तित्व यांना नकार देणारा, त्यांना नाकारणारा हा कालखंड आहे. या कालखंडात अनेक हाडामांसाची काम करून गेलेली माणसंही myth बनून राहतील की काय, अशा पद्धतीचा सारा भोवताल आहे. या पार्श्वभमीवर, सदर डॉक्युमेंटेशनचं महत्त्व आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये मधु कांबळे सर आणि भरत शेळके यांच्या संकल्पनेतून प्रा. गौतमीपुत्र सरांची सुमारे वीस तासांहून अधिक काळ मॅरेथॉन मुलाखत घेण्यात आली. कृतीशील विचारवंत-साहित्यिक, कला, क्रांती, चळवळ आणि वैयक्तिक आवड, चळवळ, साहित्य आणि धम्मक्रांती, इतिहास तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र अशा विविध पैलूंच्या अंगानं माझ्यासह संजीव सोनपिंपरे, प्रभाकर कांबळे, बबन चहांदे, अॅड. कविता, रक्षित सोनवणे, डॉ. प्रवीण चंदनशिवे, सतीश बनसोडे, प्रा. भरत नाईक, मधु कांबळे, भरत शेळके, प्रा. प्रशांत गायकवाड, प्राचार्य डॉ. अशोक बाबर, डॉ. वि.दा. वासमकर, प्रा. मोग्गलान श्रावस्ती, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. राजन गवस या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ही मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीमध्ये स्वाभाविकपणे वैयक्तिक स्वरुपाचे प्रश्न आहेतच; पण, ते केवळ सरांच्या वाटचालीचा मार्गवेध निश्चित करण्यासाठी! ही मुलाखत वाचायला सुरवात केल्यानंतर आपल्या निश्चितपणानं असं लक्षात येईल की, त्यातली वैयक्तिकता मागं पडून गेल्या शतकभरातल्या; नव्हे, गेल्या अडीच हजार वर्षांच्या चळवळीचंच डॉक्युमेंटेशन आपल्यासमोर उभं ठाकतं आणि भौतुक चळवळींच्या पलिकडं त्या चळवळींच्या तत्त्वज्ञानाशी ते आपल्याला जोडतं. खरं तर, या मुलाखतीसाठी प्रा. गौतमीपुत्र सरांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो कारण ही मुलाखत देऊन त्यांनी आमच्यासह भावी पिढ्यांसाठी एक फार मोलाचं संचित निर्माण करून ठेवलं आहे. संपादक मंडळालाही मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की, त्यांनी या डॉक्युमेंटेशनसाठी अफाट परिश्रम घेतलेले आहेत. अत्यंत विक्रमी वेळेत शब्दांकन, लेखन आणि संपादनाचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्या कष्टाखेरीज हे देखणं ग्रंथरुप साकार झालं नसतं.

आज प्रकाशित होणारं मानवमुक्तीचा पथदर्शक हे दुसरं पुस्तकही फार अभिनव स्वरुपाचं आहे. सन्मान समितीनं ठरवलं असतं, तर प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्याविषयी केवळ वैयक्तिक गौरवग्रंथ ते आज लीलया निर्माण करू शकले असते.पण, हा गौरव समारंभ साक्षात प्रा. गौतमीपुत्र सरांचा असल्यानं चळवळीचा समग्र वेध घेणारा एक संशोधनग्रंथच त्यांनी वाचकांना सादर केला आहे. २७६ पृष्ठांच्या या ग्रंथात सोळा मान्यवर विचारवंत, साहित्यिक, संशोधकांचे लेख आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सुप्रसिद्ध मुक्ती कोण पथे?’ हे भाषण या संशोधन ग्रंथाचं दिग्दर्शन करतं. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, शांताराम पंदेरे, डॉ. मच्छिंद्र सकटे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. सुनिता बोर्डे-खडसे, बबन चहांदे, गंगाधर अहिरे, प्रा. एम.आर. कांबळे, डॉ. हरिष भालेराव, मधु कांबळे, भरत शेळके, सतीश बनसोडे, प्रभाकर कांबळे, डॉ. प्रकाश भोगले आणि डॉ. गिरीष मोरे या मान्यवरांनी हे लेखन केलेलं आहे. यामध्ये गौतमीपुत्र सरांविषयीही काही लेख आहेत; मात्र, ते केवळ गौरवीकरण करणारे नसून त्यांचं संशोधनाच्या कसोट्यांवर यथोचित मूल्यमापन आणि चळवळीसह विविध क्षेत्रांतील योगदानाची चिकित्सा करणारे आहेत. त्यामुळं हे पुस्तकही केवळ सरांनाच नव्हे, तर चळवळीच्या विविध पैलूंना जाणून घेऊ इच्छिणाऱ्या तमाम संशोधक-अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणारे आहे. या संपादक मंडळासही आपण धन्यवाद द्यायला हवेत.

मित्र हो, समारोपाकडे येत असताना इतकेच सांगतो की आजचा समारंभ हा आपल्या सर्वांच्याच दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणत्याही चळवळीमध्ये जेव्हा एखादा माणूस येतो, तेव्हा त्याला सातत्याने नेतेपदच साद घालत असते. केव्हा एकदा नेता होतो आणि उदोउदो करणारे पाठीराखे निर्माण होतील, याकडे त्याचे लक्ष लागून राहिलेले असते; किंबहुना, सारा खटाटोप त्यासाठीच चाललेला असतो. नेता होणं वाईट नाही, ते असलेच पाहिजेत; पण, नेतृत्व करीत असताना आपलं कार्यकर्तेपण जपायला लोक विसरतात आणि त्यामुळंच त्यांचं नेतृत्व उणावतं. पण, याची जाणी त्यांना होत नाही.

प्रा. गौतमीपुत्र कांबळे या व्यक्तीनं मात्र फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतलं आपलं कार्यकर्तेपण सतत कायम राखून चळवळीला दिशा देण्याचं, तिचं चिंतन करण्याचं आणि तिचं तत्त्वज्ञान मांडण्याचं काम करीत राहून चळवळीला सातत्यानं दिशा देण्याचं काम केलं आहे आणि त्यातून स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं आहे. राजा ढाले यांच्यानंतर त्यांच्या पथदर्शनानुसार चळवळीमध्ये प्राण फुंकत राहणारा हा एक फार मोठा माणूस आहे. त्यांनी ते मोठेपण कधीच मिरवलं नसलं तरी त्यांचं हे योगदान मला या निमित्तानं अधोरेखित करावंसं वाटतं. आपण ही दोन्ही पुस्तकं विकत घ्यावीत, वाचावीत, समजून घ्यावीत, पुनःपुन्हा समजून घ्यावीत कारण हे तत्त्वज्ञान आपल्याला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, हेच त्यांचं औचित्य, प्रयोजन आणि प्रस्तुतता आहे.

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

आपके पाॅंव बहोत हसीन हैं; इन्हें सॅंभालिए।

डॉ. सुनील करी यांच्यासमवेत बंधू अनुप आणि अस्मादिक


मागील महिन्यात मी आठेक दिवस हुबळीत होतो, हे आपणास सांगितलेच. आई मधुमेहग्रस्त असल्याने त्या अनुषंगाने तिच्या पायावर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही तिथे होतो. तेथील सौ. मंदाकिनी मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलचे निष्णात डॉ. सुनील करी यांनी ही अतिशय कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया केली. ही पोस्ट मी व्यापक माहितीसाठी टाकतो आहे कारण आम्ही डॉ. करी यांचेपर्यंत पोहोचण्यात माहितीअभावी खूप विलंब केला. तो इतरांच्या बाबतीत होऊ नये आणि वेळीच उपचार होऊन पाय वाचवले जावेत, या भावनेतून ही माहिती देत आहे.
भारतात मधुमेही रुग्णांची संख्या आशियाई देशांमध्ये सर्वाधिक आहे. त्यातही मधुमेहामुळे पायाला जखमा होऊन बोटे किंवा पायच गमावण्याची वेळ येणाऱ्या रुग्णांची संख्या आपल्याकडे अधिक आहे. डॉ. करी हे अशा डायबेटिक फूटवरील तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे वेळेत जाऊन उपचार घेतल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. ॲम्प्युटेशन केलेल्या पायांना योग्य आकाराचे शूज देऊन रुग्णाचे चालणेही ते सुकर करतात. आईच्या बाबतीत ॲम्प्युटेशननंतर एक वर्ष उलटून गेलं आणि त्यातून पायात विकृती उद्भवली. हे डॉ. करींची माहिती नसल्यामुळं झालं. केवळ शूजमुळं जी गोष्ट साधली गेली असती, त्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. हे टाळता येऊ शकतं. पायाच्या अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होऊन पुढे तो अवयव काढून टाकण्याची वेळ येते. मात्र अशा बाबी मॉनिटर केल्यास आणि डॉक्टरांकडे गेल्यास पुढील गुंतागुंत रोखता येते. करी सरांचे चिरंजीव डॉ. शशांक हे सुद्धा व्हॅस्क्युलर व एन्डोव्हॅस्क्युलर सर्जन आहेत. रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज काढून पायाचा रक्तपुरवठा सुरळीत करून अवयव वाचविण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखविली आहे. मधुमेही पायांची काळजी घेणं आणि वेळीच उपचार घेणं, हा ते वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे. डॉ. करी यांच्याकडं देशविदेशातून रूग्ण उपचारांसाठी येत असतात. ते उत्तम सर्जन आहेतच, पण एक चांगला माणूसही आहेत. महत्वाचं म्हणजे रूग्णाला आणि नातेवाईकांना येणाऱ्या खर्चाबद्दल ते अनभिज्ञ ठेवत नाहीत. ऐनवेळी पळापळ टाळण्यासाठी हे महत्त्वाचं ठरतं. "भावी काळात भारतात मधुमेही रुग्णांची संख्या वाढत जाणार आहे. डायबेटिक फूट अल्सरच्या रुग्णांची संख्या त्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासंदर्भातील जागृती फार महत्त्वाची आहे." असं डॉक्टर सांगतात. त्या दृष्टीनं त्यांनी काही अवेअरनेस मटेरियलही तयार केलंय. तेही यासोबत माहितीसाठी जोडतोय. आपल्या आसपास असे कोणी नातेवाईक, मित्र, सुहृद असतील, तर त्यांना तातडीने उपचार घेण्यास प्रवृत्त करा... पायांची निगा राखा... योग्य ती काळजी घ्या...

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

आणखी एका सावित्रीचा इतिहास अन् शिवरायांच्या शिलेदारांचा प्रवास...

हुबळीतील विवेकानंद जनरल हॉस्पिटलचे सीईओ डॉ. राहुल मुणगेकर यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर


हॉस्पिटलचा इतिहास अभिमानानं मिरविणाऱ्या दोन महत्त्वाच्या कोनशिला


हुबळीतील विवेकानंद जनरल हॉस्पिटलची इमारत आणि हॉस्पिटलमध्ये दररोज म्हटली जाणारी प्रार्थना


सध्या काही कारणाने हुबळीमध्ये आहे. इथल्या विवेकानंद जनरल हॉस्पिटलच्या प्रांगणात फिरत असताना दर्शनी भागातच दोन कोनशिला नजरेस पडल्या. पहिला होता- इंडियन विमेन एड सोसायटी, हुबळी यांच्या इमारतीच्या पायाभरणीचा. १ नोव्हेंबर १९२९ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर फ्रेडरिक ह्यूज साईक्स यांच्या पत्नी लेडी साईक्स यांच्या हस्ते हा समारंभ करण्यात आलेला होता. ही जागाही साईक्स यांनी सदर महिलांच्या संस्थेला दान दिलेली होती. त्या दिवशी या गव्हर्नर दांपत्याच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन इथं करण्यात आलं होतं. हुबळीतलं प्रसिद्ध साईक्स पार्क, जे आता जवळच्या चिटगुप्पी हॉस्पिटलच्या नावावरुन ओळखलं जातंय, त्याचंही उद्घाटन त्याच दिवशी झालेलं. तर, परिसरातील महिलांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी ही इंडियन विमेन एड सोसायटी स्थापन झाली होती. विशेषतः सुरक्षित प्रसुती होऊन माता व बाल मृत्यू रोखणे हा प्रमुख हेतू होता. हावेरी येथून विवाह होऊन हुबळीच्या महाजन कुटुंबात आलेल्या डॉ. सावित्री महाजन यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि निष्ठापूर्वक अखेरपर्यंत निभावली. त्यांनी इतकं असोशीनं काम केलं की, आयडब्ल्यूए म्हणून नव्हे, तर सावित्रीबाईंचा दवाखाना म्हणून लौकिक पसरला याचा.
दुसरी कोनशिला होती, ही या इमारतीच्या उद्घाटनाची- खरे तर याच फलकानं माझं कुतूहल जागं झालेलं. तर, हे उद्घाटन झालं होतं दि. ७ डिसेंबर १९३८ रोजी, मुंबई प्रांताचे तत्कालीन पंतप्रधान बॅ. बी.जी. तथा बाळासाहेब खेर यांच्या हस्ते. हा मुंबई प्रांत म्हणजे आजच्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात आणि उत्तर कर्नाटकाचा बहुतांश भूगोलव्याप्त बृहन्महाराष्ट्र होता. इथं किम्स आणि रेल्वेची इस्पितळं असली तरी या विभागातलं केवळ महिलांसाठीचं असं हे एकमेव हॉस्पिटल. अगदी १९९०च्या दशकापर्यंत हॉस्पिटलनं हा लौकिक जपला, पण काळाची पावलं ओळखून सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब जनता यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आली. ट्रस्टमध्ये परिसरातील नामवंत उद्योजक, व्यावसायिकांनी सहभाग दर्शविला आणि हॉस्पिटलचा कायापालट होऊ लागला. दानशूर व्यक्तींच्या सहभागातून विस्तार करण्यात आला. आधुनिक सुविधांचा लाभ रूग्णांना मिळू लागला. परिसरातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर जोडले गेले. त्यांच्या अनुभवाचाही फायदा लोकांना होतो आहे. सर्व शासकीय योजनांचे लाभ रूग्णांना दिले जातात. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांना हव्या त्या सुविधांनी सज्ज कक्षही येथे निर्माण केले आहेत. १३x१३चे प्रशस्त ICU कक्ष आहेत. शतकाच्या उंबरठ्यावर आता इमारती आणि सुविधा यांचाही विस्तार केला जातो आहे.
ही सारी माहिती मला हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल मुणगेकर अतिशय अभिमानपूर्वक सांगत होते. कोणीतरी आमच्या इतिहासाबद्दल इतक्या आपुलकीनं जाणून घेऊ इच्छित आहे, ही आमच्यासाठीही आनंदाची बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुमारे तासभराचा वेळ त्यांनी मला दिला.
आता यातलं उपकथानक असं की, सीईओ मुणगेकर यांचं नाव पाहून मी त्यांना विचारलं, सर, आपण मूळचे कोकणातले का? त्यावर ते जाम खूष झाले आणि त्यांच्या घराण्याचा वृत्तांत त्यांनी सांगितला. सध्या ते कारवार येथे स्थायिक झाले असले तरी नजीकच्या सदाशिवगडचे. मुणगेकरांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या सदाशिवगड स्वारीच्या वेळी त्यांच्यासमवेत इकडे आले होते. स्वराज्यावर मिर्झाराजेंच्या स्वारीचे संकट आले म्हणून महाराजांना घाईने परतावे लागले असले तरी काही शिबंदी त्यांनी गडाचे संरक्षण व देखभालीसाठी सदाशिववगडी ठेवली. त्यामध्ये मुणगेकरांचे पूर्वज होते. यावेळी महाराजांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला होता. याची देखभालही या लोकांकडेच होती. महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी आणखी एकदा इथे आले. दुर्गादेवी मंदिरात त्यांनी पूजाअर्चाही केली आणि पुढे मार्गस्थ झाले.
तेव्हापासून मुणगेकर कुटुंबीय इथे स्थायिक झाले. पण, आपला लढाऊ बाणा या कुटुंबानं सोडला नाही. मुणगेकरांचे पणजोबा स्वातंत्र्य लढ्यात होते. आजोबांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेला, तर त्यांचे वडील भारतीय सेनेत होते. स्वतः डॉ. राहुल मुणगेकर आणि त्यांचे दोन बंधूही सैन्यदलात सेवारत होते. दोघे भाऊ मराठा बटालियनमध्ये आणि राहुलजी हे एमएमजी आर्टिलरी विभागात कार्यरत होते. तेथून ते २०१४ मध्ये विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सीईओ म्हणून रुजू झाले. तेव्हापासून अतिशय गतीने नवे बदल करत असताना आपल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये सेवाभावाची रुजवात करण्याला प्राधान्य दिले. विवेकाने सेवा करा आणि त्यातून समाधान, आनंद मिळवा, असा आपल्या नावाचा वेगळा अर्थ रुजवला, ज्याची प्रचिती येथे येते. त्यांनी ज्ञान आणि सेवा यांची सांगड घालून एक प्रार्थनाही तयार केली आहे, जी रोज सकाळी म्हटल्यानंतरच दिवसाच्या कामकाजाला सुरवात केली जाते.
एकूणात, एका कोनशिलेपासून सुरू झालेला माहितीचा हा प्रवास मला एका रंजक ऐतिहासिक सफरीवर घेऊन गेला, एवढे खरे!

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

सवलतींच्या देशा...

कर्नाटकात 'शक्ती योजने'च्या घोषणेनंतर मोफत बस प्रवासासाठी महिला प्रवाशांची झालेली गर्दी. (प्रातिनिधिक छायाचित्र)


सध्या आपल्या देशाला एका विचित्र रोगाने ग्रासले आहे, तो रोग म्हणजे सवलत योजना. कोणी मागितले नसताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलतींचा वर्षाव नागरिकांवर केला जातो आहे. मागणी नसताना बँक खात्यामध्ये दोन हजारांपासून दहा हजारांपर्यंत फुकट जमा करण्याची आश्वासने वाटण्यात येत आहेत. त्या मोबदल्यात फक्त राजकीय सत्तेच्या चाव्या मागितल्या जात आहेत. चिंता वाटावी असे चित्र देशात निर्माण झाले आहे.

सत्तेत पक्ष कोणताही असो, पण राज्य सरकारांनी अशा काही अनावश्यक आणि अनाठायी घोषणा करण्याचे पातक करून ठेवले आहे. पातक यासाठी म्हणतो की, आवश्यकता नसताना केवळ राजकारणप्रेरित भावनेतूनच या घोषणा आहेत, असे सकृतदर्शनी लक्षात येते. करदात्यांचा पैसा हा भरीव कारणांसाठी कारणी लावण्याऐवजी तो अशा योजनांवर खर्च होणे कदाचित आज परवडत असेलही; उजाडणारा उद्या मात्र तसा असेल, असे म्हणता येणार नाही.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकात झालेल्या निवडणुकांनंतर तेथे मागणी नसताना महिलांना शंभर टक्के बसप्रवास मोफत करण्यात आला. महिला वर्गाची विनाकारण प्रवास करण्यासाठी झुंबड उडाली. पै-पाहुण्यांकडं जाण्याबरोबरच देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या यात सर्वाधिक दिसून आली. नवरात्रामध्ये तर या गर्दीने उच्चांक गाठला. कर्नाटक बसमधील प्रवाशांत ८० टक्क्यांहून अधिक प्रमाण महिला प्रवाशांचे असल्याचे दिसून आले.

दुसरीकडं महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक नसताना, कोणतीही मागणी नसताना एस.टी.च्या प्रवासात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. आधीच तोट्यात चाललेल्या एस.टी. महामंडळावर खर्चाचा हा अतिरिक्त बोझा वाढला. कर्नाटकाप्रमाणे महिला प्रवाशांची संख्या येथेही वाढली, मात्र, त्यातून होणारा तोटा भरून निघेल, असे चित्र सध्या तरी नाही.

केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य योजनेला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देऊन पंतप्रधान गरीब कल्याण मोफत अन्नधान्य योजनेअंतर्गत देशातील ८१.३५ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ११.८० लाख कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. साहजिकच ती जगातील एक सर्वात मोठी ऐतिहासिक अन्न सुरक्षा योजना ठरली आहे.

विविध राज्यांमध्ये यांसारख्या अनेक योजना जाहीर झाल्या आहेत आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपापल्या परीने नागरिकांच्या बँक अकाऊंटवर दहा हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्याची आश्वासने देऊ लागला आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील पंधरा लाखांचे आश्वासनही आजपावेतो एक आश्वासनच ठरले आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

या सवलत योजनांचा मी विरोधक आहे किंवा राजकीय भावनेतून मी त्यांवर टीका करतो आहे, असे मात्र नाही. या देशाचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, छोटा करदाता म्हणून जेव्हा मी या योजनांचा विचार करतो, तेव्हा मला त्यांचे संभाव्य परिणाम अस्वस्थ करू लागतात, म्हणून त्याविषयी भाष्य करावेसे वाटते. देशातील वंचित घटकांचा विकास होणे, त्यांना बरोबरीच्या संधी प्राप्त करून देणे, हे सरकारांचे काम आहेच. अंत्योदयाच्या संकल्पनेला ते धरूनही आहे. तथापि, अनावश्यक सवलतींची समाजावर जेव्हा बरसात होऊ लागते, तेव्हा त्यांच्या हेतूंबद्दल शंका निर्माण व्हायला सुरवात होते आणि त्यावेळी त्याला जर राजकारणाखेरीज अन्य कोणतेही कारण दृष्टीक्षेपात तातडीने येत नसेल, तर नक्कीच कोठेतरी काहीतरी चुकते आहे, असे वाटल्याखेरीज राहात नाही.

आज आपला देश डेमोग्राफिक डिव्हीडंडच्या परमोच्च कळसावर आहे. देशाचे सरासरी आयुर्मान तिशीच्या आसपास आहे. साठ टक्क्यांहून अधिक जनता तरुण आहे. त्यांची क्रयशक्ती वापरून देशाची उत्पादकता वाढविण्यासाठीचा आणि भविष्य सुवर्णमयी करून ठेवण्यासाठीचा हा महत्त्वाचा कालखंड आहे. या हातांना काही मोफत देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातांना काम देऊन चांगल्या मोबदल्याची तजवीज करण्याची प्रत्यक्षात खरी गरज आहे. मात्र, तेवढ्याच लोकसंख्येसाठी आपण मोफत अन्नधान्य देण्याच्या मागे लागलो आहोत. ज्यांना प्रत्यक्षात खरी गरज आहे, त्यांच्यासाठी या योजनेची गरज आहेच. कोविड कालखंडात लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांच्या हाताला जेव्हा कामच नव्हते, तेव्हा शिवभोजन थाळी योजनेने महाराष्ट्रात त्यांना दोन वेळचे अन्न देऊन जगविण्याचे फार मोलाचे काम केले. आता, ही योजना ज्यांना खरी गरज आहे, अशा वंचित, कामगार घटकांसाठी अल्प मोबदल्यात सुरू आहे, हेही योग्यच आहे. मात्र, योजनांचे सरसकटीकरण होणे योग्य नाही. त्यातही फुकट किंवा मोफतची एकदा सवय लागली की, असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी या भूमिकेत लाभार्थी शिरण्याचा मोठा धोका संभवतो. आज ग्रामीण भागात रेशनवरील मोफत अन्नधान्य अगदी मुबलक स्वरुपात मिळत असल्याने लोकांची काम करण्याची इच्छाशक्ती कमी झाली आहे, असे एकंदरीत चित्र आहे. देशाच्या सार्वत्रिक क्रयशक्तीला मारक ठरणाऱ्या अशा योजनांचा राजकारणाच्या पलिकडे जाऊन देशहिताच्या अंगाने विचार केला जाणे खूप महत्त्वाचे आहे. देशाचे इतके प्रचंड मोठे मनुष्यबळ कामाविना राहणे परवडणारे नाहीच, शिवाय, उद्याच्या संभाव्य धोक्यांची ती नांदीही ठरू शकते. आज आपण सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहोत, हे खरेच, पण आणखी पंचवीस वर्षांनी लोकसंख्येचा हा पिरॅमिड उलटा होणार आहे. विकसित भारत @ २०४७चे स्वप्न ज्या हातांच्या बळावर आपण पाहात आहोत, ते हात जर आज कार्यरत नाही राहिले, तर उद्या आपण जगातील खायला काळ आणि भुईला भार अशी सर्वाधिक वयोवृद्ध लोकसंख्या असू. आज तरुण लोकांच्या क्रयशक्तीच्या बळावर आपली तुंबडी भरण्यासाठी जगभरातील भांडवली सत्ता एक होऊन आपल्या देशात प्रकटली आहे. उद्या अशा भार झालेल्या लोकसंख्येला पोसायला मात्र कोणीही पुढे येणार नाही. त्यावेळी खऱ्या अर्थाने अशा मोफत अन्नधान्य योजनेची आपल्याला गरज लागणार आहे. मात्र, काम करण्याची इच्छाशक्ती नसलेली लोकसंख्या त्यासाठी तयार आणि तत्पर असेल का, याची साधार शंका वाटते. तेव्हा लागणारे अन्नधान्याचे उत्पादन आपण आपल्या देशात घेऊ शकणार की, आयात करणार, यावरही त्याची तीव्रता अवलंबून असणार आहे.

या ठिकाणी मला वाटणारी भीती अशी आहे की, आज मोफत प्रवास, उद्या मोफत वीज किंवा आणखी काही... असे जे सुरू आहे, ते धोक्याचे आहे. आपण ज्या गोष्टी मोफत देऊ करीत आहोत, त्या प्रत्येक गोष्टीला काही तरी निर्मिती खर्च आहे, त्यामध्ये भांडवल गुंतलेले आहे, मेंटेनन्सचा खर्चही आहे. तो सारा करदात्यांच्या पैशातून होतो. हा भार अंतिमतः नागरिकांवरच आहे. मोफत मिळत असले तरी मोफत काहीही नसते. त्यामागे काही ना काही खर्च हा असतोच. अशा बाबतीत ना नफा, ना तोटा या तत्त्वावर किंवा अल्प नफ्याच्या मोबदल्यात ती नागरिकांना पुरविणे एक वेळ योग्य ठरेल. एकदा सारे काही फुकटात पदरात पाडून घेण्याची सवय झालेला नागरिक पुन्हा त्यासाठी काही खर्च करण्याची तयारी दाखवेल, याची खूपच अल्प शक्यता आहे, कारण त्याच्या महिन्याच्या खर्चामध्ये त्यांचा समावेशच नसेल. हा वाचलेला खर्च काही विधायक कामांकडे तो वळवेल, याचीही शाश्वती नाही. चैनीखोरी आणि व्यसनाधीनतेकडेच या वाचलेल्या पैशाचा ओघ मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे चित्र आहे. फुकट आणि व्यसनाधीनता हे कॉम्बिनेशन पुन्हा देशाच्या स्वास्थ्यासाठी हानीकारकच ठरणारे आहे. तेव्हा सकृतदर्शनी या गोंडस वाटणाऱ्या मात्र प्रत्यक्षात अनेक रोगांना कारक ठरणाऱ्या मोफत योजनांना जितक्या लवकर आपण बाहेरचा रस्ता दाखवू, तितके ते आपल्या देशाच्या सामाजिक स्वास्थ्याला उपकारक ठरेल.