गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

अनमोल अजिंठा


प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून साऱ्या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...

कोणत्याही गोष्टीची एक वेळ यावी लागते, असं म्हणतात. त्यावर विश्वास बसावा, अशी माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट म्हणजे माझी अजिंठा लेण्यांना भेट. बी.एस्सी. एफ. वाय.च्या सहलीपासून म्हणजे साधारण 1995पासून एप्रिल 2008पर्यंत अशा सुमारे तेरा वर्षांच्या काळात अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देता येईल, अशा अनेक संधी माझ्याकडे चालून येत होत्या. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं योग जुळून येत नव्हता. या काळात औरंगाबादलाही कितीतरी वेळा गेलो पण परिसरातील प्राचीन कला-संस्कृतीच्या या अनमोल खजिन्याचं दर्शन मी घेऊ शकलेलो नव्हतो. मात्र लोकराज्य पर्यटन विशेषांकाच्या निमित्तानं ही बहुप्रतिक्षित व बहुप्रलंबित संधी मी घेण्याचं ठरवलं. याला आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं ते हे की अजिंठयाला मी प्रथमच जाणार असल्यानं तिथल्या सर्वच गोष्टी माझ्यासाठी नवीन असणार होत्या, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं मला अप्रूप असणार होतं आणि या दृष्टीनंच मी तिथल्या प्रत्येक कलाकृतीकडं पाहू शकणार होतो, तिचा आस्वाद घेऊ शकणार होतो आणि जमेल तितकं, जमेल तसं वाचकांना सांगू शकणार होतो. माझ्या दृष्टीनं ही जमेची बाजू होती.

या अजिंठा भेटीच्या निमित्तानं आणखीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे अजिंठयाला जोडून नेहमीच वेरूळचं नाव येत असल्यानं (अजिंठा-वेरूळ असं) अत्यंत धावपळीत या ठिकाणांना भेट देऊन जाणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या मनात या दोन्ही लेण्यांबद्दल संभ्रम आढळतो. औरंगाबादला गेलेल्या माझ्या काही मित्रांनी अजिंठयापेक्षा तुलनेत जवळ असलेल्या वेरूळ लेण्या पाहिल्या होत्या. मी अजिंठयाला जातोय असं समजल्यावर त्यांनी मला कैलास लेण्यांपासून अन्य काही लेण्यांमध्ये छायाचित्र काढण्यासारखं काय काय आहे, याची माहिती दिली होती. साहजिकच ती माझ्या (निदान आता तरी) उपयोगाची नव्हती. अजिंठयाची माहिती काढत असताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हाच मी ठरवलं की यावेळी आपण फक्त अजिंठा एके अजिंठाच पाहायचा. वेरूळ फिर कभी देखा जाए।

युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोडयाच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठयाच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठयापर्यंतच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासात मी प्रत्येक डोंगराकडे पाहायचो, कुठे एखादी लेणी दिसत्येय का म्हणून. पण अजिंठयाच्या कर्त्या-करवित्यांनी माझी पूर्ण निराशा केली. टी- जंक्शनपासून अजिंठयाच्या डोंगरावर एमटीडीसीच्या एसी-बसने गेलो तरी एखादा कोरीव दगडही दिसला नाही. तिथून काँक्रीटच्या बांधीव रस्त्यावरुन वर चढून गेलो अन् एका क्षणात साऱ्या लेण्या दृष्टीपथात आल्या. त्याच जागी कित्येक वेळ उभा राहून ते शेकडो वर्षांपूर्वीचं देखणं कोरीव रुप मी मनात साठवत राहिलो आणि थोडया वेळानं कॅमेऱ्यात. त्याक्षणी मी ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन यालाही शतश: धन्यवाद दिले कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौध्द लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं मला खरंच कौतुक वाटलं. बौध्द भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण असतं. अंधाऱ्या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.
या तीस लेण्यांपैकी 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बौध्द धर्माच्या हीनयानपंथाच्या काळात झाली. यामध्ये 9, 10 या चैत्यगृहांसह 12, 13 व 15 अ या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुध्दप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर 19 क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुध्दप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुध्दप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणि केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.
बुध्दाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास 26 व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.
पहिल्या गुहेतील भगवान बुध्दाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहऱ्यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहऱ्यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच.
याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं. याठिकाणी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे 14-15 व्या शतकात मायकेल एंजेलोनं चित्रकलेत द्विमितीचा आभास निर्माण केला आणि तो महान ठरला. त्याच्याही आधी आठशे वर्षे अशा कलाकृती निर्माण करणारे ते अज्ञात कलाकार किती महान असतील!
पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहे. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वाऱ्याच्या झुळुकीसरशी फडफडणाऱ्या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृध्द व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते. आज आपल्याकडे साहेबाच्या पोशाखावरुन ज्या रंगाची पँट, त्या रंगाचे मोजे घालावेत, असा संकेत रूढ झालाय, पण इथल्या चित्रांवरुन त्या काळात ज्या रंगाचा फेटा, त्या रंगाचे मोजे घालावेत, इतकी पोषाखी टापटीप सांभाळल्याचं दिसतं. बहुरंगी, बहुआयामी मानवी प्रवृत्तीचं दर्शन इथल्या विविध जातक कथा घडवतातच, त्याचबरोबर कलियुगाविषयी भाष्य करायलाही इथली शिल्पं कमी पडत नाहीत. पत्नीचे पाय चेपणारा पती हे शिल्प याचंच द्योतक.
बौध्द लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुध्दांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील 24 फुटी बुध्द मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत. केवळ एका संपूर्ण दिवसातच अजिंठयाविषयी सांगण्या-बोलण्यासारखं इतकं काही मला मिळालं की कितीही लिहीलं तरी शब्द तोकडे पडतील. संध्याकाळी परतताना वाटत होतं की अजूनही या शिल्पचित्रांकडून पुष्कळ काही समजून घ्यायचं, पाहायचं राहून गेलंय. माझी रितेपणाची ही भावना लिहीताना अजिंठयाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांना मला एकच सांगायचंय, ते म्हणजे अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठया आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते. या शिल्प-चित्रांना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी जिवाचे रान करत आहेत. या कामगिरीत आपणही असा हातभार नको का लावायला?

--

अजिंठा येथील गुहांची यादी

पहिला टप्पा : ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तपूर्व पहिले शतक लेणी क्र. 9 व 10 : चैत्यगृह लेणी क्र. 12, 13 व 15 अ : विहार
दुसरा टप्पा : इसवी सन 5 ते 6वे शतक लेणी क्र. 19, 26, 29 : चैत्यगृह लेणी क्र. 1 ते 7, 11, 14 ते 18, 20 ते 25, 27 व 28 : विहार
अपूर्ण लेणी : 3, 5, 8, 23 ते 25, 28 व 2
--
कसे जावे अजिंठयाला?
मुंबई- अजिंठा अंतर : जळगावमार्गे 491 कि.मी., मनमाडमार्गे 487 कि.मी. व पुणेमार्गे 499 कि.मी.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने औरंगाबाद व जळगाव येथून साध्या व लक्झरी गाडयांची सोय, अन्य खाजगी टूर ऑपरेटर कंपन्यांतर्फेही मुबलक वाहन सुविधा उपलब्ध.
नजीकचे रेल्वे स्थानक : मध्य रेल्वेचे जळगाव स्थानक (58 कि.मी.), औरंगाबाद (107 कि.मी.)
नजीकचे विमानतळ : औरंगाबाद 108 कि.मी.
राहण्याची सुविधा : अजिंठा, फर्दापूर तसेच औरंगाबाद येथे एमटीडीसीची पर्यटक निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. औरंगाबाद येथे आयटीडीसीचेही निवासस्थान. त्याखेरीज औरंगाबाद, जळगाव येथे अनेक खाजगी हॉटेल्स, लॉज उपलब्ध.

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

मनाची मशागत

उत्क्रांतीनंतरच्या कालखंडात मानवाच्या प्रगतीची सुरवात ही खऱ्या अर्थानं शेतीपासून झाली. सुरक्षिततेसाठी टोळया करून राहणाऱ्या मानवानं उपजिविकेसाठी शेती करण्यास प्रारंभ केला आणि एका वेगळया संस्कृतीची मूळ या पृथ्वीतलावर रुजली. मातीची मशागत करत मानवानं तेथपासून आजतागायत आपल्या प्रगतीचा विस्तार केला. पुढं त्याला औद्योगिकीकरणाची, माहिती तंत्रज्ञान क्रांतीची जोड मिळत गेली असली तरी या सर्व प्रगतीचा मूळ पाया हा शेतीकरणात होता, किंबहुना आजही मानवी जीवनाचा प्रमुख पाया हा शेतीच आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
जमिनीची मशागत करण्याचा शोध लावण्यामागं मानवाची विचारशक्ती ही खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. विचार करण्याची, आपल्या भावभावना वेगवेगळया माध्यमांतून व्यक्त करण्याची, अभिव्यक्त होण्याची शक्ती मानवाला लाभली. त्याचा प्रगत होत जाणारा, अधिकाधिक विचारक्षम होत जाणारा मेंदू हा त्यामागं आहे. या विचारशक्तीच्या, मन:शक्तीच्या बळावर माणसानं साऱ्या पृथ्वीवर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. इतर प्राण्यांना एकतर त्यानं आपला गुलाम केलं किंवा त्यांची निवासस्थानं असलेली अरण्यं प्रगतीच्या नावाखाली गिळंकृत करून त्यांच्या आस्तित्वालाच धक्का पोहोचवला. कित्येक वनस्पती-प्राण्यांच्या स्पेसीज त्यानं आजपर्यंत नष्ट करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
मानवाचं मन हे एक असं प्रकरण आहे की सातत्यानं ते आपल्या प्रगतीसाठी (की स्वार्थासाठी?) सातत्यानं वेगवेगळया क्लृप्त्या शोधण्यात मग्न असतं. मानवी जीवनाच्या इतिहासाच्या सुरवातीपासून पाहिलं तर असं लक्षात येईल की मातीची मशागत सुरू होण्यापूर्वी मानवाच्या मनाच्या मशागतीला सुरवात झाली होती. ही प्रक्रिया आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. मानवाच्या सो कॉल्ड प्रगतीला त्यानं केलेली मनाची मशागतच पूर्णत: कारणीभूत ठरली आहे. काहीवेळा ही मशागत चुकीच्या मार्गानं गेली आणि मानवी इतिहासाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि जिथं उत्तम मशागत झाली त्यावेळी अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टी मानवी इतिहासात नोंदल्या गेल्या.
म्हणजेच लौकिकार्थानं मानवी संस्कृतीची सुरवात ही मातीच्या मशागतीपासून सुरू झाली, असं आपण ढोबळ मानानं मानत असलो तरी त्यापूर्वी त्याच्या मनाच्या मशागतीपासूनच, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीमधूनच त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग मानव शोधत गेला, चोखाळत गेला, असं म्हणता येईल.
मानवाच्या या प्रगतीला विज्ञानाच्या विविध शोधांनी नवे आयाम प्राप्त करून दिले. औद्योगिकीकरणानं तर त्याच्या आकांक्षांना भरारी मारण्यासाठी नवे पंख दिले. कष्ट करून जीवनाची वाटचाल साध्यासरळ पध्दतीनं करणाऱ्या मानवाला औद्योगिकीकरणानं कमी कष्टात भरपूर सुखं मिळविण्याचा राजमार्ग दाखवला. त्या मार्गानं वेगवान वाटचाल करणाऱ्या मानवानं मग इकडंतिकडं न पाहता केवळ भौतिक सुखांची पाठ धरली. लाइफस्टाइल अधिकाधिक उच्च दर्जाची करण्याकडं त्याचा कल वाढला, अधिकाधिक भौतिक सोयीसुविधा आणि साधनांच्या तो मागं लागला. मानवाला या दिखावटी, कचकडयाच्या दुनियादारीचा मोठा मोह पडला आहे. विवध माध्यमांमधून हीच लाइफस्टाइल खरी आणि योग्य म्हणून या महागडया लाइफस्टाइलचं प्रचंड स्तोम माजवत मार्केटिंग सुरू आहे. या गोष्टी पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या अथवा परवडणाऱ्या आणि न परवडणाऱ्या अशा सर्व प्रकारचे लोक तिचा स्वीकार करत आहेत. स्वीकार न करणारे लोकही तिला प्रतिकार अथवा प्रतिवाद करू शकत नाहीत, इतकी तिचा भुरळ समाजमनावर पडली आहे. अशा गोष्टींच्या मागं लागत असताना मानवतावाद किंवा माणुसकी मात्र मागं पडू लागली आहे, ही खेदाची बाब आहे.
मानवी मन काळाबरोबर प्रगत आणि प्रगल्भ होत गेलं असलं तरी आज या प्रगल्भतेलाही संकुचिततेची एक काळी किनार लाभताना दिसत आहे. माणूस भौतिक अर्थानं कितीही मोठा होत गेला तरी मनानं मात्र आक्रसत असलेला दिसतो आहे. आजचा जमाना शहरीकरणाचा आहे, मात्र शहरात माणसं वाढत चालली असली तरी या शहरांतून माणुसकी मात्र हद्दपार होत चाललेली दिसते. जागतिकीकरणानं या शहरी माणसाला लाइफस्टाइलच्या एका अभेद्य चक्रव्यूहात असं काही बांधून टाकलं आहे की तो अखंडितपणे फिरत राहिला तरी तो भेदणं त्याला शक्य होत नाही. या लाइफस्टाइलच्या नादाता आणि स्वत:च्या व्यापात तो इतका गुंतून गेला आहे की स्वत:चा शेजारी कोण, हेही त्याला माहित नसतं. माहिती तंत्रज्ञानानं जगात मोठी क्रांती झाली. मार्शल मॅक्लुहानच्या म्हणण्यानुसार सारं जग एक खेडं बनलं. सारं जग जवळ आलं, मात्र आपला शेजारी मात्र दुरावला. आता हे दुरावणं शेजाऱ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर मोबाईल क्रांतीनं त्याच्याही पुढची मजल मारली आहे. घरातल्या माणसांतही आज संवाद राहिलेला नाही. मोबाईल कंपन्यांना पैसे देऊन त्यावरून एकमेकांशी तासंतास गप्पा मारणारी मंडळी समोरासमोर आल्यावर हाय-हॅलो च्या पलीकडं सरकू शकत नाहीत, ही या माहिती क्रांतीच्या युगातली सर्वात खेदजनक अशी बाब आहे.
सर्व प्रकारच्या नात्यांना आपण हाताच्या अंतरावर ठेवता ठेवता काही किलोमीटरपर्यंत नेऊन ठेवतो आहोत. कोणालाही कोणाविषयी ऍटेचमेंट राहिली नाही. नात्यांचे बंध-अनुबंध सुटे होत चालले आहेत. एकत्र कुटुंबं तर आता टीव्हीवरच्या मालिकांपुरतीच आणि ती सुध्दा एकमेकांविषयी द्वेषभाव जोपासण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहेत. सर्वच नातीगोती आपण व्यावहारिक पातळीवर नेऊन ठेवली आहेत. आईबापाचं नातंही त्याला अपवाद राहिलेलं नाही. आईबाप जे करतात, ते त्यांचं कर्तव्य असतं. मुलं जन्माला घातली तर ही कर्तव्यं त्यांनी पार पाडायलाच हवीत, अशी भावना आजच्या मुलामुलींमध्ये बळावत चाललेली दिसते. आईवडलांविषयी एवढी कृतज्ञता असेल, तर अन्य नात्यांच्या विषयी बोलायलाच नको? निस्वार्थ मैत्र तर हल्ली पाहायलाच मिळत नाही. मिळालेल्या मोकळिकीला स्वैराचाराचं आणि पुढं व्यभिचाराचं रुप येताना दिसतं आहे. आणि त्याचंही कुणाला काही वाटेनासं झालंय, इतका कोरडेपणा सर्वत्र निर्माण होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांचा कल देवाकडं वाढू लागलाय, ही चांगली बाब आहे, असं म्हणावं तर त्यातही भक्तीपेक्षा स्वार्थाचाच अधिक वास येतो. धकाधकीच्या जीवनातली वाढती असुरक्षितता ही त्याला सर्वाधिक कारणीभूत असल्याचं दिसतं. गरीबाला जिथं पोट भरण्यासाठी पोटोबाच्या मागं धावावं लागतं, तिथं पोटं भरलेल्या, करू भागलेल्या लोकांनी अशा लोकांनाही आपल्याबरोबर या देवाच्या भजनी लावण्याचा उद्योग चालवलाय. या जाळयात सारेच सापडू लागलेत. प्रसारमाध्यमंही अशा प्रवृत्तींचं उदात्तीकरण करू लागली आहेत. त्यामुळं डोळे झाकून अशा लोकांचं अनुकरण करणाऱ्याचं प्रमाणही वाढीस लागलं आहे.
अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आपली डोकी गहाण ठेवली आहेत की काय, असा प्रश्न भेडसावू लागला आहे. माणसानं सुरवातीच्या टप्प्यापासून आपल्या मनाची जी मशागत केली होती, ती मनाची जमीन क्षारपड होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुसऱ्यांच्या चकचकीत मानसिक गुलामगिरीच्या मॉलमधला माल उसना घेण्यापेक्षा आपल्या मनाच्या जमिनीवर सातत्यानं विचार करून जितकं मिळेल तितकं पीक आपण घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली तरच तिला एखादेवेळेस सामूहिक, सामाजिक शक्तीचं स्वरुप प्राप्त होईल. अन्यथा ज्या चाकोरी मोडत, उध्वस्त करत आपण वाटचाल करत इथवर आलो आहोत, पुन्हा त्या चाकोरीमध्ये बांधून टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाच्या सर्वच पातळीवरील प्रगतीच्या वाटा त्यामुळं अधिक व्यापक होतीलच शिवाय त्या वाटचालीला एक ठोस असं अधिष्ठान प्राप्त होईल.
माती हाच शेतीचा जीव की प्राण. पण माणसाच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्तीमुळं मातीचा कस कमी होत चालला आहे आणि मातीशी नातं सांगमारी माणसंही कमी होत चालली आहेत. मातीचा कस आणि तिच्याशी इमान कायम राखण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढं आहे. हावरटपणामुळं मातीचा कस जसा कमी होत आहे, तशी नातीसुध्दा दुरावत चालली आहेत. मातीचं आणि नात्यांचं सारखंच आहे. अधिकारांविषयी आपण फार जागरूकता दाखवतो; कर्तव्यांना मात्र सोयीस्कररित्या विसरतो. जमिनीतून वारेमाप पीक घेताना तिला योग्य त्या प्रमाणात आणि योग्य ते घटकही परत द्यावे लागतात. पण आपण ते देत नाही. तसंच नात्यांच्या व्यवहारात आपण फक्त अधिकार जाणतो, कर्तव्यच विसरतो. हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून आता दोन्ही ठिकाणी नव्यानं खतपाणी आणि मशागतीची आवश्यकता आहे.

रविवार, ३० जानेवारी, २०११

निर्मलाताईंची 'निर्मल' मोहीम


एक मध्यमवर्गीय गृहिणी... अभियंता पती, तीन मुलं एवढंच तिचं विश्व... इतरांप्रमाणंच तीही वाढत्या महागाईनं त्रस्त... इतरांहून फरक इतकाच की वाचनामुळं आणि पूर्वाश्रमीच्या शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळं सामाजिक अन् पर्यावरणविषयक जाणीवा तीव्र झालेल्या... त्यातून ती स्वत:चं घर कचरामुक्त करून त्यापासून गांडूळखत, गॅस तयार करण्याच्या मागे लागते... तिच्या या प्रयत्नांना यश येतं... या यशानं हुरूप वाढून ती हळूहळू आपली कार्यकक्षा वाढवते... आणि तिच्या प्रकल्पाला वीजनिर्मितीचीही जोड लाभते... घरापासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा केवळ पाच वर्षांतच सव्वादोन कोटीची उलाढाल असणाऱ्या 'विवम् ऍग्रोटेक'च्या रुपात देशभर विस्तार झाला... आणि या प्रकल्पांना देशातीलच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञांकडून प्रशंसेची पोचपावती मिळाली. ही यशोगाथा आहे औरंगाबादच्या निर्मला कांदळगावकर यांची.
निर्मलाताईंचं शिक्षण बीएस्सी. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात एम. ए. ही केलं. पर्यावरण विषयाची सुरवातीपासूनच आवड. त्यामुळं दिल्ली विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्राची पदविका परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. वाचनाची त्यांना मोठी आवड. या आवडीपोटी शेती, पर्यावरण या विषयावर पुष्कळ वाचन केलं, अभ्यास केला. आपल्या दैनंदिन बेजबाबदार वर्तनातून आपण पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत, याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच शेतकरी व पर्यावरण या दोन्ही घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या भावनेनं त्यांना अस्वस्थ केलं. अभ्यासाअंती त्यांना मार्गही सापडला. हा मार्ग होता गांडूळ खतनिर्मितीचा.
गांडूळखत निर्मिती :
पारंपरिक पध्दतीतील तोटे दूर करून निर्मलाताईंनी स्वरुप गांडूळ खत निर्मिती संयंत्राची निर्मिती केली. यात कमी श्रमात व कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यापासून खत तयार करता येते. शेतकरी आपल्या शेतातील कचरा, शेण वापरून शेतातच खत तयार करू शकतात. खत उत्तम प्रकारचे व शुध्द असल्यामुळे, पीक चांगले येतेच, शिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. निर्मलाताईंच्याच शब्दांत सांगायचे तर रासायनिक खताचा वापर न केल्याने अगदी विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खामखेडासारख्या गावात महिलांनी बचतगट स्थापन करून गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही अथवा श्रमही जास्त पडत नाहीत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे एक साधन सुरू झाले आहे.
शहरातील कचरा, त्याच्या विल्हेवाटीची अशास्त्रीय पध्दत, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान व पर्यायाने मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांवरही गांडूळखत हा योग्य व शास्त्रीय उपाय होऊ शकतो, असे निर्मलाताईंच्या लक्षात आले. शहरी कचऱ्याचेही गांडूळखतात रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जिथे कचरा निर्माण होतो, तिथेच त्याचे गांडूळखत केले तर खर्च कमी होतोच, आणि कचरा रस्त्यावरही जाणार नाही व परिसरही स्वच्छ राहील, असे त्यांना वाटले. त्यामुळे घरात तयार होणारा कचरा वेगळा केला तर त्यातील कुजणाऱ्या कचऱ्यापासून गांडूळखत होऊ शकते आणि न कुजणाऱ्या प्लास्टीकसारखा कचरा पुन्हा वापरात येऊ शकतो. ही बाब लक्षात येताच त्यांनी घरातील कचऱ्यापासून गांडूळखत तयार करणारे छोटे मॉडेल तयार केले. या कचऱ्यात विशिष्ट जीवाणू घातले की त्याचा वासही येत नाही, त्यामुळे ते घरात ठेवले तरी त्यात कचरा असल्याचे लक्षात येत नाही. निर्मलाताईंनी औरंगाबादच्या घरातच गांडूळखत उत्पादन, त्यासाठी लागणारी यंत्रे व गांडुळांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी बनविलेल्या 'स्वरुप' गांडूळखत निर्मिती संयंत्राच्या साह्याने एका महिन्यात 1 ते 1.5 टन गांडूळखत बनविता येते. गॅल्व्हनाइज्ड जाळी आणि लोखंडापासून त्यांनी घडी पध्दतीचे संयंत्र बनविले आहे. त्यामुळे ते कोठेही नेण्यास सोपे आहे. आपल्या घरातील एक किलोच्या कचऱ्यापासून ते दरमहा 75 टन गांडूळखत बनविणारी प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या उभारले आहेत. आज केवळ पाच वर्षांत नेपाळपासून, पंजाब, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील 222 तालुक्यांत त्यांचे प्रकल्प पोहोचले आहेत. पाच हजारहून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. एकटया औरंगाबाद शहरात हे गांडूळखत निर्मिती संयंत्र घेणारे सुमारे चार हजार नागरिक आणि दीडशे संस्था आहेत.
निर्मलाताईंच्या या शास्त्रीय व बहुपयोगी उपक्रमाची भारत सरकारच्या कृषी खात्यानेही दखल घेतली असून दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांच्या स्टॉलसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली. राज्याच्या तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक शासकीय उपक्रमांच्या जागेवर (उदा. कृषी, वनीकरण आदी) तसेच अनेक मान्यवरांच्या घरांतही निर्मलाताईंची स्वरुप संयंत्रे बसविण्यात आली आहेत. याठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे गांडूळखताच्या प्लँटमधून गांडूळपाणी मिळवले तर ते एक अत्यंत उपयुक्त कीटकनाशक आहे आणि त्याचे अन्य दुष्परिणामही नाहीत.
बायोगॅस निर्मिती :
गांडूळखत निर्मितीनंतर काय, हा प्रश्न पुढे निर्मलाताईंना पडलाच नाही. कारण त्याचे उत्तर त्यांनी शोधून ठेवले होते, ते म्हणजे बायोगॅस निर्मिती. घरातील कचऱ्याचे त्यांनी सुका कचरा, ओला कचरा आणि नष्ट न होणारा कचरा असे वर्गीकरण केले. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंडया, कांद्याची टरफले थोडक्यात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पदार्थांचे उरलेले भाग, कागदाचे तुकडे- हा झाला हिरवा कचरा. यापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्माण होते. त्यानंतर जेवणाच्या ताटातील, भांडयातील उष्टे अथवा शिल्लक अन्नपदार्थ, चहाच्या पातेल्यातला चोथा, खरकटे पाणी हा झाला ओला कचरा. हा कचरा बायोगॅसच्या संयंत्रामध्ये टाकून गॅस तयार केला जातो. तो गॅस पाइपच्या साह्याने स्वयंपाकघरात आणून थेट वापरता येतो. नष्ट न होणाऱ्या सुक्या कचऱ्यात रिकाम्या बाटल्या, टयूब, खराब बल्ब, प्लास्टीकचे तुकडे व पिशव्या, धातू, काच यांचा समावेश होतो. या वस्तू आपण भंगारवाल्याला देऊ शकतो. त्याच्या विक्रीतून पैसा मिळू शकतो. याठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे घरातील कोणताच कचरा या पध्दतीमुळे डंपिंग ग्राऊंडवर जाणार नाही. तयार होणारे गांडूळखत 10 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाते. खरकटया पाण्यापासून बायोगॅस मिळतो. त्यामुळे गॅसची बचत होते.
साधारण सकाळी दोन किलो अन्न व सायंकाळी दोन किलो अन्न बायोगॅस संयंत्रात टाकले तर त्यापासून 3 तास पुरेल एवढा गॅस मिळतो. त्याची ज्योतही निळया रंगात जळते. निर्मलाताईंनी त्यांच्या घरातच या गॅसचं प्रात्यक्षिकच आम्हाला दाखवलं. शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्रात्यक्षित पाहण्यासाठी त्यांच्या घरी येऊन गेले आहेत.
या गॅसला कोणताही वास येत नाही. त्याचप्रमाणे त्या स्फोट होण्याचीही भिती नाही. जमिनीमधला मिथेन वायू काढून जाळण्याऐवजी कचऱ्यापासून निर्माण होणारा मिथेन वापरणे कधीही हितावहच ना!
आज राज्यभरात बसविलेल्या विवम् ऍग्रोटेकच्या संयंत्रांमधून दररोज सुमारे 500 टन कचऱ्याचे गांडूळखत अथवा बायोगॅसमध्ये रुपांतर होत आहे. यामध्ये आणखी भरच पडत आहे. औरंगाबादसह राज्यात 50 शहरांत असे बायोगॅसचे प्रकल्प बसविले आहेत. पुणे महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 11 नगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयातील कॅन्टीनसह अनेक शासकीय इमारती, खासगी कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये ही संयंत्रे बसविली आहेत. प्रतिष्ठेच्या आयएसओ मानांकन मिळवण्यासाठीही अनेक कंपन्या आता हे संयंत्र बसविण्याला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. हॉटेल, धाबे यांनाही डंपिंग ग्राऊंडऐवजी असा प्रकल्प परवडतो.
निर्मलाताईंनी नुकताच चंद्रपूर नगरपरिषदेसाठी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केला आहे. गंजवार्ड भाजी मार्केटमधील रोजच्या 1500 किलो कचऱ्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते. त्यातून निर्माण होणारा गॅस शेजारच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या कॅन्टीनला देण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प स्वर्णजयंती महिला बचत गटामार्फत चालविला जातो.
वीजनिर्मिती प्रकल्प :
केवळ बायोगॅस निर्मितीवर निर्मलाताई थांबल्या नाहीत. त्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. याअंतर्गत जनरेटरमध्ये (डिझेलऐवजी बायोगॅस प्रकल्पांत तयार होणारा) बायोगॅस वापरला जातो. आज वीज तयार करण्यासाठी कोळशाचे ज्वलन केले जाते. यासाठी ऑक्सिजन मोठया प्रमाणात जळतो. ऑक्सिजनची किंमत पाहायला गेलो तर ती 36 रुपये प्रतिकिलो आहेच, पण जीवनासाठी अनमोल आहे. अशा वीजनिर्मितीचा खर्च ऑक्सिजनच्या किंमतीसह 120 रुपये प्रतियुनिटपर्यंत असू शकतो. मात्र कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा खर्च 3 रुपये प्रतियुनिट इतका असतो आणि प्रकल्पही पूर्णत: पर्यावरण सुसंगत.
नांदेड येथील केळी मार्केटमध्ये एक बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. तिथल्या केळीच्या लिलावानंतर उरणारे देठ, बुंधे, पाने असा रोजचा 1500 किलो कचरा प्रकल्पात टाकला जातो. याठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव आहे. याखेरीज चंद्रपूर नगरपालिका, वर्धा नगरपालिका, पंढरपूर नगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, रामटेक नगरपालिका व कागल नगरपालिका या ठिकाणी दीड ते पाच टनांपर्यंतचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोकणात चिपळूण आणि विदर्भात अंजनगाव- सुर्जी येथेही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
निर्मलाताईंच्या कार्याची आज अनेक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अधिकारीही त्यांचे काम पाहून प्रभावित झाले आहेत. केंद्र शासनाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या स्टॉलला मोफत जागा उपलब्ध केलीच शिवाय ठिकठिकाणी त्यांची मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली. महाराष्ट्र शासनाने कृषी सल्लागार समितीमध्ये स्थान देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला आहे. नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांत बायोगॅस व गांडूळखत या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा पुरस्कार, माँसाहेब मीनाताई ठाकरे विशेष गौरव पुरस्कार, बेस्ट प्रोजेक्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध नगरपालिकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याच्या कामाचा ओघही त्यांच्याकडे पुष्कळ आहे.
'आधी केले, मग सांगितले' अशा वृत्तीने निर्मलाताईंनी कचऱ्यापासून वीजनिर्मितीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. यापुढे सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याबरोबरच 'व्हर्मीकंपोस्टिंग' या विषयावर पीएच. डी. करण्याचा त्यांचा मानस आहे. शाळा व मंदिरे याठिकाणी प्रबोधन शिबिरे घेण्याचे प्रमाणही त्या वाढविणार आहेत. अत्यंत साधी राहणी, मनमोकळं बोलणं यामुळं आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या निर्मलाताई आजही 'जमिनीवर'च असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवतं. या जमिनीचे उपकार फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अथक सुरू आहेत. त्या प्रयत्नांत आपणही सहभागी होण्याची गरज आहे.

बचतगटांना काम
चंद्रपूर येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आले आहे. या महिला सायकलवरुन कचरा गोळा करतात. प्रत्येक महिलेकडे साधारण 250 घरे आहेत. घरगुती स्तरावरच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांच्या ताब्यात मिळते. यामध्ये हिरवा भाजीपाला, अन्य सुका कचरा व ओला कचरा असा त्या गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा दहा रुपये त्यांना मिळतात. जर कोणी ही मामुली रक्कम देण्यासही का- कु केले तर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे संबंधिताची तक्रार करण्याची मुभा त्या महिलेला असते. दरम्यान गोळा केलेल्या कचऱ्यातील हिरवा कचऱ्यापासून गांडूळखत केले जाते. प्लास्टीक, धातू, काच, बाटल्या वगैरे सामान विकूनही या महिलेला पैसे मिळतात. त्यामुळे कचरा गोळा करण्याचा मोबदला, गांडूळखत विक्री व भंगार विक्री यातून महिन्याकाठी तिला तीन ते चार हजार रुपये सुटू शकतात. तसेच त्यासाठी संपूर्ण दिवस न राबता केवळ चार तास द्यावे लागतात, अशी माहिती निर्मलाताईंनी दिली.
--
संपर्कासाठी पत्ता :
निर्मला कांदळगावकर,
विवम् ऍग्रोटेक,
ए-6, वेदांत गृहकुल, नवे श्रेयानगर,
औरंगाबाद, 431 005.
दूरध्वनी क्र. 0240- 2346532, 2321863
इ-मेल : vivamgroup@rediffmail.com
वेबपेज : http://vivamgroup.tripod.com

रविवार, २८ सप्टेंबर, २००८

एका क्लिकवर महाराष्ट्र!

 (दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत रविवार पुरवणीमध्ये दि. २८ सप्टेंबर २००८ रोजी वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' वेब पोर्टलविषयी लिहीलेले विशेष फीचर...)


महासंचालक मनिषा पाटणकर-म्हैसकर आणि संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्यासमवेत 'टीम महान्यूज'. (बसलेल्या डावीकडून) वर्षा आंधळे, मयुरा देशपांडे-पाटोदकर. (उभे डावीकडून) प्रमोद धोंगडे, नंदकुमार वाघमारे, मंगेश वरकड, डॉ. गणेश मुळे, किरण मोघे, आलोक जत्राटकर आणि अंजू कांबळे




मुंबई, दि. २७ सप्टेंबर : एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस थाटणाऱ्यालादेखील शक्य न होणारे कार्य माहिती व जनसंपर्क विभागाने एका क्लिकसरशी करून दाखविले आहे. राज्याचा हा विभाग जगाच्या गतीसोबत धावू शकतो हे दाखवून देताना महाराष्ट्राच्या उदरात काय काय दडले आहे, याचा खजिनाही ई-वाचकांसाठी खुला करण्याचे मोठे काम या विभागाने केले आहे. हे करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटलादेखील मोठे आव्हान या पोर्टलने उभे केले आहे.

माहिती खात्याकडून बातम्यांचे टपाल आले की आता घरी जाण्याची वेळ झाली असा समज गेली काही वर्षे रुढ होता. कारण सगळ्या दैनिकांमधे आपापले काम आटोपून घरी निघाल्यानंतर कधीतरी दिवसभर काय घडले, याचे टपाल येत असे. ते टपाल यायचे, ते देखील विस्कळीत स्वरुपात. काळ बदलला. कॉम्प्यूटर आले, तसे बातम्यांचे स्वरुप बदलले. त्यानंतर कालांतराने माहिती आणि जनसंपर्क विभाग चर्चेत आला तो रंगीत लोकराज्यने स्वतःचे रंगरुप बदलत माहिती देण्याची पद्धती देखील बदलली तेव्हा. त्याच काळात दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन सुरु करण्यात आला. (त्यासाठी या खात्याने ऊर्जा विभागाला धन्यवाद द्यायला हवेत. कारण गावात सकाळी-सकाळी लाईट गेले की बंद पडलेले रेडिओ सुरु होतात आणि त्यावर दिलखुलास कार्यक्रम लागतो !) त्यानंतर या विभागाकडून 'जय महाराष्ट्र' या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमाद्वारे मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या माहितीपूर्ण मुलाखती येऊ लागल्या. पण माहिती खात्याचे बातम्या देण्याचे मुख्य काम खऱ्या अर्थाने आजच्या काळाशी सुसंगत झाले ते महान्यूज या पोर्टलमुळे!

एकेकाळी राज्यातल्या विविध दैनिकांना शासकीय बातम्या पुरविणारा विभाग अशी स्वतःची ख्याती या विभागाने पूर्णपणे पुसून स्वच्छ करीत आधुनिक जगाशी नवी ओळख करून दिली. आज http://www.mahanews.gov.in या पोर्टलमध्ये किमान पाच दहा दैनिकं चालविण्याची ताकद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाईव्हेंन्ट, साक्षात्कार, महासंस्कृती, तारांकित, फर्स्टपर्सन, चौकटीबाहेर, महाऑप, गॅलरी, हॅलो अशा विविध सदरांच्या माध्यमातून या पोर्टलने अवघा महाराष्ट्र एका क्लिकवर आणून ठेवला आहे. केवळ एवढेच नव्हे, तर बंद पडलेले एम्प्लॉयमेंट न्यूज कल्चरदेखील या महान्यूजने जिवंत केले आहे. या पोर्टलवरील 'महाऑप' या सदरात नोकरी मिळण्याची किमान सहा हजार ठिकाणं उपलब्ध करून दिलेली आहेत. सरकार केवळ माहितीच देते, असे नाही; तर, त्यासोबत तुम्हाला रोजगारही देते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इंडो-तिबेट पोलीस दलात ६६ जागा भरल्या जाणार आहेत, इथपासून ते बँक ऑफ बडोदामध्ये लिपिकाच्या हजार जागा भरणार आहेत, हे सांगण्याचे व त्याच्याशी संबंधित ईमेल किंवा वेबसाईट सांगण्याचे कामही हे पोर्टल करीत आहे. (मनसेच्या कार्यकर्त्यांनादेखील कोठे मराठी तरुणांना नोकऱ्या आहेत हे शोधण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो !)'

एकीकडे नोकरी सांगण्याचेच काम हे पोर्टल करते, असे नाही; तर, त्यासोबत महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, श्रद्धास्थाने, वस्त्रप्रावरणे, लोककला, संतपरंपरा, सण-उत्सव, गडकिल्ले यांची माहिती, नवनवीन बातम्या, वेगवेगळ्या मुलाखती, राज्यभरातील विविध फोटो असा खजिनाच यातून खुला होतो.

माहिती खात्याला 'गुडलूक' देणाऱ्या खात्याच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर या पोर्टलच्या एडिटर इन चिफ आहेत, तर सीईओची जबाबदारी दमदारपणे सांभाळली आहे श्रद्धा बेलसरे यांनी. त्यांच्या टीममध्ये डॉ. गणेश मुळे यांच्यासोबत वर्षा आंधळे, आलोक जत्राटकर, डॉ. किरण मोघे, नंदकुमार वाघमारे, अंजू कांबळे, प्रमोद धोंगडे, मंगेश वरकड यांच्यासह मयुरा देशपांडे, सुनील पाटील, अरविंद जक्कल असा चमू काम करीत आहे. कधी काळी हे सगळे लोक सरकारी खात्यात काम करीत होते, हे सांगताना आता संकोच वाटावा, इतका व्यावसायिकपणा या सगळ्या टीममध्ये आला आहे. अर्थात याचे सारे श्रेय दिलखुलासपणे मनीषा म्हैसकर यांनाच द्यावे लागेल. संपूर्ण विभागाला सतत नवनव्या योजनांत गुंतवून टाकण्याचे व कात्रणं कापण्यातून सुटका करण्याचे काम त्यांनी केले. पोर्टलमुळे विभागाची प्रतिमा बदलली, काम करणाऱ्यांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आला. आता या विभागात काम करणाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था मात्र समाधानकारक नाही. ती देखील 'गुडलूक' असायला हवी. तेवढे झाले की मंत्रालयात एखादे कॉर्पोरेट ऑफिस कार्यरत असल्याची जाणीव सतत सगळ्यांना होत राहील.

रविवार, २८ जानेवारी, २००७

वंशवादाचा बळी?

(आज, रविवार, दि. २८ जानेवारी २००७ रोजी दै. सकाळच्या साप्ताहिक सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)





जानेवारीच्या मध्यात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' या इंग्लंडमधील एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये ब्लडी पाकी (युरोपात आशियाई नागरिकांसाठी वापरले जाणारे अवमानकारक संबोधन), डॉग आदी अवमानास्पद विशेषणे वापरून सहभागी सहकलाकारांनी तेजोभंग केला. वर्णभेदाच्या या वर्तणुकीचा भारतीयांबरोबरच ब्रिटनमधील प्रेक्षकांनी तीव्र निषेध केलाच; पण त्याचे पडसाद ब्रिटनच्या संसदेतही उमटले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही त्याचा निषेध केला.

तब्बल साडेतीन कोटी रुपये घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या शिल्पाला हा प्रकार अगदीच अनपेक्षित असावा, अशातला भाग नाही. किंबहुना या सेलिब्रिटीजनी एकमेकांशी गुडीगुडी बोलणे किंवा वागणे यात प्रेक्षकाला काय रस असणार? त्यापेक्षा त्यांच्यातील भांडणे, तणावाचे संबंध आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य हाच या कार्यक्रमाच्या टीआरपीचा आत्मा आहे. त्यात आपली शिल्पाही कसलेली (की कसली का असेना!) अभिनेत्री आहे. तिनं छान रडून वगैरे या कार्यक्रमातील अन्य कलाकारांच्या तुलनेत आपली लोकप्रियता बळकट केली आहे. त्याबद्दल तिला मानायलाच हवं. आता झाल्या प्रकाराबद्दल घूमजाव करीत शिल्पाने व्यावसायिकतेची प्रचिती दिली आहे. असे असले तरी आम्ही तिच्याशी सहमत आहोत, असे मात्र नाही. कोणत्याही भारतीयाची किंवा कोणत्याही नागरिकाच्या राष्ट्रीयत्वाची खिल्ली, कुचेष्टा ही बाब निषेधार्हच आहे. या ठिकाणी केवळ या एकूण प्रकरणामागची व्यावसायिकता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुळात शिल्पा शेट्टी प्रकरणातून, त्यापूर्वी काही दिवसच अगोदर घडलेल्या एका गंभीर घटनेकडे वाचकांचे लक्ष वेधायचे आहे. रायगड जिल्ह्यातील रोह्यानजीक माळसाई या खेड्यात गेल्या अकरा डिसेंबरला स्टीफन बेनेट या ब्रिटन पर्यटकाचा मृतदेह झाडाला फाशी दिलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर या घटनेविषयी अनेक तर्कवितर्क लढविले गेले. परस्पर विसंगत माहिती सामोरी येत गेली. गावातील एका महिलेची छेड काढल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्याला बदडून अखेर झाडावर फाशी दिले, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सहा ग्रामस्थांना अटकही झाली आहे. पोलिस तपासात स्टीफनविषयी काही संशयास्पद बाबी उजेडात आल्या आहेत. तो अमली पदार्थ घ्यायचा, गोव्यात सारखी हॉटेल बदत बदलायचा. अशा माहितीमुळे स्टीफनच्या मृत्यूभोवतीचे गूढ वाढलेय.

मुळात तो मुंबईहून गोव्याला जाताना मध्ये रोझातच का उतरला आणि चालत माळसाई गावाकंडे का गेला. या प्रश्नाचे उत्तर सांपडलेले नाही. त्याच्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे मात्र स्टीफन अत्यंत सुस्वभावी होता. मादक पदार्थांच्या सेवनाच्या सवयीचाही त्यांनी इन्कार केलाय. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार तो एक चांगला पर्यटक होता. पोलिसांना आढळलेल्या काही संशयास्पद बाबी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्याच्या नातेवाईक, मित्रांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू. त्या दिशेने आपण विचार केला तर या परदेशी पर्यटकाच्या खून प्रकरणाचे गांभीर्य आणखीचं वाढते, जरा स्टीफनच्या जागी स्वतःला ठेवून पाहू. पर्यटनाची हौस असलेला स्टीफन रोह्यात मध्येच गाडी थांबलेली पाहून उतरला. कोकण रेल्वे मार्गाच्या निसर्गसौंदयनि भारावलेला स्टीफन त्याचा आस्वाद घेत चालू लागला, असाच चालत तो एका गावात पोहोचला. हे गाव कोणते, पुढे काय लागते, परिसरात आणखी काय काय पाहण्यासारखे आहे, या विषयी किंवा आपण चुकून स्टेशनपासून फारच दूर आलो आहोत, आता परत कसे जायचे, या विषयी त्याला माहिती हवी असेल, त्यासाठी एखाद्या ग्रामस्थाला विचारणे क्रमप्राप्त होते; पंण विचारणार कसे? भाषेचा मोठा अडसर त्याच्या आणि ग्रामस्थांच्या दरम्यान होता. त्यातच त्याला एक महिला दिसली. आपले प्रश्न त्याला हातवारे करून विचारण्याखेरीज दुसरे गत्यंतरच नव्हते. आता त्याच्या हातवाऱ्यांचा त्या महिलेने आणि ग्रामस्थांनी काय अर्थ घेतला. याला स्टीफन जबाबदार कसा? आपल्या परिसरातल्याच जंगलातला एखादा दुर्मिळ प्राणी (किंवा बिबट्या जरी) गावात आला तर त्याला लाठ्या-काठ्या आणि दगडांनी ठेचून मारणाऱ्या आपल्या अडाणी जनतेसाठी स्टीफन हा एखाद्या एलियनसारखाच (परग्रहावरचा मानव) होता. त्याच्याही वाट्याला तेच आले. पोलिस तपासात जर स्टीफन हा वंशवादाचा बळी उरल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आल्यास त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असेल? आज शिल्पा शेट्टीसाठी आपली अस्मिता जागृत झाली आहे. उद्या स्टीफनच्या मृत्यूबद्दल आपण तितक्याच पोटतिडकीने ब्रिटनवासीयांची क्षमायाचना करू शकू का? जागतिक वंशवादाबद्दल ओरड करण्यापूर्वी एकदा आपल्या देशातील अठरापगड जातीधर्माच्या भिंतीत बंदिस्त सामाजिक परिस्थितीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, असे नाही वाटत? शेवटी परमपूज्य राजकुमार यांच्या शब्दांत या साऱ्या गोष्टीचे सार सांगायचे म्हणजे 'जिनके खुदके घर शिशे के होते हैं, वो दुसरोंके घरोंपर पत्थर नही फेंका करते!'

बुधवार, २४ जानेवारी, २००७

एमपीएससीचे विद्यार्थीभिमुख पाऊल

लोकसत्ता (२४-१-२००७)


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा अर्जाच्या स्वरूपात तसेच ते भरून घेण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची सर्वंकष माहिती देणारी तसेच त्यातच सर्व परीक्षांसाठी सामायिक अर्ज असणारी माहितीपुस्तिका दि. २२ जानेवारी २००७ पासून राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयात कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याविषयी दै. लोकसत्तामध्ये आज, दि. २४ जानेवारी २००७ रोजी प्रकाशित झालेला लेख...



सध्या देशात सुशिक्षित तरुणांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध रोजगार आणि नोकरीच्या संधी यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वयंरोजगार सुरू करण्याची ऐपत किंवा क्षमता असेल, असेही नाही. या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीच्या संधीही कमी असल्या तरी हमखास आणि विश्वासाची म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. स्पर्धा परीक्षा हा त्याचा मार्ग. त्यामुळेच शहरांतील विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या ग्रामीण भागातील गरिबाघरची मुलेही मग शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा मार्ग चोखाळतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. लाखो विद्यार्थी आयोगाच्या भरवशावर आपले उमेदीचे आयुष्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात घालवतात. प्रिलीम पास होईपर्यंत प्रिलीम, ती झाली की मेन्स, मेन्स उडाली तर पुन्हा प्रिलीम, मग पुन्हा मेन्स आणि ती सुटली तर मग इंटरव्ह्यु, असा या परीक्षांचा प्रवास म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एकेक आंदोलनच असते. जो पुढे गेला तो गेला, मागे राहिलेल्यांच्या धडका पुन्हा नव्या जोमाने सुरूच.


या तमाम परीक्षार्थीच्या अभ्यासातील एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे योग्य मार्गदर्शकाचा अभाव. प्रत्येक विद्यार्थ्यालाच भरमसाट फी भरून शहरांतील क्लासेसमध्ये प्रवेश घेणे परवडते, असेही नसते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्टिमेट मार्गदर्शक हा त्याच्या आधी एक दोन वर्षे अभ्यास करणारा विद्यार्थीच असतो. आता त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ट्रॅक कितपत योग्य, हे ज्या त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पाहण्याच्या गांभीर्यावर अवलंबून असते.


नेमकी हीच बाब हेरून आयोगाने आता या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण माहितीपुस्तिका तयार केली आहे. आयोगाच्या वेबसाइटवर यातील बहुतेक माहिती वेळोवेळी प्रदर्शित होत असली तरी फारच कमी विद्याथ्यर्थ्यांना इंटरनेट सेवेचा लाभघेता येत असतो. त्यामुळे एकत्रित स्वरूपात असलेल्या या माहितीपुस्तिकेला महत्त्व आहे. या पुस्तिकेतच आयोगाने आता परीक्षा अर्ज उपलब्ध केला आहे. आता प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळा अर्ज असे स्वरूप न ठेवता सर्व परीक्षांसाठी एकच सामायिक अर्ज असे नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. साधारण आठ भागांत विभागलेल्या या पुस्तिकेच्या पहिल्या भागात आयोगाविषयी, आयोगाच्या कार्यभाराविषयी, आयोगामार्फत नाही. घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची केंद्रे यांची माहिती आहे. दुसऱ्या भागात विविध स्पर्धा परीक्षांची योजना, अर्हता, अभ्यासक्रम, निवडीचे स्वरूप यांची माहिती आहे. तिसऱ्या भागात हा अर्ज मिळण्याची व भरण्याची ठिकाणे, अर्ज करण्याची पद्धत, शुल्क, अर्हता, सर्वसाधारण पात्रता, वयोमर्यादा यांची माहिती आहे. चौथ्या भागात मागासवर्ग, महिला, अपंग, माजी सैनिक, अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू आदींसाठी आरक्षणाविषयी विस्तृत माहिती आहे. तर पाचव्या भागात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, परीक्षेतील गैरप्रकार, उमेदवारीसंदर्भातील बदल, पदग्रहण, परीविक्षा कालावधी वेतन, सेवा प्रवेशोत्तर शर्ती तसेच गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई आदी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. सहाव्या भागात विविध आवेदनपत्रांसोबत सादर करावयाच्या कागदपत्रांसंदर्भात सांगण्यात आले आहे. यामध्ये वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्गीय असल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान, अपंगत्व, माजी सैनिक, पूर्व पाकिस्तानातील खरा स्थलांतरित असल्याचा दाखला, विवाहितांच्या नावात बदल, छायाचित्र, अनुभव आदीविषयी पुराव्यादाखल सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती दिली आहे. पुस्तिकेच्या सातव्या भागात अर्जाची छाननी, अर्ज नाकारण्याची कारणे, विविध परीक्षांच्या गुणांची सीमारेषा, त्यांच्या पडताळणीची पद्धत, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्यक्रमवारी या विद्यार्थ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आठव्या भागात प्रवेश अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन केले आहे तसेच वय, राष्ट्रीयत्व, मागासवर्गीय, अनुभवाचा दाखला आदी विविध अर्जाचे नमुनेही देण्यात आले आहेत.


आयोगाने अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेली ही पुस्तिका राज्यातील सर्व प्रधान डाकघर तसेच जिल्हा व तालुका मुख्यालयांच्या पोस्ट कार्यालयामध्ये पोस्टाच्या कार्यालयीन वेळेत २२ जानेवारी, २००७ पासून कायमस्वरूपी विक्रीसाठी शंभर रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. आयोगाने एखाद्या परीक्षेसाठी जाहिरात दिल्यानंतर त्या परीक्षेसाठी लागू असलेली माहिती तसेच आवेदनपत्रामध्ये सर्व उमेदवारांसाठी लागू असलेली परिपूर्ण माहिती भरून प्रवेश फी व आवश्यक कागदपत्रांसह माहितीपुस्तिकेत नमूद केलेल्या पोस्ट कार्यालयांत विहित कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज मिळविणे तसेच अर्ज भरणे यासाठी अधिक यातायात करावी लागणार नाही.


या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरूपात परीक्षा शुल्क भरून घेण्याची पद्धत आयोगाने बंद केली आहे. आवश्यक किमतीचा कोर्ट फी स्टॅम्पची उपलब्धता असणे, तो मिळविण्यासाठी रांगा लावणे या। गोष्टी आता बंद होतीलच. त्याशिवाय हे स्टॅम्प चुकून लावायचे राहून गेले किंवा मध्येच गहाळ झाल्यास संबंधित परीक्षार्थीला परीक्षेच्या आदल्या दिवशी अर्ज नाकारले गेल्याचे समजायचे आणि त्याच्या संपूर्ण तयारीवर पाणी फिरायचे. यापुढे असा प्रकार होणार नाही. आता संबंधित पोस्ट खात्यात विद्यार्थ्याने रोखीने प्रवेश शुल्क भरावयाचे आहेत. त्याला त्याची पोचही तात्काळ मिळेल. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी जो निर्धारित अंतिम दिनांक असेल, त्या दिवसापर्यंत पोस्टात अर्ज भरून घेण्यात येतील. त्यामुळे अर्ज मुदतीत भरला नाही म्हणून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान यापुढे होणार नाही.


गेल्या डिसेंबरमध्ये कार्बनलेस कार्बन पेपरचा आपल्या परीक्षांसाठी वापर करण्यास सुरुवात करून अधिक पारदर्शी धोरण स्वीकारलेल्या एमपीएससीने नव्या वर्षात अधिकाधिक विद्यार्थीभिमुख धोरण स्वीकारल्याची प्रचीती या माहितीपुस्तिका छापण्याच्या निर्णयातून आली आहे.


ठळक वैशिष्ट्ये


आयोगाच्या सर्व परीक्षा, अभ्यासक्रम, नियम, अर्हता, पात्रता यांची माहिती एकत्रित


सर्व परीक्षांसाठी एकच सामायिक परीक्षा अर्ज


राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांत कायमस्वरूपी उपलब्ध


कोर्ट फी स्टॅम्पऐवजी रोखीने परीक्षा शुल्क स्वीकारणार


विद्यार्थ्यांना तात्काळ पोच मिळणार





- आलोक जत्राटकर

सहायक संचालक (माहिती)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई

शुक्रवार, १४ एप्रिल, २००६

घटना 'शब्दबद्ध' करणारे विल्सन पेन भारतात राहणार की इंग्लंडला जाणार?

(दि. १४ एप्रिल २००६ रोजी दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले विशेष वृत्त...)





कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिखाणासाठी ज्या पेनचा वापर केला, ते पेन भारतात राहणार की इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये जाणार, याचा निर्णय पेनधारकांनी राज्य सरकारवर सोडला आहे.

डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी वापरलेला 'विल्सन पेन' सध्या अखिल भारतीय दलित पँथर चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण कांबळे यांच्याकडे आहे. 'राज्य सरकारला हा पेन हवा असेल तर डॉ. आंबेडकर यांचा पूर्ण आदर राखून मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव दयावे,' अशी त्यांची अपेक्षा आहे. या अपेक्षेमागील कारण स्पष्ट करताना डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर येथील लॉ कॉलेजचे प्राचार्य होते. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्यही होते. आधी आपण त्यांचा आदर राखला पाहिजे. सरकारला जर हा पेन हवा असेल तर त्यांनी तत्पूर्वी मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव दयावे. ही मागणी मान्य झाली नाही तर ब्रिटिश म्युझियमकडे हा पेन सुपूर्द करण्याचा त्यांचा विचार आहे. त्या दिशेने त्यांची चर्चाही सुरू आहे. 'ब्रिटीश म्युझियममध्ये हा पेन शंभर टक्के सुरक्षित राहील, याची मला खात्री आहे.' असेही ते म्हणाले.

या पेनखेरीज त्यांच्याकडे गोलमेज परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांनी नेलेली पर्स तसेच अन्य चीजवस्तूही आहेत; मात्र हा पेन सर्वाधिक मौल्यवान असल्याचे त्यांचे मत आहे.